Home Blog Page 39

डॉ. योगेश क्षीरसागर भाजपात, बीडच्या न.प‌.निवडणुकीला कलाटणी

0

बीड —  नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर व डॉ.सारिका क्षीरसागर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भाजपात रविवारी (दि.१६) प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तसेच राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. क्षीरसागर दाम्पत्याने घेतलेला निर्णय ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बीड नगरपालिकेच्या राजकारणाला डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे कलाटणी मिळाली आहे. न प निवडणुकीत बीडमध्ये व्हेंटिलेटर वर असलेली भाजपा पक्षप्रवेशामुळे प्रबळ बनली आहे. याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपला याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे.डाॉ. क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशावेळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण व पशुसंवर्धन पंकजाताई मुंडे यांनी क्षीरसागर दाम्पत्याचे भाजपात स्वागत केले. कार्यक्रमाला भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, नगरसेवक शुभम धूत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. भाजपमध्ये प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, “पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजाताई मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू होती. आता आम्ही भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहोत. बीड नगरपरिषदेसाठी जागा महिलांसाठी राखीव आहे, त्यानुसार आम्ही निवडणूक लढवू. भाजप आणि आमचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतील.” राष्ट्रवादी सोडण्यामागे काही कारणे होती, आता मोकळा श्वास घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, “बाहेरचे लोक बीडमध्ये येऊन वेगवेगळ्या निवडणुकीत प्रयोग करत आले, परंतु बीडकरांनी ते सातत्याने हाणून पाडले. हा प्रयोगही बीडकर हाणून पाडतील आणि स्वाभिमान जपतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीसाठी भाजप संपूर्ण ताकद देणार

डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे ह्या संपूर्ण ताकद देणार असून खंबीरपणे पाठीशी उभा राहणार असल्याचा शब्द देखील त्यांनी दिला आहे.

माजलगाव: डांबलेल्या जळगावच्या 30 मजुरांची सुटका

0

माजलगाव — जळगाव जिल्ह्यातील सुमारे 30 ऊसतोड मजुरांना माजलगाव तालुक्यातील कवडगावथडी येथे डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मजुरांकडून जबरदस्तीने वेठबिगारी करून घेतली जात होती आणि त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे
जळगावच्या मजुरांना डांबून ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळताच त्यांच्या निर्देशानुसार तातडीने मोहिम राबवून सर्व मजुरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात तक्रारदार सखाराम तुकाराम सोनवणे वय 25 वर्ष, रा. धरणगाव जि. जळगाव, सध्या रा. कवडगावथड यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ते पत्नी, दोन मुली, आई यांच्यासह मजुरी करून उपजीविका चालवतात. दसऱ्यानंतर दोन दिवसांनी ऊसतोड मुकादम बाळु मगरे रा. पाथरवाडा, जि. जालना यांनी त्यांचा भाऊ देवाजी सोनवणे याला ऊसतोडीसाठी नेले. त्यानंतर सखाराम यांना फोन करून “तुम्ही कवडगाव येथे लगेच या, नाही आलात तर तुमचा भाऊ सोडणार नाही.”अशी धमकी दिली. यानंतर सखाराम यांच्यासह कुटुंबातील ज्योती, संगीता, पद्माबाई, दिपाली, रुपाली सोनवणे यांसह इतर 8-10 जणांनी 6 ऑक्टोबर रोजी कवडगावथडी गाठले. तिथे आधीपासून देवाजी सोनवणे आणि इतर 20-22 जणांसह एकूण तीस मजूर डांबून ठेवलेले होते.तेथे सोमेश्वर आबा आणि त्याचा मुलगा गणेश यांनी “ट्रॅक्टर भरा, काम करा, नाही तर हातपाय बांधून गंगेत फेकून देऊ.” अशा धमक्या देत शिवीगाळ केली. मजुरांना जेवणही दिले नाही. फड मालकांनी दिलेलेच जेवण खाऊन त्यांना काम करावे लागत होते. मुकादम बाळु मगरे उचल रक्कम न देता मजुरांना सतत कामाला लावत होता. सोबत असलेल्या लहान मुलांनाही ऊसतोडीचे काम करायला लावण्यात आले.
दरम्यान 14 नोव्हेंबर रोजी काम सुरु असताना तहसिलदार, पोलीस अधिकारी, जळगावमधील अधिकारी तसेच महिला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तीसही मजूरांची सुटका करून तहसील कार्यालयात सुरक्षितपणे हलवले.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात मुकादम बाळु मगरे, ट्रॅक्टर मालक सोमेश्वर आबा, त्याचा मुलगा गणेश अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर करीत आहेत.

