Home Blog Page 124

मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद राधाकृष्ण विखेंकडे

मुंबई — मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या काही आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदामध्ये मोठा फेरबदल करण्यात आला. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत. तत्पूर्वीच हा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील प्रभावी नेते आहेत. त्यांनी यापूर्वी महसूल, शिक्षण आणि कृषी खात्यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव पाहता, त्यांना ही जबाबदारी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा फेब्रुवारी २०२४ मध्ये मंजूर झाला असला, तरी त्यावरून अजूनही वाद आणि कायदेशीर आव्हाने कायम आहेत. या पार्श्वभूमीवर, विखेंच्या नियुक्तीमुळे मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी नवे प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या उपसमितीमार्फत मराठा आरक्षणाशी संबंधित प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवण्यात येणार आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलांशी समन्वय ठेवण्यात येणार आहे. तसेच न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीशी समन्वय साधणे. मराठा आंदोलन आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणे. जात प्रमाणपत्र देण्यातील अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुलभ करणे. मराठा समाजासाठी बनवलेल्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, तसेच सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेणे, अशी कामे मराठा आरक्षण उपसमितीकडून केली जातील.

विखे पाटील यांनी नियुक्तीनंतर सांगितले की, ते मराठा समाजाच्या हितासाठी आणि सरकारच्या धोरणांनुसार काम करतील. तसेच, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यावर आपला भर असेल, असं ते म्हणाले.

ओबीसी प्रवर्गात आणखी 29 जातींचा समावेश होणार!

मुंबई — राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

दरम्यान त्यासाठी 29 तारखेला जरांगे पाटील हे मुंबईत धडक देणार आहेत. मात्र त्या आधी राज्य सरकार ओबीसी समाजाबाबत महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

राज्याच्या ओबीसी जातींच्या महाराष्ट्राच्या यादीत आता नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे शिफारशीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. राज्य सरकारने मान्यता दिल्यास हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे जाणार आहे.

राज्यात ओबीसी जातींची यादी खूप मोठी आहे. यामध्ये अनेक जाती आहेत. उपजाती आहेत. आता राज्यातील अन्य जातींचा राज्याच्या ओबीसी जातींच्या यादीत समावेश करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने यावर प्रस्ताव मंजूर केल्यास तो प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. यामध्ये 29 जातींचा समावेश करण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे.

प्रेमाच्या त्रिकोणातून महिला होमगार्डची हत्या

बीड — प्रेमाच्या त्रिकोणातून हत्त्ये सारखी घटना घडल्याने बीड पुन्हा हादरले आहे. एकाच बॉयफ्रेंडवरून दोन मैत्रिणींमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच एका महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. मृत महिलेचा मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मैत्रिणीसह चार जणांना अटक केली आहे. मृत महिलेचे नाव अयोध्या राहुल व्हरकटे वय 26, वर्ष रा. लुखामसला, ता. गेवराई असे आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता. तिला तीन वर्षांची मुलगी असून ती सध्या सासरी आहे. अयोध्या काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये भरती झाली होती आणि बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहून पोलिस भरतीची तयारी करत होती.

‎दरम्यान, अयोध्याची मैत्रीण फडताडे हिचे राठोड नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी राठोडची जवळीक अयोध्याशी वाढली. यामुळे फडताडे हिच्या मनात राग निर्माण झाला. दोन दिवसांपूर्वी तिने अयोध्याला घरात बोलावून घेतले. तेथे आपल्या मुलाच्या मदतीने अयोध्याचा गळा दाबून तिचा खून केला.

यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा डाव रचण्यात आला. मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवून फडताडेच्या मुलाने आपल्या ओळखीच्या व्यक्तीची स्कूटी घेतली. त्यात मृतदेह ठेवून बीड शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात फेकण्यात आला. गुरुवारी सकाळी हा मृतदेह आढळून आला आणि घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी चौघांना ताब्यात घेतले. फरताडे हिने खुनाची कबुली पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे.

