Home Blog Page 130

अंबाजोगाईच्या बस वाहकाचा चालत्या गाडीत देवरुख मध्ये मृत्यू

0

देवरूख — अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी गावच्या तुकाराम कुंडलिक माने या बस वाहकाचा करजुवे — देवरुख या दरम्यान चालत्या गाडीतच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

मंगळवार दि.18 फेब्रुवारी रोजी चालक बालाजी मनोहर कोपनर आणि वाहक तुकाराम कुंडलिक माने यांनी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत संगमेश्वर ते करजुवे अशा फेऱ्या मारल्या. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ते संगमेश्वर येथून करजुवे वस्तीची बस घेऊन गेले होते. बुधवारी सकाळी 6.15 वाजता ही बस करजुवे येथून प्रवासी घेऊन संगमेश्वरकडे निघाली. थोड्याच अंतरावर भायजेवाडी मार्गे घारेवाडी येथे वाहक तुकाराम माने चक्कर येऊन खाली पडल्याचे एका प्रवाशाने बसचालकाला सांगितले.
चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी करून तुकाराम मानेकडे विचारपूस केली. त्याने अस्वस्थ वाटत असल्याचे आणि छातीत दुखत असल्याचे सांगितले. चालक कोपनर यांनी वेळ न घालवता व प्रवाशांची मदत घेत थेट संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाकडे बस नेली. तेथे वाहकाला उपचारासाठी दाखल केले. मात्र तोवर तुकाराम याची प्राणज्योत मालवली होती.
देवरुख आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, स्थानक प्रमुख कैलास साबळे तसेच अनेक चालक वाहकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. काही वाहक आणि चालकांना अश्रू अनावर झाले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे
बीड जिल्ह्यातील तुकाराम माने हे २०१८ साली वाहक कम चालक म्हणून देवरुख आगारात रुजू झाले होते. दोन मुलगे आणि पत्नीसह ते देवरुखमध्ये राहतात. अन्य कुटुंब बीड जिल्ह्यातील मूळ गावी आहे.

दमानियां आधी माझ्यावर खटला दाखल करा, गंभीर आरोप करत धसांचे मुंडेंना आवाहन

0

बीड — आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या वरदहस्ताने कृषी खात्यात 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर खून खटल्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपावरूनही धनंजय मुंडें अडचणीत आले असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना कृषी खात्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सातत्याने करत आहेत. त्यानंतर, आता आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी स्वत: राजीनामा दिला होता, सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आम्ही स्वत: पाहिलंय की अजित पवारांनी राजीनामा दिला होता. मग, धनंजय मुंडे का देत नाहीत, असा सवालही आमदार धस यांनी उपस्थित केला आहे.

मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी झालेल्या आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या वरदहस्ताने कृषी खात्यात 300 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केले आहेत. शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी जीआर निघाला. हे सर्व डीबीटीने द्यावे असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सूचवले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावा असे आदेश काढल्याची माहिती आमदार धस यांनी दिली.

धनंजय मुंडे यांनी आज अर्ज उद्या कर्ज अशा स्वरुपात सर्व करुन ठेवले, टेंडर काढताना अतिशय डोक्याने ते काढले आहे. कुणाला काही कळू नये असे टेंडर काढण्यात आले, महाराष्ट्राचे डोके चक्रावेल असे सर्व आहे, असे आमदार धस यांनी म्हटले आहे. नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे, DAP मध्ये 56 कोटी 76 लाख रुपये, बॅटरी 45 कोटी 53 लाख, कापूस साठवणूक बॅगमध्ये 577 ची बॅग 1250 रुपये घेण्यात आली. तर, 180 कोटी 83 लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या चमूने बाहेर काढल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे. रफिक नाईकवाडे यातील मुख्य ॲक्टर आहे, भामरे आजही त्यांच्यासोबत आहेत. या चमूने फक्त कागदपत्रे रंगवली आहेत, लोकायुक्त कार्यालयाल देखील खोटी माहिती देण्यात आली. त्यामुळे, धनंजय मुंडे यांच्या काळातील या भ्रष्टाचाराची एस आय टी स्थापन करून चौकशी करा, अशी मागणीही आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

