Home Blog Page 15

वंजारवाडी तलाव आणि पाट दुरूस्तीच्या कामाला १ कोटी ७ लाखांचा निधी

0

राजुरी परिसरातील ८ ते १० गावांच्या शेतीसिंचनाचा प्रश्न आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यातून मार्गी

बीड — वंजारवाडी लघु प्रकल्प तलाव दुरूस्ती आणि पाट दुरूस्तीच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून १ कोटी ७ लाखांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली आहे. सदरील काम हे निविदास्तरावर असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे राजुरी परिसरातील ८ ते १० गावांच्या शेतीसिंचनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून हा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
               बीड तालुक्यातील वंजारवाडी लघू प्रकल्प असलेला तलावाचे काम सन १९६५ मध्ये पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची सिंचन क्षमता ही १०५२ हेक्टर आहे. तलाव म्हणजे राजूरी परिसरातील ८ ते १० गावांना शेती सिंचनासाठी पूरक ठरू शकणारा स्त्रोत आहे.‌ परंतु सदरील तलावाचे काम मोठ्या कालवधीपूर्वी झाल्यामुळे याठिकाणी मुख्य बांधकाम कमकुवत होणे, त्यातून पाण्याची गळती होणे, सांडव्याची दुभाजक भिंत मोडकळीस आली होती‌. त्यामुळे येथे आवश्यक ती दुरूस्तीची कामे होणे अत्यंत गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन राजूरी परिसरातील शेतकरी बांधवांनी आदर्श गाव वंजारवाडीचे सरपंच वैजनाथ तांदळे यांच्या माध्यमातून हा प्रश्न आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे मांडला. त्यावर आ.क्षीरसागर यांनी या संदर्भात शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी वंजारवाडी तलाव आणि पाटदुरूस्तीच्या कामासाठी १ कोटी ७ लाख रूपयांचा भरघोस निधीसह मंजूरी मिळाली आहे.आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राजूरी, वंजारवाडी आणि परिसरातील गावांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

डोमरी तलावाचे पाणी वंजारवाडी तलावात आणण्यासाठीही पाठपुरावा सुरू, स्व.अजितदादांनीही दिले होते निर्देश

   मागील अनेक वर्षांपासून डोमरी तलावामध्ये अतिरिक्त असलेले पाणी वंजारवाडी तलावात वळविण्यासाठी मागणी आहे. आ.संदीप क्षीरसागर हे मागील अनेक दिवसांपासून डोमरी तलावातील अतिरिक्त (ओव्हरफ्लो) पाणी वंजारवाडी तलावात लिफ्टींगद्वारे आणण्यासाठी आणि वंजारवाडी धरणाची उंची वाढवण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत. दरम्यान सन २००७ मध्ये स्व.अजित दादा पवार जलसंपदा मंत्री असताना, डोमरी धरणातील अतिरिक्त पाणी वंजारवाडी धरणात वळवणे आणि वंजारवाडी तलावाची उंची वाढविण्याचा कामासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

मजुरीसाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग; तोंडाला चावा घेत महिलेने केली सुटका