सरकारी वकील आत्महत्या प्रकरणी न्यायाधीशासह लिपिकावर गुन्हा दाखल

बीड — सरकारी वकील विनायक लिंबाजी चंदेल वय 47वर्ष, रा. इंदेवाडी, जि. परभणी यांनी बुधवारी वडवणी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी दोन दिवसानंतर न्यायाधीशासह लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऍड. विनायक चंदेल यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत न्यायाधीशासह लिपीकावर मनमानी कारभार, वारंवार अपमान करून मानसिक छळ केल्याचा आरोप केल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजित चंदेल वय 19 वर्ष यांनी वडवणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील जानेवारी 2025 मध्ये एमपीएससी परीक्षेद्वारे सरकारी वकील म्हणून वडवणी न्यायालयात रूजू झाले होते. जून 2025 पासून वडवणी कोर्टातील नवनियुक्त न्यायाधीश रफीक शेख आणि लिपीक आण्णासाहेब तायडे हे त्यांना विनाकारण मानसिक त्रास देत होते. कामामध्ये अपमानित करणे, मनमानी काम करणे आणि त्यांचे म्हणणे न ऐकल्यामुळे ते सतत ताणतणावात राहत असत. त्यातूनच त्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे विश्वजित याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे
दरम्यान बुधवारी सकाळी सरकारी वकील विनायक चंदेल यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याची जोरदार चर्चा सुरू होती. परंतू त्यात न्यायाधिशांचे नाव असल्याने वडवणी पोलिसांकडून ही माहिती दडवण्यात आली होती. शिवाय विनायक यांचा मुलगा विश्वजीत यानेही पोलिसांवर गुरूवारी आरोप केला होता. या प्रकरणात सगळीकडून टीका होत असल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला नातेवाईकच तक्रार द्यायला येत नव्हता, असा खुलासा पोलिसांनी केला असला तरी विश्वजीत यांच्या आरोपामुळे त्यात किती तथ्य आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला

बीड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

  बीड — राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार बीड जिल्हा परिषदेच्या 61  निवडणूक विभाग आणि त्याअंतर्गत  निर्वाचक गणात गेवराई-18, माजलगाव-12, वडवणी-04, बीड-16, शिरुर कासार-08, पाटोदा-06, आष्टी-14, केज-14, धारुर-06, परळी-12 आणि अंबेजोगाई-12 अशा एकूण जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या 122 निर्वाचक गणासाठी  निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

त्यानुसार आज दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. ही अधिसूचना बीड जिल्हाधिकारी कार्यालय, बीड जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसील कार्यालये आणि सर्व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध असेल. सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली – ऑनलाइन गेम्समधील जुगारावर चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत विधेयक मांडले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५’ हे विधेयक सादर केल्यानंतर ते चर्चे विनाच संमत करण्यात आले. यामुळे रिअल मनी गेमिंग आणि ऑनलाइन बेटिंगला चाप लावला जाणार आहे.

तसेच आज (२१ ऑगस्ट) राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाले आहे. त्यामुळे विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या कायद्यामुळे सरकारला आता मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. पण लोकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे केंद्राने सांगितले आहे.

या विधेयकाच्या माध्यमातून रिअल मनी गेमिंग आणि ऑनलाइन बेटिंगला चाप लावला जाणार आहे. याचे व्यसन लागल्यामुळे पैसा आणि वेळेचा प्रचंड अपव्यव होत असून सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित असल्याबाबत बुधवारी चिंता व्यक्त करण्यात आली.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हे विधेयक बुधवारी कॅबिनेट बैठकीत मांडले. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ते लोकसभेत सादर करण्यात आले. तसेच आज राज्यसभेत मांडले गेले. विरोधकांनी बिहारमधील मतदार यादीमधील घोळासंदर्भात घोषणाबाजी केल्यामुळे चर्चेविनाच सदर विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यसभेतही विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.

राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. कायदा झाल्यास पैशावर आधारीत गेमिंगमध्ये सहभागी असलेल्या संस्थांविरुद्ध कारवाई प्रामुख्याने राज्य सरकारे करतील. निर्धारित तरतुदींचे उल्लंघन म्हणून ऑनलाइन मनी गेमिंग सेवा देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागतील. खेळांसंबंधी जाहिराती देण्यावर प्रतिबंध असेल. अशा प्रसंगी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्हीही शिक्षांची विधेयकात तरतूद आहे.

कायदा झाल्यास कोणत्या भारतीय ॲप्सना फटका बसणार?

व्हेंचर कॅपिटल फर्म लुमिकाईच्या मते, २०२९ पर्यंत अशा गेम्सची भारतीय बाजारपेठ ३.६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल.

ड्रीम११ : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि सेलिब्रिटींनी जाहिरात केल्यामुळे आणि मार्केटिंगचे तंत्र वापरल्यामुळे ड्रिम ११ हे ॲप बरेच लोकप्रिय झाले आहे. क्रिकेट, कबड्डी आणि इतर काही खेळांची फँटसी टीम ड्रीम११ वर तयार केली जाते. ड्रीम ११ या स्टार्टअपचे बाजार मूल्य ८ अब्ज डॉलर इतके आहे.

ड्रीम११ वर युजर ८ रुपयांपासून पुढे त्यांचा संघ लावण्याची संधी मिळते. एका सामन्यावर कोट्यवधींचा पैसा लावला जातो. आयपीएलमुळे या ॲपला बरीच प्रसिद्धी मिळाली.

मोबाइल प्रिमियर लीग : मोबाइल प्रिमियर लीग हे आणखी एक फँटसी टीम लावण्याचे ॲप असून त्याचे बाजारमूल्य २.५ अब्ज डॉलर्सचे आहे.