भारतीय किसान संघाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते, संबंधित घोटाळ्याची तपासून कारवाई करावी. मात्र, वाल्मिक कराड यांनी हे पत्र फाडून टाकले होते. कृषी विभागाला चॅलेंज करतो हे पत्र तुमच्याकडे आहे का? असंही धस यांनी म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याचे उत्तर द्यावे.भारतीय किसान सभेचे पत्र त्यांनी फाडून टाकले. त्यामुळे, त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे. तसेच, सीबीआय, ईडी एसीबी, यांच्याकडे याबाबतची सविस्तर तक्रार करणार आहे, धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्ंयामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. बदल्यांसाठीचे रेट कार्ड त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांकडे सापडले आहे, धनंजय मुंडे यांच्याकडे सर्व वाटा जात होता, असा गंभीर दावा आमदार धस यांनी केला आहे.

वाल्मिक कराड यांनी निविदा ठरवल्या, वाल्मिक कराड हे राज्याचे बाप होते का? महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक केली होती. या सर्वांचे सिडीआर काढा, 100 कोटींपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार यात आहे. वाल्मिक कराड जिल्ह्याचे बाप वाटत होते, मात्र निविदा काढण्यात देखील तो बाप होता असा टोला सुरेश धस यांनी लगावला आहे. आकाचे कार्य फक्त बीड जिल्हा पुरते नव्हते, संपूर्ण महाराष्ट्रभर होते, आता कागदाचा लढा चालू द्या, आता खटला करा पण मी माघार घेणार नाही. हा सगळा एकूण 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. धनंजय मुंडे म्हणतात अंजली दमानिया यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा करणार, पण मी म्हणतो त्यांनी माझ्यावर खटला दाखल करावा, असे म्हणत सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना चॅलेंजच दिले आहे.

शेतकऱ्यांची भिकाऱ्यांशी तुलना करणाऱ्या कृषिमंत्री कोकाटेच्या पेकाटात न्यायालयाची लाथ; 420 त दोन वर्षाची शिक्षा!

0

मुंबई — राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढतांना दिसून येत आहे. कारण कृषीमंत्री कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे या दोघांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा गुरूवारी सुनावल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या निर्णयाविरोधात कृषीमंत्री कोकाटे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करू शकतात. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या शिक्षेस स्थगिती न दिल्यास त्यांची आमदारकी देखील रद्द होवू शकते, त्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांचा पाय आणखी खोलात जातांना दिसून येत आहे.
कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर 1995 मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे.

कोणत्या प्रकरणात शिक्षा ?
1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात याचिका दाखल केली होती. माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर भादंवि कलम 420 (फसवणूक), 465 (कृत्रिम दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवजाचा उपयोग करणे) आणि 474 (सत्यता लपवणे) या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान कोकाटे यांना दोन तासाच्या काळात 15 हजार रुपयांच्या जात मूचलक्यावर जामीन मिळाला आहे.

धनजंय मुंडेंना “हा “दुर्मिळ आजार,सलग दोन मिनिटही बोलता येत नाही

0

मुंबई — मंत्री धनजंय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला असून या आजारामुळे त्यांना दोन मिनिटंही बोलता येत नाही. याबाबतची माहिती त्यांनीच सोशल मीडियातून दिली आहे

त्यांनी म्हटले आहे की, माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.

याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल…

माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

जल्लोष शिवजयंतीचा! बीडमध्ये ऐतिहासिक शिवजयंती साजरी

0

सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी खेळांची बीडकरांना मेजवानी

बीड  — दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या माध्यमातून, आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली डीजेमुक्त आणि वर्गणीमुक्त सांस्कृतिक शिवजयंती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीडकरांना विविध कला-क्रीडा सादरीकरणाच्या माध्यमातून अनोखी मेजवानी मिळाली.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहक्ष यांच्या आयोजनातून बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर बुधवारी (दि.१९) रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी लाखो शिवप्रेमींनी या कार्यक्रमाचा मनमुक्त आनंद घेतला.