ग्रामपंचायत कार्यालयात घुसून कागदपत्र अज्ञाताने जाळली!

0

आष्टी — ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कागदपत्र पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे उघडकीस आली. या आगीत महत्त्वाचे दस्तऐवज फाईल व 40 ते 45 रजिस्टर जळून खाक झाले. दारूच्या नशेत हा प्रकार घडला असल्याचं सांगितलं जात असून अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे ‌
सुलेमान देवळा येथील एका दारूने झिंगलेल्या व्यक्तीने शुक्रवारी रात्री हातात कुर्‍हाड घेऊन ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.महत्त्वाचे दस्तऐवज अस्ताव्यस्त करत पेटवून दिले. या लावलेल्या आगीत 40ते 45 रजिस्टर व महत्वाचे दस्तऐवज,फाइल जळून खाक झाले. अशी माहिती गावकऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी त्र्यंबक मुळीक यांना दिली.दरम्यान, आज ग्रामविकास अधिकारी मुळीक, सरपंच दादा यदु घोडके, अतुल पोपट घोडके, भिमराव सुखदेव भादवे, सचिन भगवान खोरदे, नवनाथ,एकनाथ भोजे या पंचाच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी मुळीक यांनी सांगितले.सरपंचाकडून आर्थिक पिळवणूक
येथील सरपंच हे वैयक्तिक कामासाठी व घरकुलाच्या हप्त्यापोटी पैशाची मागणी केल्याशिवाय हप्ता देत नाहीत. त्याच्याकडून सातत्याने मनमानी कारभार सुरू आहे. तसेच गेल्या तीन वर्षापासून ग्रामसभा न झाल्यामुळे, आपली व्यथा मांडायची कोणापुढे या भावनेतून कदाचित एखाद्या ग्रामस्थांने हि घटना केली असावी, असे समाजसेवक परमेश्वर घोडके यांनी सांगितले.

डॉ. योगेश क्षीरसागरांचा (ना)राजीनामा

0

बीड — न.प‌ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख दोन दिवसांवर आलेली असतानाच अजित पवारांची राष्ट्रवादी बंडाळीच्या फेऱ्यात अडकली आहे. स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याच्या कारणावरून डॉ. योगेश क्षीरसागर यांनी बीड विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात बंडाळीचे ग्रहण लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची 17 नोव्हेंबर शेवटची तारीख असली तरी बहुतांश राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले नाहीत.त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र अमरसिंह पंडितांच्या शिवछत्र मधून हलवली जात आहेत. त्यातूनच क्षीरसागर मुक्त नगरपालिका असा नारा ही समाज माध्यमातून दिला जात आहे. अशावेळी डॉ. योगेश क्षीरसागर यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून देखील वगळण्यात आले.
डॉ. योगेश क्षीरसागर यांना साईडलाईन करत न.प. निवडणुकीची रणनीती आणि उमेदवार निश्चिती पंडितांच्या शिवछत्र च्या मार्गदर्शनाखाली सुरु केली आहे. या सर्व अन्यायाची माहिती डॉ .योगेश क्षीरसागर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वारंवार सांगितली. मात्र तरीदेखील यामध्ये कुठलाच बदल झाला नाही. परिणामी फेसबुक वर “विकास हाच धर्म, विकास हीच जात” असा नारा देत कव्हर फोटो बदलला आहे. यामध्ये दिवंगत केशरबाई क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर व चुलते जयदत्त क्षीरसागर यांचे फोटो ठेवले आहेत.
एवढ्यावरच ते डॉ. योगेश क्षीरसागर थांबले नाहीत तर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून डावलल्याची खंत व्यक्त करत बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे दिला आहे. दरम्यान बीड नगरपालिकेवर क्षीरसागर घराण्याचं आज पर्यंत वर्चस्व राहिलेलं आहे.डाॅ. भारत भूषण क्षीरसागर व नगराध्यक्षपद इतकं समीकरण जुळलं होतं की त्यांचं नावच जनतेने अध्यक्ष साहेब असच ठेवलं होतं. डॉ. योगेश क्षीरसागर बीड नगरपालिकेत “एकला चलो “ची भूमिका घेतात की भाजपची वाट पकडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दीड लाखाच्या बैलचोरीचा बनाव अंगलट, तक्रारदारच बनला आरोपी

