Home Blog Page 128

सावधान…!ढोकीत बर्ड फ्लू चा संशयित रुग्ण आढळला

0

ढोकी — प्राण्यानंतर आता माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संशयित रुग्ण सापडला आहे.ढोकी गावात माणसाला बर्ड फ्लू झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

लागण झालेला संशयित व्यक्ती हा मास विक्रेता असल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून हा व्यक्ती तापाने फणफणला होता. ताप कमी होत नसल्याने आरोग्य विभागाने त्याचा स्वॅब घेतला. स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे.

या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या व्यक्तीवर उपचार सुरू आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाकडून बर्ड फ्लू मुळे ढोकी गावत कोंबड्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण सुरू असतानाच ढोकी गावातील एक मांस विक्रेत्याला बर्ड फ्लूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ढोकी गावातील पोलिस ठाणे परिसरात 21 फेब्रुवारीला पहिल्यांदा काही कावळे मृतावस्थेत पडलेले आढळून आले त्याना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे उघडकीस आले. 24 फेब्रुवारीला प्रयोगशाळेकडून मिळालेल्या अहवालातून कावळ्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ढोकी गावच्या 10 किमी परिघातील परिसर अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. या परिसरात 52 कावळे आत्तापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत.

पोलीस स्टेशन परिसरात कावळे मृत्युमुखी पडत असल्याने पोलीस स्टेशनचा परिसर बंद करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनच्या बाहेर पशुसंवर्धन विभागाने परिसर निर्जंतूकीकरण केला असून परिसरात वावरण्यास मनाई करण्यात आली आहे. तर, ढोकी शहर परिसरातील चिकन व मटन विक्रीचे दुकाने बंद आहे करण्यात आली आहेत

वाल्मीक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट; गंभीर आरोपाने खळबळ

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला तुरूंगात व्हीआयपी ट्रेंटमेंट दिली जाते, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच १४ जानेवारीला वाल्मिक कराड कारागृहाच्या मेनगेटमध्ये आला असताना वैजनाथ मुंडे, रमेश खाडे, यांनी ज्यांची ड्युटी नाही अशा कर्मचाऱ्यांना कारागृहात आरोपीसोबत घेतले.

असा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्यावरून आता बीडचे प्रकरण आणखी तापायला सुरूवात झाली आहे.

ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, विश्वनात गीते, सुधारकर मुंडे, गोविंद खाडे, राहुल राठोड यांनी आरोपीची बॅग आणि इतर साहित्य कारागृहात नेले. १५ जानेवारीला सकाळी ८ ते ९ दरम्यान कारागृहातल्या किचनमधून आरोपी कराडला स्पेशल चहा देण्यात आला असा आरोप देखील त्यांनी केला आहे. १५ जानेवारीलाच सकाळी १० वाजता पोलीस वाल्मिक कराडला घेऊन जात असताना कारागृहातील कर्मचारी ज्ञानेशेवर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, विश्ननाथ गीते, सुधाकर मुंडे, गोविंद खाडे आणि राहुल राठोड यांनी कर्तव्यावर असतानाही आरोपीला साहित्य दिले.

तर २२ जानेवारीला वाल्मिक कराड कारागृहाच्या मेनगेटमध्ये आल्यानंतर कर्मचारी अशोक सानप यांनी अंगझडती घेतली नाही. अशोक सानप हेच वाल्मिकचे साहित्य कारागृहात घेऊन गेले. २२ जानेवारीला रात्री ११ वाजता ४० मिनिटांनी वाल्मिकला दवाखान्यात पाठवताना कृष्णा ढाकणे, राहुल राठोड, यांनी वाल्मिकचं साहित्य त्याच्या नातेवाईकांकडे दिले असल्याचाही आरोप देशमुख कुटुंबियांनी केला आहे.

१५ फेब्रुवारीला कराडला सुभेदार चिंचाणे यांनी स्पेशल चहा बनवून दिला. कारागृहातील कर्मचारी ढाकणे हे कारागृहातील बंदी बालाजी धस यांच्यामार्फत कराडला चहा नाश्ता आणि सर्व निरोप देत आहेत. १५ फेब्रुवारीला कराडला वकील असल्याचा बहाणा करून त्याचे सहकारी आणि मित्र भेटले. असा आरोप देखील देशमुख कुटुंबियांनी केला आहे

बालरोग तज्ञ परिचारिका’ अभ्यासक्रमाला जे.जे.हॉस्पिटलनंतर बीड जिल्हा रुग्णालयात मान्यता

