Home Blog Page 124

आ.संदीप क्षीरसागरांच्या दूरदर्शी प्रयत्नाला यश;बिंदुसरा नदीवरील पूल कम बंधार्‍याचा केला शुभारंभ

0

बंधारा कम पुलामुळे बीड शहरासह परिसरातील गावांची भूजल पातळी वाढणार

बीड —  शहरातील बिंदुसरा नदीच्या पात्रात पूल कम बंधारा बांधणीच्या कामाला अखेर सुरूवात झाली असून आ.संदीप क्षीरसागरांनी गुरूवारी (दि.३) रोजी या कामाचा शुभारंभ केला. आ.क्षीरसागर हे काम होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या कामाची सुरूवात झाली असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या पूल कम कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यामुळे बीड शहर आणि परिसरातील आसपासच्या गावांमध्ये भूजल पातळीत मोठी वाढ होणार आहे. ही आनंदाची बाब आहे.
बीड शहरातील बार्शी नाक्याजवळील असलेल्या बिंदुसरा नदी पात्रात पूल कम कोल्हापूरी बंधारा तयार करावा. जेणेकरून बिंदुसरा नदीतून वाहून जाणारे पाणी अडविले जाईल. हे काम करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांनी गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय लावून धरला. अशा स्वरुपातील हे काम असणार आहे. या कामाच्या मंजूरीसाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी अनेक वर्षे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. आणि अखेर आ.संदीप क्षीरसागरांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे. बिंदुसरा नदीवरील बंधार्‍यामुळे बीड परिसरात सिंचन आणि पाणी उपलब्धतेसाठी मोठा फायदा होणार आहे. आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांतून बीडसाठी अतिशय फायदेशीर असलेले हे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

पूल कम बंधार्‍याचा सिंचन आणि पाणी साठवण्यासाठी मोठा फायदा

शुभारंभ झालेल्या बिंदुसरा नदीवरील पूल कम कोल्हापूरी बंधार्‍यामुळे बीड शहर आणि आजूबाजूच्या साधारण ५ किलोमीटर पर्यंतच्या परिसरात भूजल पातळीत वाढ होणार आहे. बीड जिल्ह्यात पावसाची अनियमितता असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होते. परंतु या कोल्हापूरी बंधार्‍यामुळे पाणी साठवणूक होईल. परिणामी पाणी उपलब्धता आणि शेती सिंचनासाठी याचा खूप मोठा फायदा या पूल कम बंधार्‍याचा होणार आहे. बिंदुसरा नदीवर बंधारा कम पूल ही संकल्पना मोठी दूरदर्शी होती. ती आ.संदीप क्षीरसागर यांनी डोळ्यासमोर ठेवून हे काम होण्यासाठी निरंतर प्रयत्न केले. शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. अनेकवेळा अधिवेशनातही हा मुद्दा मांडला. दरम्यान आता आ.संदीप क्षीरसागरांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच हे काम पूर्ण झालेले असेल.

ज्या झाडाखाली भावाने आत्महत्या केली त्याच झाडाखाली आरोपी ठेचून मारला

0

बीड —  जिल्ह्यातील गुन्हेगारीने कळस गाठला असून आणखी एक हत्या झाल्यानंतर खळबळ माजली आहे.या हत्याप्रकरणाचा तपशील लक्ष वेधून घेणारा आहे. बीड जिल्ह्यातील शिरसाळा परिसरानजीक कान्हापूर गावात जुन्या वादातून स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याची हत्या करण्यात आली. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजते.
बीडच्या धारुर तालुक्यातील कान्हापूर हे गाव शिरसाळाजवळ येते. येथील स्वप्नील उर्फ बबलू देशमुखचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी स्वप्निल देशमुख याच्या त्रासाला कंटाळून गावातीलच किराणा दुकानदार अविनाश देशमुख यांनी मार्च 2023 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी बबलू देशमुख याच्यावर कलम 306, कलम 504, कलम 506, कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठीच संतोष देशमुख यांच्यावर आरोपी स्वप्नीलकडून वारंवार दबाव आणला जात होता. या त्रासाला कंटाळून संतोष देशमुख आणि त्यांची पत्नी सोनाली देशमुख यांनी बबलू देशमुख याच्यावर हल्ला करुन त्याला संपवले.
या हल्ल्यात संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पाठीवर बबलू देशमुख याने वार केले आहेत. पोलिसांनी या घटनेत वापरण्यात आलेली गुप्ती घटनास्थळावरुन जप्त केली आहे. बबलूची हत्या केल्यानंतर संतोष देशमुख आणि सोनाली देशमुख दोघेही स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. त्यांनी पोलिसांत स्वप्निल देशमुख विरोधात फिर्याद दाखल केली. विशेष म्हणजे ज्या झाडाला लटकून अविनाश देशमुख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्याच झाडाखाली संतोष देशमुख यांनी बबलू देशमुख याची हत्या केली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वाल्मीकच्या इशाऱ्यावरून आम्हाला मारहाण महादेव गीतेचा आरोप;चार आरोपी हर्सुल कारागृहात पाठवले