0

केज — गेल्या दोन वर्षापासून नवरा बेपत्ता असल्याचा गैरफायदा घेतऊस बांधणीसाठी शेतात मजुरीसाठी जात असलेल्या विवाहित महिलेचा रस्त्यात अडवून वाईट हेतूने विनयभंग करण्याचा एकाने प्रयत्न केला मात्र पीडित महिलेने धाडसी प्रतिकार करत आरोपीच्या तोंडाला चावा घेतला, त्यामुळे आरोपीने पळ काढला.६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजताच्या सुमारास घडली.
केज तालुक्यातील ही महिला रोजंदारीने ऊस बांधणीचे काम करण्यासाठी एकटीच पायी शेताकडे जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवले. त्यानंतर झटापट करत वाईट हेतूने तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेने त्याच्या तोंडाला जोरदार चावा घेतला. त्यामुळे जखमी झालेल्या आरोपीने तिला सोडून घटना स्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ आपल्या दीर, जाऊ व सासू यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांसह केज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून अजहर अशरफ पठाण याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११५(२) तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कलम ३(१)(आर), ३(१)(डब्ल्यू)(i) व ३(१)(डब्ल्यू)(ii) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत. दरम्यान
पीडित महिलेने प्रसंगावधान राखत केलेल्या प्रतिकारात आरोपीच्या तोंडाला जोरदार चावा घेतल्याने तो जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपीची परिसरात चांगलीच चर्चा होत असून त्याच्या कृत्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. पीडित महिलेचा पती गेल्या दोन वर्षापासून बेपत्ता असून या प्रकरणात पोलीस दप्तरी नोंद देखील करण्यात आलेली आहे. पीडित महिलेच्या याच परिस्थितीचा फायदा घेण्याचा आरोपीने प्रयत्न केला असल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आला आहे

अजितदादांचा विमान अपघात,खा.सोनवणे यांना वेगळीच शंका

0

बीड — ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान  अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर विमान अपघातावर शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, आता खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील नवी शंका उपस्थित केली आहे.

विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे अशी शंका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणेंनी उपस्थित केली आहे. त्यांच्या या शंके नंतर आता नवीन विषयाला तोंड फुटलं आहे.

यावेळी सोनवणे यांनी आणखीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानात 6 लोक होते तर 5 बॉड्या कशा सापडल्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. अजित पवार घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज आणि एअरपोर्टवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासलं पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर सोनवणे यांनी आपल्या आयुष्यात दादा किती महत्वाचे होते यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मला घडवण्यामध्ये अजितदादा पवार यांचा मोठा वाटा आहे. 1999 पासून त्यांचा माझा संबंध आला. अजित दादा माझे राजकीय वडील होते. आज संपूर्ण महाराष्ट दुःखात आहे.

हा सर्व नियतीचा खेळ आहे. येडेश्वरी कारखाना परिसरात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार आहोत. या स्मारकामधून सर्वांना ऊर्जा मिळेल. बीड जिल्ह्यात नसेल, असं स्मारक उभारणार आहोत. एका वर्षात स्मारक बांधून पहिल्या पुण्यतिथीला लोकार्पण करणार आहोत. बीड जिल्ह्याच्या विकासाची वेळ आली आणि दादा गेले हे दुर्दैव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मी भाष्य करणार नाही, कारण आज ती वेळ नाही असंही ते म्हणाले.

दादा मला हेलिकॉप्टरमध्ये काय बोलले हे मी आज सांगणार नाही. पण दादा जे काय बोलले ते अपूर्ण राहू नये, असं आम्ही काम करणार आहोत. आज राजकारणावर बोलण्याची वेळ नाही. दहा दिवस दुखवटा असल्याने मी माध्यमांशी बोललो नाही. दादांचा आम्हाला मोरल सपोर्ट होता. आता बीड जिल्ह्याचा विकास होईल की नाही? हे सांगता येत नाही.राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या बैठकीला मी नव्हतो. बीडहून संभाजीनगर आणि तिथून आम्ही सोबत प्लेनने पुण्याला गेलो होतो. ज्या माणसावर आम्ही परमेश्वरापेक्षा जास्त प्रेम केले तो आता निघून गेला असंही ते म्हणाले.

दादा गेले त्या विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेत. विमानात 6 लोक होते, मग 5 बॉडी कशा सापडल्या? ज्या प्रकारे अपघात झाला, त्या विमानात बॉम्ब होता का? हे पाहिले पाहिजे. अंजली दमानिया यांच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा तपास सार्वजनिक करा. पायलट कोण होता याची चौकशी झाली पाहिजे. घटनेच्या दिवशीचे सकाळपासूनचे  सिसीटिव्ही फूटेज दाखवले गेले पाहिजे. विमान वरच क्रॅश झाले. वर विमान ब्लास्ट का झाले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.

