Sunday, February 1, 2026
Home Blog Page 3

🇮🇳🇮🇳 प्रजासत्ताक दिन:महाराष्ट्रातील 4 दिग्गजांना पद्म पुरस्कार, देशातील 45 जणांचा होणार सन्मान 🇮🇳🇮🇳

0

नवी दिल्ली — प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून एकूण 45 दिग्गजांसाठी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
यामध्ये 4 महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. या सर्व दिग्गजांना प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्म पुरस्काराची घोषणा झाली आहे. यासोबतच महाराष्ट्रातील लोकप्रिय तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांनादेखील पद्म पुरस्कार घोषित झाला आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे श्रीरंग देवबा लाड यांना पद्म पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांनादेखील पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहेत.

भिकल्या लाडक्या धिंडा 

भिकल्या लाडक्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील वलवंडे गावचे रहिवासी आहेत. ते 89 वर्षीय आहेत. ते आदिवासी तारपा वादक आहेत. ते अतिशय उत्कृष्ट तारपावादन करतात. तसेच ते तारपाची निर्मिती देखील करतात. ते तरुणांना तारपावादन शिकवतात. तारपा हे बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून बनवले जाणारे पारंपरिक वाद्य आहे. ते जवळपास 9 ते 10 फूट लांबीचे असते. भिकल्या लडक्या धिंडा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी व्यथित केलं. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव आता सर्वोच्च पुरस्काराने करण्यात येणार आहे.
         रघुवीर खेडकर 

रघुवीर खेडकर हे प्रसिद्ध तमाशा कलावंत आहेत. ते गेल्या 40 ते 45 वर्षांपासून तमाशा क्षेत्रात कार्यरत आहेत. तमाशा संस्कृती टिकवणं आणि ती राज्याबाहेर नेण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. रघुवीर खेडकर हे तमाशातील सोंगाड्या या भूमिकेसाठी लोकप्रिय आहेत. त्यांना त्यांच्या योगदानासाठी तमाशा महर्षी म्हणून देखील ओळखलं जातं. विशेष म्हणजे डॉ. जब्बार पटेल यांनी लिहिलेला ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट रघुनाथ खेडकर यांना डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आल्याचं मानलं जात. रघुवीर खेडकर हे मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे आहेत. प्रसिद्ध तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे ते पुत्र आहेत. रंगभूमीची सेवा करण्याचा वारसा रघुवीर खेडकर यांना आईपासून मिळाला. हा वारसा त्यांनी समर्थपणे जपला देखील आहे. त्यांच्या नेतृत्वातील तमाशा मंडळ रघुवीर खेडकर तमाशा मंडळ हे लोकप्रिय आहे.

श्रीरंग देवबा लाड 

परभणी जिल्ह्यातील माळसोन्नाचे श्रीरंग देवबा लाड यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कापूस तंत्रज्ञानाचे जनक मानले जातात. तसेच शेतकरी-केंद्रीत कृषी नवप्रवर्तनाचे प्रेरक, स्वदेशी पशुधन संवर्धनाचे आदर्श मार्गदर्शक, ग्रामीण विकास, शाश्वत शेती यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांचं सामाजिक कार्यदेखील तितकेच मोठं देखील आहे. त्यांना याआधी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स (मानद) पदवी प्रदान करण्यात आली आहे. यासोबतच अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.

डॉ. आर्मिडा फर्नांडीस कोण आहेत?

डॉ. आर्मिडा फर्नांडीस यांचं देखील समाजासाठी मोठं योगदान आहे. आर्मिडा या मुबंईतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशुतज्ज्ञ आहेत. भारतीय नवजात शिशु आरोग्य सेवेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी 1989 मध्ये आशिया खंडातील पहिली दूध बँकेची स्थापना केली होती. नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांना यश देखील आलं. त्यांनी मुंबईतील शीव रुग्णालयात 25 वर्षांपेक्षा जास्त काळ बालरोग विभाग प्रमुख आणि डीन म्हणून काम केले आहे. यासोबतच 2000 पेक्षा जास्त परिचारिका आणि डॉक्टरांना प्रशिक्षण दिलं आहे.