0

बीड — जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये मारामारीची घटना घडली.सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराडला महादेव गीते आणि अक्षय आठवलेने मारहाण केल्याची चर्चा होती.मात्र, असा प्रकार घडला नाही. सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे यांच्यात झटापट झाली. परंतू, सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना वेगळे केले, असा खुलासा कारागृह प्रशासनाने केला आहे. दरम्यान सायंकाळी महादेव गीते याच्यासह चार बंदींना हार्सुल कारागृहात हलवण्यात आले.

बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले हे न्यायालयीन कोठडीत आहेत. याबरोबरच बापु आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते, मुकूंद गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे हे देखील याच कारागृहात आहेत. याबरोबरच बनावट नोटा प्रकरणातील आरोपी अक्षय आठवले हा देखील याच ठिकाणी आहे. सोमवारी सकाळी महादेव गीते व अक्षय आठवले याने मिळून सुदर्शन घुले याला मारहाण केली तसेच वाल्मीक कराडला देखील मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर दुपारी कारागृह प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देत सुदीप सोनवणे व राजेश वाघमोडे यांच्यात झटापट झाली परंतु सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याचे कारागृह प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, मुकूंद गिते, राजेश वाघमोडे या चार जणांना हर्सुल कारागृहात हलवण्यात आले आहे.
एकीकडे वाल्मीक कराड व सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याची चर्चा होत असताना दुसरीकडे महादेव गीते याच्यासह अन्य चार कैद्यांना छ.संभाजीनगरच्या हार्सुल कारागृहात हलवण्यात आले. त्यांना कारागृहाबाहेर आणण्यात आल्यानंतर उपस्थित काही जणांसमोर त्यांनी आम्हाला वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरुन मारहाण होत असून कारागृहातील सीसीटीव्ही चेक करा, अशी मागणी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एकंदरच या सर्व प्रकारामुळे जिल्हा कारागृहाची लक्तर टांगली गेली आहेत.

वाल्मीक कराडच्या मुस्काटात मारली, सुदर्शन घुलेही बदडला; कारागृहात राडा

0

बीड — जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आहेत, त्याच जेलमध्ये राडा झाला आहे. या भांडणांमध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती आहे.
जेल प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीही माहिती दिलेली आहे. मात्र वाल्मिक कराडला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांकडून मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. दोन गटात राडा झाला त्यामुळे जेलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा राग असू शकतो, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे. लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार कराडने केलेले आहेत. त्यामुळे चार दोन झापडी मारल्याच ते म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अमरावती आणि नागपूरच्या जेलमध्ये हलवावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. जेलमध्ये राडा झाल्याच्या बातमीला सुरेश धस यांनी एक प्रकारे दुजोरा दिलेला आहे. जेलमध्ये मारहाण होत असेल तर जेल सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळी नाष्ट्याच्या वेळी गित्ते आणि आठवले हे दोघे कराडच्या अंगावर धाऊन गेले. त्यावेळी सुदर्शन घुले तिथेच होता. तो मध्ये पडला, त्यामुळे महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला झोडपल असल्याची माहिती मिळत आहे. जेल प्रशासनाने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

पा’ठक’ साहेब तुम्ही कंपनीचे दलाल का? शेतकऱ्याच्या प्रश्नाने जिल्हाधिकारी हडबडले!