एस‌.पी. साहेब..! बदलते निर्णय हि चुकीची उपरती की राजकारण्यांचे बाहूले?

0

बीड — पोलीस दलात होणाऱ्या भ्रष्टाचारा विरोधात कारवाईचा निर्णय घ्यायचा, ढोल वाजवून गाजावाजा करायचा अन काहीच दिवसात पुन्हा तो निर्णय बदलून क्लीन चीटही आपणच द्यायची असा “घराला नाही कौल आणि रिकामा डौल” असा प्रकार पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सुरू केल्याचं पाहायला मिळू लागलं आहे. वाळू प्रकरणात लाच घेताना माजलगाव पोलीस ठाण्याचा कर्मचारी 28 जानेवारी रोजी एसीबी ने रंगेहात पकडला यावर कारवाई करत कांवत यांनी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची उचल बांगडी करून नियंत्रण कक्षात बदली केली. अशीच घटना पाटोदा या ठिकाणी सुद्धा घडली होती. तिथेही कर्मचारी लाच घेताना पकडला गेला. त्यावेळीही सोमनाथ जाधव या पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. मात्र हे दोन्हीही निर्णय आता बदलण्यात आले असून माजलगाव माजलगाव शहर पोलीस ठाण्याचा कारभार पोनि राहूल सूर्यतळ यांना पुन्हा देण्यात आला तर सहा महिने पोनि सोमनाथ जाधव यांना चुकीच्या निर्णयामुळे कंट्रोलला बसावे लागले म्हणून बक्षीस म्हणून बीड ग्रामीण पोलीस ठाणे त्यांच्या हवाली करण्यात आलं तर पोनि अशोक मूदीराज यांना नियंत्रण कक्षात हलवण्यात आलं.
सहा महिन्यापूर्वी वाळू वाहतूक करणारा कडून लाच घेताना पाटोदा पोलीस ठाण्याचा कर्मचारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला. पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली म्हणून जबाबदार धरत पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी ठाणे प्रमुख सोमनाथ जाधव यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली केली. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असा संदेश देऊन माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाहवाई कांवत यांनी मिळवली. त्यानंतर 28 जानेवारी 2026 रोजी वाळू वाहतुकीत पोलिसांची हप्ते खोरी चालत असल्याचा प्रकार माजलगाव मध्ये उघडकीस आला. माजलगाव शहर पोलीस ठाण्याचा कर्मचारी अमोल कदम खासगी इसमासह वीस हजाराचं लाचेच शेण खाताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगहात पकडला. मग काय पोलीस अधीक्षकांना पुन्हा नव्याने दवंडी पिटवण्याची व कर्तव्यदक्षतेचा आव आणण्याची आयती संधी चालून आली. जाधव यांच्यावर कारवाई केली तशीच कारवाई करत तडकाफडकी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना नियंत्रण कक्षात हलवण्यात आले. ठरल्याप्रमाणे पोलीस अधीक्षकांची माध्यमांनी पाठ थोपटली. मोठा गाजावाजा झाला गेला. दरम्यान या बदलीच्या घटनेला आठ नऊ दिवसाचा कालावधी उलटत नाही तोच पोलीस अधीक्षकांना साक्षात्कार झाला. लाचखोरीच्या प्रकरणात पोनि राहुल सूर्यतळ यांचा काय दोष असं जबाबदार धरण योग्य नाही. म्हणून आपला पूर्वीचाच निर्णय बदलून पुन्हा त्यांना सन्मानाने माजलगाव शहर पोलीस ठाणे बक्षीसी म्हणून देण्यात आलं.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबल नाही तर विनाकारण आपण पोनि सोमनाथ जाधव यांना जबाबदार धरून सहा महिने कंट्रोल ला बसवले याची जाणीव देखील झाली गेली. या सगळ्याच परिमार्जन म्हणून त्यांच्याकडे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आला. या संदर्भातले आदेश आज काढण्यात आले. एका मातब्बर आमदाराच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या बाबतीत निर्णयाचा फेरविचार पोलीस अधीक्षकांना करावा लागला. हाच तो साक्षात्कार होता अशी कुजबुज पोलीस दलात सुरू झाली आहे.याबरोबरच आणखी एका आमदाराच्या सांगण्यावरून पेठ बीड पोलीस ठाणे विविध अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या व कायदा सुव्यवस्थे ची विल्हेवाट लावणाऱ्या पो नि अशोक मूदीराज यांना सन्मानाने बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचा कारभार देण्यात आला होता. या बदली प्रकरणाला ही फार दिवस झालेले नाहीत. मात्र त्यांची बदली कंट्रोलला करून जनतेवर मात्र पोलीस अधीक्षकांनी उपकार करून जनतेला मोकळा श्वास मिळवून दिला आहे. पोलीस अधीक्षकांना या निर्णयासारखीच उपरती देऊन कधी अवैध धंद्यांना आळा घातला जाईल, सर्वसामान्यांच्या जीवनात न्याय कधी मिळेल? खून दरोडे चोऱ्या मारहाणी यासारख्या घटनांना देखील आळा घातला जाईल म्हणून जनतेला देव पाण्यात घालून बसण्याची वेळ आली आहे.
अशा आपणच घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात पुन्हा दुसरा आदेश काढणं ही पोलीस अधीक्षकांना उमगलेली चूक होती की पुन्हा “ये रे माझ्या मागल्या” या म्हणीप्रमाणे राजकारणी लोकांचे कठपुतले बाहुले म्हणून काम करू लागले आहेत असा आरोप देखील होऊ लागला आहे. वारंवार बदलल्या जाणाऱ्या निर्णयामुळे काहीही असो “लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार कांवत साहेब अजब तुमचा कारभार ” असं गाव पारावर गमतीने म्हटलं जाऊ लागला आहे.

बीडचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित थेट फिल्डवर

0

उन्हाळा व रमजानच्या पार्श्वभुमीवर पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा

बीड — राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी बीडचा पाणीप्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता, सर्व यंत्रणांना कामाला लावत बीड नगर पालिकेच्या थकीत विज बिलासाठी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. पाणी प्रश्नासह दादांचा बीडच्या विकासाचा वादा राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्यासाठी आ. विजयसिंह पंडित थेट फिल्डवर उतरले आहेत. बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव येथील बॅक वॉटर काडीवडगाव आणि ईट येथील जलशुध्दीकरण केंद्राची त्यांनी पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता तुषार टेकावडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, सभापती शेख निजाम, संपादक शेख मुजीब यांची उपस्थिती होती.

शुक्रवार, दि.६ फेब्रुवारी रोजी आ. विजयसिंह पंडित यांनी बीड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी माजलगाव बॅक वॉटर काडीवडगाव आणि ईट येथील जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली. या पाहणीत योजनेच्या पाईपलाईनवर पाणी गळती, पाणी वितरणातील अवमेळ, फिल्डवरील बिघाड याकडे झालेले दुर्लक्ष आणि तांत्रिक चुका अशा धक्कादायक बाबी यावेळी समोर आल्या. या सर्वांचा बीड शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. माजलगावच्या काडीवडगाव येथील बॅकवॉटरवरून ३६ एमएलटी पाणी प्रत्यक्षात उचलण्यात येत असले तरी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणी गळतीमुळे ईटच्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत हे पाणी पोहोचत नाही. ही अशीच गळती जलशुध्दीकरण केंद्रावरही होत असल्याचे निदर्शनास आल्याने याचा बीड शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसताच आ. विजयसिंह पंडित यांनी भविष्यातील उन्हाळी परिस्थिती, रजमान व इतर सण लक्षात घेता तातडीने उपलब्ध साधन सामग्रीचा व यंत्रणेचा वापर करून बीड शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्या बाबतच्या सूचना पालिका प्रशासन, पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना दिल्या आहेत.
यावेळी पाणीपुरवठा अभियंता माने, विद्युत विभागाचे विजय गाडेकर, उदय ईपिल्ला, एम.जी. पठाण, दत्ता व्यवहारे, एम.बी.सानप, रशिद सय्यद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांचा पुढाकार

