Home Blog Page 102

माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचे निधन

0

छत्रपती संभाजी नगर — ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे शनिवारी (25जानेवारी) पहाटे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी साहित्यविश्व आणि न्यायव्यवस्थेतून मोठं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी सन 1961 ते 62 मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले. मराठवाडा, मराठवाड्यातील सामाजिक वास्तव उर्वरित महाराष्ट्रात पोहोचवण्यात नरेंद्र चपळगावकर यांचा मोठा सहभाग होता. नरेंद्र चपळगावकर यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळे ते मूळचे बीडचेच झाले. बीडमधून केसरी, सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. 16 वर्षे वकिली केल्यानंतर मुंबईत काही काळ वकिली केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायपीठ स्थापन झाल्यावर त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
चपळगावकर यांनी 1962 ते 1978 या काळात बीडमध्ये वकिली केली. त्यानंतर 1979 ते 1881 दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. आणि 1981 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची 19 जानेवारी 1990 मध्ये नियुक्ती झाली आणि कायमचे न्यायाधीश म्हणून 20 नोव्हेंबर 1990 रोजी नियुक्ती झाली. 10 एप्रिल 1999 रोजी ते निवृत्त झाले. मराठी साहित्यातला मोठा विचारवंत आणि अभ्यासक असणाऱ्या नरेंद्र चपळगावकरांनी मराठी साहित्यविश्वात मोलाची भर टाकली आहे.
अनंत भालेराव: काळ आणि कर्तृत्त्व
आठवणीतले दिवस
कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
कायदा आणि माणूस
कहाणी हैदराबाद लढ्याची
तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
त्यांना समजून घेताना (ललित)
दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
नामदार गोखल्यांचं शहाणपण
न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
राज्यघटनेचे अर्धशतक
विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन
संघर्ष आणि शहाणपण
समाज आणि संस्कृती
संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
सावलीचा शोध (सामाजिक)
हरवलेले स्नेहबंध

सरकारची अडचण वाढली! मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरू

0

जालना — ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेल, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील शनिवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.सगेसोयरे अध्यादेश काढून 26 जानेवारी रोजी एक वर्ष होत आहे. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे आपण पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणत्र देण्याचा शासनादेश काढावा, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी, ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना मिळालेल्या सगे सोयऱ्यांच्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, न्या. शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ द्याची, प्रमाणपत्र वाटपासाठी कक्ष सुरू करावे, शिंदे समितीला उर्दू, फारशी, मोडीलिपीचे अभ्यासक द्यावेत, ज्यांच्या नोंदी असूनही प्रमाणपत्र दिलेले नाही त्यांना तातडीने प्रमाणपत्र द्यावे, आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. हैदराबाद संस्थानचे गॅझेट, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी पुन्हा उपोषण सुरू केल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाल्मीक कराडची करोडो रुपयांची संपत्ती एसआयटी करणार जप्त

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराडला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विशेष तपास पथकाने वाल्मिक कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

वाल्मिक कराड यांच्या मालकीच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने एसआयटी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा संकलित करण्यात आला असून त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील, असे सांगितले जात आहे. हा वाल्मिक कराडसाठी प्रचंड मोठा धक्का ठरु शकतो.
गेल्या काही दिवसांमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर पुणे, बीड यासह विविध भागांमध्ये जमीन, फ्लॅट अशा वेगवेगळ्या मालमत्ता असल्याची माहिती समोर आली होती. या संपत्तीचे आकडे डोके चक्रावणारे होते. वाल्मिक कराड याने बीड जिल्ह्यात दहशतीच्या जोरावर मोठे आर्थिक साम्राज्य उभे केल्याची चर्चा होती. याचे तपशील गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले होते. मात्र, आता एसआयटीने वाल्मिक कराडची ही सर्व मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात एसआयटीकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 107 (मालमत्तेची जप्ती, जप्ती किंवा पुनर्संचयित करणे) अंतर्गत अर्ज आधीच न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला आहे.

वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांची हत्या आणि आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. वाल्मिक कराड याला या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी त्याच्यावर महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका लावण्यात आला होता. गेल्या सुनावणीवेळी एसआयटीने वाल्मिक कराड याने 2 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा उल्लेख केला होता. या संपत्तीचा शोध घ्यायचा असल्याचे एसआयटीने न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार आता एसआयटीने वाल्मिक कराड याच्या संपत्तीची पाळेमुळे खणायला सुरुवात केली आहे. यापूर्वी सीआयडीने वाल्मिक कराड याची परदेशातही संपत्ती असू शकते, असा संशय व्यक्त केला होता.मात्र, आता एसआयटीने वाल्मिक कराडच्या मालकीच्या राज्यातील मालमत्तांवर टाच आणल्यास त्याच्या अडचणी वाढू शकतात. वाल्मिक कराड याच्यासोबत त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे असलेल्या जमिनी आणि फ्लॅटसवरही जप्तीची कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

वाल्मिक कराडच्या अडचणीत भर, महादेव मुंडे खून प्रकरणाची चौकशी होणार

महादेव मुंडे खून प्रकरण तपास परळी पोलीस ठाण्याकडून काढून अंबाजोगाई डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. 14 महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांचा खून झाला होता, अद्यापही याचे आरोपी पकडले गेले नाहीत. महादेव मुंडे यांच्यापत्नीने याबाबत सवाल उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनीही शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्याचे आदेश काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! अनेक अधिकारी येणार गोत्यात; हायकोर्टाच्या सुनावणीकडं लक्ष

0
  1. नागपूर — धनंजय मुंडे यांना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं झटका दिला आहे. यापूर्वीच्या मंत्रीमंडळाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यामुळं ते गोत्यात आले आहेत.

यामध्ये अनेक अधिकारी देखील गुंतले आहेत. त्यामुळं या अधिकाऱ्यांच्या अडचणीतही वाढ होणार आहे. त्यामुळं हायकोर्टाच्या सुनावणीकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
नेमकी घटना काय?

धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना फवारणी पंपाच्या खरेदीत घोटाळा झाला होता. याप्रकरणावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात २९ जानेवारीला सुनावणी होणार आहे. हायकोर्टाच्या या सुनावणीकडं राज्याचं लक्ष लागून राहलं असून यामध्ये जे जे अधिकारी गुंतले आहे, त्यांचा अडचणीत वाढ होणार आहे. यामध्ये २,६०० रुपयांचा कृषीपंप ३,६५० रुपयाला खरेदी करण्यात आलं होतं. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारकडं याबाबत स्पष्टीकरण मागितलं होतं.
हायकोर्टाचा सवाल

दरम्यान, कृषी सचिवांना नकार देऊनंही तत्कालीन कृषिमंत्र्यांनी फवारणीपंपांची अतिरिक्त दरानं खरेदी केली होती. कृषी विभागाने 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती. 2023 मध्ये राज्य सरकारनं कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल का केला? अशी विचारणा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं केली आहे. यासंदर्भात राजेंद्र मात्रे यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

महादेव मुंडेच्या हत्येनंतर सुशील कराडने पोलीस अधिकाऱ्याला 150 कॉल कशासाठी केले? — आ.सुरेश धस

0

बीड — महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराड यांचे मुले सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दीडशे कॉल केले असल्याचा आरोप आ. सुरेश धस यांनी केला.सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या संदर्भाने निवेदन देण्यासाठी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक गुन्हे शाखेकडे महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास देण्याचे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मान्य केल्याचे धस यांनी सांगितले.

“महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, विष्णू फड, गोविंद भदाणे, भास्कर केंद्रे यांच्यासह 6 मोबाईल क्रमांकांवरून अर्ध्या तासात 150 वेळा फोन केले होते. हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले? याचा तपास झाला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, वाल्मिक कराडला न्यायालयामधून तुरुंगात घेऊन जाताना शितल कुमार बल्लाळ किती काळजी घेत होता. वाल्मीक कराडच्या पीएला जवळ बसवून कसं घेतलं. काल वाल्मीक कराड व पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. मोकातील आरोपी सनी आठवले याने आपल्याला खोट्या गुन्ह्यात दोघांनी अडकवल्याचे समाज माध्यमातून सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस यांनी भल्लाळ देव असं म्हणून आकाची किती हुजरेगिरी करतो हे ही आतापर्यंत दिसून आले आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितला असलं तरी स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख उस्मान शेख हा वाल्मीक कराडचाच माणूस असल्याचं देखील त्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितलं असल्याची माहिती दिली.”वाल्मिक कराडची मांजरसुंभा परिसरामध्ये 20 ते 25 एकर जमीन आहे. ज्योती मंगल जाधव या महिलेच्या नावावर ही जमीन आहे. कराडच्या सर्व संपत्तीबाबतची कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू आहे, ही कागदपत्रे मी ईडीकडे देणार आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेने लातूर जिल्ह्यातील तुरुंगात हलवावे, असा अर्ज केल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आमदार सुरेश धस म्हणाले की, ” हे आरोपी त्यांना लातूरच्या तुरुंगात घेऊन जाण्याची मागणी का करत आहेत, याची माझ्याकडे माहिती आहे. पण जेव्हा याबाबतचा निर्णय घेतला जाईल, तेव्हा मी सांगेन. पण या आरोपींना लातूर किंवा पश्चिम महाराष्ट्रातील तुरुंगही नको, त्यांना विदर्भात ठेवा. कारण तिकडच्या तुरुंगाचे अधिकारी बदलत असल्याचं त्यांनी सांगितलं.

