Home Blog Page 127

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 12 मार्चला होणार !

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्या प्रकरणी वाल्मीक कराड यांच्यासह आठ जणांवर दाखल करण्यात आलेल्या खंडणी, खून आणि ॲट्रॉसिटी प्रकरणाची पुढील सुनावणी 12 मार्च रोजी विशेष मकोका न्यायालयात होणार आहे.

सरपंच संतोष देशमुखांनी आवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या कंपनीत खंडणी मागणाऱ्यांचा विरोध केला होता. म्हणून त्यांचे दिनांक 6 डिसेंबर रोजी टोल नाक्यावर वरून अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडीने अवघ्या 80 दिवसांत पूर्ण करून दि. 28 फेब्रुवारी रोजी दीड हजार पानांचे दोषारोप-पत्र विशेष मकोका न्यायालयात सादर केले आहे.

या हत्या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक बाबुराव कराड आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू महादेव चाटे यांच्यासह सराईत गुन्हेगारी टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले आणि प्रतीक भीमराव घुले, सुधीर ज्ञानोबा चाटे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे आणि फरार असलेला कृष्णा शामराव आंधळे यांच्या विरुद्ध दि. 28 फेब्रुवारी रोजी दीड हजार पानांचे दोषारोप-पत्र विशेष मकोका न्यायालयाचे दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयात दाखल झालेले आहे.

दि. 1 मार्च रोजी विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली असून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 12 मार्च रोजी केज न्यायालयात ठेवली आहे. राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील ॲड उज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. बाळासाहेब कोल्हे हे काम पहात आहेत.

पाटबंधारे विभागाचे नशेडी कर्मचारी माजले; शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करू लागले

0

लिंबागणेश –– जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने कालवा फुटून पाणी सरळ शेतकऱ्यांच्या शेतात घुसले यामुळे जमीन वाहून गेल्याने तसेच सिमला मिरचीचे मोठे नुकसान झाले. याबाबत नुकसानभरपाई मिळावी म्हणून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यावरच पाटबंधारे विभागाने गुन्हा दाखल केला असल्याचाप्रकार उघडकीस आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

बीड तालुक्यातील मसेवाडी येथील तलावातून कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्यात येते, पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारामुळे मसेवाडी लघु सिंचन तलावातून जास्त पाणी सोडण्यात आले. यामुळे अंजनवती शिवारात कालवा फुटला हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले, यामुळे कैलास येडे रा. अंजनवती, स्वामी येडे यांचे सिमला मिरचीचे मोठे नुकसान झाले. सत्यभामा येडे यांच्या शेतात पाणी गेल्यामुळे ज्वारीचे चिपाड देखील जागेवर राहिलं नाही. याशिवाय श्रीराम वारकरी भास्कर येडे गणेश येडे या शेतकऱ्यांच्या शेतासह पिकांचे नुकसान झाले.कालवा फुटल्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आली पण कोणीच फिरकले यामुळे पाण्याची तर नासाडी झालीच पण शेतकऱ्यांचे पिकांचे आणि माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. हा सततचा प्रकार असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली असता पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल केले. 24 तास नशेत असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना नुकसान झालं तरी जाब विचारायची सोय राहिली नाही. उलट बाई माणसाला दमदाटी करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात असल्याची कैफियत आशाबाई येडे यांनी मांडली. याबरोबरच पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांची तक्रार केली त्यामुळे कैलास येडे या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला.यामुळे घटनेचा निषेध करीत पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देऊन पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर इतरांचे काय ? रक्षा खडसे यांचा सरकारला घरचा आहेर; छेडछाड करणारे आरोपी मोकाट

0

जळगाव — केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित करुन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्था परिस्थितीवरुन राज्य सरकारला घरचा आहेर दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणातील संशयितांविरुध्द गुन्हा दाखल झाला असला तरी रविवारी सायंकाळपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे सुरू असलेल्या यात्रेत काही टवाळखोरांनी तरुणांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य तरुणींची छेड काढल्यानंतर सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्वतः मंत्री खडसे यांनी रविवारी पोलीस ठाणे गाठून दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली.

मुक्ताईनगर येथील यात्रेत काही टवाळखोरांनी रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची शुक्रवारी रात्री छेड काढली. मुलींबरोबर असलेल्या सुरक्षारक्षकाने टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की करण्यात आली.