शिव-शाहू-फुले-आंबेडकर-मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक शहरातील नागरीकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ॲक्टिव असल्याचे दिसून येत आहे. शहरातील रस्ते, नाली, स्वच्छता, पाणी प्रश्न, विद्युत पुरवठा आदी मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांच्यासह नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सभापती व सर्व नगरसेवक उपलब्ध होत असून बीड नगर परिषदेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच शहरवासियांचे मुलभूत प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे नागरीकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

शहरात बदल होतोय

बीड नगर परिषदमध्ये स्व.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन बीड शहरातील जनतेने परिवर्तन केले. नगर परिषदेची सत्ता हाती आल्यानंतर आ. विजयसिंह पंडित हे आपल्या नगरसेवकांसह शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध प्रश्न निकाली निघत आहेत. स्वच्छतेसाठी घंटागाड्या, पाणी पुरवठा यांसह विविध मुलभूत प्रश्न मार्गी लागत असल्याने बीड शहरामध्ये बदल होत असल्याची चर्चा नागरीकांमधून केली जात आहे.

माजलगाव: नगराध्यक्ष पती बिलाल चाऊस कडून न.प.कर्मचाऱ्यास बेदम मारहाण?

0

माजलगाव — पी टी आर विभागातील कामावरून झालेल्या वादातून नगराध्यक्ष शिफा बिलाल चाऊस यांचे पती बिलाल सहाल चाऊस यांनी दादागिरी करत अक्षय धारक या न प कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याची खळबळ जनक घटना गुरुवारी दुपारी घडली.
नगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या असून शिफा बिलाल चाऊस या निवडून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. त्यांनी पदभार घेऊन महिना उलटला नाही तोच नगराध्यक्षांचे पती बिलाल सहाल चाऊस यांनी नगरपालिकेतील आस्थापना विभागातील कर्मचारी अक्षय धारक यांना पीटीआर द्यायला पैसे का मागितलेस म्हणून नगरपालिकेत येत अक्षय धारक यांना खाली बोलावून त्यांच्या श्रीमुखात भडाकावली त्यानंतर त्यांच्या साथीदाराने त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची खळबळ घटना घडली. दरम्यान हा प्रकार चालू असताना येथे कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी हे भांडण सोडवले व पुढे होणारा अनर्थ टाळला. याप्रकरणी शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्ष पतीची दादागिरी सहन केली जाणार नसल्याचे कर्मचाऱ्यांमधून सांगण्यात येत आहे. पुन्हा असा प्रकार झाल्यास आम्ही आंदोलन छेडणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.

नियमानुसार काम करत होतो
माझ्याकडे आस्थापना विभाग असून पीटीआर विभागातील माणूस सुट्टीवर असल्यामुळे मला त्या ठिकाणी बसवण्यात आले होते. मी संबंधितांना पीटीआर दिली व नियमानुसार शंभर रुपयाची पावती फाडण्यास सांगितले. म्हणून बिलाल चाऊस व त्याच्या साथीदारांनी मला नगरपालिकेत येऊन मला मारहाण केली.
अक्षय धारक , कर्मचारी न.प. माजलगाव

स्व.अजित दादांच्या निधनामुळे शिवजयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द 