विशेष म्हणजे निवृत्तीनंतर त्यांनी स्नेहा संस्थेची स्थापना केली. ही संस्था मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी काम करते. त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील या अफाट योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारकडून सर्वोच्च मानला जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

या’ दिग्गजांना जाहीर झाले पद्म पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

भगवानदास रायकर (मध्य प्रदेश)
भिकल्या लाडक्या धिंडा (महाराष्ट्र)
ब्रिजलाल भट्ट (जम्मू आणि काश्मीर)
चरण हेमब्रम (ओडिशा)
चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू आणि काश्मीर)
कोल्लक्काइल देवकी अम्मा जी (केरळ)
महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
ओथुवर तिरुथनी (तामिळनाडू)
रघुपत सिंग (उत्तर प्रदेश)
रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
राजस्थानपती कलिअप्पा गौंडर (तामिळनाडू)
सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड)
श्रीरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
तिरुवरूर बख्तवासलम (तामिळनाडू)
अंके गौडा (कर्नाटक)
डॉ. आर्मिडा फर्नांडिस (महाराष्ट्र)
डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
गफ्फारुद्दीन मेवाती (राजस्थान)
खेम राज सुंदरियाल (हरियाणा)
मीर हाजीभाई कासंबाई (गुजरात)
मोहन नगर (मध्य प्रदेश)
नीलेश मांडलेवाला (गुजरात)
आर अँड एस गोडबोले (छत्तीसगड)
राम रेड्डी मामिदी (तेलंगणा)
सिमांचल पात्रो (ओडिशा)
सुरेश हनगवाडी (कर्नाटक)
तेची गुबिन (अरुणाचल प्रदेश)
युनाम जात्रा सिंग (मणिपूर)
बुधरी थाठी (छत्तीसगड)
डॉ. कुमारसामी थंगराज (तेलंगणा)
डॉ. पुननियामूर्ती नटेसन (तामिळनाडू)
हेले वॉर (मेघालय)
इंद्रजित सिंग सिद्धू (चंदीगड)
के. पंजनिवेल (पुडुचेरी)
कैलास चंद्र पंत (मध्य प्रदेश)
नुरुद्दीन अहमद (आसाम)
पोकिला लेकटेपी (आसाम)
आर. कृष्णन (तामिळनाडू)
एस जी सुशीलम्मा (कर्नाटक)
तागा राम भील (राजस्थान)
विश्व बंधू (बिहार)
धर्मिकलाल चुनीलाल पंड्या (गुजरात)
शफी शौक (जम्मू आणि काश्मीर)

दर्जेदार बंधारे उभारुन पाण्याचा प्रश्न सोडवणार — अमरसिंह पंडित

0

कुंभेजळगाव आणि राजपिंप्री येथील ३० लाख रुपये किंमतीच्या सिमेंट बंधा-याचे उद्घाटन

गेवराई — पाण्याचे दुर्भिक्ष असताना देखील कुंभेजळगाव, राजपिंप्री आणि परिसरातील शेतकरी उत्तम पद्धतीने शेती करत असल्याने आपण प्रभावित झालो, त्यामुळे अशा दुष्काळी भागाची निवड करुन पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बंधारा उभारण्याचे काम आपण हाती घेतले आहे. बंधा-याचे काम दर्जेदार होईल याचा फायदा या भागातील शेतकरी व नागरिकांना होईल. आगामी काळात गेवराई तालुक्यात २२ बंधारे उभारणार असल्याचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सांगितले.जिल्हा नियोजनातून कुंभेजळगाव येथील १५ लाख रुपये किंमतीच्या सिमेंट बंधारा बांधकामांचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