0

बीड — बैलजोडी चोरीला गेली आहे असा बनाव तयार करून पोलिसात खोटी तक्रार देणाऱ्या पिंपरखेड येथील दोन भावा विरोधात वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. जिल्ह्यात खोट्या तक्रारी देऊन पोलिसांना कामाला लावण्याचे प्रकार उघडकिस आल्यानंतर पोलिसांनीही फिर्यादीवरच गुन्हे दाखल केल्यामुळे अशा प्रकारांना आळा बसला होता. दरम्यान वडवणी पोलिसांमध्ये पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला आहे. पिंपरखेड येथील संपत त्रिंबक निपटे व त्याचा भाऊ मदन निपटे यांनी दीड लाख रुपये किमतीची बैलजोडी चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल केली. चोरीची घटना घडून इतके दिवस तुम्ही तक्रार देण्यासाठी का आला नाहीत तसेच बैल जोडी संदर्भात आर्थिक व्यवहार काही होता का? अशी विचारणा देखील एपीआय वर्षा व्हगाडे यांनी वारंवार तक्रारदाराकडे केली होती.
पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्र फिरवली असता सदर बैलजोडी ही श्रीकांत चंद्रकांत मगर, राहणार भावठाणा , तालुका आंबेजोगाई,बीड या शेतकऱ्याकडे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी त्यास समक्ष पोलीस ठाणे येथे बैल जोडीसह आणले. यावेळी श्रीकांत मगर यांनी ही बैल जोडी बाबाराव डाके, राहणार टकारवाडी, तालुका माजलगाव, याचे कडून विकत घेतल्याचे सांगितले, त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री टकारवाडी,येथे जावून बाबाराव डाके यांचेकडे चौकशी केली असता, त्याने ही बैल जोडी तक्रारदार संपत निपटे
राहणार पिंपरखेड,यास पैसे देऊन विकत घेतली, असे सांगितले त्यानंतर पोलिसांनी पुन्हा विश्वासात घेऊन तक्रारदाराची चौकशी केली असता त्यानेच हा बैलचोरीचा खोटा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे सदर तक्रारदार संपत नीपटे व त्यांचे भाऊ मदन निपटे यांचे विरोधात पोलीस ठाणे वडवणी येथे पोलीस अंमलदार नितीन काकडे यांचे सरकारतर्फे फिर्यादीवरून “सर्व परिस्थिती माहिती असताना देखील पोलिसांचे कायदेशीर अधिकाराचा गैरवापर करण्यासाठी पोलिसांना खोटी माहिती देवून त्यांची दिशाभूल करने या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी श्रीकांत मगर या शेतकऱ्यास ही बैलजोडी परत केल्याने त्याने त्यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी वडवणी पोलिसांचे आभार मानले व कोणत्याही नागरिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करू नये, असे आवाहन वडवणी पोलिसांनी केले आहेत.

दिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने पकडला

0

सोने चांदी नगदी सह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

बीड — दिवसाढवळ्या घरफोडीसह दरोडा चोरी खून यासारख्या 20 हून अधिक गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. त्याच्याकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड झाले असून चोरीचा साडेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ‌
याबाबत अधिक माहिती अशी की, विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला तसेच यापूर्वी मकोका अंतर्गत कारवाई झालेला आरोपी संदीप ईश्वर भोसले रा. बेलगाव ता. कर्जत जि.अहिल्यानगर हा गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन फाटा येथील हॉटेलवर जेवणाचे पार्सल घेण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना मिळाली. तात्काळ त्यांनी पोउपनि. श्रीराम खटावकर यांची टीम रवाना केली. या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला असता संदीप भोसले हा जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आला. मात्र पोलिसांचा संशय आल्यामुळे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ झडप घालत त्याला जेरबंद केले.परंतु संदीप भोसले याला मोटार सायकल वरून घेऊन आलेला भगवान ईश्वर भोसले याने उसाच्या शेताचा आधार घेत पळून जाण्यात यश मिळवले. पकडलेल्या संदीप भोसले ला पोलिसांनी विचारणा केली असता पिंपळनेर, नेकनूर व शिरूर भागात आपला भाऊ भगवान भोसले च्या मदतीने दिवसा घरफोडी केल्याचे कबूल केले. आरोपी संदीप भोसले याच्याकडून चोरून नेलेल्या मुद्देमाला पैकी चार लाख 41 हजार 100 रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने व नगदी तसेच गुन्ह्यात वापरलेली 90 हजार रुपये किमतीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली. पुढील तपास कामी पिंपळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.‌ पिंपळनेर पोलीस ठाण्यात संदीप भोसले याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कावत पोलीस उपाधीक्षक सचिन पांडकर, पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज जारवाल,पोनि श्रीराम खटावकर, पोह. सोमनाथ गायकवाड अशोक दुबाले बाळू सानप राहुल शिंदे विकास राठोड अंकुश वरपे आश्पाक सय्यद मनोज परजणे विकी सुरवसे नितीन वडमारे सिद्धार्थ मांजरे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामगिरी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

15 लाखाची लाच घेताना लिपिकाला अटक; न्यायाधीशही अडकले

0

माझगाव — दिवाणी सत्र न्यायालयातल्या लिपिकाने 15 लाख रुपयांची लाच स्वीकारली. याशिवाय लिपिकानं अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना काॅल करून‌ रक्कम स्वीकारू का विचारलं, त्यावर न्यायाधीशांनी देखील संमती दिली.यामुळे आता लिपिकासह न्यायाधीशांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिकासह न्यायाधीश लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लिपिक चंद्रकांत हनमंत वासुदेव याला 15 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. तक्रारदाराच्या बाजूनं निकाल लावण्यासाठी क्लार्कने 25 लाखांची मागणी केली होती. त्यानं पैसे घेताच फोन लावला आणि न्यायाधीशांनीही ते घेण्यासाठी संमती दिली. आता या प्रकरणी न्यायाधीशांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीची जागा बळजबरीने ताब्यात घेतल्याचा वाद गेल्या 10 वर्षांपासून न्यायालयात चालू आहे. याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे पण केस दिवाणी सत्र न्यायालयात वर्ग केली होती. 9 सप्टेंबरला कोर्टात गेल्यावर लिपिकानं तक्रारदाराशी संपर्क साधला. यानंतर निकाल बाजूने लावण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली.
न्यायाधीशांच्या माध्यमातून निकाल तुमच्या बाजूने लावतो म्हणून २५ लाख मागितले. यातले १० लाख मला आणि १५ लाख न्यायाधीशांना द्यावे लागतील असं सांगितलं. यानंतर सतत कॉल करून पैशांची मागणी केली. पण इतके पैसे देणं शक्य नसल्यानं तक्रारदाराने थेट एसीबीकडे तक्रार केली.
लिपिक वासुदेव यानं शेवटी 25 ऐवजी 15 लाखांवर तडजोड केली. यासाठी सापळा रचून 11 नोव्हेंबरला त्याला अटक केली. अटकेनंतर वासुदेवनं न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी यांना कॉल करत लाचेची रक्कम स्वीकारल्याचं सांगितलं. न्यायाधीशांनी संमती दर्शवताच पोलिसांनी वासुदेवसह काझींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी न्यायाधीशांच्या अटकेसह घराची झडती घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे

जमीन हरवलेल्या अशोक लोढांच्या हातात भाजपाची मदार; कसा मिळणार भाजपाला जनाधार?

0

बीड — नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट वगळता भाजपची स्थिती दयनीय आहे. अशावेळी स्वतःची राजकीय जमिन हरवलेल्या अशोक लोढांच्या हातात निवडणुकीची मदार सोपवल्यामुळे दयनीय स्थितीत आणखीनच भर पडली आहे. आशा अवस्थेत भाजपाला नगरपालिकेत कितपत जनाधार मिळेल याबाबत मात्र शाशंकता व्यक्त केली जात आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुकांमधून भाजप विजय मिळवत असला तरी बीडमध्ये मात्र फारशी परिस्थिती चांगली असल्याचं दिसत नाही. अनेक वार्डांमधून उमेदवार मिळेल की नाही याची चिंता निर्माण झाली आहे. त्यातच बीड नगरपालिकेत क्षीरसागर घराण्याचं वर्चस्व राहिलेला आहे. अशावेळी इच्छुक उमेदवारांचा कल देखील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडेच आहे. विशेष म्हणजे शहराची जबाबदारी देखील भाजपने स्वतःचीच राजकीय जमीन हरवलेल्या व्यक्तीच्या हातात दिली आहे. एक तर भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची वाणवा त्यातच अशोक लोढा सारख्या माणसाच्या हातात निवडणूक सोपवली अथवा तसा निर्माण केलेल्या आभासामुळे या दयनीय परिस्थितीत आणखीनच भर पडली आहे. त्यातच पुन्हा जैन धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमात धुडगूस घालून जितेंद्र बोरा यांना केलेली मारहाण भाजपच्या संस्काराला न शोभणारी असल्याने बीड शहरातला शांततेचा स्वीकार करणारा वर्ग भाजपपासून या निवडणुकीत दुरावला जाण्याची शक्यता आणखी वाढली आहे. चौसाळा जिल्हा परिषदेतून प्रबळ उमेदवार लढतीला नसल्यामुळे नाविलाजास्तव म्हणून जनतेने अशोक लोढा यांच्या पदरात विजयाचं माप टाकलं होतं. विजयानंतर त्यांची पाच वर्षाची वाटचाल देखील विकासाच्या दृष्टीने निराशाजनकच ठरली. त्यामुळे त्यांच्या चौसाळा भागातच जनतेत फारसं स्थान राहिलेलं नाही.अशा राजकीय जमीन हरवलेल्या व्यक्तीच्या हातात भाजप नेतृत्वाने मदार सोपवली असेल तर ती भाजपाच्या भवितव्याला घातक ठरणारी असेल असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