0

आ.संदीप क्षीरसागरांनी मानले शासनाचे आभार

बीड — महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत २० विद्यार्थी प्रवेश क्षमता असेलला केवळ जे.जे.रुग्णायालय मुंबई येथे उपलब्ध असलेला नर्सिंग क्षेत्रातील ‘पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिंग’ आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे ३० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचा अभ्यासक्रम आता बीड जिल्हा रुग्णायालात उपलब्ध होणार आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे माता व नवजात बालक यांच्या आरोग्यसेवेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बालरोगतज्ञ परिचारिका मुंबईनंतर आता मुंबईपेक्षा जास्त संख्येने बीडमधून घडणार आहेत. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी पालकमंत्री, आरोग्यमंत्री व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.
केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत माता व बाळ मृत्यू दार कमी करण्यासाठी तसेच नवजात बालक व माता यांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी समुपदेशन, उपचार व प्रशिक्षण यांच्या माध्यमातून प्रशिक्षित अधिपरिचारिकांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येतात. सध्या महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत २० विध्यार्थी क्षमता असलेला ‘पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिंग’ हा अभ्यासक्रम केवळ मुंबई येथील जे.जे.रुग्णालय येथील परिचर्या प्रक्षिशण केंद्रात उपलब्ध होता. त्यानंतर आता जे.जे.रुग्णायलय येथील प्रशिक्षण केंद्रापेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश क्षमतेने या अभ्यासक्रमाला बीड जिल्हा रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्रात सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रात मुंबई नंतर बीड मध्ये बालरोगतज्ञ असलेल्या अधीपरिचारिका घडणार हि नक्कीच बीड जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे. दरम्यान हा अभ्यासक्रम १ वर्ष कालावधीचा असून ३० विद्यार्थी प्रतिवर्षी येथे प्रवेश घेऊ शकतील. तसेच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता जीएनएम किंवा बीएस्सी नर्सिग उत्तीर्ण नोंदणीकृत अधिपरिचारिक असणे आवश्यक आहे. याबाबत दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून शासन निर्णय क्रमांक २०२५०२२७१४४४४१३३१७ द्वारे अधिसूचित करण्यात आले आहे. बालरोग तज्ञ अधिपरिचारिका अभ्यासक्रमाला बीड जिल्हा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात मान्यता मिळावी यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्याला आता अखेर यश आले आहे. बीड मतदार संघाच्या वतीने आ.संदीप क्षीरसागर यांनी पालकमंत्री ना.अजित दादा पवार, आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचे व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.

ही तर एसपींची रझाकारी मोगलाई; शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवण्याची घाई !!✒️ भाग -१

0

बीड — पवन ऊर्जा कंपन्यांच्या अर्थकारणात जिल्हाधिकाऱ्यांसह सगळ्यांचेच हात बरबटले आहेत. एस पी ची ही तीच परिस्थिती आहे. कंपन्यांचे अधिकारी गुंडांच्या मदतीने शेतकऱ्यावर फसवणुकीसह दमनंशाहीचे अस्त्र वापरत असताना एसपींनीही त्यांनाच पाठबळ दिलं आहे. विकासाला विरोध कोणाचाच नसला तरी अन्याय पीडित शेतकऱ्यांची बाजू घेण्याची आवश्यकता नवनीत कावत यांना वाटली नाही. पीडित शेतकरी गावगुंड ठरवून त्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवण्याच रझाकारी फर्मान एस पी नी काढला आहे. ही लोकशाही आहे की मोगलाई असा प्रश्न या निमित्ताने पडू लागला आहे.

(हेच ते एसपींचं तुघलकी फर्मान)

