बीड — विविध ठिकाणी चोरी गेलेल्या मोटरसायकल चोर त्याच्या राहत्या घरासमोर उभा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून सात मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश विष्णू गायकवाड वय 33 वर्ष सुभाष कॉलनी पेठ बीड याने अनेक ठिकाणावरून मोटार सायकल चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. सध्या तो घरासमोर उभा असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच शिवाजी यलप्पा जाधव वय 34 वर्ष रा.डोमरी ता. पाटोदा याच्याकडे विक्रीसाठी ठेवल्याची कबुली दिली. जाधव कडून पोलिसांनी सात मोटरसायकल जप्त केल्या आहेत. चार लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.त्याचे कडुन मिळुन आलेल्या मोटारसायकल वरुन खालीलप्रमाणे मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस ठाणे बीड शहर गु.र. नं 109/2025 कलम 303(2) बी.एन.एस
पोलीस ठाणे बीड शहर गु.र.नं 256/2024 कलम 303 (2) बी.एन.एस
पोलीस ठाणे बीड शहर गु.र. नं 303/2024 कलम 303 (2) बी.एन.एस.,पोलीस ठाणे बीड शहर गु.र. नं 59/2025 कलम 303(2) बी.एन.एस
पोलीस ठाणे पेठ बीड गु.र.नं 190/2025 कलम 303 (2) बी.एन.एस
पोलीस ठाणे पेठ बीड गु.र.नं 299/2024 कलम 303 (2) बी.एन.एस
पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 403/2025 कलम 303 (2) बी.एन.एस. दरम्यान पकडलेल्या दोन्ही आरोपींना बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार, आनंद म्हस्के, विकास राठोड, सोगनाथ गायकवाड, राहुल शिंदे, बाळु सानप, अर्जुन यादव, आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, चालक नितीन वडमारे, सुनिल राठोड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे.
मोटार सायकल चोरांची टोळी पकडली; साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त
सहाय्यक सरकारी वकिलाची न्यायालयातच आत्महत्या
बीड — वडवणी न्यायालयातील सहाय्यक सरकारी वकील ऍड विनायक एल चंदेल यांनी बुधवारी सकाळी वकिलांच्या चेंबरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर खळबळ माजली.
सात महिन्यापूर्वीच एड. विनायक चंदेल वय 45 वर्ष यांची सरकारी वकील म्हणून वडवणी न्यायालयात नियुक्ती झाली होती. चंदेल यांनी वकिलांच्या चेंबरमधील खिडकीच्या गजाला शालीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दहा-साडेदहाच्या सुमारास न्यायालयीन कर्मचारी व वकील कामकाजासाठी हजर झाले असता. ही बाब निदर्शनास आली. ही घटना समजताच सर्वत्र खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके वडवणी ठाण्याच्या सपोनी वर्षा व्हगाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आत्महत्या केलेल्या वकिलाच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून त्यातील मजकूर अद्याप समोर आला नाही. सात आठ महिन्याच्या कालावधीतच त्यांनी आपले जीवन संपवल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून चंदेल यांच्या आत्महत्येने खळबळ माजली.
नव्या विधेयकामुळे 251 खासदारांचे सदस्यत्व धोक्यात ?
नवी दिल्ली — केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दि. २० ऑगस्टला लोकसभेत तीन महत्त्वाची विधेयकं मांडली. गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांखाली अटक झाल्यास पंतप्रधानांपासून ते राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदच्युत करण्याची तरतूद या विधयेकामध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान, कोणत्या पक्षाच्या खासदारांवर किती गुन्हे दाखल आहेत? याच विषयी माहिती जाणून घेऊ.
पदावर असताना कोणत्या मुख्यमंत्र्यांना अटक?
भारताच्या इतिहासात पदावर असताना अटक होणारे पहिले मुख्यमंत्री झारखंडचे माजी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा नसून मधु कोडा (2006-2008) होते. मधु कोडा यांना 2009 मध्ये भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटक झाली होती, जेव्हा ते झारखंडचे मुख्यमंत्री होते. कोळसा घोटाळ्याशी संबंधित या प्रकरणात त्यांना कथितरित्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप होता. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्यावर कारवाई केली होती.