छेडछाड प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक न झाल्याने मंत्री रक्षा खडसे रविवारी आक्रमक झाल्या. संशयितांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाणे गाठले. टवाळखोरांनी छेड काढलेल्यांमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी अशी संशयितांची नावे आहेत. सर्वांवर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी अनिकेत भोई याच्यावर यापूर्वी विविध कलमांखाली चार गुन्हे दाखल आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत एकाही संशयिताला अटक झालेली नाही, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली

गुंडगिरीला स्थानिक राजाश्रय कारणीभूत -एकनाथ खडसे

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात अलीकडच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे. त्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचा राजाश्रय कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. मुलींच्या छेडखानीचा मुद्दा हा केवळ आपल्या घरचा नसून, व्यापक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

एस.पी. कांवत यांच रझाकारी तुघलकी फर्मान, अडकित्त्यात अडकली शेतकऱ्यांची मान ✒️ भाग-२

0

बीड — विकासाला शेतकऱ्यांचाही विरोध नाही मात्र स्वतःची घर जाळून होणाऱ्या विकासाला का विरोध करू नये? या विरोधालाच गावगुंडांच्या परिभाषेत नेऊन ठेवणार तुघलकी फर्मान पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी काढला आहे. एकीकडे शेतकरी निसर्गाशी दोन हात करत आहे तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली घर उध्वस्त करणार परचक्र शेतकऱ्यांच्या घरावरून वरवंटा फिरवत आहे. विकासाची काळजी आपल्यालाच आहे असा आव आणून कंपन्यांचे रखवालदार आहोत अशा जहागीरदारी थाटात लोकशाहीला मूठमाती देत एसपींनी रझाकारी फर्मान काढून शेतकऱ्यांची मान अडकित्यात अडकवली आहे. यामुळे एसपी विरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

(शेतकऱ्यांची मान अडकित्यात अडकवणार हेच ते एसपींच फर्मान)

ही तर एसपींची रझाकारी मोगलाई; शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवण्याची घाई !!✒️ भाग -१

नवनीत कांवत जिल्ह्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात काहीसा का होईना फरक पडेल अशी अपेक्षा होती मात्र ती एका फर्मानाने धुळीला मिसळली गेली. पवन ऊर्जा, सौरऊर्जा कंपन्यानी जिल्ह्यात नंगानाच सुरू केला आहे‌. या नंग्या नाचाला जिल्हाधिकाऱ्यापासून प्रशासनातील प्रत्येक यंत्रणेच पाठबळ भेटत आहे. तीच स्थिती पोलीस यंत्रणेची देखील झाली आहे. जिल्ह्याच्या विकासाची जणू काही आपल्यालाच काळजी आहे. अशा थाटात एसपींनी लोकशाहीला मूठ माती देत शेतकऱ्यांची घर बरबाद झाली,ती देशोधडीला लागली तरी विकास झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. कंपन्यांना त्यांच्या कामात त्रास होऊ नये त्यांना संरक्षण मिळावं यासाठी गावगुंडांच्या परिभाषेत शेतकऱ्यांना नेऊन ठेवलं. शेतकऱ्यांनी स्वतःच हित कुटुंबाच हित जपणं देखील त्यामुळे पाप होणार आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून कंपनीची लोक गाड्या घेऊन गेले. रस्त्यात आडवी येणारी घर पाडली, अधिग्रहित जमिनीपेक्षा जास्त क्षेत्रावर कब्जा केला,अधिग्रहित जमिनीचा मावेजा दिला नाही, कंपन्यांच्या गुंडांनी घर जाळली तरी काहीच फरक पडणार नाही. या उलट कंपन्यांना कायद्याचं संरक्षण मिळणार आहे. या अन्यायाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात कंपन्यांच हित जपण्यासाठी पोलीस अधिकारी एसपींच्या या तुघलकी फर्मानामुळे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून बिन भाड्याच्या खोलीत त्यांना बसवायला रिकामे होणार आहेत.                                निसर्गाशी दोन हात करत जीवन जगायचं सावकाराची देणी द्यायची, मुला बाळांना दोन घास खाऊ घालून त्यांचं शिक्षण करायचं की या परचक्राला थोपवण्यासाठी कर्जबाजारी होऊन न्यायालयीन प्रक्रियेच्या फेऱ्यात अडकायचं की झालेला अन्याय मुकाट सहन करायचा असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था निर्माण करायला आले आहेत की शेतकऱ्यांची घर उध्वस्त करून कंपन्यांची दलाली करायला आले आहेत असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला आहे. या आरोपांच खंडन देखील करण्याचं तोंड त्यांना राहिला नसल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी आमची बाजू ऐकून घ्या अशी आर्त हाक मारून देखील ती ऐकून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याची मानसिकता कंपन्यांपुढे शरणागत झालेल्या एसपींना निर्माण झाली नाही. एस पी “सदरक्षणाय खलनिग्रहणाय”या पोलीस प्रशासनाच्या ब्रीद वाक्याला येणाऱ्या काळात तरी प्रामाणिक राहणार आहेत की नाही असा प्रश्न त्यांच्या फर्मानामुळे निर्माण झाला आहे.

