Home Blog Page 129

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी ॲड. उज्जवल निकम यांची नियुक्ती

0

बीड — मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून या संदर्भातील अधिसूचना निघाल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी माध्यमांना दिली.

या अधिसूचनेनुसार ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मागील महिना ते दीड महिन्यांपासून या प्रकरणात ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पुढे येत होती. याच प्रमुख एका मागणीसाठी मंगळवारपासून मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले असून, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच ॲड. निकम यांच्या नियुक्तीच्या संदर्भाने अधिसूचना निघाली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: मसाजोग ग्रामस्थांचे अन्न त्याग आंदोलन सुरू

0

बीड — आज धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत. सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाद्वारे हत्येतील सर्व आरोपींना अटक करण्याची आणि कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस उलटून गेले आहेत, आणि या प्रकरणात कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे.

धनंजय देशमुख म्हणाले की, केज पोलिसांच्या तपासात सुरुवातीला असमाधानकारक निष्कर्ष आले होते. त्यांनंतर पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या चर्चेत तपासाची असमाधानकारक कार्यशैली उघड झाली, तसेच पोलिसांनी आरोपींना अभय दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

या हत्येच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वाल्मीक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली, जी धनंजय देशमुख यांच्या आंदोलनामुळे पूर्ण झाली. आता तिसऱ्यांदा ग्रामस्थ आणि धनंजय देशमुख अन्नत्याग आंदोलन करीत आहेत, आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांनी एल्गार पुकारला आहे.

धनंजय देशमुख यांचे प्रमुख मागणी आहे की, कृष्णा आंधळे याला अटक करून त्याच्या समर्थकांवर कारवाई केली जावी, कारण ते प्राणघातक हल्ले करत आहेत. कृष्णाचे समर्थक अजूनही त्याचे स्टेटस ठेवतात, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याशिवाय, सरकारकडून सरकारी वकिलांची नियुक्ती करून या प्रकरणाला फास्ट ट्रॅक न्यायालयात न्याय मिळवावा अशी मागणी धनंजय देशमुख आणि मसाजोग ग्रामस्थ यांच्याकडून केली जात आहे.

पीआय गोसावी दरोडेखोरावर सवाई; थरारक कारवाईत दरोडेखोर पकडले

0

नेकनूर — सोलापूर मधील मोहोळ तालुक्यात दरोडे वाट मारी लूटमार करणारे दरोडेखोर बीड जिल्ह्यात असल्याची माहिती सोलापूरच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. दरोडेखोरांच्या मागावर असलेल्या सोलापूर पोलिसांचे पथक केज मध्ये आले. दरम्यान दरोडेखोर नेकनूरच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच नेकनूर पोलिसांशी संपर्क साधला. एपीआय चंद्रकांत गोसावी यांनी तात्काळ नेकनूर चौकात नाकाबंदी केली. पळून जात असलेल्या दोन दरोडेखोरांना थरारक पद्धतीने जेरबंद करण्यात यश मिळवले.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात दरोडे टाकणारे दरोडेखोर बीडच्या दिशेने एमएच २२ ए ३४ ४६ या गाडीने सोलापूर पोलिसांना हुलकावणी देत निघाले होते. दरोडेखोरांच्या पाठलागावर सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस होतेच. केज मधून हुलकावणी देऊन नेकनूर कडे दरोडेखोर निघालेले असताना सोलापूर पोलिसांनी नेकनूर पोलिसांचे संपर्क साधला. ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी यांनी तात्काळ नेकनूरच्या नुराणी चौकात नाकाबंदी केली. दरोडेखोरांना पळून जाताना अडथळा निर्माण व्हावा अशा पद्धतीने तीनही रस्त्यांना वाहने आडवी लावली. दरोडेखोर भरधाव वेगात आल्यानंतर अडथळ्यातून मार्ग काढत असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवळल्या. दरम्यान ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी पोलीस नाईक सचिन वंजारे पोलीस अंमलदार बाळासाहेब ढाकणे सय्यद अब्दुल्ला सहाय्यक उपनिरीक्षक रेखा मॅडम पोका आशा चौरे होमगार्ड मुतजीब आतार यांनी पार पाडली. पकडलेल्या दरोडेखोरांना सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

कांदा पिकात अफूची लागवड; साडेचार किलो अफू जप्त

0

केज — एका शेतकऱ्याने कांद्याच्या पिकात अफूची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर केलेल्या कारवाईत एक लाख 72 हजार रुपयाची साडेचार किलो अफू जप्त करण्यात आली. ही घटना कळंबआंबा येथे उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी की कळंब अंबा येथील शेतकरी उत्तम रंगनाथ मस्के या शेतकऱ्याने शेतात कांद्याची लागवड केलेली आहे. याच कांदा पिकात अफू पिकाची देखील लागवड केली. या संदर्भात युसुफ वडगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली या माहिती आधारे पोलिसांनी सोमवारी उत्तम मस्के यांच्या शेतात धाड टाकली. असता अफूची झाड मिळून आली. या कारवाईत पोलिसांनी साडेचार किलो अफु जप्त केला. या अफुची किंमत 1 लाख 72 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी उत्तम मस्के यास पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई नायब तहसीलदार आशा वाघ, पोलीस निरीक्षक शेंडगे, सय्यद अमजद, शिनगारे, घोरपडे, महादेव, राऊत, डोंगरे, चालक गायकवाड यांनी केली आहे.