0

चौसाळा — जिल्हाधिकारी अविनाश पाठक चौसाळा येथे महाराष्ट्र बँकेच्या शाखा उद्घाटनाला आले असताना चौसाळा परिसरात पवन ऊर्जा कंपन्यांच्या टॉवर लाईनच्या कामाची पाहणी त्यांनी केली. अर्धवट काम पाहताच लवकर तारा ओढून घ्या असा आदेश देताच एका शेतकऱ्याने पुढे येत साहेब आमची कैफियत ऐका! असं म्हणत पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाल का असा प्रश्न शेतकऱ्यांने विचारताच जिल्हाधिकारी हडबडल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह शेतकरी उभा करू लागल्याचे पाहायला मिळत आहे.
जनता आणि शासन यांचा समन्वय साधून विश्वासाच नातं‌ तयार करत कायदा सुव्यवस्था स्थापन करताना न्याय भूमिका घेण्याची अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते. मात्र या सगळ्या गोष्टीला बीड जिल्ह्यात सुरुंग लावण्याचे काम जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. पवन ऊर्जा ,सौर ऊर्जा कंपन्यांची काम मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात केली जात आहेत. हा विकासाचा भाग असला तरी शेतकऱ्यांच्या बाबतीत न्याय भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी कधीच घेतली नाही. कायदा सुव्यवस्था फक्त कंपन्यांच रक्षण करण्यासाठी आहे. शेतकरी हा कायदा सुव्यवस्था बिघडवणारा आहे अशी प्रतिमा निर्माण करत आदेशांची सरबत्ती जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनावर केली. पवनचक्की, सौरऊर्जा प्रकल्प उभा करताना संपादित जमीनीचा मावेजा शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळाला आहे की नाही हे पाहण्यासाठी स नियंत्रण समिती स्थापन करण्याचे निर्देश असताना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना कंपन्यांच्या आर्थिक खळखळाटा पुढे गरज वाटली नाही. त्या दिशा निर्देशांच पालन त्यांनी केलं नाही. परिणामी बाधित शेतकऱ्यांना मावेजा व्यवस्थित मिळाला नाही. शेतकऱ्यांना दांडगाई करून धमकावणे, गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देणे, वेळप्रसंगी ठाण्यात नेऊन डांबणे यासारख्या अनैतिक मार्गाचा वापर कंपन्यांनी केला.
या उपरही एखादा शेतकरी स्वतःच्या शेतात कंपनीला पाय ठेवण्यास मज्जाव करत असेल तर पोलीस यंत्रणेचा वापर करून एखाद्या दहशतवाद्याला पकडायला पोलीस यंत्रणा आली आहे की काय? अशी वातावरण निर्मिती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बनली गेली. शेवटी “राजा बोले दल हाले” याचा प्रत्यय येऊ लागला. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी देखील बऱ्याच ठिकाणी कंपन्यांना संरक्षण देण्यास असमर्थता दर्शवली. मात्र शेवटी” बॉस इज ऑलवेज राईट” असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन त्यांनाही करावं लागलं.
सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेश कर यांनी आंदोलन केले. माध्यमांनी बोंब केली. पण याचा आवाज जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर गेलाच नाही. कंपन्यांच्या आर्थिक खनखनाटाने जिल्हाधिकाऱ्यांचे कान बहिरे झाले. शेतकऱ्यांची आर्त हाक त्यामुळे ऐकू आली नाही परिणामी जिल्ह्यात रझाकारी सुरू असल्याचं चित्र निर्माण करण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीने यश आलं. शेतकऱ्यांनी मावेजा मिळावा यासाठी अर्ज विनंत्या केल्या पण त्याची दखल देखील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नाही. शेवटी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी आपल्याला न्याय देतील अशी आशा मावळली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अशाच मस्तवालपणाचा परिणाम जनतेचा जिल्हाधिकाऱ्यांवरचा विश्वास उडाला. त्यातच प्रकल्प बाधितांना मावेजा मिळाला नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त होण्यासारखे प्रकार घडले त्यामुळे शेतकरी विरोधी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांची आहे अशी प्रतिमा अविनाश पाठक यांची निर्माण झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी चौसाळा येथे गेल्या सप्ताहात ( 20 मार्च रोजी )महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा उद्घाटनाला आले होते. यावेळी त्यांनी टॉवर लाईनचे काम कुठपर्यंत आले आहे याची स्पॉटवर जाऊन माहिती घेतली. अर्धवट काम दिसताच तात्काळ काम करा असा आदेश देखील दिला. परिणामी चिडलेल्या शेतकऱ्यांनी ” पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाल का?”शेतकऱ्यांची बाजू कधी ऐकणार?
असा प्रश्न विचारला. या प्रश्नाने मात्र जिल्हाधिकारी हडबडले, थोडेसे भानावर आले. भानावर येताच तुमच्या मावेजाचा प्रश्न मिटवून टाकू असं तोंडी बोलून शेतकऱ्यांच्या “तोंडाला पान पुसली” त्यानंतर देखील सनियंत्रण समिती स्थापन करून न्याय पद्धतीने मावेजा वाटप करावा याची सद्बुद्धी जिल्हाधिकाऱ्यांना झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या धृतराष्ट्रा सारख्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन प्रशासनाची विश्वासार्हताच धोक्यात आली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