पवन ऊर्जा कंपनी, सौरऊर्जा कंपनी यांचं बस्तान जिल्ह्यात बसवताना शेतकऱ्यांना लालूच दाखवायची. जमीन ताब्यात घ्यायची, ताब्यात घेतलेल्या जमिनीचे भाडे पत्र असेल अथवा ठरलेला मोबदला कसा बुडवता येईल, अधिग्रहित केलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर अतिक्रमण कसं करता येईल, प्रकल्प उभा करताना शेतकऱ्यांच्या पिकाची वाहन घेऊन जाताना धुळधान करायची, एखादा शेतकरी जमीन द्यायला तयार नसेल तर गुंडांच्या मदतीने दहशतीचं वातावरण निर्माण करायचं यासारखे अनेक प्रकार बीड जिल्ह्यात घडू लागले आहेत. विकासाच्या नावाखाली शेतकरी देशधडीला लावायचा त्यातून आपली तुंबडी भरायची एवढाच फंडा जिल्हाधिकाऱ्यापासून पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत राबवला जात आहे. कंपन्यांनी कायदा धाब्यावर बसवला तरी पाठराखण करायला एवढी मोठी यंत्रणा बटीक म्हणून काम करत असेल तर शेतकऱ्यांचा कसं होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाहीची थट्टा कशी उडवायची याचा चंग प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सध्या बांधला असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आणखी धक्कादायक बाब म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कायदा सुव्यवस्थेच रक्षण करण्यासाठी डांगोरा वाजवत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या हातात जिल्ह्याची सूत्र दिली. त्यांनी तात्काळ पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काळजी करू नका असा संदेश दिला. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर यांच्यासह शेतकऱ्यांनी एस पी नी आमची ही बाजू ऐकून घेऊन न्याय भूमिका घ्यावी अशी मागणी केली. पण कंपन्यांच्या बटीक मानसिकतेतून त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याला केराची टोपली दाखवली. आपण लोकसेवक आहोत लोकांच्या टॅक्सच्या पैशातून आपला उदरनिर्वाह चालतो. ही बाब पोलीस अधीक्षक विसरले. ते कंपन्यांचे कर्मचारी म्हणून आता काम पाहू लागले आहेत की काय असे प्रश्न पडू लागले आहेत. त्यांच्या लहरीपणाचा कहर म्हणून गुरुवारी (27 फेब्रुवारी) तूघलकी फर्मान जारी केलं. कंपन्यांच्या संरक्षणासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. शेतकरी गावगुंड यांची तुलना करताना सर्वतोपरी कंपन्यांचा संरक्षण करण्यात येईल. अन्याय पीडित शेतकरी असला, तो कितीतरी बोंबलला, आकांड तांडव करायला गेला तरी त्याला गाव गुंड ठरवून जेलमध्ये टाकण्याची मुभाच या फर्मानातून दिली. आता “सदरक्षणाय खलनिग्रहणाय”असं ब्रीद घेतलेल्या पोलिसांची भूमिका यापुढे “कंपनी रक्षणाय, शेतकरी निग्रहणाय”अशीच राहणार आहे. कावत यांनी किती जरी कायदा सुव्यवस्थेची दुहाई दिली असली तरी पवन ऊर्जा कंपन्यांची काम सुरळीत करण्यासाठी ते जिल्ह्यात आल्याचं त्यांच्या एकंदर वागणुकीवरून तरी लक्षात येऊ लागला आहे. मोगलाई पुन्हा बीड जिल्ह्यात सुरू झाली की काय? शेतकऱ्यांच्या घरावरून वरवंटा फिरवायचा आहे की काय? शेतकरी देशोधडीला लागला तरी वरिष्ठ पातळीवर आपलं महिमा मंडन कसं होईल याची काळजी एस पी नवनीत कावत घेत आहेत की काय? असे प्रश्न गोरगरीब शेतकऱ्यांना पडू लागले आहेत.

चंदू बियाणीला सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले; तीन दिवसांची पोलीस कोठडी

0

परभणी — ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सेलू पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात राजस्थान मल्टिस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणीस बीड कारागृहातून सेलू पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले.

बुधवारी परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुदत संपूनही पैसे परत दिले नसल्याने अभय सुभेदार (रा. सेलू) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयाच्या आदेशाने १० फेब्रुवारीला सेलू पोलिस ठाण्यात राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव पी. डी. अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय प्रकाश लड्डा, सेलू येथील शाखाधिकारी नंदकिशोर सोमाणी अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. पोनि. दीपक बोरसे, सपोनि. प्रभाकर कवाळे यांनी तपासादरम्यान अध्यक्ष चंदुलाल बियाणी हे अंबाजोगाई येथील एका ग्राहक फसवणूक गुन्ह्यात बीड येथील कारागृहात असल्याचे पुढे आले. आरोपी चंदुलाल बियाणीला २५ फेब्रुवारीला बीड कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजार केले असता, न्या. जी. जी. भरणे यांनी आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

विधिमंडळ रुग्णालय समितीच्या अध्यक्षपदी आ. नमिता मुंदडा

0

बीड — राज्य विधीमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार सुरेश धस यांना भाजपने पुन्हा डावलले आहे. या अगोदरही जिल्हा नियोजन समितीवर आमदार सुरेश धस यांना डावण्यात आले होते.