आ.संदीप क्षीरसागरांनीही ढोल-ताशांच्या आणि शिवगीतांवर ठेका धरला होता. हे पाहून तरुणाई भारावली होती. या कार्यक्रमास बीड शहरासह ग्रामीण भागातील सर्व क्षेत्रातील मान्यवर, लाखो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

संदीपभैय्यांना मानावेच लागेल- मनोज जरांगे पाटील

अशा प्रकारची शिवजयंती मी पहिल्यांदाच पाहतोय. अशा प्रकारचे कौतुकास्पद नियोजन आणि आयोजन आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे. महिला भगिनींनाही शिवजयंती उत्सवात सहभागी होता येईल याची काळजी शिवजयंती उत्सव समितीकडून घेतली जाते. ही विशेष बाब आहे‌. यासाठी तर संदीपभैय्यांना मानावेच लागते. अशा शब्दांत संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आ.संदीप क्षीरसागर व शिवजयंती उत्सव समितीचे कौतुक केले.

असे होते सांस्कृतिक कार्यक्रम

🌕- करवीर नाद ढोल पथकाच्या तब्बल ४५० कलाकारांचे सादरीकरण
🌕- तिबेटीयन मॉंक यांचे शाओलीन मार्शल आर्ट या चित्तथरारक साहसी खेळाच्या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला.
🌕-पश्चिम बंगाल येथील ‘रायबिशी आर्ट स्कूल’ नावाच्या पथक ऍक्रोबाईक्स फाईट आणि वेगवेगळे चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली.
🌖-ओडिशा राज्यातील ‘दुलदुली बाजा’ नावाचे आदिवासी वाद्य पथकाने आपली लोकनृत्य सादर केले.
🌗-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लाईट आणि लेजर शो-ने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

विशाखा भिल्लारे- वरपे उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्काराने सन्मानित

0

बीड  — मराठी समाजशास्त्र परिषद आणि श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेज, पाचगणी, तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी समाजशास्त्र परिषदेचे ३४ व्या राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 17 व 18 फेब्रुवारी 2025 रोजी ‘लिंगभाव,शिक्षक आणि विकास’ या मुख्य विषया अंतर्गत आयोजित करण्यात आले होते.

या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील 193 शोध निबंध सादर व प्रकाशित झाले. या शोधनिबंधातून संशोधकांसाठी भारतीय समाजशास्त्राचे जनक डॉ. जी. एस.घुर्ये यांच्या नावाने दिला जाणारा उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार बलभीम महाविद्यालयातील संशोधक व सहाय्यक प्राध्यापक विशाखा विलास भिलारे(वरपे) यांनी महिला प्रश्नावर व महिला सरपंचांच्या विषयावर संशोधन करून ‘महिला सरपंच म्हणून अधिकार वापरताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास :बीड तालुक्याच्या महिला सरपंचाच्या संदर्भात समाजशास्त्रीय अभ्यास, या शोधनिबंधनाला मिळाला. हा पुरस्कार देताना शोधनिबंध लेखन आणि सादरीकरण या बाबी लक्षात घेऊन संशोधन निवड समितीने मराठी समाजशास्त्र परिषदेला या निबंधाची शिफारस केली होती.
मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रो. लक्ष्मणसिंग साळोक ,सचिव प्रो. कालिदास भांगे, कोषाध्यक्ष प्रो. प्रियदर्शन भवरे, श्रीमती मीनलबेन मेहता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर सतीश देसाई, डॉ. पद्माकर सहारे
तसेच मराठी समाजशास्त्र परिषदेची कार्यकारणी सदस्य डॉ.दिगंबर तंगलवाड, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रयागराज, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान करताना या शोधनिबंधाचे महत्त्व आणि उपयोजिता याविषयी मराठी समाजशास्त्र परिषद आणि महाविद्यालयाने व्यक्त केली.
या त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब कोकाटे, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गोविंद बावस्कर, कला व वाणिज्य महाविद्यालय चौसाळाचे प्राचार्य डॉ. विलास भिलारे, डॉ. दत्ता तंगलवाड आदींनी अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिवजयंती महोत्सव:क्षीर “सागरा”तील (सं) दीप अन् निर्भयतेतून आधुनिक जिजाऊ पर्यंत शिवबा पोहोचवला