कुंपणच शेत खातय; शेतकऱ्यांना वाली नाही

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाने दि.२१ आक्टोबर २०२३ रोजी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संनियंत्रण समित्यांची स्थापना केली असुन पवन ऊर्जा प्रकल्पाशी निगडित असलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत कायदेशीर बाबी व अनिश्चितता तपासणे, जमिनीच्या व्यवहारांमध्ये योग्य व्यावहारिक मोबदला मिळत असल्याबाबत खात्री करणे.पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत समितीकडे आलेल्या तक्रारींची चौकशी करून त्यावर योग्य कारवाई करणे.शेतकरी आणि ग्रामस्थ आणि प्रकल्प विकासक यांच्यामध्ये समन्वय ठेवणे आदि त्यांची कामे असुन जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष तर पोलिस अधीक्षक सदस्य आहेत.मात्र या समित्या केवळ कागदावर कार्यरत असुन जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक पवनचक्की कंपन्यांचीच पाठराखण करत असुन पिडीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. चौसाळ्यात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नात गैर काहीच नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह का उभे करू नये?
जिल्हा प्रशासनाची भूमिका कुंपनच शेत खातंय
       डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर,                  सामाजिक कार्यकर्ते

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन; कोविड काळातील भ्रष्टाचार भोवला

0

मूंबई : बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन केले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत केली आहे. कोविड काळात घोटाळा केल्याचा भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली.

या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधिमंडळात निलंबन करण्यात येईल तसेच तीन महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण करावी अशी घोषणा केली आहे.

कोविड काळात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला. या घोटाळ्यात डॉ. थोरात दोषी आढळले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची बीडहून नाशिकला बदली करण्यात आली. परत पुन्हा बीड जिल्ह्यात बदली का? दोषी असतील तर डॉ अशोक थोरात वरती गुन्हा दाखल करणार का? असा सवाल नमिता मुंदडा यांनी केला. तसेच प्राथमिक चौकशीमध्ये डॉ. अशोक थोरात औषध खरेदीमध्ये प्रथमदर्शनी अनियमित्ता आढळून आली, असे भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली.

या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधिमंडळात निलंबन करण्यात येईल तसेच तीन महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या कामकाजाबद्दल खूप गंभीर आक्षेप आहेत. निश्चितपणाने सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांना आपण सस्पेंड करत आहोत. त्यांना निलंबित करून तीन महिन्यांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्यात येईल. या मध्ये जे दोष आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा आरग्यमंत्र्यांनी केली.

कोण आहेत डॉक्टर अशोक थोरात?

डॉ. अशोक थोरात पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते. त्यानंतर पुन्हा ते जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बीडमध्ये रुजू आहेत. या पूर्वी देखील बीडमध्ये ते जिल्हा शल्य चिकित्सक होते. दरम्यान, मस्सोजागचे सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट अशोक थोरात यांनी दिला होता. अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर अंबाजोगाई येथील पियुष इन हॉटेल चर्चेत आले होते. त्यानंतर डॉ. अशोक थोरात यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

“सह्याद्री माझा इफेक्ट: खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारे पोलीस निलंबित!

0

बीड — खोक्या उर्फ सतीश भोसले याला अमानुष मारहाण प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यावेळी कारागृह आवारात पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचं वृत्त “सह्याद्री माझा” ने व्हिडिओसह प्रसिद्ध करताच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचे जाहीर करून कारणे दाखवा नोटीस देणार असल्याचे सांगितले आहे.
खोक्या उर्फ सतीश भोसले याच्यावर अमानुष मारहाणी सोबतच त्याच्या घरात वन्य जीवांची हत्या केल्याचे अवशेष सापडले. मारहाण प्रकरणात त्याला शिरूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान जिल्हा कारागृह आवारात बाहेरचा डबा आणून खोक्याला जेवण देण्यात आले. याबरोबरच खंडीभर कार्यकर्ते त्याच्या दिमतीला उपस्थित होते. खोक्याचे जेवण झाल्यानंतर मिनरल वॉटर हातावर ओततताना कार्यकर्ता दिसत आहे. राजा महाराजाला शोभेल अशी बडदास्त त्याची ठेवण्यात आली होती. या संदर्भातला कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाच्या अनुषंगाने सह्याद्री माझा ने वृत्त प्रसिद्ध करताच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना निलंबित करून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तडकाफडकी निलंबनाच्या आदेश दिल्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे ‌