0

शासकीय महापूजा, अभिवादन करून साधेपणाने साजरी होणार शिवजयंती 

बीड — राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, दिवंगत लोकनेते स्व.अजित दादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे बीड येथे बीड शहर सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने दरवर्षी साजरे होणारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान सकाळी ७:०० वा. होणाऱ्या शासकीय महापूजा आणि अभिवादन सभेस मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बीडचे आ संदीप क्षीरसागर आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहर च्या वतीने करण्यात आले आहे.
                 गेल्या ३० वर्षांपासून बीड शहरात, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहराच्या आयोजनातून डीजेमुक्त आणि वर्गणी मुक्त असणारी शिवजयंती, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आदर्श पद्धतीने साजरी केली जाते. सालाबादप्रमाणे यंदाही जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवकालीन मर्दानी खेळ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काही दिवसांपूर्वीच दिवंगत लोकनेते स्व.अजित दादा पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक आणि दुर्दैवी निधन झाले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुःखद पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेची जाणीव ठेवत, यावर्षी शिवजयंती कोणतेही जल्लोषी कार्यक्रम न करता साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.
   परंपरेप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा
परंपरेप्रमाणे सकाळी ७:०० वा. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहरचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी तसेच विविध मान्यवर यांच्या हस्ते शासकीय महापूजा आणि अभिवादन करून साधेपणाने शिवजयंती साजरी केली जाणार आहे. शासकीय महापूजा आणि अभिवादन कार्यक्रमासाठी दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:०० वा. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहर यांच्याकडून करण्यात आले आहे.

शस्त्राचा धाक दाखवून लुटणारा फरार आरोपी पकडला

0

बीड — जिल्हा परिषद कार्यालयासमोर शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने साहित्य पळवून नेणारा आणि मागील एक वर्षापासून हैदराबाद येथे फरार असलेला सराईत गुन्हेगार सय्यद अनवर याला बीड शहर पोलिसांनी बीड जिल्हा परिषदेच्या आवारातून सापळा लावून जेरबंद केले.

सय्यद अन्वर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी अशोक रोहिदास कांबळे (रा. साखरे बोरगाव, ह.मु. बीड) हे जिल्हा परिषद कार्यालयासमोरील जागेत पत्र्याचे शेड मारण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी सय्यद अनवर सय्यद मुजावर आणि यासिन खान पठाण दोघे रा. बीड यांनी तेथे येऊन फिर्यादीस फरशी कुऱ्हाड व तलवारीचा धाक दाखवून, कामासाठी लागणारे २५ हजार रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन, कटर मशीन व ड्रिल मशीन बळजबरीने चोरून नेले होते. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सय्यद अनवर हा गुन्हा केल्यापासून मागील एक वर्षापासून हैदराबाद येथे पळून गेला होता व पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, बीड शहर पोलिसांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, हा आरोपी बीडमध्ये आला असून जिल्हा परिषद आवारामध्ये संशयास्पदरित्या फिरत आहे. या माहितीची तत्काळ दखल घेत पोलिसांनी सापळा रचून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस हवालदार सय्यद शहेनशहा, गहिनीनाथ बावनकर, मंगेश शिंदे, राम पवार आणि इलियास शेख यांच्या पथकाने केली आहे.

पोलिसांनी कपिलधार येथे होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

0

बीड — कपिलधार देवस्थान येथे सोळा वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळताच पोलिसांनी कारवाई करत विवाह रोखण्यात यश मिळवले.AHTU ने मुलीला ताब्यात घेवून पोस्टे बीड ग्रामीण येथे केला गुन्हा दाखल