गुत्तेदार करतोय पुलाचे काम लावून थुंका; शाखा अभियंता ठाकूरच्या मदतीने जनतेला फासतोय बूक्का

0

चौसाळा — चौसाळा नांदूर रोडवर ज्योतिबा नाल्यावरील पुलाच्या डागडुजीचे काम थातुरमातुर करत शासनाच्या तिजोरीला लुटल्याचा चंग गुत्तेदाराने बांधला आहे. पूल खचलेला असला तरी वरच्यावरीच कठडे बांधून रंगरूप आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चौसाळा नांदूर रस्त्यावरील पुलांची डागडुजी करण्यात येत आहे. कोष्टी नाल्यावरील पुलाच्या सिमेंट नळ्या सध्याच्या स्थितीत वाहून गेलेल्या आहेत. हा पूल खचून भगदाड पडली आहेत. या भगदाडामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले असले तरी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे सोयर सुतक नाही. तीच स्थिती जोतिबा नाल्यावरील पुलाची आहे. पूल खचून कठडे कोसळलेले आहेत. दरम्यान या पुलाच्या डागडुजी चे काम सध्या हाती घेतलेले आहे. मात्र हे काम ज्या गुत्तेदाराला दिले आहे. तो गुत्तेदार नुसता थूंक्याला थूंका लावण्याचे काम करत असल्याचं सध्या तरी दिसत आहे. जुने कठडे अर्धा फूट उकरून त्यावरच सेंट्रींग ठोकून थातूरमातूर काम सुरू केलं आहे. ज्या पूलाचा पायाच खचला आहे. त्याला वरच्या बाजूला डागडुजी करून उपयोग काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला बुद्धिवंत अभियंते मिळालेले असल्यामुळे जनतेला मुर्खात काढून शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकायचा आहे की काय असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. विशेष म्हणजे पुलाचे कठडे अर्धा फूट उकरल्यानंतर त्याखाली काळी मातीच असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या पुलाचे काम अशा पद्धतीने थातूरमातूरच करायचय तर काळे कागद करून बिल उचलली तरी काय हरकत आहे.असं काम करण्यापेक्षा न केलेलं बरं असं आता जनतेत बोललं जाऊ लागला आहे.
यासंदर्भात शाखा अभियंता संजय ठाकूर यांना संपर्क साधून प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ठाकुरी थाटात असलेल्या या अभियंत्याला फोन उचलण्याची तसदी घ्यावी वाटली नाही. कार्यकारी अभियंता तोंडे असे गुत्तेदार हाताशी धरून लोकांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. बोराडेंचा राडा जनतेच्या मुळावर उठणार आहे.
या पुलाचे काम दर्जेदार करण्यात यावं अशी मागणी होऊ लागली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण: ग्रामस्थ मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलन करणार

0

केज — सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्याने न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंब,महिला व ग्रामस्थांसह मंगळवारी सकाळी 10 वाजल्या पासून महादेव मंदिरासमोर सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरु होणार असल्याची घोषणा सोमवारी रात्री 9 वाजता झालेल्या बैठकीत सर्व एकमताने करण्यात आली.

मस्साजोग ग्रामस्थांनी 25 फेब्रुवारी पासून सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना यापूर्वीच दिले होते. मात्र सोमवारी रात्री 9 पर्यंत प्रशासनाकडून गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत त्यामुळे सामूहिक अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय गावाकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान अन्नत्याग आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिली.

भिक्षुकी करणाऱ्या कुटुंबाला द्वारकाधीश मित्र मंडळाचा मदतीचा हात

0

बीड — शहरातील धोंडीपुरा भागातील ब्राह्मण समाजातील भिक्षुकी करणारे स्व.भालचंद्र कुलकर्णी यांचे काही दिवसांपुर्वी दुःखद निधन झाले होते, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्यांच्या हलाखीची असल्याने या कुटुंबासाठी द्वारकाधीश मित्र मंडळाने मदतीचा हात दिला आहे. स्व.भालचंद्र कुलकर्णी यांचा दहाव्या पासुन ते चौदाव्या पर्यतच्या विधीचा सर्व खर्च व्दारकाधीश मित्र मंडळ करणार आहे. द्वारकाधीश मित्र मंडळाने केलेल्या या मदतीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. भविष्यात ही या कुटंबाच्या मदतीसाठी द्वारकाधीश मित्र मंडळ कटिबद्ध राहील, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता यांना कैद करण्याचे न्यायालयाचे आदेश