0

बीड — छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी जाज्वल्य इतिहास प्रत्येकालाच रोमांचित करतो. प्रत्येक ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते मात्र बीडचा महोत्सव वेगळीच छाप पाडून जातो.निर्भय वातावरणामुळे महिलांचा वाढता सहभाग आधुनिक जिजाऊंना घडवणारा ठरू लागला आहे. शिवरायांची शिकवण यातून “आई” च्या विद्यापीठातून पुढच्या पिढीला मिळणार आहे. भरकटलेल्या समाज व्यवस्थेत क्षीर “सागरा”तला (सं) दीप सुराज्याकडे नेणारा स्तंभच ठरणार आहे.

शौर्य,पराक्रम, त्याग संस्कार यासारख्या अनेकविध गुण लक्षणांची खाण असलेले नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज…! आजही त्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी प्रत्येकाचं रक्त सळसळतं इतकी महाराजांच्या नावात ताकद आहे. त्यांच्या शौर्य पराक्रमाची यशोगाथा घराघरात गायली जात असली तरी आधुनिकतेच्या रगाड्यात त्यांची शिकवण विसरली जाऊ लागली. त्यातूनच अन्यायविरुद्ध लढण्याची धमक कमी होऊ लागली. दरवर्षी शिवजयंती साजरी केली जात असली तरी मध्यंतरीच्या काळात ती युवा वर्ग ,पुरुष यांच्यापर्यंत मर्यादित राहिली गेली. त्यातून हिडीस प्रदर्शन होऊ लागलं. महिलांचा सहभाग नसल्यात जमा झाला. महाराजांचा इतिहास महिलांपर्यंत पोहोचला तरच आधुनिक पिढी काही प्रमाणात का होईना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार वागेल ही बाब विसरली गेली. हे वास्तव नाकारून चालणार नाही.
मात्र संघटित समाज निर्मिती व्हावी या उद्देशाने शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली. त्याचा फायदा इंग्रजा विरुद्ध लढण्यासाठी उपयोगी पडला. हीच प्रेरणा घेऊन आधुनिक समाज व्यवस्थेत जिजाऊंच्या माध्यमातून शिवबा राजेंच्या संस्काराचे बीज पेरण्याचं काम संदीप क्षीरसागर या युवकांने हाती घेतलं‌. सगळ्यात मोठं पाऊल त्यांनी उचलत शिवजयंती महोत्सवात महिलांचा सहभाग वाढवण्याकडे लक्ष दिलं. शिवजयंती महोत्सवात महिलांचा सहभाग वाढला तरच मुलांना शिकवण देणारी “आई” महाराजांचा इतिहास आपल्या मुलांपर्यंत पोहोचवेल. या बीज पेरणीतूनच आधुनिकतेत समाज व्यवस्थेची बिघडलेली घडी पुन्हा बसवण्यात यश मिळणार याची खात्री बाळगली. त्यासाठी आधी शिवजयंती महोत्सव काळात निर्भयतेच वातावरण निर्माण केलं गेलं.महिलांसाठी वेगळी व्यवस्था करून कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली गेली. “पर स्त्री मातेसमान”हे महाराजांचं ब्रीद आपोआपच अंगीकारला जाऊ लागलं.
महिला भगिनींचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रमांच आयोजन केलं. त्यामुळे अबालवृद्धांसह महिलांचा सहभाग इतका वाढला की बीडच्या शिवजयंती महोत्सवाला कुंभमेळ्याचं स्वरूप आलं गेलं. या कुंभमेळ्यात प्रत्येक जण शिवबांच्या विचाराचं स्नान करून कृतकृत्य होऊ लागला आहे. त्यामुळेच बीडच्या समाज व्यवस्थेची विण घट्ट करण्यात (क्षीर)सागरातला (सं) “दीप” दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून काम करताना दिसू लागला आहे

अनैतिक संबंधातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे दाखवण्याचा होता प्लॅन!