“कंपनी रक्षणाय, शेतकरी निग्रहणाय”हे एस पीं च ब्रीद

शेतकऱ्यांची बाजू तसेच त्यांच्यावर होणारा अन्याय ऐकून घ्यावा यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन एसपींना निवेदन दिलं. मात्र एसपींनी शेतकऱ्यांच म्हणण ऐकून न घेता पवन ऊर्जा सौरऊर्जा कंपन्यांच्या गुंडगिरीला पाठबळ देणारी भूमिका घेतली आहे. त्यामुळे “कंपनी रक्षणाय, शेतकरी निग्रहणाय” हे ब्रीद घेऊन नवनीत कावत चालले आहेत. असं म्हणायला हरकत नाही. कंपन्यांची बाजू घेण्याची एसपींची भूमिका त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय निर्माण करणारी आहे
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
               सामाजिक कार्यकर्ते

धारूरमध्ये परीक्षा केंद्रातून इंग्रजीचा पेपर घेऊन दोघे पळाले

0

धारूर —  शिक्षण विभागाकडून विशेष खबरदारी घेतल्यानंतरही दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर जिल्ह्यातील धारुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रातून शनिवारी (दि. १ मार्च) सकाळी फुटला.पेपर सुरू झाल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता दोघांनी एका हॉलच्या खिडकीतून पेपर घेऊन पलायन केले.                         दरम्यान, पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी अतिशय शिताफीने अवघ्या अर्ध्या तासात पेपर फोडणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पेपर जप्त केला आहे. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी लागलीच तपास सुरू केला. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच घेऊन पळालेला इंग्रजी विषयाचा पेपर त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केला. दरम्यान, पेपरफुटीमुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी पेपर फोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. तसेच या प्रकाराची शिक्षण विभागातील वरिष्ठांना माहिती दिली असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रातून दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर घेऊन दोघे पळाले होते. त्या दोन तरुणांना आम्ही ताब्यात घेतले आहे. या पाठीमागे आणखीन कोण आहे? पेपर फोडणारी साखळी आहे का? या दृष्टिकोनातून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी दिली आहे.

धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथे अफूच्या शेतात पोलिसांचा छापा

0

धारूर –तालुक्यात अफूची शेती होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तीन अधिकाऱ्यांसह 12 पोलीस कर्मचारी पिंपरवाडा शिवरात कारवाई करत रामहरी तिडके नावाच्या शेतकऱ्याचे शेतात तीन गुंठे अफूची शेती केली जात असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यावरुन पथकाने तीन अधिकाऱ्यांसह 12 पोलीस कर्मचारी घेऊन दुपारी बारा वाजल्यापासून या ठिकाणी कार्यवाही सुरू केलेली आहे. सायंकाळी सहा वाजता त्या तीन गुंठे शेतीतील अफू उपटून घेण्यास सुरुवात केली आहे.