दिल्ली पूर्व मुख्यमंत्री केजरीवाल 6 महिने आणि तमिलनाडु मंत्री वी सेंथिल बालाजी 241 दिवस जेलमध्ये आहेत. पदावर असताना अटक होणारे केजरीवाल दुसरे मुख्यमंत्री होते.
१८ व्या लोकसभेतील खासदारांवरील गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे-
१८ व्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या ५४३ खासदारांपैकी २५१ खासदारांवर (४६%) फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या २०२४ च्या अहवालात नमूद आहे. त्यापैकी २५ हून अधिक जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. एकूण २३३ खासदारांनी (४३ टक्के) स्वतःविरुद्ध फौजदारी खटले घोषित केले होते. तर, २०१९ मध्ये हा आकडा २३३ (४३%), २०१४ मध्ये १८५ (३४%), २००९ मध्ये १६२ (३०%) आणि २००४ मध्ये १२५ (२३%) होता.
पक्षनिहाय खासदारांवरील गुन्हेगारी आरोप:
भारतीय जनता पक्ष (भाजप): २४० खासदारांपैकी ९४ (३९%) खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. यापैकी ६३ (२६%) खासदारांवर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत, ज्यात खून आणि खुनाचा प्रयत्न यांचा समावेश आहे.
काँग्रेस: ९९ खासदारांपैकी ४९ (४९%) खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. ३२ खासदार (३२%) गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली आहेत.
समाजवादी पक्ष (सपा): ३७ खासदारांपैकी २१ (४५%) खासदारांवर गुन्हे आहेत, तर १७ (४६%) खासदारांवर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत.
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (टीएमसी): २९ खासदारांपैकी १३ (४५%) खासदारांवर गुन्हे दाखल आहेत.
द्रविड मुन्नेत्र कङगम (डीएमके): २२ खासदारांपैकी १३ (५९%) खासदारांवर गुन्हे आहेत.
तेलुगु देसम पक्ष (टीडीपी): १६ खासदारांपैकी ८ (५०%) खासदारांवर गुन्हे दाखल आहेत.
शिवसेना: ७ खासदारांपैकी ५ (७१%) खासदारांवर गुन्हे आहेत.
राज्यनिहाय आकडेवारी:
• केरळ: २० खासदारांपैकी १९ (९५%) खासदारांवर गुन्हे, ११ गंभीर गुन्ह्यांचे.
• तेलंगणा: १७ खासदारांपैकी १४ (८२%) खासदारांवर गुन्हे.
• उत्तर प्रदेश: ८० खासदारांपैकी ४० (५०%) खासदारांवर गुन्हे.
• महाराष्ट्र: ४८ खासदारांपैकी २४ (५०%) खासदारांवर गुन्हे.
• पश्चिम बंगाल: ५२% खासदारांवर गुन्हे.
• बिहार: ५३% खासदारांवर गुन्हे
होळ येथे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुशराव शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव
जंगी मिरवणूक काढून नागरी सत्कार; माजी मुख्य न्यायमूर्ती संभाजीराव शिंदे यांची विशेष उपस्थिती
केज — तालुक्यातील होळचे सुपुत्र, राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुशराव शिंदे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता होळ येथील हनुमान मंदिरात करण्यात आले. या सोहळ्यापूर्वी ग्रामस्थांनी जंगी मिरवणूक काढून त्यांचे उस्फूर्त स्वागत केले.

कार्यक्रमाला राजस्थानचे माजी मुख्य न्यायमूर्ती संभाजीराव शिंदे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सोहळ्याचे अध्यक्षस्थान सरपंच अश्विनीताई शिंदे यांनी भूषविले. प्रमुख अतिथींमध्ये मांजरा कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, माजी सरकारी वकील अॅड.प्रकाश शिंदे, पुणे सीआयडीचे माजी पोलीस उपअधीक्षक दीपक शिंदे, केंद्रप्रमुख रमेश कांबळे, माजी प्राचार्य डॉ.ज्ञानोबा सरवदे, बारामती अॅग्रोचे प्रबंधक अंकुश ढवारे, मुख्याध्यापक धर्मराज शिंदे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ.नवनाथ घुगे, डॉ.गणेश ढवारे यांचा समावेश होता. यावेळी मान्यवरांचा होळ ग्रामस्थांच्यावतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली. होळ गावातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा झालेला हा गौरव सोहळा ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. यावेळी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित होते
आठवणींना उजाळा
या सोहळ्यात संभाजीराव शिंदे व अंकुशराव शिंदे यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनापासून ते आजवरच्या प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. दोघेही बनेश्वर शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असल्याने शिक्षण संस्थेबद्दल व होळच्या मातीतून मिळालेल्या संस्कारांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या भाषणातून गावाशी असलेली घट्ट नाळ प्रकर्षाने जाणवली.