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह केज ऐवजी धाराशिव जिल्ह्यातील कळंबकडे नेण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे एका महिलेला तयार ठेवण्यात आले होते. महिलेची छेडछाड झाली, त्यातून संतोष देशमुख यांना मारहाण झाली असे सांगून त्यांना समाजातून उठवण्याचा प्लॅन होता, असा खळबळजनक आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.

धनंजय देशमुख म्हणाले, मृतदेह केजकडे घेऊन येत होते. तेव्हा गाडी कळंबकडे वळवण्यात आली होती. याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनात सभागृहालाही दिली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, पोलिसांनी संतोष देशमुख यांचा मृतदेह उचलला आणि ते केजकडे निघाले होते. दरम्यान चिंचोली फाटा येथे एक मार्ग कळंबकडे जातो आणि एक केजकडे. तेव्हा गाडी कळंबकडे वळवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पोलिसांच्या गाडीमागे गावातील एक-दोन गाड्या होत्या. हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा केजकडे वळवली, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.देशमुख म्हणाले की, गुन्हेगारी टोळीचा म्होरक्याचा प्लॅन होता की, सरपंचाची हत्या झाली आहे. त्याच्या मृतदेहाला एका महिलेकडे घेऊन जायचे. संतोष देशमुख यांना ठार केल्यानंतरही त्यांनी सोडले नाही. त्या महिलेकडे नेऊन सोडले जाणार होते. तिथे ती महिला कपडे फाडून घेणार, छेडछाड झाली म्हणणार, अंगावर जखमा करुन घेणार आणि हे सर्व या माणसाने केले असे सांगून त्याला समाजातून उठवण्याचा त्यांचा डाव होता. हा कट रचणारा टोळीचा मुख्य होता. कटकारस्थान रचणारे पोलिसांच्या गाडीत होते. त्या गाडीत कोण पोलीस होते हे समजू शकले नाही, असेही धनंजय देशमुख यांनी सांगितले.
महिलेची छेड काढली आणि त्यातून हत्या झाली, असे दाखवण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण गावातील दोन गाड्या पोलिसांच्या गाडीच्या मागे होत्या म्हणून हा प्लॅन फसला. आमदार सुरेश धसांनी ही माहिती सभागृहाला सांगितले होती. पहिल्या आठ दिवसांत काय-काय झाले याचा तपास झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. बीड आणि केज पोलिसांनी सीआयडी आणि एसआयटीला काय माहिती दिली, असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला.

त्या टोळीकडून सगळं प्री प्लॅन केलं जातं. विदाऊट प्री-प्लॅन ते काहीही करत नाहीत. त्यांच्या गाडीमध्ये हत्यारं आधीच ठेवली जातात. त्यात काही नवीन नाही. हे जर नवीन असतं तर दोन दिवसांत आरोपी सापडले असते. यांचे सर्व सीडीआर तपासले पाहिजे. त्यांचा म्होरक्याने पहिल्या दोन-तीन दिवसांत 50-60 वेळा फोन केले होते. ते कशासाठी आणि कोणासाठी केले होते? असे सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.

खा. सुप्रिया सुळेंनी घेतली महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट; ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणावर ठाम