राज्य विधीमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात. यात महायुतीत भाजपच्या वाट्याला 11 समित्या आल्या आहेत. या समित्यांवरील अध्यक्षांची निवड भाजपकडून करण्यात आली आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या समित्यांची घोषणा बाकी आहे. दरम्यान, भाजपला मिळालेल्या समित्यांपैकी धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्ष म्हणून केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची वर्णी लागली आहे. दुसऱ्यांदा आमदार झालेल्या नमिता मुंदडा यांना स्थान देण्यात आले आहे.यापूर्वीही समितीवर सदस्यांमधून जिल्हा नियोजन विधीमंडळ होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये आमदार सुरेश धस यांच्याऐवजी नमिता मुंदडा यांनाच संधी दिली गेली होती. नियोजन समितीवर धस यांना डावलल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आहेत. आष्टीचे आमदार सुरेश धस 4 वेळा विधानसभा आणि 1 वेळा विधानपरिषदेवर आमदार राहिले आहेत. सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणात थेट भूमिका घेतल्यामुळे ते राज्यभरात चर्चेत आहेत. मात्र भाजपने त्यांना विधीमंडळ समितीवर अध्यक्षपदी स्थान दिलेले नाही.आमदार नमिता मुंदडा या मंत्री पंकजा मुंडे यांच्या विश्वासू आहेत. तर सुरेश धस यांनी निवडून आल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेत मुंडेंवर आरोप केले होते. याचाच फटका कुठे तरी आमदार सुरेश धस यांना बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आमदार सुरेश धस यांना डावलत आमदार नमिता मुंदडा यांची विधिमंडळ रुग्णालय समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सुरेश धस यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

आरोपी कृष्णा आंधळेला घेऊन येतो असं सांगत आ.सुरेश धस,खा. बजरंग सोनवणेंना गंडवले!

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. नेमका याचाच फायदा घेत एकाने खा. बजरंग सोनवणे यांना फसवले. त्यानंतर याच व्यक्तीने भाजप आमदार सुरेश धस यांनाही गंडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आ.सुरेश धस यांनीच हा प्रकार अन्नत्याग करणाऱ्या मस्साजोगकरांसमोर माध्यमांना दिली होती. एकाने कृष्णा आंधळे हा माझ्यासोबत आहे, त्याला कारने घेऊन येण्यासाठी मला पाच हजार रुपये पाठवा, असा फोन धस यांना केला होता. कृष्णा आंधळे हा सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील महत्वाचा धागा असल्याने धस यांनी कुठलीही शहानिशा न करता संबंधित व्यक्तीला पाच हजार रुपये पाठवले. तसेच नगरमधील एका हाॅटेलमध्ये या फोन करणाऱ्या व्यक्ती आणि आरोपी कृष्णा आंधळे यांची वाट पहात साडेचार तास थांबले होते.
शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश धस नगरमधून निघून गेले होते, असे धस यांनी सांगितले. विशेष म्हणजे याच व्यक्तीने खासदार बजरंग सोनवणे यांनाही फोन करून आरोपी कृष्णा आंधळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, त्याला घेऊन येण्यासाठी आॅनलाईन पैसे टाका असे सांगितले.खा. सोनवणे यांनीही संबंधित व्यक्तीला पैसे पाठवले होते. पण नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्याही लक्षात आले होते. बापूराव बारगजे असे गंडवणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे धस यांनी सांगितले.या व्यक्तीची माहिती आपण आष्टी आणि बीडच्या पोलीस अधिक्षकांना दिली होती. दोन-पाच रुपयासाठी अशी फसवणूक करणाऱ्या औलादीही असतात, असा संताप धस यांनी व्यक्त केला आहे.

दरोडेखोरांचा जामखेडमध्ये धुमाकूळ ; 3 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज लंपास

0

जामखेड — शहरापासून दोन किमी अंतरावरील साकत फाट्याजवळील एका घरावर एका महिलेसह सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील 8 तोळे सोने व 71 हजार रुपयांचे रोख असे एकूण 3 लाख 22 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे या दरोड्यात एका महिलेचा समावेश असून घटनास्थळी पोलिसअधीक्षक राकेश ओला यांनी भेट दिली आहे. दरोड्याच्या घटनेने जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली अशी की, जामखेड शहरापासून दोन किमी अंतरावरील बीड रोड येथील साकत फाट्याजवळ फिर्यादी महिला प्रतिक्षा शंकर रोकडे (वय 19) राहते. बुधवार दि 26 रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी एका महिला दरोडेखोरासह सात ते आठ दरोडेखोर आले. यावेळी सोबत असलेल्या आरोपी महिलेने फिर्यादी यांचे दार वाजवत आवाज दिला की ‘ताई दार उघड’ त्यामुळे फिर्यादी महिलेस आपलेच कोणी आले असल्याचे वाटल्याने त्यांनी दार उघडले.