वाळू माफियांचा महसूल पथकावर हल्ला; दोन आरोपींना अटक

0

आष्टी — हिंगणी जवळील सिना नदीपात्रात महसूल पथकाने छापा टाकल्यानंतर आणि बेकायदेशीर उत्खननात सहभागी असलेल्या वाहनांना जप्त केल्यानंतर वाळू माफियांनी एका महिला अधिकाऱ्यासह महसूल विभागाच्या पथकावर हल्ला केला आहे.बुधवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांनी एका अधिकाऱ्याला लोडर वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला वेळीच वाचवले. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आष्टी तालुक्यातील हिंगणीजवळील सीना नदीच्या पात्रातून बेकायदेशीर वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार वैशाली पाटील यांनी त्यांच्या पथकासह छापा टाकला. कारवाईदरम्यान, एक बॅकहो लोडर मशीन, तीन ट्रॅक्टर, एक ट्रॅक्टर ट्रॉली आणि ३० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. ज्यांची एकूण किंमत ५१ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. जप्त केलेल्या वस्तू महसूल विभागाचे पथक तहसील कार्यालयात नेत असताना, आष्टी शहरात एका पांढऱ्या कारने त्यांचा मार्ग अडवला.

जप्त केलेली वाहने आणि साहित्य परत मिळवण्यासाठी तीन जणांनी गाडीतून उतरून तहसीलदार पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. एका हल्लेखोराने बॅकहो लोडर वाहन चालवणाऱ्या तलाठी सचिन तेलंग यांना ढकलले. तर, दुसऱ्याने साक्षीदार सूरज कोकणे यांना ढकलले. त्यानंतर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराने लोडर वाहन थेट तेलंगकडे वळवून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तथापि, महसूल पथकाच्या इतर सदस्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेल्याने ते वाचले.

दरम्यान, दोन कारमधून आणखी चार जण घटनास्थळी पोहोचले आणि जप्त केलेले ट्रॅक्टर रोखण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या गोंधळात हल्लेखोरांनी तलाठी प्रवीण शिंदे यांच्याकडून जप्त केलेला एक ट्रॅक्टर जबरदस्तीने घेऊन जाण्यात यश मिळवले. पोलिसांच्या माहीतीनुसार, महसूल पथकाला अखेर बॅकहो लोडर वाहन आणि त्याचा चालक महेश आसावर यांना पकडण्यात यश आले. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा;निवडणूक आयोगानं ‘पिपाणी’ चिन्ह वगळलं

0

मुंबई — लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या “पिपाणी”(ट्रंपेट) या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा फटका बसला होता. दरम्यान शरद पवार यांनी या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांच्या यादीतून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मशाल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवण्यात आले आहे. या निवडणुकी दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत राजकीय पक्षांसह मान्यता असलेल्या चिन्हांची यादी जारी केली आहे. त्यातून पिपाणी चिन्ह हटवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आले होते. पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसला होता. अपक्षांना दिलेल्या पिपाणी चिन्हामुळे साताऱ्यात शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला होता. विधानसभा निवडणुकीतही पिपाणी आणि तुतारी चिन्हांमध्ये मतदारांचा घोळ झाल्याने 9 ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार पराभूत झाल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”निवडणूक चिन्हातून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार..! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा खूप मोठा फटका आम्हाला सहन करावा लागला. हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता तर आजचं चित्र खूप वेगळं असतं…! पण असो! देर आए दुरुस्त आए..!” असे रोहित पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या चिन्हामुळे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मोठा गोंधळ निर्माण झाला, त्याची राजकीय किंमत पक्षाला चुकवावी लागली होती. हा निर्णय जर आधीच घेतला गेला असता, तर आज महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय चित्र नक्कीच वेगळं असतं.

शेवटी, उशिरा सुचलेलं शहाणपण अस याला म्हणावं लागेल. निवडणूक चिन्हातून ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ हे चिन्ह कायमचे वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार! हा निर्णय लोकशाही आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी एक सकारात्मक पाऊल असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली आहे.