0

परळी — परळी येथे महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट खा. सुप्रिया सुळेंनी आज दुपारी घेतली यावेळी त्यांनी पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांना फोन करून जलद तपास करत मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्यात यावी तसेच तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती देण्यात यावी अशी मागणी केली. मुंडे कुटुंबीयांच्या लढ्यात आम्ही देखील सोबत असल्याचा विश्वास खा‌‌. सुळे यांनी दिला. दिवंगत मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आपण उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. त्यांनी पोलिसांना येत्या मंगळवारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची आज दुपारी परळीत भेट घेऊन सांत्वन केले. खा. सुळे यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे, त्यांची मुले आणि महादेव मुंडे यांच्या वडीलांस अश्रू अनावर झाले. महादेव मुंडे यांच्या खुनास पंधरा महिने उलटून गेले आहे तरी अद्याप या प्रकरणाचा तपास लागला नाही. एकाही आरोपींना अटक करण्यात आली नाही. आरोपींना अटक का होत नाही? असा प्रश्नही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी खा. सुप्रीया सुळें पुढे यावेळी उपस्थित केला.दरम्यान, खा. सुप्रिया सुळे यांनी फोनवरून जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी, स्वतः लक्ष घालून पारदर्शी पद्धतीने तपास करण्यात येईल व ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या संपर्कात राहून तपासाबाबतची प्रगती कळविण्यात येईल असे, आश्वासन खासदार सुळे यांना दिले. खासदार सुळे यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे,आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. महादेव मुंडे यांचा खून प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्यातील पोलीस करू शकत नाही. अशी खंत यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्ती. दरम्यान आपल्या पतीच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळाला असे वाटणार नाही. पोलिसांनी आजपर्यंत तपास केला नाही. पोलीस प्रशासन दोषी आहे. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आपण मंगळवारी उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यावेळी सांगितले. अंबाजोगाईत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले हे पंधरा महिन्यापूर्वी पासून असून त्यांच्या उपस्थितीत महादेव मुंडे यांच्या खुनाच्या घटनेचा पंचनामा झालेला आहे. आता त्यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळातील काही पोलीस अधिकाऱ्यांना प्रमोशनही मिळाले आहे . तर काहींच्या पोलिसांच्या बदल्या झाल्या असल्याचं यावेळी सांगितलं.

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती

0

नवी दिल्ली — मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्ञानेश कुमार यांची मुदत 26 जानेवारी 2029 पर्यंत राहणार आहे.

आगामी लोकसभा निवडणूक 2029 मध्ये होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक ज्ञानेश कुमार यांच्याच नेतृत्वात होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेत झालेल्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी पर्यंत आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर ज्ञानेश कुमार पदभार स्वीकारणार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठीच्या बैठक पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षेतत झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. याच समितीच्या शिफारशीनंतर मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. बैठकीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त पदासाठी पाच नावांची चर्चा होती. त्यात ज्ञानेश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे केरळ कॅडरचे

आएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1964 रोजी झाला. आयआयटी कानपूर येथून त्यांनी बीटेक केले. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.
केरळ एससी, एसटी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. निवडणूक आयोगातील नियुक्तीपूर्वी ते केंद्रीय गृह मंत्रालायमध्ये अतिरिक्त सचिव होते. तसेच संसदीय कार्य मंत्रालयात सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यूपीए सरकारच्या काळात संरक्षण मंत्रालयातही त्यांनी काम केले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. काँग्रेस नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले की, मुख्य निवडणूक आयुक्त निवड समिती ही चुकीच्या पद्धतीने स्थापन करण्यात आली आहे. ही निवड समिती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन आहे. निवड समितीमधून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना हटवण्यात आले

आहे. सरन्यायाधिशांना निवड समितीतून बाहेर करुन सरकारने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांना निवडणूक आयोगावर नियंत्रण हवे आहे, निष्पक्ष निवडणूक आयोग नको आहे, अशी टीका अभिषेक मनु सिंघवी यांनी केली.

मुख्य निवडणूक आयोग निवड समितीतून सरन्यायाधिशांना हटवण्यात आले आहे. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर येत्या 19 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी 12 फेब्रुवारीला होणार होती, मात्र त्या दिवशी केस बोर्डावर आली नाही. तेव्हाच ज्येष्ठ वकील प्रशांत भुषण यांनी जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठापुढे हा मुद्दा उपस्थित केला होता.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्याआधी नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होऊ शकते, हे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आणि या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतरही कोर्टाने 19 फेब्रुवारी ही तारीख दिली आणि म्हटले होते की, या दरम्यान जर काही झाले तर ते कोर्टाच्या आधीन असेल, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.