याबाबत सविस्तर बातमी अशी की, दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी, पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी ११:३० वाजता फोनद्वारे माहिती दिली की, आज दुपारी १२:०० वाजता कपिलधार देवस्थान ता. जि. बीड येथे एका १६ वर्षाच्या मुलीचा बालविवाह होणार आहे. त्यावरून, पो उप नि पल्लवी जाधव या AHTU टीमसह व तत्वशील कांबळे असे कपिलधार देवस्थान येथे दाखल झाले. तेथे दोन तीन विवाह सुरू होते आणि माणसांची पण खूप गर्दी होती म्हणून सर्व टीम पहिल्या हॉल मधे दाखल झाली. तेथे गेल्यावर पो उप नि पल्लवी जाधव ने एका महिलेला नवऱ्या मुलीचे नाव विचारले असता तिने मुलीचे नाव चुकीचे सांगितले म्हणून टीम तेथून बाहेर पडणार तोच मुलीचे आडनाव विचारले तर ते बरोबर सांगितले. म्हणून मुलीला ताब्यात घ्यायला टीम जाणार तोच वऱ्हाडी मंडळीला पोलीस असल्याचा संशय असल्याने त्यांची पळापळ सुरू झाली. एवढ्या गर्दीत पल्लवी जाधव यांनी मुलीला ताब्यात घेतले व गर्दीचा फायदा घेवून नवरदेव मुलगा पळून गेला. हॉल मधे हजर असलेल्या व पळणाऱ्या लोकांना थांबायला सांगून त्यांना पल्लवी जाधव यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम बाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले. पीडित मुलीला विश्वासात घेवून तिचे समुपदेशन केले व तिला तिच्या लग्नाबाबत विचारपूस केली असता, तिने सांगितले की, तिचा विवाह राजेंद्र भाऊसाहेब शिंदे वय २४ वर्ष रा.पिंपळाची वाडी ता. शिरूर कासार जि. बीड याच्यासोबत झाला आहे. सदर पीडित मुलगी व तिचे आई वडील व मामा तसेच राजेंद्र व त्याचे आई वडील फरार झाल्याने त्याचे मामा व नातेवाईकांना ताब्यात घेतले व पुढील कारवाई साठी पोस्टे बीड ग्रामीण येथे हजर केले. तसेच नवरदेव राजेंद्र व त्याच्या आई वडिलांना पोस्टेला हजर होण्याबाबत वऱ्हाडी मंडळीला सूचना दिल्या . तसेच बालविवाहाचा गुन्हा दाखल करणेकामी बालविवाह प्रतिबंधात्मक अधिकारी, श्रीराम वीर ग्रामपंचायत अधिकारी पाली बीड यांना घटनेची फोनद्वारे सर्व माहिती देवून पोस्टे बीड ग्रामीण ला बोलावून घेतले.
पोस्टेला आल्यावर त्यांनी पीडितेशी व तिच्या आई वडिलांशी संवाद साधून सर्व माहिती घेतली व पोस्टे बीड ग्रामीण गुरनं ४३/२०२६ कलम ९, १०,११ बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये ८ आरोपी तसेच इतर ५० ते ६० वऱ्हाडी मंडळी व देवस्थान ट्रस्टी व सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पल्लवी जाधव यांनी पीडित मुलीच्या काळजी व संरक्षणासाठी तिला बालकल्याण समिती बीड यांचे समक्ष हजर करणे बाबत तपास अधिकारी यांना सूचना दिल्या आहे.
सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएसआय पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, पोशी अक्षय जाधव सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड यांनी केली.

सोयाबीनच्या दरात सहा हजारांची उसळी; आणखी भाव वाढण्याची शक्यता !

0

सांगली — चार-पाच वर्षानंतर प्रथमच सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त बाजार भाव मिळत आहेत.गेल्या १५ दिवसांपासून सोयाबीन दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शनिवारी प्रतिक्विंटल ५५०० ते ५९०० रुपये दर मिळाला.
राज्यात खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच सोयाबीनला अपेक्षित दरही मिळत नव्हता.यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकडे दुर्लक्ष केले होते. तसेच उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणावर घट आली आहे सध्याच्या काळात सोयाबीनचे उत्पादन कमी असूनही डिसेंबर २०२५ मध्ये सोयाबीनला अपेक्षित बाजारभाव मिळत नव्हता.
डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यात ‘नाफेड’च्या केंद्रांवर सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू झाली. दरम्यान, मागील १५ दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आहे.
मागील चार दिवसांत तर हमीभावापेक्षाही (५३२८ रुपये) अधिक दर सोयाबीनला बाजार समित्यांमध्ये मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.मंगळवारी सांगली मार्केट यार्डात सोयाबीनला प्रतिक्विंटल ५५०० ते पाच हजार ९०० रुपये दर मिळाला आहे. सोयाबीन दर येणाऱ्या काळामध्ये 6 हजार रुपयांपेक्षा अधिक चा टप्पा पार करेल असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे