Home Blog Page 40

एसटी महामंडळाच्या एनसीएमसी कार्ड प्रकल्पाला ब्रेक; 60 पैकी 57 एजंट्सचे आयडी प्रलंबित

0

लाखोंची गुंतवणूक अडकली, सवलतीपासून नागरिकही वंचित

बीड — महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) आणि एबीक्स कॅश प्रा.लि. यांच्यातील करारानुसार महामंडळाच्या बसमधून सवलतीत प्रवास करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या नॅशनल कॉमन मोबिलिटी (एनसीएमसी) कार्ड वितरण प्रकल्पाला बीड जिल्ह्यात अक्षरशः ब्रेक लागल्याचे चित्र समोर आले आहे.
जिल्ह्यातील एजंट्सनी मोठ्या अपेक्षेने व आर्थिक गुंतवणुकीसह या योजनेत सहभाग घेतला असतानाही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प रखडल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात एकूण 60 एजंट्सनी  कार्ड सुविधेसाठी नोंदणी केली आहे. या सर्व एजंट्सनी आवश्‍यक असलेले मशीन व आयडी शुल्क ‘एचजेआर प्रा. लि.` मार्फत संबंधित विभागाकडे नियमानुसार सुमारे 30 हजार जमा केले आहेत. जे ना परतावा आहेत. अनेक एजंट्सनी या प्रक्रियेसाठी कर्ज काढून किंवा वैयक्तिक बचत वापरून गुंतवणूक केली असल्याचेही समजते. मात्र, रक्कम भरून बराच कालावधी उलटूनही केवळ 7 एजंट्सचे आयडी कार्यान्वित झाले असून, उर्वरित तब्बल 57 आयडी अजूनही पेंडींग अवस्थेत आहेत. त्यामुळे एजंट्समध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विलंबामुळे एजंट्सना अपेक्षित व्यवसाय सुरू करता आलेला नाही. मशीन निष्क्रिय अवस्थेत पडून असून गुंतवलेली रक्कम अडकली आहे. परिणामी अनेक एजंट्स आर्थिक अडचणीत सापडले असून, काहींवर कर्जाचा ताणही वाढत आहे. यासोबतच, प्रवाशांनाही या प्रकल्पाचा फटका बसत आहे. एनएमसी कार्डच्या माध्यमातून कॅशलेस आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार होती, मात्र प्रकल्पच रखडल्यामुळे प्रवाशांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. एजंट्सच्या मते, एबीक्स कॅश प्रा.लि.तसेच संबंधित तांत्रिक विभागाकडून कामाला अपेक्षित गती मिळत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, संतप्त एजंट्सनी एस.टी. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदन सादर करून या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. उर्वरित 57 एजंट्सचे आयडी व मशीन लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देत प्रलंबित कामे पूर्ण केली नाहीत, तर एजंट्सकडून आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे. त्यामुळे आता एस.टी. महामंडळ आणि संबंधित कंपनी या प्रश्‍नावर कितपत गांभीर्याने पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उशिरा नोंदणी करून जास्तीचे पैसे देवून आयडी घेतले
काही एजंटानी नंतरच्या काळात नोंदणी केली आणि जास्तीचे पैसे दिल्याने अशा एजंटांना तात्काळ आयडी सुरू करून देण्यात आले आहेत, असे सांगितले जात आहे. आयडी मिळविण्यासाठी नियमानुसार 30 हजार फी आकारण्यात आलेली आहे मात्र काह एजंटांनी 40 ते 45 हजार रूपये देत आयडी मिळविले आहेत. याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महसूल खात्याचा ऐतिहासिक 7/12 घोटाळा उघडकीस लाखो शेतकरी फसवले गेले

0

मुंबई — महाराष्ट्राच्या महसूल खात्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा उघड झाला आहे, अशी धक्कादायक माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली ७/१२ उताऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

बावनकुळेंनी दिलेल्या माहिती नुसार, महसूल विभागाच्या कलम १५५ चा गैरवापर करून सुमारे एक ते दीड लाख शेतकऱ्यांना फसवण्यात आले. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये त्यांची संमती न घेता बदल करण्यात आले, मालकी हक्कांवर परिणाम झाला आणि काही ठिकाणी बेकायदेशीररित्या जमीन हस्तांतरणही झाले. या गंभीर प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, या मुद्द्यावर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून महसूल अधिकाऱ्यांकडून अधिकारांचा गैरवापर होत असल्याचे सांगितले. त्यांनी नमूद केले की, दुरुस्तीच्या नावाखाली अधिकारी फेरफार करतात आणि शेतकऱ्यांना वारंवार दिरंगाईचा सामना करावा लागतो.

या सर्व प्रकरणावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक तक्रारी समोर आल्या आणि कलम १५५ चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे स्पष्ट झाले. “केवळ शुद्धलेखन दुरुस्त करण्यासाठी असलेले हे कलम वापरून मालकी हक्कांमध्ये बदल करण्यात आले, ज्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाला आणि गरीब शेतकऱ्यांची फसवणूक झाली,” असे त्यांनी सांगितले.पुणे जिल्ह्यात जुलै-ऑगस्ट २०२५ दरम्यान हा प्रकार उघडकीस आला असून, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालात महसूल प्रशासनातील गंभीर त्रुटी उघड झाल्या. अनेक प्रकरणांत मूळ मालकाची परवानगी न घेता ७/१२ उताऱ्यांमध्ये बदल करण्यात आले तसेच बिगरशेती प्रक्रियेतही अनियमितता आढळून आली.

बावनकुळे यांनी सांगितले की, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. राज्यभरातील सर्व संशयित नोंदी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून पुढील सात दिवसांत कारवाई सुरू केली जाईल. “कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

महिलांच्या बचत गटांना अवजार बँकांसाठी २४ लाखांपर्यंत अनुदान

0

प्रत्येक गावातील फक्त एकाच गटाला लाभ

बीड — नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा) दुसऱ्या टप्प्याअंतर्गत, बीड जिल्ह्यातील महिला बचत गटांना कृषी व्यवसायात प्रगती साधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. या योजनेअंतर्गत, ग्राम पातळीवर ‘कृषी अवजार बँक’ स्थापन करण्यासाठी प्रकल्पाच्या मूल्याच्या ६० टक्क्यांपर्यंत आणि कमाल २४ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक- आत्मा, सुभाष साळवे यांनी यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

प्रकल्प गावांमधील उमेद, माविम व आत्मा पुरस्कृत आणि इतर महिला बचत गट तसेच महिलांच्या ग्राम संघटना या उपक्रमासाठी पात्र असतील. लाभ मिळवण्यासाठी, संबंधित गटामध्ये वेगवेगळ्या कुटुंबांतील किमान १० सदस्य असणे आवश्यक आहे. तसेच, ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला आहे, त्यांना या योजनेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही.

प्रत्येक गावातील केवळ एकाच महिला गटाला या योजनेचा लाभ दिला जाईल. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास, लाभार्थ्याची निवड सोडत पद्धतीने केली जाईल. जर प्रकल्पाचे मूल्य २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर राष्ट्रीयीकृत बँकेकडून ७५ टक्के कर्ज घेणे बंधनकारक असेल. निवडक गटांना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर-चलित अवजारे, बीबीएफ यंत्रे, लागवड आणि पेरणी यंत्रे, मल्चिंग यंत्रे, कंबाईन हार्वेस्टर आणि फवारणी पंप यांसारखी आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करता येईल.
इच्छुक महिला बचत गटांनी ५ एप्रिलपर्यंत प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर https://dbt-ndksp mahapocra.gov.in/
ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावेत.अधिक माहितीसाठी, प्रकल्प गावातील समूह सहाय्यक आणि स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक ‘आत्मा’ सुभाष साळवे यांनी केले आहे.

माझ्याकडे का बघतोस ? म्हणून एकाला बेदम मारहाण

0

केज — माझ्याकडे बघतोस काय म्हणत एकाला तिघाजणांनी लाकूड लोखंडे राॅड व केबलने एकास बेदम मारहाण केल्याची घटना कुंबेफळ येथे घडली.

कुंबेफळ येथील निसार शेख हे १५ मार्च रोजी सकाळच्या सुमारास त्याच्या घरासमोर एका विक्रेत्याशी बोलत होते. तेव्हा रोहित दीपक थोरात हा त्याच्या मोटार सायकलवरून तेथून जात होता. तो निसार शेख यांना म्हणाला माझ्याकडे काय बघतोस ? मी तुला जिवंत सोडणार नाही. अशी त्याने धमकी दिली, म्हणून त्यांचे भांडण सोडविण्यासाठी निसार शेखची पत्नी आणि मुलगा समजावून सांगत असताना त्याने स्त्री वर्गास लज्जा उत्पन्न होईल; अशी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत निघून गेला.त्यानंतर पंधरा मिनिटांनी रोहित थोरात त्याचा भाऊ स्वप्नील थोरात आणि ज्ञानेश्वर थोरात हे पुन्हा भांडण करण्याच्या उद्देशाने तेथे आले. त्यावेळी रोहित याच्या हातात लोखंडी रॉड , त्याचा भाऊ स्वप्नील थोरात याच्या हातात केबल वायर आणि ज्ञानेश्वर थोरात याच्या हातात लाकूड होते. त्यांनी घरात घुसून निसार शेख याला बेदम मारहाण केली. यावरही त्यांचे मन भरले नाही शेवटी निसार शेख यांना घराबाहेर ओढत आणून लोखंडी राॅड, केबल व लाकडाने जीवघेणा हल्ला केला. रोहितने त्याच्या हातातील लोखंडी रॉड निसार याच्या डोक्यात आणि हातावर मारून मांडीत घुसविल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. याचवेळी स्वप्नील त्याला केबल वायरने आणि ज्ञानेश्वर लाकडाने मारहाण करीत होता. या मारहाणीचे व्हिडिओ काढीत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी निसारच्या शेख याच्या पत्नीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत पळून गेले.

नातेवाईकांच्या मदतीने निसार शेख यास उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोपचार करून अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान निसार शेख यांची पत्नी शाहीन शेख हिच्या तक्रारी वरून रोहित दीपक थोरात त्याचा भाऊ स्वप्नील दीपक थोरात आणि ज्ञानेश्वर अशोक थोरात या तिघांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात कलम १०९, ११८(१), ११८(२), ३९६, ३२९(३), ३३३, ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

“भूगोल”च्या प्रश्नपत्रिका फुटल्या, दहावीचा पेपर होणारच !

0

पुणे  — राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा उद्या होणारा भूगोलाचा पेपर  दिलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सांगोल्यात  दहावीच्या परीक्षेदरम्यान भूगोलाचे 50 पेपर चोरी गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली होती.या संपूर्ण घटनेचा अहवाल पुणे बोर्डाने मागितला होता. त्यामुळे, उद्याच्या परीक्षेवर आणि बोर्डाच्या पेपरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, उद्या 10 वी बोर्डाचा भूगोल विषयाचा पेपर होणार की नाही असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला होता. मात्र, बोर्डाने  दहावीचा पेपर वेळापत्रकानुसार होणार असं जाहीर केलं आहे.

उद्या दहावीचा भूगोलाचा पेपर शेड्युलनुसारच होणार आहे, विद्यार्थ्यांनी तयारी करून शांतपणे पेपर सोडवावा असे आवाहन पुणे एसएससी बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केले आहे. सांगोल्यातून उद्या होणाऱ्या भूगोलाच्या 50 पेपरची आज सकाळी चोरी झाली होती. त्यामुळे उद्याच्या पेपरबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती. मात्र, उद्या ठरलेल्या वेळेप्रमाणेच भूगोलाचा पेपर होणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आलेले आहे.