“व्होट चोरी भारत मातेवरचा हल्ला” सत्तेत आल्यावर कारवाईचा निवडणूक आयोगाला राहुल गांधींचा इशारा
गया (बिहार) — निवडणूक आयोगा विरोधात राहुल गांधी यांनी चांगलेच दंड थोपटले आहेत.व्होट चोरी म्हणजे भारतमातेवर हल्लाच असून ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यावर मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांवर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज दिला.
मतदार अधिकार यात्रे’दरम्यान येथे घेतलेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. ”पंतप्रधान मोदी ज्याप्रमाणे विशेष पॅकेजबाबत बोलत असतात, त्याचप्रमाणे आयोगानेही मतदारयादी पडताळणीच्या रूपाने नवे पॅकेज आणले आहे. हा मतदान चोरीचाच नवा प्रकार आहे. ही चोरी उघडकीस आल्यानंतरही निवडणूक आयोग मला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगत आहे. मात्र सर्व देश त्यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत आहे. आम्हाला आणखी थोडा वेळ द्या, प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतचोरी आम्ही उघडकीस आणू आणि तुम्हाला जनतेसमोर उभे करू,” असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावरही थेट टीका केली. ”मी कधीही खोटे बोलत नाही. मात्र या तीन निवडणूक आयुक्तांनी भाजपचे सदस्यत्व घेतले असून ते त्यांच्यासाठीच काम करत आहेत. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही बिहारमध्ये आणि केंद्रात सत्तेवर येऊ, तेव्हा तुम्हा तिघांवर कारवाई करू. तुम्ही तिघांनी मतचोरी केली आहे,” असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले.
‘घटना म्हणजेच भारतमाता’
पावसातही सभा सुरूच ठेवत राहुल म्हणाले, ”राज्यघटना हीच भारतमाता आहे. ही राज्यघटना डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार पटेल व पंडित नेहरू यांच्यासारख्या नेत्यांनी तयार केली. हाच भारताचा आत्मा आहे. जेव्हा मतांची चोरी होते, तेव्हा भारतमातेवर हल्ला झालेला असतो.”
कावतां च्या इभ्रतीला फासली जातेय “राख”; गोसावी बनवून घालवणार का सगळीच साख?
बीड — बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत इव्हेंटच्या स्टंटबाजीने प्रसिद्धीच्या झोतात रहात असले तरी त्यांच्या इभ्रतीला “राख “फासण्याचं काम एपीआय चंद्रकांत गोसावी कडून होऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे. गोविंद राख नावाच्या कर्मचाऱ्याची बदली झाली. तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश दिले. पण तो प्रामाणिकपणे अवैध धंद्यातून मिळणाऱ्या कमाईची वसुली करून देणारा असल्याने एसपींचीच दिशाभूल करून बदली रोखण्यात यश मिळवल्याची माहिती मिळत आहे.