बीड मधील 500 हून अधिक ग्रामपंचायत सदस्यांवर सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार?

0

बीड — जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर न दिल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तेरा सरपंच व 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. यानंतर आता परळी गेवराई शिरूर बीड या तालुक्यामधील पाचशेहून अधिक ग्रामपंचायत सदस्य सरपंच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तालुक्यातील तहसीलदारांनी जात पडताळणी वेळेत सादर न करणाऱ्यांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र हे निवडून आलेल्या दिनांकापासून ते 12महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. परंतु 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यास संबंधितांचे सदस्यपद रद्द करण्याची कायदेशीर तरतूद आहे. सन 2020 ते 2025 या कालावधीत ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या ज्या सदस्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नाही त्यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली होती. त्यानुसार 13 सरपंच तर 418 सदस्यांचे सदस्यत्व 20 जानेवारी रोजी रद्द केले होते .आता चार तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची माहिती मागवली आहे. तहसीलदारांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. अहवाल पाठविण्यापूर्वी पडताळणी करून मगच प्रकरणे पुढे पाठवाव्यात अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.

भंडाऱ्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट; मृतांचा आकडा ८ वर, ७ जखमी

0

भंडारा — जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७ लोक जखमी असल्याची प्राथमिक माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.कारखान्याच्या आरके शाखा विभागात हा स्फोट झाला.

कारखान्यात झालेल्या स्फोटाची छायाचित्रेही समोर येत असून, त्यात शस्त्रे बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जड साहित्याचे तुकडे आजूबाजूला विखुरलेले दिसत आहेत. स्फोटानंतर काळ्या धुराचे लोट आकाशात दूरवर उठताना दिसत आहेत. त्याचवेळी, स्फोटानंतर कारखान्यात आग लागली, त्यामुळे अनेकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर असून ते मदतकार्यात गुंतले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. लोक सांगतात की स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरात घबराट पसरली आणि लोक इकडे तिकडे धावू लागले. घटनास्थळी स्थानिक लोकांची मोठी गर्दी जमली असून ते लोकांना वाचवण्यात मदत करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे

यात पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. एसडीआरएफ आणि नागपूर महानगरपालिकेच्या पथकांनाही बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले असून ते लवकरच पोहोचतील. जिल्हा प्रशासन संरक्षण दलांच्या समन्वयाने बचाव कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

शुक्रवारी (24 जानेवारी) सकाळी 10:30 ते 10:45 च्या दरम्यान कारखान्यात 14 कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कारखान्यात 14 कर्मचारी काम करत होते. गंभीर जखमी अवस्थेत चार ते पाच जणांना बाहेर काढण्यात आले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अधिकाऱ्यांशिवाय अग्निशमन दल आणि पोलिस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्य सुरू आहे.

लालपरीचा प्रवास महागला; तिकीट दरात 15 टक्क्यांची वाढ, नवे दर लागू

0

मुंबई — महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणे आता महाग झाले आहे. कारण, एसटी महामंडळाच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

एसटी बसची तिकीट दरवाढ आजपासून लागू झाली आहे. यामुळे आता लालपरीचा प्रवास महाग झाला आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