अफू उपटून घेतल्यानंतर त्याचं जे वजन एकत्रित होणार आहे, त्यानुसार किती लाखाचा मुद्देमाल पकडला याबाबत पोलिसांकडून सविस्तर माहिती दिली जाईल असं सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी धारूर तालुक्यात अफूची शेती आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील कळंब आंबा येथील शेतकऱ्यांने कांद्याच्या पिकात अफूची लागवड केल्याची घटना 25 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती.दहा वर्षांपूर्वी परळी तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच धारूर तालुक्यातील कानपूर येथे अफूची शेती पिकवण्याचा प्रकार आढळून आला होता. या अफूच्या माध्यमातून नशेखोरांना नशा करण्यास अफूचा उपयोग होतो आणि त्यासाठीच नशेखोर अफूचा उपयोग करून घेतात.रामहरी तिडके यांनी शेततळे खोदून त्याच्याद्वारे अफूला पाणीपुरवठा करत अतिशय दुर्गम भागात जिथे सहज जाणं शक्य नाही अशा ठिकाणी अफूची शेती पिकवली आहे. अफू पिकवणे कायद्याने निर्बंध घातलेले असताना रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने अफूची शेती होत असल्याचे उघडकिस आल्यानंतर खळबळ माजली आहे.

“तर आपण भीकेला लागू”; वाल्मीक कराडचा ‘तो’ फोन कॉल उघड

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपास पूर्ण करून मकोका न्यायालयात चौदाशे हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

यामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याचे म्हटले आहे. संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली आणि हत्येचा कट कोणी रचला, याबाबतची सविस्तर माहिती या आरोपपत्रातून समोर आली आहे.

वाल्मिक कराडच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की, त्याचा या हत्येशी काहीही संबंध नाही. परंतु, हा दावा खोटा असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. वाल्मिकचा संतोष देशमुख यांच्या हत्येत थेट सहभाग होता आणि त्यानेच सुदर्शन घुलेला फोन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

7 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले याने वाल्मिक कराडला फोन केला होता. त्यावेळी वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला सांगितले, ‘कोणीही उठतोय आणि आपल्या आड येतोय. असंच सुरू राहिलं तर आपण भीकेला लागू.’

‘असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. आता मागचं पुढचं काही बघू नका. जो कुणी आडवा येईल त्याला आडवा करावाच लागेल. कामाला लागा…. विष्णू चाटेशी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल,’ अशा सूचना वाल्मिकने सुदर्शन घुलेला दिल्या.
आवादा एनर्जी प्रा. लि. कंपनीने मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथे पवनचक्कीच्या माध्यमातून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात कंपनीची सुमारे 300 ते 350 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. 8 ऑक्टोबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 या काळात वाल्मिक कराड , विष्णू चाटे , सुदर्शन घुले , प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कट रचून आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा आणि जो कोणी या मागणीला विरोध करेल, त्याची हत्या करून परिसरात दहशत पसरवण्याचा कट रचला, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

संतोष देशमुख हत्येचा वाल्मीक कराडच मास्टरमाईंड

0

बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी केज न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात काही धक्कादायक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, तपासादरम्यान पोलिसांनी वाल्मिक कराड याला या प्रकरणाचा प्रमुख आरोपी ठरवला आहे. यासाठी पोलिसांनी विविध पुरावे आणि व्हिडिओ क्लिप्सचा आधार घेतला आहे.

आरोपपत्रात संतोष देशमुख यांची हत्या, खंडणी यांचा एकत्रित उल्लेख करण्यात आलेला आहे. पोलिसांनी 1400 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. आरोपपत्रानुसार, संतोष देशमुख यांची हत्या खंडणीच्या कारणावरून झाली, असे दर्शवले गेले आहे.आरोपी वाल्मीक कराड यानेच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्लॅनिंग केलं. यानंतर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांनी संतोष देशमुखांचा निर्घृण खून केला. या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हाच होता, असं आरोप पत्रात म्हटलं आहे

पाच गोपनीय साक्षीदारांचा पुरावा

या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या दिलेल्या जबाबावरून वाल्मिक कराड याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. साक्षीदारांनी सांगितले की, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची नांदूर फाट्यावर भेट झाली
होती, जिथे विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुले याला वाल्मिक कराडचा संदेश दिला. या संदेशानुसार, “संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा,” असं सांगितलं गेलं.

सीआयडीचा महत्त्वाचा व्हिडिओ पुरावा

तपासादरम्यान सीआयडीला एक महत्त्वाचा व्हिडिओ मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ आरोपी जयराम चाटे याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला होता. या डिजिटल पुराव्यामुळे सीआयडीने निष्कर्ष काढला आहे की, संतोष देशमुख यांची हत्या करणारी एक संघटित टोळी होती.