“गोविंद राख” माणूस तसा प्रामाणिक …!वसुलीची जबाबदारी गोसावींनी सोपवली ती अगदी प्रामाणिकपणे “नशा युक्त अभियानाला” प्राधान्य देत कमाई करून देणारा…! वाळू उपशातून होणारी कमाई असो की अवैध धंद्यातून असो की गौण खनिजातून प्रत्येक वेळी वर कमाईच्या आकडेवारीची कमान उंचावलेलीच ठेवली. त्यामुळे तो गोसावीं चा “खास माणूस” या प्रकारामध्ये मोडला जातो. गोविंद राख यांची बदली तीन साडेतीन महिन्यापूर्वी पिंपळनेर पोलीस ठाण्यात झाली. 15-20 दिवसाचा कालावधी उलटत नाही तोच नेकनूर पोलीस ठाण्यातील वसुलीचा चांगला अनुभव असल्याच्या कारणावरून बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ बदली झाली. बाकी वसुली सोडली तर पोलीस यंत्रणेच्या कर्तव्याची कुठलीच मोठी कामगिरी हातातून न पार पडलेलं व्यक्तिमत्व…! बदली करताना पोलीस अधीक्षकांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे असे आदेश दिले. पण एस पी चे आदेश मानतील ते चंद्रकांत गोसावी कसले? गोसावींनी राखची बदली होताच इमोशनल करण्याचा डाव खेळला नेमके त्या डावालाच एस पी भुलले. त्याचवेळी नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत पवनचक्की रखवालदाराने गोळीबार केला त्यामध्ये एक चोरटा मारला गेला. या संधीचं सोन गोसावींनी केलं. कायदा सुव्यवस्थेच, मनुष्यबळाचं कारण पुढे केलं. पोलीस अधीक्षकांना फोन लावून चार-पाच दिवस गोविंद राख यांना नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत राहू द्या अशी विनंती केली. यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास एसपींना नडला. याचाच गैरफायदा घेतला गेला. तीन साडेतीन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील गोविंद राख अजूनही नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तो असेना का? अडचण काहीच नाही. पण कर्तव्य सोडून वसुलीच्या कामात प्रामाणिकपणा दाखवत अवैध धंद्यांना खतपाणी घालण्याची कृती मात्र सर्वसामान्य जनतेच्या मुळावर उठू लागली आहे. जिथे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत सारख्या कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकाऱ्याचा आदेश डावलला जात असेल ? त्यांनाच दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जात असेल? अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिले जात असेल? त्यातून होणाऱ्या कमाईवर लक्ष ठेवले जात असेल? तर कावत यांच्या इभ्रतीला (साख) राख फासण्याच काम केलं जात असल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
वाल्मिक कराडच्या जामीनाला विरोध; ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी
बीड — मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या मकोका कोर्टात तब्बल तीन तास सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कराडच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला
तर आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी तब्बल पावणे दोन तास युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने कोणताही निर्णय न देता पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडच्या जामीन अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध केला. या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे याने दाखल केलेल्या दोषमुक्ती अर्जावरही निकम यांनी सडेतोड युक्तिवाद केला. आजची सुनावणी तब्बल तीन तास पार पडली.. यामध्ये वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तिवाद केला.
अटक करताना कराडला अटकेची कारणे सांगितली गेली नव्हती. मात्र, निकम यांनी हा दावा खोडून काढला. तसेच आवादा कंपनीचे कर्मचारी सुनील शिंदे यांनी रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलची तारीख चुकीची असल्याचा आरोपींचा दावा निकम यांनी सीडीआर सादर करून फेटाळला. सीडीआरनुसार कराडने त्या दिवशी फोन केल्याची नोंद आहे, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या संभाषणाशी संबंधित प्रत्यक्ष पुरावे योग्य वेळी सादर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
विष्णू चाटेच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद
विष्णू चाटेच्या वकिलांनी त्याच्यावर कोणताही गुन्हा नसल्याचा दावा केला. यावर निकम यांनी चाटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. खंडणीच्या प्रकरणात विष्णू चाटे हा वाल्मीक कराडचा ‘उजवा हात’ होता आणि त्याने कराडला पूर्णपणे सहकार्य केले, असे निकम यांनी न्यायालयाला सांगितले. मकोका कायद्याच्या तरतुदी या गुन्ह्याला लागू होतात, आरोपीला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी चाटेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळण्याची मागणी केली.