एसटी महामंडळाकडून 15 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाऱ्या बैठकीत 14.95 टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची बैठक झाली. या बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटीचा प्रवास महागला असून 15 टक्के दरवाढ झाल्याने 100 रुपयांच्या तिकीटासाठी आता 115 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ आजपासूनच (24 जानेवारी 2025) लागू करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं, प्राधिकरणाची बैठक पार पडली. या बैठकीत एसटी तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. यामध्ये आता 14.95 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. यासोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 3 रुपयांनी करण्यात आली आहे. नवे दर 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत आहेत त्यामुळे प्रत्येकवर्षी ही भाडेवाढ अपेक्षित असते. पण गेल्या तीन ते चार वर्षांपासून ही दरवाढ न झाल्याने एकत्रित रित्या एसटीच्या तिकीट दरात 14.95 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एसटी बसेसचे उत्पन्न आहे त्यापेक्षा खर्च अधिक आहे. एसटी महामंडळाला दिवसाला 3 कोटी रुपायंचे नुकसान होत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून भाडेवाढ करण्यात न आल्याने ही एकत्रित भाडेवाढ करण्यात आली आहे असंही मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

वाल्मिक कराडची माघार, खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे घेतला; आय सी युत दाखल

0

बीड — संतोष देशमुख यांची हत्या आणि आवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडने जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे या प्रकरणात वाल्मिकने घेतलेल्या या निर्णयामागे नेमकं कारण काय हे समजू शकलेलं नाही.

आज वाल्मिकने खंडणी प्रकरणात केलेल्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र, वाल्मिकने जामीन अर्जच मागे घेतल्यामुळे ही सुनावणी होऊ शकलेली नाही.दरम्यान, वाल्मिक कराडची प्रकृती काल रात्री अचानक बिघडली. यानंतर त्याला बीडमधील (Beed Jail) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कालच वाल्मिक कराडला न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन सुनावण्यात आली होती. त्यामुळे तो आता बीड जेलमध्ये होता. जेलमध्ये रवानगी करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा वाल्मिकच्या पोटात दुखत असल्याची माहिती समोर आली. यानंतर काही वेळातच कडेकोट बंदोबस्तात वाल्मिक कराडला तुरूंगातून थेट बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.प्रकृती नाजूक असल्यानं वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. आरोपी वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानं त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वाल्मिक कराडची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबद्दल रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

शरद पवारआणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा

0

पुणे – आज अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याने दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आले.यावेळी घाईघाईत आलेल्या अजित पवारांनी आपल्या स्वीय सहायकाला विचारले कुठे बसायचे आहे, यावर त्यांच्या स्वीय सहायकाने ‘साहेब इकडे आत बसलेत असे म्हणताच अजित पवार हे अध्यक्ष असा बोर्ड लावलेल्या दालनात गेले. यावेळी त्यांची शरद पवारांशी जवळपास अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने सपाटून मार खाल्ला. त्यानंतर अजित पवार-शरद पवार एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या. 1 जानेवारी रोजी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी पवार कुटुंब एकत्र येऊ दे, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केल्याची बातमी यापूर्वीच प्रसारित झालेली आहे.. तर . मला वाटतं की पांडुरंग माझं नक्की

ऐकणार. वर्षभरात हे दोघे एकत्र येतील, असा दावाही आशाताई यांनी केलेला आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाच्या काही आमदारांनी केंद्रात आणि राज्यातही सत्ता नसेल तर विकास कामे होणे कठीण आहे, याची जाणीव झाल्याने आता अजित पवारांकडे चला, असा आग्रह धरला होता. तर नरहरी झिरवाळ यांनीही पवार कुटुंब एकत्र यावे, असा सूर लावला. ते म्हणाले की, हनुमानाची छाती फाडल्यानंतर जसा त्यात राम दिसला होता तशी माझी छाती फाडली तर त्यात शरद पवार दिसतील. शरद पवारांची भेट घेऊन त्यांना लोटांगण घालेन.अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार व अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच वाटेल, असे म्हटले आहे.

पवार कुटुंब एकत्रित रहावे, ही माझी व्यक्तिगत इच्छा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मात्र, राजकीय भूमिका घेणे माझ्या अधिकारात नाही.

शरद पवार यांच्या कुटुंबीयांपैकी एका लोकप्रतिनिधीचाही सत्तेसोबत जाण्याचा आग्रह सुरू असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. सुप्रिया सुळे यांनीही जाहीरपणे अनुकूलता दाखवली तर सत्तेसोबत जाण्याचा आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याचा मार्ग सुकर होईल, असे सांगण्यात येते आहे. जर बहुमताने सत्तेसोबत जाण्याचा निर्णय झाला तर शरद पवार संघटनेपासून दूर होण्याचा निर्णयही घेऊ शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.