दरम्यान, बोर्डाने पेपर घेण्याचा निर्णय घेतल्याने दहावीच्या भूगोलाच्या पळवून नेलेल्या 50 पेपरचे झेरॉक्स, फोटो कोणी काढले असेल आणि ते जर व्हायरल केले असेल तर त्याची जबाबदारी बोर्ड स्वीकारणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सांगोला येथील बोर्डाचे पेपर चोरीप्रकरणी प्रभारी शिक्षणाधिकारी सुयोग नवले, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांचेवर ठपका ठेवत शिक्षण विभागाने त्यांचे तडकाफडकी निलंबित केले आहे. याशिवाय या इथे सुरक्षेवर असणारे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्याबाबतच्या अहवालानुसार त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई होणार आहे. दरम्यान, उद्याचा बोर्डाचा भूगोलाचा पेपर ठरल्यावेळी प्रमाणेच घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी शांतपणे पेपर सोडविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

बीडच्या मजूरांनी बूर्ज खलिफा व्हाइट हाऊस मध्ये काम केले मृतांना अनूदान दिले कोनाळेच्या कामगिरीने सभागृह गाजले

0

बीड — जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याण विभागातील घोटाळ्यांच्या एक ना अनेक प्रकरणांनी सभागृह गाजले.मृत कामगारांना जिवंत दाखवून त्यांच्या नावे अनुदान दिल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. दहा वर्षापुर्वी मरण पावलेल्या व्यक्तीला नगर परिषदेतील अधिकाऱ्यांनी जिंवत दाखवून त्याने चक्क शंभर दिवस काम केल्याचे कागदोपत्री दाखवले.त्यानंतर त्याच व्यक्तीला पुन्हा मृत दाखवून त्याच्या कुटुंबियांना दोन लाख तीस हजार रुपयाचे अनुदान मिळवून दिले. अनेक कामगारांनी तर बुर्ज खलिफा, व्हाईट हाऊस मध्ये काम केल्याचे कागदोपत्री दाखवले याचा भांडाफोड भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केला.

बीड जिल्ह्यात अशी शंभर प्रकरण समोर आली आहेत, आणखी एवढीच प्रकरण घडल्याचा अंदाज आहे. काही कामगार हे बुर्ज खलिफा आणि व्हाईट हाऊसमध्ये काम करून आल्याचे देखील नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर नोंदी आहेत.या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता सचिव स्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करून चौकशी करावी तसेच दोषी अधिकाऱ्यांकडून घोटाळा झालेली कोट्यवधीची रक्कम वसुल करावी, अशी मागणीही सुरेश धस यांनी केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून बीडमधील बांधकाम कामगार विभागातील हा घोटाळा चव्हाट्यावर आणला.

2020 ते 2026 दरम्यानच्या अर्जांमध्ये मृत व्यक्तींना जिवंत दाखवून 100 दिवस काम केल्याचे घोषणापत्र दिल्याचे आणि पुन्हा मृत दाखवून वारसांना सुमारे 2.30 लाख रुपयांचे अनुदान दिल्याचे उघड झाले आहे. 2013 मध्ये मृत झालेल्या व्यक्तीला 2023 मध्ये कामगार दाखवण्याचा प्रतापही नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका आणि काही ग्रामपंचायतींमध्येही घडला आहे.

अशा 100 ते 200 संशयास्पद प्रकरणांसह काही नोंदींमध्ये व्हाईट हाऊस व बुर्ज खलिफा येथे काम केल्याचेही दाखवले गेले आहे. हा प्रकार कोट्यवधींचा घोटाळा असून बोगस कागदपत्रे व अधिकाऱ्यांच्या संगनमताची शक्यता लक्षात घेता सचिव स्तरावर स्वतंत्र चौकशी, दोषींवर गुन्हे आणि संपूर्ण रकमेची वसुली केली जावी.बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार खात्यात झालेला घोटाळा हा कोरोना काळ आणि त्या अगोदर मृत झालेल्यांच्या बाबतचा आहे. त्या काळात मृत झालेले लोक परत जिवंत झाले आणि त्यांनी काम केले. त्यांना तसे प्रमाणपत्र दिले गेले. नंतर ते पुन्हा मयत झाले आणि त्यांच्या कुटुंबियांना अडीच लाखांचे अनुदान देण्यात आले. 2013 मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला अंबाजोगाई नगर परिषदेने मृत्यू प्रमाणपत्र दिलं. त्यानंतर त्यांनी याच व्यक्तीला दहा वर्षांनी म्हणजे 2023 मध्ये ते शंभर दिवस एका व्यक्तीकडे कामाला होते, अशी नोंद आहे.

कामगार म्हणून त्यांनी ऑनलाईन पोर्टलमध्येही नोंद केली आहे. कमलाकर मोडेगावकर या मृत झालेल्या व्यक्तीच्या नावे त्यांचे स्वयंघोषणा पत्रही दिले, की मी कामाला होतो. दहा वर्षानी ते वरून खाली कसे आले? परत मोडेगावकर यांना एक मृत्यू प्रमाणपत्र अंबाजोगाई नगर परिषदेनेच दिले. 2023 मध्ये पुन्हा ते वारले. गजानन मोडेगावकर या त्यांच्या मुलाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर दोन लाखाच्या अनुदानाची रक्कमही पाठवली गेली.नगर पंचायती, नगरपालिका, नगर परिषदांमध्ये असे प्रकार झाले आहेत. काही ग्रामपंचायतीमध्येही असे खोटे प्रमाणपत्र दिले आहेत. माझ्या कानावर आलेल्या प्रकरणात अशी शंभर उदाहरणे आहेत. किमान दोनशे प्रकरण बीड जिल्ह्यात समोर आले आहेत. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सचिव स्तराच्या अधिकाऱ्याची समिती नेमून चौकशी करावी. दीड-लाख कामगारांची बीडमध्ये नोंद आहे. हे गंभीर प्रकरण असून दोनशे प्रकरणात 2 लाख 30 हजार प्रत्येकी असा हा मोठा घोटाळा झाला असल्याचे सुरेश धस यांनी सभागृहात मांडले.

यावर संबंधित खात्याचे मंत्री आकाश फुंडकर यांनी ऑफलाईन कामगारांच्या नोंदणी वेळी असे प्रकार घडल्याचे मान्य केले. आता ऑनलाईन नोंदी आणि बायोमेट्रीकमुळे याला आळा बसला आहे. सुरेश धस यांनी तक्रार केलेल्या प्रकरणांची तपासणी केली त्यात अपघाती मृत्यू एकच होता तो खरा होता हे स्पष्ट झाले आहे. इतर प्रकरणांची कागदपत्रे तपासली जात आहेत.

53 प्रकरणात अनियमितता आढळून आलेले नाही. अपघातील मृत्यू झाल्यास पाच लाख, नैसर्गिक मृत्यूसाठी आपण कामगारांना दोन लाख रुपये अनुदान देतो. सुरेश धस यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे द्यावेत, एक स्वतंत्र अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करू, असे उत्तर फुंडकर यांनी सभागृहात दिले.

लैंगिक अत्याचाराच्या घटना सुरूच; बीडमध्येही चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

0

बीड — परळी तालुक्यातील अल्पवयीन मुलीची, त्यानंतर हिवरा पहाडीच्या अल्पवयीन विवाहित अत्याचार प्रकरणाची घटना ताजी असतानाच पुन्हा आणखी एका अत्याचाराच्या घटनेने बीड शहर हादरले आहे. सहा वर्षाच्या चिमुकलीला चिकू देण्याचे अमिष दाखवून अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वर्षीय चिमुकली सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आपल्या मैत्रिणीच्या घरासमोर फुले वेचित होती. यावेळी एका मुलाने तिच्या मैत्रिणीला घरी जाण्याचे सांगत ‘चिकू देतो’ असे आमिष दाखवत सहा वर्षीय मुलीला स्वत:च्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर उचलून नेले. तिथे त्याने चिमुकलीशी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे घाबरलेली चिमुकली रडत आरडाओरडा करत खाली आली. तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. पीडितेच्या आई-वडिलांनी मंगळवारी पेठ बीड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणात पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान आरोपी विधी संघर्ष असून त्याला पोलिसांनी सुधारगृहात पाठवल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल होण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे मोठा समुदाय पेठ बीड पोलीस ठाण्यात जमला होता.

एस पी साहेब…! न्यायाचं तराजूच झुकलेलं; तिथे दराडेंचं वर्तन चुकलेलंच

0

बीड — संतोष देशमुख हत्याकांडानंतर देखील जिल्ह्याचे नाव गुन्हेगारी मध्ये आजही टॉप वरच आहे.बीडचा बिहार होण्यासाठी अजून थोडी भर आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही होताना दिसत आहेत. बाळराजे दराडे, शिवाजी बंटेवाड सारखी बोटावर मोजण्या इतकी माणसं सोडली तर पोलीस दलाला अवकळा आणण्यात कुणीच मागे नाही. न्यायाचं तराजू झुकलेलं असताना गुन्हेगारी विरोधात अनेक कारवाया करून
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचं नाव चर्चेत आणणं त्या जीवावर आपल्याला एखादा ठाणं मिळावं नाही मिळालं म्हणून एसपींनी पाडलेल्या पायंड्यावर पाऊल टाकावं तसेच राजकारण्यांच्या वळचणीला जावं एवढी मोठी चूक करण्याची गरजच काय होती त्याची शिक्षा दराडेंना मिळायलाच हवी.अशा चर्चांना आता उधाण आला आहे.

जिल्ह्यात दररोज खून, जीव घेणे हल्ले, चोऱ्या दरोडे, अवैध धंदे यांना सुगीचे दिवस आले आहेत.बलात्कार तर रोजच्याच घटना आहेत. सामान्य माणूस झालेल्या अन्यायाची तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात गेला तर तक्रारच घेतली जात नाही. तक्रार घेतली गेलीच तर गुन्हेगारांना मोकळीक कशी मिळणार यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत काय असा प्रश्न देखील भाबड्या जनतेतून चर्चेला जात आहे. न्याय देण्यासाठी राबवलेल्या वेगवेगळ्या संकल्पना नुसत्या शोभेच्याच बनल्या आहेत. इतर सामाजिक प्रश्न मांडायला पत्रकारांना वेळ मिळेल अशी स्थिती जिल्ह्यात राहिली नाही. गुन्हेगारीच्या घटना छापतानाच पांढऱ्या कागदाचे काळे रकाने भरत आहेत. आणखी थोडी भर पडली की बीडचं बिहार व्हायला थोडीशी कसर बाकी आहे. गुन्हेगारी मध्ये जिल्ह्याचा ठसा राज्यात उमटावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.असं असताना स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड असोत की बीड ग्रामीणचे एपीआय बाळराजे दराडे असोत हे कारवाया करून विनाकारण गुन्हेगारावर वचक मिळवायचा प्रयत्न करू लागले आहेत. दराडेंनी तर इतकी मजल मारली की शेकडो किलोमीटर समुद्र असून देखील बीडमध्ये इतिहासात पहिल्यांदाच व्हेल माशाची उलटी जप्त केली. गुटखा कारवाया असो की अन्य गुन्हेगार पकडणं असो अशा गोष्टी करण्याची गरज काय होती. पण त्यांचं मन लालचीच कर्तबगारी दाखवली तर न्याय मिळेल एखाद्या ठाण्याचा कारभार करायला मिळेल अशी भाबडी आशा धरण्याची गरज होती का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
बरं असू द्या पोलीस अधीक्षकांनी चार नोव्हेंबर 2025 ला राजकारण्यांच्या सांगण्यावरून प्रवीण कुमार बांगर यांची शिवाजीनगर बीड , ग्रामीणचे मारुती खेडकर यांना उचलून अशोक मूदीराज यांना बसवले. यावेळी ठाणे बदल करण्यात आला. याच पायंड्याचा वापर कर्तबगारीवर ठाण मिळालं नाही म्हणून दराडे यांनी केला.ठाण्याची खुर्ची मिळावी यासाठी वेगळे मापदंड असतात हे पोलीस खात्यात राहून देखील दराडे ना कळाले नाही. कर्तबगार शब्दाची परिभाषा काळा मानानुसार बदलते हे दराडे सपशेल विसरले. हेच पहा ना माजलगाव मध्ये वाळू प्रकरणात लाच घेतल्यामुळे राहुल सूर्यतळ यांना मुख्यालयाला बोलावून घेतलं. पण चार-पाच दिवसातच चमत्कार घडावा अशी कामगिरी सूर्यतळ यांनी केली. चक्र अशी फिरली की पुन्हा सन्मानाने माजलगाव मध्ये ठाणेदारकी मिळाली.
चकलांब्याचा कर्तव्यदक्ष एपीआय संदीप पाटीलची 50 हजाराची लाच घेताना एसीबीने पकडल्यामुळे विकेट पडली. पकडला म्हणून तो चोर ठरला नाहीतर राजरोस हे धंदे चालू होते. वाळू उपसा होत असल्याच्या हप्ते खोरीच्या बातम्या छापून येत असताना देखील वरिष्ठांकडून कारवाई केली गेली नव्हती. कारवाई केली गेली असती तर जनतेला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग देखील कार्यरत असतो हे कळालं नसतं हे कळावं यासाठी केलेला हा अट्टाहास होता. असं म्हणण्याची वेळ आली आहे. मग या लाचखोर पाटलाच्या जागेवर आपली बदली व्हावी ही अपेक्षा ठेवून पोलीस अधीक्षकांनी राजकारण्यांची खुर्चीसाठी मनधरणी करावी लागते हा पाडलेला पायंडा अमलात आणून दराडेनी लॉबिंग साठी मुंबई गाठली. नेमकं त्याच वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा पवार यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात अचानक भेट देऊन हजेरी घेतली. मग काय दराडे यांनी मुख्यालय सोडण्यासाठी परवानगी घेतली नाही म्हणून चौकशी लावली. उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार या प्रकरणाची चौकशी करून दोन-तीन दिवसात पोलीस अधीक्षकांकडे अहवाल सुपूर्द करणार आहेत. अशा प्रकरणांमध्ये दराडे सारख्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करणं गरजेचच आहे.खरंच बाळराजे दराडे यांना मोह मायेत अडकून शिस्तभंगाचे चाळे करायची गरज होती का? कुठेतरी ठाण्याचा कारभार मिळेल म्हणून गुन्हेगारा विरोधात कारवाई करण्याची गरज आहे का? जिकडे वारं तिकडं उफणायची पद्धती ते कधी अवलंबणार? कर्तबगारी नाही तर चाटुगिरी करावी लागते हे त्यांना कधी समजणार? गुन्हेगारीवर वचक मिळवायचा नाही हे धोरण त्यांना कधी कळणार? असे एक ना अनेक प्रश्न जनतेतून विचारले जात आहे.

राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळया रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

0

नवी दिल्ली — साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून मराठी भाषेतील ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त राष्ट्रीय संस्था असून भारतीय भाषांमधील साहित्याच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. दरवर्षी अकादमीकडून विविध भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करून त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेत लेखकाने आपल्या आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि वैचारिक प्रवास यांचे प्रभावी चित्रण केले आहे. या साहित्यकृतीला मिळालेल्या पुरस्कारामुळे मराठी साहित्यविश्वाचा गौरव वाढला आहे.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, निबंध, साहित्यिक समीक्षा, आत्मकथा आणि संस्मरण अशा विविध साहित्य प्रकारांतील विविध पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. देशातील विविध भाषांमधील साहित्यिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या साहित्यकृतींना तज्ज्ञांच्या समितीद्वारे निवडण्यात आले आहे. मराठी भाषेच्या पुरस्कारासाठी नियुक्त परीक्षक मंडळामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले, नागोराव तम्माजी उटकर आणि राजन गवस यांचा समावेश होता.

साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. सन २०२५ च्या साहित्य अकादमी पुरस्कारांचे वितरण ३१ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे.

अकादमी पुरस्कार २०२५-भाषा, पुस्तक व लेखक पुढीलप्रमाणे :

🕳️  असमिया – कड़ि खेलर साहित्यसाधु (उपन्यास) – देवब्रत दास

🕳️   बाङ्ला – श्रेष्ठ कबिता (कविता) -प्रसून बंद्योपाध्याय

🕳️  बोडो दोंनै लामाः मोनसे गाथोन (उपन्यास) – सहायसुलि ब्रह्म

🕳️  डोगरी -‘ठाकुर’ सतसई (कविता, दोहे) – खजूर सिंह ‘ठाकुर’

🕳️   अंग्रेजी – क्रिमसन स्प्रिंग (उपन्यास) -नवतेज सरना

*🕳️ गुजराती – भट्टखडकी (कविता) – योगेश वैद्य

*🕳️ हिंदी – जीते जी इलाहाबाद (संस्मरण) -ममता कालिया

*🕳️ कन्नड -दडा सेरिसु तंदे* (कहानी) – अमरेश नुगडोणी

*🕳️ कश्मीरी – नजदावनेकी पॉट अलाव (कविता) -अली शैदा

*🕳️  कोंकणी – कोंकणी काव्यें: रुपां आनी रूपकां (आलोचनात्मक निबंध) -हेनरी मेंडोनका (एच. एम. पेरनाळ)

*🕳️ मैथिली – धात्री पात सन गाम (संस्मरण) -महेन्द्र

*🕳️ मलयाळम् – मायामानुष्यर (उपन्यास) – एन. प्रभाकरन

*🕳️ मणिपुरी – कंगलमद्रीब इफुत (कहानी) – हाओबम नलिनि

*🕳️ मराठी – काळयानिळया रेषा (आत्मकथा) – राजू बाविस्कर

*🕳️ नेपाली -नेपाली पारम्परिक संस्कृति र सभ्यताको ढुकुटी (निबंध) -प्रकाश भट्टराई

*🕳️ ओड़िआ – पदपुराण (कविता) – गिरिजाकुमार बलियारसिंह

*🕳️ पंजाबी – सेफ्टी किट (कहानी) -जिंदर

*🕳️ राजस्थानी -भरखमा (कहानी) – जितेंद्र कुमार सोनी

*🕳️ संस्कृत -प्रस्थानचतुष्टये ब्रह्मघोषः (कविता) – महामहोपाध्याय साधु भद्रेशदास

*🕳️ संताली – मिड बिर्ना चेनने साओन इनाग सागई (कहानी) -सुमित्रा सोरेन

*🕳️ सिंधी – वाघू (कहानी) – भगवान अटलानी

*🕳️ तमिळ – तमिळ सिरुकथैयिन थडंगल (साहित्यिक आलोचना) – सा. तमिळसेलवन

*🕳️ तेलुगु -अनिमेष (कविता) – नंदिनी सिद्धरेड्डी

*🕳️ उर्दू -सफ़र जारी है (कविता) -प्रितपाल सिंह बेताब

जमिनीच्या तुकड्यासाठी सासरच्या मंडळीसह लेकाचा बापावर प्राणघातक हल्ला

0

केज — शेती आणि ट्रॅक्टर नावावर करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मुलाने जन्मदात्या वडीलावर सासरच्या मंडळींच्या मदतीने प्राण घातक हल्ला केल्याची घटना नाहोली येथे घडली. यामध्ये वडील गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाईत उपचार सुरू आहेत

नाहोलीतील लक्ष्मण ठोंबरे हा आपले वडील सुभाष ठोंबरे यांच्याकडे जमीन व ट्रॅक्टर माझ्या नावावर करा म्हणून घरात वितंड वाद घालत होता. शेवटी १४ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. गावातील चौकात लक्ष्मण ठोंबरे व त्याची पत्नी सारिका यांनी सुभाष ठोंबरे यांना गाठले. “जमीन आणि ट्रॅक्टर माझ्या नावावर का करत नाहीस?” असा जाब विचारत त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण होत असताना सून सारिका हिचे माहेर त्याच गावात असल्याने तिचे आई-वडील, भाऊ आणि चुलते यांनीही घटनास्थळी धाव घेतली.आपल्या जावयाला साथ देत या सर्वांनी मिळून सुभाष ठोंबरे यांना अमानुषपणे मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून सुभाष ठोंबरे यांची मुलगी मीना बिक्कड आणि जावई दादा बिक्कड हे बचावासाठी धावून आले. मात्र, संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी त्यांनाही सोडले नाही. त्यांनाही मारहाण करत “मध्ये आलात तर जीवे मारू” अशी धमकी दिली.
या मारहाणीत सुभाष ठोंबरे हे रक्तबंबाळ झाले असून त्यांच्या तोंडावर, हातावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. मारहाणीमुळे त्यांचे शरीर काळे निळे पडले आहे. त्यांना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.या प्रकरणी मुलगा लक्ष्मण ठोंबरे, सून सारिका ठोंबरे, यांच्यासह सासरच्या १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.