मात्र या आरोप पत्रातून दोन आरोपींचं नाव वगळण्यात आलं आहे. रणजीत मुळे आणि सिद्धार्थ सोनवणे अशी आरोप पत्रातून नावं वगळलेल्या आरोपींची नावं आहेत.

दरम्यान रणजीत मुळे हा अॅट्रोसिटी प्रकरणातील आरोपी होता. तर सिद्धार्थ सोनवणे हा खूनाच्या प्रकरणात आरोपी होता. मात्र दोघांविरोधात आरोप पत्र दाखल झालं नाही. दोघांची नावं सीआयडीने आरोप पत्रातून वगळली आहेत. आता पुरवणी आरोप पत्रात या दोघांची नावं येतात की त्यांना मुख्य आरोपींविरोधात माफीचा साक्षीदार बनवलं जातं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दोघांना माफीचा साक्षीदार बनवलं तर मुख्य आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते, असं कायदेतज्ज्ञांचं मत आहे

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील इष्टांक वाढीसंदर्भात धनंजय मुंडे यांनी घेतला जिल्हानिहाय आढावा

0

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाचा मंत्री मुंडेंनी घेतला सविस्तर आढावा

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीबाबत ही घेतली सर्वंकष माहिती

मुंबई — राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबई येथे होणार असून या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात विभागाचा जिल्हा निहाय आढावा घेतला.

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील विविध जिल्ह्यात इष्टांक वाढवणे, ई पॉस मशीन सह सर्व अन्य समस्या याबाबत प्रत्येक जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेत धनंजय मुंडे यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या.

विविध जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे तसेच ज्या जिल्ह्याने इष्टांक पूर्ती केली आहे त्यांना वाढीव मागणी असल्यास इष्टांक देण्यासंदर्भात तसेच ईष्टाकाची पूर्ती न केलेल्या जिल्ह्यातील उर्वरित इष्टांक हा अन्य आवश्यकता असलेल्या ठिकाणी हस्तांतरित करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

बुलढाणा जिल्ह्यात रेशनचे धान्य व त्यामुळे केस गळती होत असल्याबाबतच्या काही तक्रारी आल्या असून त्याबाबत धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व योग्य त्या सूचना केल्या.

या बैठकीस विभागाच्या सहसचिव, उपसचिव यांसह सर्व जिल्ह्यांचे जिल्हा पुरवठा अधिकारी आदी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते.

आजारी पण कामावर

धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांचे नुकतेच ऑपरेशन झाले असून त्यांना बेल्स पाल्सी या आजाराचे निदानही झाले होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामास त्यांनी सुरुवात केली आहे.

डोळ्यांची हालचाल आणि अधिक काळजी म्हणून त्यांनी गॉगलचा वापर करत मीटिंग घेतली. अद्यापही स्पष्टपणे सलग बोलण्यास त्रास होत असतानाही त्यांनी आपल्या कामकाजास आता सुरुवात केली आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणी दत्ता गाडे पकडला

0

पुणे — स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता, आणि अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.

दोन दिवस ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या आरोपीला जेवण मिळत नव्हते. त्यामुळे तो रात्रीच्या वेळी आपल्या नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी जात होता. पोलिसांनी याच माहितीच्या आधारे त्याचा मागोवा घेतला.
अखेर, रात्री एक वाजता तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना शोधमोहीम राबवणाऱ्या पोलिसांना दिसला. त्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आले आहे. सध्या त्याला लष्कर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे.
पुढील चौकशीसाठी त्याला पुण्यात हलवण्यात आले असून, तूर्तास एवढेच सांगता येईल, अशी माहिती डीसीपी निखिल पिंगळे यांनी दिली.
आरोपीला पकडण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचे 100 जणांचे पथक तयार करण्यात आले होते.
-ऊसाच्या शेतात शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाचा वापर करण्यात आला.
-आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
-आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

बलात्कार करून घरी परतला, दुपारपर्यंत आरामात, नंतर कीर्तनात सहभागी झाला!साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपीने एका तरुणीवर अत्याचार करून शिरूर तालुक्यातील गुणाट गाव गाठले. दुपारपर्यंत तो घरीच होता. त्यानंतर त्याने कीर्तनातही सहभाग घेतला. मात्र, टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या आणि त्यामध्ये स्वतःचा फोटो दिसताच, त्याने तातडीने घर सोडून पळ काढला.