इतर ॲप्स कोणते?

  • माय ११ सर्कल (My11Circle)
  • हाऊजॅट (Howzat)
  • एसजी११ फँटसी (SG11 Fantasy)
  • विन्झो (WinZO)
  • गेम्स २४ बाय ७ (Games24x7)
  • जंगली गेम्स (Junglee Games covers Rummy & Poker)
  • पोकरबाजी (PokerBaazi)
  • गेम्सक्राफ्ट (GamesKraft)
  • नझारा टेक्नॉलॉजिस (Nazara Technologies)

सर्व सामान्यांना मोठा दिलासा, १२ अन् २८ टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द

नवी दिल्ली — सणासुदीच्या दिवसात मोदी सरकारने सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी मंत्रिगटाच्या बैठकीत भारत सरकारच्या जीएसटीचा १२ टक्के आणि २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे.

सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत. त्यापैकी दोन स्लॅब हे बंद करण्यात येणार आहेत. ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के या चार असे जीएसटीचे चार स्लॅब आहेत. यातील, २ टक्के आणि २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द करुन केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यामुळे कोणत्या गोष्टी स्वस्त होणार?
कपडे आणि रेडिमेड कपडे, चप्पल, बूट, प्रिंटिंग आणि स्टेशनरी वस्तू, प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ, होम अप्लायन्सेस वरील कर कमी होईल.

तसेच, दुचाकी वाहनं, चार चाकी कार, सीमेंट आणि बिल्डींग मटेरियल, फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कंडीशनर, टीव्ही याचा समावेश होतो. पॅकेजमधील अन्नपदार्थ, बेवरेजेस, पेंटस आणि वॉर्निश यावरील कर कमी होतील.

यासोबतच, आरोग्य आणि जीवन विमा यावरील जीएसटी माफ करण्याच्या प्रस्तावावर मंत्रिगटाच्या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये वैयक्तिक आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरील प्रीमियमवर जीएसटी माफ करण्याचाबाबत चर्चा झाली. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीवर थेट परिणाम होईल. सध्या यावर १८ टक्के जीएसटी आकारला जातो. त्यामुळे यावर निर्णय झाल्यास आरोग्य आणि जीवन विमा यावरील जीएसटी माफ होऊ शकतो.

बेपत्ता असलेल्या महिला होमगार्ड चा मृतदेह आढळला

बीड — बेपत्ता झालेल्या महिला होमगार्ड चा मृतदेह पांगरी च्या पुढे नाल्यात आढळून आल्याने खळबळ माजली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. अयोध्या राहुल व्हरकटे (वय २६) असं मयत महिलेचं नाव आहे.
पांगरीच्या पुढे असलेल्या एका नाल्यात अयोध्या यांचा मृतदेह आढळून आला आहे.घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे टीम पोहोचली आहे. दरम्यान अयोध्या यांच्या मृत्युमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. मयत महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याला शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.अयोध्या व्हरकटे बेपत्ता झाल्याबाबत शिवाजीनगर ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. दोन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. वासनवाडीच्या पुढे पांगरी जवळील एका नाल्यात अयोध्या यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे आता पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतलं असून त्या महिलेची चौकशी देखील सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे . या घटनेमागे हत्येचा संशय व्यक्त करण्यात येतं असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कोयत्याने डोक्यात वार करून तरुणाची हत्या; परळी हादरलं

परळी — तालुक्यातील रत्ननगर तांड्यात एका तरुणाची कौटुंबिक वादातून डोक्यात कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री जळगव्हाण ता.परळी येथे घडली. अतिशय निघृणपणे खून करून डोके पुर्णतः ठेचण्यात आल्याचे दिसून येत आहे. ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत तरुणाचे नाव भीमराव

शिवाजी राठोड असून, आरोपीचे नाव अनिल चव्हाण आहे, जो घटना स्थळावरून फरार झाला आहे. दरम्यान मयत भिमराव राठोड हे आरोपी अनिल चव्हाणचे मेव्हणा असून कौटूंबिक वादातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल बाबासाहेब चव्हाण वय 30 वर्ष, रा.रामनगर तांडा आणि पप्पु उर्फ भीमराव शिवाजी राठोड वय 26 वर्ष, रा.रामनगर तांडा, ता. परळी यांच्यात घरगुती वाद सुरू होता.हा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता आणि यावरून अनिल चव्हाणने भीमरावला संपवण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी अनिलने भीमरावला रत्ननगर तांड्यात बोलावले. या भेटीत दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला. बाचाबाची झाली आणि नंतर हाणामारीत रूपांतर झालं. या हाणामारी दरम्यान अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेकदा वार केले. यात भीमराव गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिस ठाण्याचे सपोनि. गोरखनाथ दहिफळे, सोनवणे, देशमुख, तौर, मुंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी अनिल चव्हाणच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.
या हत्येच्या घटनेमुळे रत्ननगर तांडा आणि आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक आणि शेजारी घाबरलेले आहेत. पोलिसांनी येथील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे आणि घटनास्थळी अधिक सुरक्षाबळ तैनात केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने सखोल तपास सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांचे जबाब आणि मोबाइल लोकेशन यांचा आधार घेतला जात आहे. तसेच पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने हाताळत अनिल चव्हाणला लवकर पकडण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