परळी तालुक्यातील कौडगाव हुडा येथील नदीत चार चाकी गाडी गेली वाहून
धनंजय मुंडे यांनी रात्रीतून हलवली यंत्रणा
गाडीतील चार पैकी तिघांना वाचवण्यात बचाव पथकांना यश
परळी — तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सदृश परिस्थिती असून परिणामी गावागावांतील नद्यांना पूर आला आहे. याचा फटका कौडगाव हुडा येथील तरुणांना बसला असून कौडगाव हुडा येथील तरुणांची चार चाकी कार गाव नदीच्या पुरत रात्री उशिरा वाहून गेली. या गाडीतील चौघांपैकी तीन जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले असून एक तरुण मयत झाला असून त्याचे पार्थिव सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
रविवारी मध्यरात्री कौडगाव – कासारवाडी रस्त्यावर मारुती बलिनो गाडी पुरात वाहून गेली. ही घटना रविवारी रात्री ११:३० ते १२ च्या दरम्यान घडली असून या घटनेची माहिती स्थानिकांनी तत्काळ या भागाचे आमदार धनंजय मुंडे यांना कळवली आता श्री मुंडे यांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणांना सज्ज करून बचाव कार्याला वेग आणला. उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, सिरसाळा पोलीस ठाण्याचे सपोनी गोरक्षनाथ दहिफळे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, जगमीत्र कार्यालयाचे समन्वयक बाबुराव रुपनर हे बचाव पथकांना घेऊन मध्यरात्री घटना स्थळी दाखल झाले होते. पाण्याचा प्रवाह अत्यंत जास्त असल्याने बचाव कार्याला अडथळे येत होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मार्फत बीडचे जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कार्यालयास संपर्क करून एन डी आर एफ च्या पथकास पाचारण करण्यात आले. हे पथकही तातडीने रवाना झाले.
दरम्यान या घटनेत वाहून गेलेल्या अमर मधुकर पौळ (वय २२) रा. डिग्रस, राहुल संपती पौळ (वय ३२), राहुल सटवाजी नवले (वय २२) रा. फुलारवाडी ता. पाथ्री या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले असून विशाल बल्लाळ (वय २४) रा. बोरी सावरगाव ता. केज हा तरुण मयत झाला असून त्याचा मृतदेह सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पहाटे युवक नेते अजय मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी ग्रामस्थांशी व प्रशासकीय यंत्रणांशी चर्चा केली. धनंजय मुंडे हेही दूरध्वनीवरून रात्रभर यंत्रणांच्या संपर्कात होते, तसेच त्यांचे सहकारी राजाभाऊ पौळ, सुभाष नाटकर, तसेच धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाची टीम घटनास्थळी मदत कार्यात उपस्थिती होती.
प्रशासन अलर्टवर, नागरिकांनी सतर्क रहावे – धनंजय मुंडे
दरम्यान परळी वैद्यनाथ मतदारसंघांत परळी शहरासह विविध गावातील अनेक नद्यांना पूर आले असून प्रशासन २४ तास अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, नदी काठी राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी तसेच कोणतीही आपत्ती उद्भवत असल्यास तातडीने सुरक्षित स्थळी जावे, कुठल्याही पुलावरून पानी वाहत असल्यास त्यातून वाहने घालू नयेत, तसेच आपत्ती काळात माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
दोन वर्षांच्या चिमुकलीला संपवून आईची आत्महत्या
गेवराई — 25 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला फाशी देऊन स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मालेगाव मध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास घडली
सोमवारी 18 ऑगस्टला दुपारच्या सुमारास अंकिता बळीराम घवाडे वय 25 वर्ष या विवाहितेने घरातील माळवदाच्या हलकडीला दोरीच्या साहाय्याने आपल्या मुलगी शिवप्रीती बळीराम घवाडे व दोन वर्ष हिला फाशी दिली आणि तिचा जीव घेतला. त्यानंतर तिने स्वतःही त्याच ठिकाणी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. ही घटना लक्षात आल्यानंतर तातडीने शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेत ते बीड येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या पोलिस शवविच्छेदन अहवालाची वाट बघत आहेत. अद्याप या प्रकारामागचे नेमके कारण समजू शकले नाही.
घरगुती कलह, आर्थिक समस्या किंवा मानसिक ताणतणावामुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. तथापि, याबाबतचे खरे कारण पोलिसांच्या पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.आईने आपल्या दोन वर्षांच्या लेकीचा जीव घेऊन स्वतःचेही जीवन संपवल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या हृदयद्रावक घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे. या आईने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत मात्र सध्या काहीही माहिती नाही.