घराचे दार उघडताच घरामध्ये स्कार्फ बांधलेल्या महिलेसह चोरटे आत शिरले. यानंतर चोरट्यांनी किचनमधील सामानाची उचकापाचक केली. तसेच चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून सोने व रोख रक्कम लुटली . यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा वरच्या मजल्यावर रहात असलेल्या गायत्री किसन जाडकर यांच्या घराकडे वळवला. यावेळी घराला कुलुप असल्याने चोरट्यांनी दार तोडुन घरातील रोख रक्कम व सोने चोरुन नेले. अशा प्रकारे दोन्ही घरातील एकुण 2 लाख 51 हजार रुपयांचे आठ तोळे सोन्याचे दागिने व 71 हजार 750 रु रोख असा एकुण 3 लाख 22 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केला.

या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. दरोडा पडला असल्याची माहिती फिर्यादी यांनी फोनवरून जामखेड पोलीसांना दिली यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी आले. मात्र तोपर्यंत दरोडेखोर पळुन गेले. घटनास्थळी सकाळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, जामखेड पोलीस स्टेशनचे सपोनि सोनवलकर, सपोनि वर्षा जाधव मॅडम व जामखेड व अहील्यानगर चे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भेट दिली.

या प्रकरणी एका महिलेस एकुण सात ते आठ दरोडेखोरांवर जामखेड पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वर्षा जाधव या करत आहेत.

स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर अत्याचार; वैद्यकीय अहवाल आला समोर

0

पुणे — स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बस मध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

या प्रकरणातील मेडिकल रिपोर्टमध्ये पीडित तरुणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं मेडिकल रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. माहितीनुसार, संध्याकाळी ससुन रुग्णालयाने हा वैद्यकीय अहवाल पोलिसांना दिला आहे. या अहवालात आरोपीने पिडितेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.तर दुसरीकडे या प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी कारवाई करत स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन करून तसेच डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करुन एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. 23 सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन करून उद्यापासून त्यांच्या जागी स्वारगेट डेपोमध्ये नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
असं आहे संपूर्ण प्रकरण!

पहाटे 5.30 च्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे अत्याचाराची घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटण्याच्या दिशेने जात होती. बससाठी ती स्वारगेट बस स्थानकावर थांबली असता आरोपी दत्तात्रय गाडे तिकडे आला आणि पीडित तरुणीला स्वारगेट आगारात मधोमध उभी असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं. उभी असणारी बस सोलापुरला जाणार आहे आणि मधे बस फलटणला थांबणार आहे. असं त्याने पिडितेला सांगितले.यावेळी तो पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बस बंद केली. त्यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तिकडून पळ काढला. तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला.

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मसाजोग ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन मागे

0

केज — सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी मागण्या मान्य कराव्या यासाठी मंगळवार पासून देशमुख कुटुंबीयांसह मसाजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत होते. दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलेले लेखी आश्वासनानंतर बुधवारी सायंकाळी सहा वाजता अन्न त्याग आंदोलन मागे घेण्यात आले आहे.मात्र, लेखी आश्वासन दिलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामस्थांनी दहा दिवसांची मुदत दिली आहे.

खा.बजरंग सोनवणे, आ.सुरेश धस आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या आंदोलकांनी हस्ते शरबत घेऊन आंदोलन मागे घेतले. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या केल्याप्रकरणी
मसाजोग ग्रामस्थांनी प्रशासनाकडे 9 मागण्याचे निवेदन सादर केले होते. व मंगळवारी सकाळी 10 देशमुख कुटुंबीय व गावाकऱ्यांनी सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन बुधवारी अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली.दरम्यान, खा बजरंग सोनवणे यांनी आंदोलन स्थळाहून पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना कॉल करुन आंदोलनाचे गांभीर्य सांगितले. 9 पैकी पोलीस अधीक्षक यांच्या कक्षेत येणाऱ्या 4 मागण्या या मस्साजोग ग्रामस्थांचे सविस्तर निवेदन मिळाल्यानंतर 8 दिवसात मंजूर करण्यात येतील, असे लेखी आश्वासनाचे पत्र अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्फत पोलिसअधिक्षकांनी दिले. खा बजरंग सोनवणे आणि आ सुरेश धस हे ही मस्साजोग मध्ये दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आ. धस, खा. सोनवणे या तिघांनीही आंदोलक ग्रामस्थांसोबत चर्चा केली. पोलीस अधीक्षक यांचे आश्वासनाचे पत्र वाचून दाखविल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दहा दिवसाची मुदत देत खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या हस्ते शरबत देऊन अन्नत्याग आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.