नवनीत कावतांच्या “नशा मुक्त” अभियानाला गोसावींच्या “नशा युक्त” अभियानाचे चोख उत्तर

बीड — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या नशा मुक्त अभियानासाठी बीडकर एक दिवस धावले. यासाठी प्रशासनाने तिजोरीतून पैसा खर्च केला पण एपीआय चंद्रकांत गोसावी राबवत असलेल्या नशा युक्त अभियानात तरुणाई दररोज झिंगताना दिसून येत आहे. गांजा असो की दारू यातून मिळणाऱ्या महसुलातून राज्यासह स्वतःची तिजोरी भरत अर्थचक्राला गती दिली जाऊ लागली आहे.
जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा या उद्देशाने 17 ऑगस्ट रोजी पोलीस दलातर्फे नशा मुक्त अभियान राबवण्यात आले. त्याकरता बीड करांना धावायला लावले. पोलीस अधीक्षक नवनीत कांवतांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ही मिळाला. त्यासाठी शासकीय तिजोरी तून खर्च करण्यात आला. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत नशा युक्त अभियानाची केली गेलेली सुरुवात तरुणाईला दररोज झिंगायला लावत आहे. नवनीत कावत यांचा नशा मुक्त अभियानाचा फीवर एक दिवस राहिला. मात्र गोसावींच्या अभियानाचा फीवर कायम राहिला आहे. गांजा असो की दारू खेड्यापाड्यात देखील मिळू लागली आहे. प्रत्येक धाब्यावर अवैध दारूचा महापूर आल्याचं चित्र अनुभवायला येत आहे. सहज गांज्यासारखे अमली पदार्थ उपलब्ध होत असल्याने तरुण पिढीवर याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. एपीआय चंद्रकांत गोसावी यांनी राबविलेल्या नशा युक्त अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यातूनच बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेला गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून केलेल्या कारवाईत मांजरसुंबा अंबाजोगाई महामार्गावर चार किलो गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने सूचना दिल्यावरून नेकनूर पोलिसांच्या समन्वयाने ही कारवाई केली गेली. चौसाळा असो की नेकनूर ही मोठी शहर गांजाला बाजारपेठ मिळवून देऊ लागली आहेत.या बाजारपेठेतूनच ग्रामीण भागात हा माल पोहोच केला जातो. तीच स्थिती दारूची देखील आहे.गाव खेड्यात उघडलेल्या धाब्यांमधून सर्रास बनावट दारूसह देशी विदेशी ब्रँड उपलब्ध होत आहेत. हे धाबे गर्दीने अक्षरशः फुलून जाऊ लागले आहेत. अशीच स्थिती राष्ट्रीय महामार्ग असो की राज्य महामार्ग येथेही सहज उपलब्ध होते आहे. हातभट्टीसह, केमिकल युक्त ताडी देखील मोठ्या प्रमाणात चौसाळ्या मध्ये उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत गोसावी यांनी राबविलेल्या नशा युक्त अभियानामुळे राज्याच्या अर्थचक्राला गती तर मिळालीच आहे पण धाब्यावाल्यांसह तस्करी करणाऱ्यांना देखील रोजगाराचं साधन उपलब्ध झाला आहे. त्यातून गोविंद राख सारखे बदली झालेले पोलीस कर्मचारी हाताशी धरून मोठी कमाई देखील केली जाऊ लागली आहे. किरकोळ वादविवाद नशेच्या माध्यमातून झाले तर ते पोलिसांच्या मध्यस्थीने सोडविले जातात. त्यातून मिळणारी बिदागी मोठ्या प्रमाणावर आहे. बेवड्यांच्या गोंधळामुळे रस्त्यावर फिरणं जिथे पुरुषांना शक्य नाही तेथे महिलांनी फिरण्याचा विषयच येत नाही त्यामुळे महिला अत्याचारांच्या घटनांना देखील आळा बसला आहे. राहिला प्रश्न कौटुंबिक वादविवादाचा तोही तिजोरीत भर घालणाराच आहे. एकंदरच राज्यासह स्वतःच्या तिजोरीत भर घालणाऱ्या अर्थचक्राला गोसावींनी नशा युक्त अभियानाने बळकटी दिल्यामुळे नवनीत कांवत यांच्या नशा मुक्त अभियानाला वरचढ अभियान गोसावींच ठरू लागलं आहे.