अजितदादा की शरद पवार राष्ट्रवादी कोणाची ; न्यायालयात सुनावणी

0

नवी दिल्ली — विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने जोरदार मुसंडी मारत 41 जागा जिंकल्या आहे. तर शरद पवार गटाला पराभवाचा धक्का पचवावा लागला. पण अजूनही राष्ट्रवादी कुणाचीही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.अशातच आता 25 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीच्या पक्षासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पक्ष नाव आणि चिन्ह या संदर्भात जयंत पाटील यांच्या वतीने जी याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर 25 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या द्विसदस्य खंडपीठामुळे ही सुनावणी होणार आहे दुपारी बारानंतर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार यांनी काका शरद पवारांची साथ सोडून महायुतीत सामील झाले होते. अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळांसह प्रमुख नेत्यांनी वेगळा गट स्थापन केला होता. पण या गटानेही राष्ट्रवादी आपलीच असल्याचा दावा केला. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. कोर्टाने घड्याळ चिन्ह वापरण्यास अजित पवार गटाला अटी आणि शर्थी घालून दिल्या होत्या. तर शरद पवार गटाला स्वतंत्र्यपणे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं होतं.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. तर शरद पवार गटाने तुतारी वाजवणाऱ्या माणूस चिन्हावर निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर विधानसभा निवडणुकीत वारं बदललं. अजित पवार गटाने सर्वाधिक ४१ जागा जिंकल्या होत्या. तर शरद पवार गटाला फक्त ७ जागांवर समाधान मानावं लागलं. अजित पवार गटाने महायुतीत राहुन दमदार कामगिरी केली. तर महाविकास आघाडीसोबत लढून शरद पवार गटाने सर्वात कमी जागा जिंकल्या. आता स्थानिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे, त्याआधी राष्ट्रवादी कुणाची? याचा निर्णय सुप्रीम कोर्टात लागण्याची शक्यता आहे.

खोक्या उर्फ सतीश भोसले ला व्हीआयपी ट्रीटमेंट; पोलिसांचं फक्त धुवायचंच राहिलं?

0

बीड — अमानुष मारहाण तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारी सारख्या गुन्ह्यातून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसले ला व्हीआयपी ट्रीटमेंट भेटत आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी कारागृह आवारात जेवणाचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांशी गप्पा मारत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे यामुळे खळबळ माजली आहे. एकूणच बीड पोलिस प्रशासनाची इभ्रत वेशीला टांगली गेली आहे.


संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्यावरून राज्यात खळबळ माजली होती. त्यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ट्विट करून गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

मात्र सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या याला देखील पोलिस प्रशासन व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ लागलं आहे. सतीश भोसलेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शिरूर न्यायालयाने दिले आहेत.बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करत असताना राजा महाराजांना शोभेल अशी खोक्याची बडदास्त जेलच्या आवारात ठेवली गेली असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कारागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यांसोबत मस्त राव रंभाच्या गप्पा मारत आलेल्या डब्यावर ताव मारताना या व्हिडिओत खोक्या दिसत आहे. त्याच्या दिमतीला पोलीस यंत्रणादेखील आहे. कार्यकर्त्यांसमोर बसून आलेल्या डब्यातील जेवणाचा आनंद त्याने घेतला. कार्यकर्त्यांनी त्याचे हात धुण्यासाठी पाणी ओतले त्यानंतर तो भेटायला आलेल्या लहान मुलीसह महिलांना बोलत असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची अशा समोर येत असलेल्या व्हिडिओमुळे नाचक्की झाली असून जेल व पोलीस प्रशासन कधी सुधारणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजलगाव: जुन्या मोंढ्यातील दोन किराणा दुकान चोरट्यांनी फोडली

0

माजलगाव — जुन्या मोंढ्यातील मुख्य रस्त्यावर असलेल्या दोन किराणा दुकानाची शटर तोडून सामानाची नासधूस केली. गल्ल्यात असलेली 95 हजाराची रोकड देखील लंपास केली.
रहदारीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या जुन्या मोंढ्यातील दिलीप बबन आप्पा खुरपे यांच्या मालकीचे चंद्रशेखर किराणा स्टोअर्स तसेच लक्ष्मीकांत रामहरी झुंजुर्के यांचे लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी ही दोन किराणा दुकान शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून सामानाची नासधूस केली. दरम्यान रविवारी सकाळी दिलीप खुरपे यांना फोनवरून याची माहिती मिळाली. त्यावेळी चोरांनी नासधूस केलेली तसेच गल्ल्यातील 80 हजार पाचशे रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबरोबरच चोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीसीआर देखील चोरून नेला. झिंजुर्के यांच्या दुकानातील कल्याण बारा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी पीडित व्यापाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.