0

बीड — भूसंपादनाच्या मावेजासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका भूसंपादन मावेजा प्रकरणात थेट जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कैद करण्याचे आदेश बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. एस. पिंगळे यांच्या न्यायालयाने दिले आहेत. तसे वॉरंटचं न्यायालयाने काढल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची भूसंपादन मावेजाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत . त्यासाठी शेतकरी खेटे घालत असतात. न्यायालयाचा निवडा आल्यानंतरही भूसंपादन मावेजा दिला जात नसल्याची देखील प्रकरणे आहेत. त्यातूनच काही दिवसांपूर्वी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश माजलगाव न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आता बीडच्या दिवाणी न्यायालयाने आणखी एक आदेश दिला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. राजेश पोकळे यांची जमीन लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर बीड यांच्या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. त्याचा मावेजा देण्याचे आदेश 2018 मध्ये देण्यात आले होते. मात्र त्याची पूर्तता अद्यापही झाली नसल्याने 13 लाख 19 हजाराच्या मावेजासाठी शासनाच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर चे कार्यकारी अभियंता यांना कैद करून त्यांच्याकडून मावेजाची रक्कम भरणा करून घ्यावी अशा आदेशाचे वॉरंट बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस. पिंगळे यांच्या न्यायालयाने काढले आहेत. या वॉरन्टची अंमलबजावणी 21 मार्च पूर्वी करावयाची आहे. या आदेशाने सर्वत्र खळबळ माजली आहे.
काय असते दिवाणी कैद ?
बीडच्या न्यायालयाने दिलेले हे आदेश दिवाणी कैदेचे आहेत . यात धनको म्हणजे ज्याचे पैसे येणे आहेत ती व्यक्ती ऋणको अर्थात कर्जदाराच्या दिवाणी अटकेची मागणी करते, त्यासाठीचा भत्ता देखील धनको न्यायालयात भरते . ऋणकोला कैद केल्यानंतर त्याच्या खाण्याचा व इतर भत्ता धनको मार्फत केला जातो.

चार चाकी डिव्हायडर ला धडकताच पेटली; पोलीस कर्मचाऱ्यासह तरुणाचा जळून मृत्यू

0

जामखेड — शहरातील बीड रस्त्यावर चारचाकी कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्यानंतर, मोटारीने पेट घेतला. या अपघातात जामखेड पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यासह आणखी एका तरुणाचा जळुन मुत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.हा अपघात आज, सोमवारी पहाटे घडला.

धनंजय नरेश गुडवाल वय 35 वर्ष व महादेव दत्ताराम काळे, वय 28 वर्ष रा. आदित्य मंगल कार्यालय शेजारी, बीड रस्ता जामखेड  अशी दोघा मृतांची नावे असल्याची माहिती जामखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.

महादेव काळे व पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल हे दोघे आज पहाटे 4 च्या सुमारास चार चाकी गाडीतून क्र. एम एच 16 डीएम 35 83 जामखेड शहराकडे येत होते. मोटार एका हॉटेलसमोरील दुभाजकाला धडकली व मोटारीने पेट घेतला. अत्याधुनिक पध्दतीमुळे गाडीचे दरवाजे लॉक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मोटारीतील दोघांना बाहेर पडता आले नाही. त्यातच दोघांचा गाडीतच जळुन दुर्दैवी मुत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे त्या ठिकाणी आले. यानंतर जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जामखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग विझवली. अग्नीशमन दलाचे आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या जवानांनी त्यासाठी प्रयत्न केले. मोटार पूर्ण जळुन खाक झाली. दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.

घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले. अपघातील मृत महेश काळे याचे बीड रस्त्यावर साईनाथ पान शॉप दुकान आहे. अधिक तपास तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत.

जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षापासून अपुर्ण आहे. दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत, मधेच काही ठिकाणी डिव्हाइडर तसेच डिव्हाइडरसाठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होतात. यामुळे लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.

वडवणी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

0

बीड — अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी येत असताना गावातील एका तरुणाने रस्ता अडवून मुलीला घरात ओढत घेऊन जात लैंगिक अत्याचार केला. दरम्यान मुलीने आरडा ओरडा केल्याने आरोपी पळून गेला. घडलेला प्रकार मुलीने आपल्या आई व आजीला सांगितल्यानंतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज तांदळे असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वडवणी तालुक्यातील एका गावात राहते. आरोपी मनोज तांदळे देखील याच गावात राहतो. घटनेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला पीडित मुलगी नेहमी प्रमाणे शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर ती एकटी पुन्हा घरी निघाली होती.
दरम्यान, घरी जात असताना आरोपी मनोजने तिचा रस्ता अडवला. तिच्याशी दमदाटी करत तिचा हात पकडला आणि तिला ओढत घरात घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं पीडित मुलीवर बलात्कार केला. यावेळी पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर आरोपीनं घरातून पळ काढला. या घटनेनंतर पीडित मुलीनं घडलेला सगळा प्रकार आपल्या आजीला आणि आईला सांगितला. यानंतर घरच्यांनी पीडित मुलीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.