जिल्हा नियोजनातून कुंभेजळगाव आणि राजपिंप्री येथील ३० लाख रुपये किंमतीच्या सिमेंट बंधारा बांधकामांचे उद्घाटन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, जगन्नाथ काळे, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष कालिदास नवले, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे, शिवाजीराव दिवाण, राधाकिसन शेंबडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, कुंभेजळगाव, राजपिंप्री या भागातील बंधारे आणि ईतर विकास कामामुळे या भागातली लोकांच्या दैनंदिन जीवन आणि अर्थकारणावर सकारात्मक परिणाम होईल. रस्ते, नाली, पुल, लाईट तसेच या भागातील वाहून गेलेल्या बंधारे दुरुस्तीचे काम केले जाईल. ब्रम्हगाव, कुंभेजळगाव, रामनगर तांडा या ग्रुप ग्रामपंचायत विभागून प्रत्येक गावात स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा विचार असून यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळेल. कुंभेजळगाव येथील गावाला जोडणारा ५०० मिटरच्या रस्त्याचा प्रश्न सोडवला जाईल, त्याच बरोबर दलित समाजाच्या स्मशानभूमीचे काम र्लवकरच केले जाईल. गेवराईच्या दुष्काळी भागात आगामी काळात २२ बंधारे उभा करतोय. बंधा-यांचे काम दर्जेदार काम होईल. याचा फायदा या भागातील शेतकरी व नागरिकांना होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामबप्पा लेंडगुळे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कुभेजळगाव येथील उपसरपंच शेख सद्दाम, सुदाम लेंडगुळे, कल्याणराव पांगरे, लहुराव पांगरे, बळीराम पांगरे, भुजंगबापू पांगरे, महादेव पांगरे, हरी झेंडे, भिकाजी राठोड, रुस्तुम पांगरे, चेअरमन गणपत राठोड, अभिमान लेंडगुळे, उद्धव पांगरे, योगिराज चव्हाण, सुरेश पांगरे, संजय गायके, रामचंद्र पांगरे, पोपट चव्हाण, कोळगावचे सरपंच राजेंद्र कदम, अशोक करांडे तसेच राजपिंप्री येथे संतोष पानखडे, दिलीप पानखडे, बापु धोत्रे, गोरख म्हेत्रे, सुरेश पानखडे, विष्णू चव्हाण, विजय हराळे, सौ. विमल धोत्रे यांच्यासह कुंभेळगाव आणि राजपिंप्री येथील येथील नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परळी येथील थर्मल च्या जागेत सोलार एनर्जी प्लांट उभारण्याची निविदा प्रसिद्ध

0

मुख्यमंत्री देवाभाऊंनी धनंजय मुंडेंना दिलेल्या शब्दाची केली पूर्ती!

मेगा सोलर प्रकल्प परळीच्या विकासात ठरणार मैलाचा दगड

परळी — राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांना विधानसभा सभागृहात दिलेल्या शब्दाची पूर्तता केली असून परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत मेगा सोलर प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात याठिकाणी ५० मेगा वॅट वीज निर्मिती क्षमता असलेला सोलर प्रकल्प उभारण्यात येत असून त्याची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केली आहे.

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक एक ते पाच च्या रिकाम्या जागेत 350 मेगा वॅट वीज निर्मितीची क्षमता असलेला मेगा सोलर प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी मागील अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची ती मागणी मान्य करून लवकरच मेगा सोलर एनर्जी प्रकल्प उभा करण्याचा शब्द दिला होता.

या सोलार निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीमुळे वीज निर्मितीसह परळी व परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार असून हा प्रकल्प परळीच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात 50 मेगा वॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या संचाची उभारणी करण्यात येणार असून याबाबतची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी ऊर्जामंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समस्त परळीकरांच्या वतीने आभार मानले आहेत.

पात्रुड मध्ये 33 किलो गांजासह एकास अटक

0
  1. बीड — स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे सापळा रचून एका इसमाला तब्बल ३३ किलो गांजासह रंगेहाथ पकडले. या कारवाईत गांजा आणि दुचाकीसह एकूण ७ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक इसम बजाज मोटार सायकलवरून गांजा विक्रीसाठी पात्रुड (ता. माजलगाव) येथे येत आहे. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या पथकाने पात्रुड परिसरात सापळा लावला. संशयित दुचाकी येताच पोलिसांनी अडवून झडती घेतली. त्याच्याकडे असलेल्या सॅक मध्ये ३३ किलो गांजा मिळून आला.
पकडलेल्या आरोपीचे नाव सय्यद अत्तार रहेमान सय्यद नौमान वय ३५ वर्षे, रा. परळी, जि. बीड असे आहे. आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ७ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ नुसार कलम ८ (क) आणि २० (ब) गुंगीकारक औषधी द्रव्य, मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पीएसआय सुशांत सुतळे, हवालदार मारोती कांबळे, सुनील अलगट, रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, बिभीषण
चव्हाण आणि चालक अतल हराळे यांचा सहभाग होता.

पत्नीचा हार्ट अटॅक ने मृत्यूचा बनाव, खून केला अंत्यसंस्काराची तयारी पण पोलिसांनी प्लॅनिंग उधळली 

0

अंबाजोगाई — शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्याने पत्नीचा डोक्यात काठीने वार करून निर्घृण खून केला. त्यानंतर तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेला.मात्र, बर्दापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघड झाला.
अंत्यविधीच्या पूर्वीच मृतदेहासह बनाव करणाऱ्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातोला शिवारात घडली आहे. शीलाबाई सुरेश शेरफुले वय 45 वर्ष, रा. आलुरा, ता. देगलूर, जि. नांदेड असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश शेरफुले हा हातोला येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करण्यासाठी त्याच्या पत्नीसह राहत होता. मागील 3-4 दिवसांपासून तो गावाकडे जाऊ म्हणून पत्नीकडे आग्रह धरत होता, परंतु ती तयार नव्हती. याच कारणावरून दोघांत तीव्र वाद झाला असल्याची चर्चा आहे. रागाच्या भरात सुरेशने जाड भरीव काठीने शीलाबाईच्या डोक्यात एकामागून एक अनेक वार केले. या हल्ल्यात शीलाबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सुरेशने हा खून पचवण्यासाठी परिसरातील लोकांना आणि गावाकडे नातेवाईकांना शीलाबाईचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे खोटे सांगितले.

गुन्हा लपवण्यासाठी सुरेशने तातडीने एक क्रुझर गाडी भाड्याने केली आणि मृतदेह घेऊन थेट देगलूर तालुक्यातील आलुरा गाठले. मात्र, बर्दापूर पोलिसांना या संशयास्पद मृत्यूची गुप्त माहिती मिळाली. बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी वेळ न घालवता देगलूर पोलिसांशी संपर्क साधला. देगलूरचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी यांनी तातडीने आलुरा गाव गाठले. तिथे शीलाबाईच्या माहेरच्या लोकांनाही डोक्यावरील जखमा पाहून संशय आला होता. पोलिसांनी अंत्यसंस्कारापूर्वीच मृतदेह ताब्यात घेऊन पती सुरेशला ताब्यात घेतले.

सुरेश शेरफुले हा सध्या संशयित आरोपी हा अखेर बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात असून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून त्यानंतर या गुन्ह्यात आणखी खुलासे समोर येतात का तसेच या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करित आहेत.

जि.प. प्रशासन अखेर जागे;अतिरिक्त कामकाजा”च्या नावाखालील १५० प्रतिनियुक्त्या रद्द

0

प्रजासत्ताकदिनी आंदोलनाचा डॉ. ढवळे नी दिला होता इशारा

बीड — बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण, बांधकाम व आरोग्य विभागात सुरू असलेल्या मनमानी कारभारावर अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली असून, “अतिरिक्त कामकाज” या गोंडस नावाखाली करण्यात आलेल्या तब्बल १५० हून अधिक प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणासाठी येणाऱ्या पालकमंत्र्यांसमोर लक्षवेधी आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी दिल्यानंतर, प्रशासनाने प्रजासत्ताक दिनाच्या आधीच याची दखल घेतली.

दि. २२ जानेवारी रोजी प्रदीप काकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हा परिषद बीड यांनी सर्व विभागप्रमुखांना लेखी आदेश देत अतिरिक्त पदभार तात्काळ कमी करून संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी पूर्णवेळ रुजू करून घ्यावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

आदेश न पाळल्यास जबाबदारी निश्चित

या संदर्भात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभागाकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्याचे नमूद करत,
दि. २३ जानेवारीपासून संबंधित कर्मचाऱ्यांना मूळ पदस्थापनेवर कार्यमुक्त न केल्यास विभागप्रमुख व सहाय्यक / कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांना वैयक्तिक जबाबदार धरले जाईल,असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

मूळ पदस्थापनेवर रुजू होईपर्यंत वेतन रोखण्याची मागणी

डॉ. ढवळे यांनी मागणी केली आहे की  जोपर्यंत अतिरिक्त कामकाज पाहणारा कर्मचारी आपल्या मूळ पदस्थापनेवर रुजू होत नाही, तोपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करू नयेत.

नियमांचा बेकायदेशीर भंग

डॉ. ढवळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की  “जिल्हा परिषदेतील कोणत्याही कर्मचाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. मात्र ‘प्रतिनियुक्ती’ हा शब्द टाळून ‘अतिरिक्त कामकाज’च्या नावाखाली नियमांचा सर्रास भंग करण्यात आला.”विशेषतः शिक्षण, बांधकाम व आरोग्य विभागात अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असून, काही विभागप्रमुख सामान्य प्रशासन विभागाला डावलून थेट सीईओ यांच्या नावावर फाईल पाठवत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. “सीईओ यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा काही अधिकारी घेत आहेत. १५० पेक्षा अधिक कर्मचारी महत्वाच्या टेबलांवर अतिरिक्त कामकाजाच्या नावाखाली बसले आहेत. यामागे हितसंबंध व सत्ताधारी गटांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही,”
असेही डॉ. ढवळे यांनी स्पष्ट केले.

आष्टी:वाळू माफियांचा धुमाकूळ; कर्मचाऱ्यांवर हल्ला करत तहसीलमधून जप्त टेम्पो पळवला

0

आष्टी — येथील तहसील कार्यालयातून वाळू माफियांनी चक्क जप्त केलेला वाळूचा टेम्पो पळवून नेल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. तहसीलदार वैशाली पाटील या रजेवर जाताच संधी साधून ६ ते ८ जणांच्या टोळीने कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत हा प्रताप केला आहे. आश्चर्य म्हणजे तहसीलच्या आवारातच ही घटना घडली आहे.
तहसीलदार वैशाली पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणारा एक टेम्पो पकडून तहसील कार्यालयात लावला होता. गुरुवारी वैशाली पाटील रजेवर गेल्या आणि प्रभारी तहसीलदार म्हणून विनोद रणविरे यांनी पदभार घेतला. रात्री ८:३० च्या सुमारे ८ वाळू माफिया तहसील कार्यालयाच्या पाठीमागील भिंतीवरून आत शिरले. त्यांनी तिथे कर्तव्यावर असलेल्या दोन कोतवालांना धक्काबुक्की करत हुज्जत घातली.माफियांनी जप्त केलेला टेम्पो चालू करून तो पळवण्यास सुरुवात केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. माफियांच्या या दहशतीमुळे कर्मचारी बाजूला झाले आणि त्यांनी टेम्पो पळवून नेला. माफियांचा दुसरा एक ट्रक पळवण्याचा प्रयत्न मात्र फसला.या सर्व घटनेचा थरार तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची माहिती तात्काळ नायब तहसीलदार आणि जमाबंदी विभागाला देण्यात आली आहे. प्रभारी तहसीलदार विनोद रणविरे यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, संबंधित गुंडांवर कठोर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले. आता या प्रकरणातील आरोपींना पोलीस कधी बेड्या ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाकाने वांगे सोलणारी व्यवस्था शेळपटली,”फाटे” पूढे गोंडा घोळत बसली जीएसटी अधिकारी जाधवर मृत्यू प्रकरणात कावतांची हतबलता बीड ने पाहिली

0

बीड — कडक शिस्तीचे कर्तव्यदक्ष, राजकीय दबावाला बळी न पडता काम करणारे म्हणून प्रतिमा असलेले पोलीस अधीक्षक नवनीत कांवत जीएसटी अधिकाऱ्याच्या आत्महत्ये प्रकरणात हतबल असल्याचं त्यांच्या कार्यपद्धतीला फाटेने फाट्यावर मारल्याचं बीडच्या जनतेने पाहिलं. जेवढी बीडमध्ये इज्जत कमावली ती मूदीराज च्या नादी लागून आमदाराच्या दबावा खाली येऊन मातीत घातली. जाधवर आत्महत्याप्रकरणी सात दिवसानंतरही कुटुंब एसपींची भेट घेतं. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर धरण देतं. तरीही गुन्हा दाखल करायला वेळ घेतला जातो.एवढा शेळपटलेला कारभार सर्वसामान्य जनतेला काय न्याय देणार हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
आपल्याच महतीचा डंका वाजवायचा कायदा सुव्यवस्था निर्माण केली म्हणून सांगायचं पण वास्तव पाहतांना मात्र धृतराष्ट्रासारखी आंधळी भूमिका घ्यायची हीच पोलीस अधीक्षकांची कर्तव्यदक्षता असल्याचे चित्र जिल्ह्यात तरी पाहायला मिळत आहे.
सचिन जाधवर या जीएसटी अधिकाऱ्याचा संशयास्पदरीत्या आठ दिवसापूर्वी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कपिलधार वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कमानीजवळ कार मध्ये आढळला. शवविच्छेदन करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट आढळली. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं तसेच प्रदीप फाटे या अधिकाऱ्याचं नाव
त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलं होतं. घटना घडल्याच्या दिवशीच त्यांची पत्नी मयुरी सचिन जाधवर गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात आल्या. त्यावेळी ठाणे प्रमुख मूदीराज यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. वाटलं नंतर तरी गुन्हा दाखल होईल.मयुरी जाधवर दुःखात आहेत म्हणून कदाचित मूदीराज मधली माणुसकी जागी असेल म्हणून झाला नसेल असं वाटलं. त्यानंतरही मयुरी जाधवर व त्यांचे नातेवाईक वारंवार गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवत बसले.पण ठाणे प्रमुख मूदीराज यांना पाझर फुटलाच नाही. माणुसकीचं दर्शन झालच नाही. सुसाईड नोट मध्ये ज्या “प्रदीप फाटे” नावाच्या अधिकाऱ्याचं नाव आढळून आलं त्या फाटेला बोलावून घेत विचारपूस करण्याचा फार्स केला गेला. तपास होत नाही तोपर्यंत बीड सोडायचं नाही असं त्याला सांगितलं असल्याचं पोलीस सांगू लागले. या सुसाईड नोट मध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांनी काय लिहिलं आहे कोणाकोणाची नाव आहेत याची माहिती कुटुंबीयांना देणं गरजेचं होतं. पण ती देखील मोदीराज ने दिली नाही.कायद्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असं म्हणत आरोपी पुढे गोंडा घोळण्याचे काम केलं गेलं. न्यायासाठी मयुरी जाधवर यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची आठ दिवसानंतर आज भेट घेतली. काळीज पिळवटून टाकेल अशी दर्द भरी कहानी एसपींना सांगितली. हीच कहाणी मयुरी जाधववर यांनी माध्यमांसमोरही सांगितली गेल्या एक महिन्यापासून ते प्रचंड मानसिक तणावात होते, मला ऑफीसचं टेन्शन आहे असे ते सांगायचे. एवढेच नव्हे तर या घटनेच्या ८-१० दिवसा पुर्वी माझ्या मुलाचे शाळेतून अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही जाधवर यांच्या पत्नीने माध्यमांना सांगितले. ऑफीसच्या बाहेर सुध्दा एका इनोव्हा गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ झाली होती, एवढेच नव्हे तर थांब तुला बघतो अशी धमकी दिल्याचा दावा देखील जाधवर यांच्या पत्नीने केला. अशा घटनांमधुन त्यांना जाणिवपुर्वक मानसिक त्रास दिला गेला. यामागे नेमकं काय होतं ? याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालयात नेमकं काय सुरू होतं ? याचाही तपास होणे गरजेचे असल्याच्या त्या म्हणाल्या. प्रदिप फाटे व कार्यालयातील त्याच्यासोबत आणखी दोन-तीन लोकं आहेत. त्यांची सुध्दा सखोल चौकशी झाली पाहिजे. सुसाईड नोटमध्येही प्रदिप फाटे याच्यासह त्याच्यासोबतचे कर्मचारी असा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलाच्या अपहरणासारखे धक्कादायक खुलासे मयुरी जाधवर यांनी नवनीत कावत यांच्यासह माध्यमांसमोर केले असले तरी फारसा फरक पडला नाही. या संदर्भात सुसाईड नोट सोबतच पोस्टमार्टम रिपोर्ट मिळावा अशी मागणी देखील मयुरी यांनी केली. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा यासाठी नातेवाईकांनी पुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्याकडे येऊन विनंती अर्जव केले.पण मूदीराज खुर्चीवर स्थितप्रज्ञपणाने नातेवाईकांकडे पहात बसले.पाषाणाला ही पाझर फुटला असता पण ठाणे प्रमुखाला पाझर फुटलाच नाही. या प्रकरणात नुसता गुन्हा दाखल करण्यात येईल असं सांगून वाटी लावण्याचा वारंवार प्रयत्न त्यांनी केला. नातेवाईकांनी दुपारपासून ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. रात्री साडेआठ पर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता नातेवाईक मात्र ठाण मांडून तिथेच होते.
याची भनक एसपींना लागली नाही का? एसपींनी पोलीस ठाणे आधुनिक करायचे म्हणून गाजावाजा केला.पण पीडित कुटुंब ठिय्या मांडून बसलय ही बाब एसपीना कशी कळाली नाही.
एस पी साहेब….!
प्रामाणिक कर्तव्यदक्ष जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या कुटुंबीयांची ही वाताहात तुम्ही व तुमचे पोलीस ठाणे करीत असतील तर सर्वसामान्य गोरगरिबांचं काय? पोलीस अधीक्षक धुतल्या तांदळासारखे पण भातात लागणाऱ्या खड्यासारखे
असून जनतेला उपयोग काय? तुमच्या आधुनिकीकरणाचा जनतेला उपयोग काय? मूदीराज सारखा अधिकारी तुमचा ऐकत नाही काय? राजकीय दबावाला बळी पडणारे तुम्हीही निघालात काय? माध्यमावर जाधवर आत्महत्या प्रकरणात छापून आलेल्या घटना वर तुमचं लक्ष नाही काय? एवढ्या मोठ्या घटनेवर तुमचं लक्ष नाही तर गोरगरिबांचा काय? अवैध धंदे नाकावर टिच्चून चालू आहेत त्याचं काय? जाधवर कुटुंबीयांना न्याय मिळणार का? कायदा असाच फाट्यावर मारला जाणार का? यासारखे अनेक प्रश्न जाधवर कुटुंबासह सर्वसामान्य जनतेकडून विचारले जाऊ लागले आहेत.

आजीला तिसऱ्या मजल्यावरून उचलून आणलं; परिचारिकेने उर्मट उत्तर देत सोनोग्राफी सेंटरला कुलूप ठोकलं

0

जिल्हा रुग्णालयातील प्रकाराने संताप

बीड — गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी उभारलेला जिल्ह्याचा सरकारी दवाखाना कर्मचाऱ्यांच्या नंग्या नाचामुळे नेहमीच चर्चेत येत राहते. दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून वयोवृद्ध आज्जीला नातेवाईकांनी सोनोग्राफी सेंटर कडे आणले मात्र परिचारिकेने 15 ते 20 मिनिटे आधीच सोनोग्राफी सेंटरचे दरवाजे बंद केले. नातेवाईकांनी परिचारिकेला सोनोग्राफी करण्याची विनंती केली. परिचारक यांनी मात्र नातेवाईकांसह आजारी आज्जीला उर्मट भाषा वापरून अपमानित केले. हा प्रकार घडत असताना मात्र आज्जी वेदनेने तळमळताना दिसली. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अगोदरच वेळा पाळत नसल्यामुळे रुग्णांमध्ये संताप आहे. त्यातच सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची माणुसकी हरवली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वयोवृद्ध पेशंट आजी तिसऱ्या मजल्यावर ऍडमिट होती. डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली होती. जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी, नातेवाईकांनी उचलून आजीला खाली आणलं. सहा वाजेच्या अगोदर सोनोग्राफी सेंटर समोर आले. मात्र सोनोग्राफी सेंटरमधील मस्तवाल परिचारिकेनं पावणे सहा वाजताच स्ट्रेचरवर वयोवृद्ध आजी झोपलेली असताना सुद्धा तिच्याकडे कसल्याही प्रकाराचे लक्ष न देता, पावणे सहा वाजताच सोनोग्राफी सेंटरला कुलूप ठोकलं.नातेवाईकांनी या परिचारिकेकडे विचारणा केली पण, तिने नातेवाईकांना उर्मट भाषा वापरली आणि त्या आजीला तसंच सोडून सेंटर बंद करून निघून गेली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात आपण चौकशी केली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या परिचारिकेसह डॉक्टरची चौकशी करून कारवाई केली जाईल असं नेहमीसारखं कोरडं उत्तर जिल्हा शल्य चिकित्सक सतीश कुमार सोळंके यांनी दिलं. हा प्रकार समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सतीश कुमार सोळंके जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारणार का? उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का? रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी सोळंके काय उपाययोजना करणार? मुजोर परिचारिकेला निलंबित करणार का? ढेपाळलेल्या कारभाराची घडी पुन्हा नीट बसवणार का? यासारखे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

सत्तेसाठी काहीही..! भाजपाचा एमआयएम सोबत अचलपूर मध्ये जांगडगुत्ता

0

अमरावती — महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सत्तेसाठी अनपेक्षित आणि अभद्र युती होताना दिसत आहेत. दरम्यान अमरावतीमध्ये चक्क भाजपा आणि एमआयएमने युती केली असून दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयएमने एकत्र येत सभापती बनवत सत्ता स्थापन केलेली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या भाजपवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीकेची झोड उठवली आहे.

अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली असून अचलपूर नगर परिषदेच्या समिती सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिली आहे. त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद मिळाले आहे. एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट हा भाजपासोबत गेल्याने अचलपूर मध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आली असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान या संपूर्ण सावळ्या गोंधळावर वडेट्टीवारांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला आहे. भाजप आणि एमआयएमची सेटिंग आहे. हे दोघेही जेवताना वेगवेगळे सोबत जेवतात. एक व्हेज खाते तर एक नॉन व्हेज खातो. एमआयएमचा फायनान्सर कोण आहे? काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी हे सुरू आहे. काही काळासाठी हे चालेल पण सत्यता बाहेर येईल. तसेच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे शाही स्नानापासून शंकराचार्य यांना मारहाण झाली यावरून ही विचारांची विकृती आहे. हिंदुत्व सत्ता मिळवण्यासाठी आहे त्यापेक्षा दुसरा काही संबंध हिंदुत्ववाशी नाही. अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला माणिकर्णिका घाट जमीनदोस्त केला. हे पाहता भाजपचे हिंदुत्वाशी देणं घेणं नाही. हे फक्त सत्तेसाठी हिंदुत्व आहे असे म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप निर्लज्ज सदासुखी सत्तेसाठी वाटेल ते करू शकतो अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान हिंदुत्ववादी भाजपने अचलपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी एकत्र येत सभापती बनवल्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात की स्थानिक भाजपने घेतलेल्या निर्णयाला भाजपचे वरिष्ठ नेते साथ देतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे