Sunday, February 1, 2026
Home Blog

माजलगाव मध्ये सराफा व्यापाऱ्याला 60 लाखाचे दागिने लुटणाऱ्या चौघांना एलसीबीने ठोकल्या बेड्या

0

बीड — आठवडी बाजाराला निघालेल्या सराफा व्यापाऱ्याचे साठ लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची घटना माजलगाव‌ मध्ये घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 18 तोळे सोने व एक किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.
सराफा दुकानदार अमोल पंढरीनाथ गायके वय ३१ वर्ष रा. भाट वडगाव ता. माजलगाव) हे त्यांचे माजलगाव येथील अमोल ज्वेलर्स या दुकानातून आठवडी बाजारात खेर्डा येथे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी २५ जानेवारी रोजी त्यांच्या दुचाकीवर पुतण्यसाह जात होते. यावेळी पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांना बाजूला थांबण्यास भाग पाडले. गायके यांनी गाडी थांबविल्यावर त्यांना तीन आरोपींनी सत्तूरचा धाक दाखवून त्यांचेकडील सोन्या-चांदी दागिन्याची पिशवी बळजबरीने काढून घेऊन पळ काढला. त्यावरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

वरील प्रमाणे गुन्हा घडल्यापासून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यांना आदेशीत केले की दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील गेला माल सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करावे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तीन वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला.तपासात तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर असे निष्पन्न झाले की, यातील फिर्यादी गायके यांचा माजलगाव शहरातून रेकी करून पाठलाग केला असून आरोपींनी दुचाकींची अदला बदली करून पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी बारकाईने तपास करून यातील आरोपीं निष्पन्न केले. यातील आरोपी हे सध्या बीड येथील शांताई हॉटेलच्या पाठीमागील गल्लीत आहेत, अशी माहिती मिळताच पथकांनी आरोपी एकनाथ ऊर्फ नारायण अरुण कपाले वय ३५ वर्ष, रा. पाटोदा ता. परतूर जि.जालना ह.मु. बीड, कृष्णा तुकाराम निरडे वय २२ वर्ष, अभिषेक अशोक शिंदे वय २२, दोघेही रा. माजलगाव यांना ताब्यात घेतले.

आरोपींतांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांना अधिक विचारपूस करता एकनाथ कपाले याने सांगितले की, तो सराफा कारागिर असून त्याने पूर्वी माजलगाव येथे वेगवेगळे ठिकाणी कारागिरीचे काम केले होते व त्याला माजलगाव येथील सोनार दुकानदार यांच्या आठवडी बाजारात जाण्याचे वार व वेळ माहिती होती. तसेच तो सध्या खूप कर्जबाजारी झालेला होता. त्यामुळे नारायण याने माजलगाव येथील सराफा दुकानदार यास आठवडी बाजारास जाताना लुटण्याचे ठरवले. एकनाथ कपाले याने रेकॉर्डवरील गुन्हेगार कृष्णा निरडे व अभिषेक शिंदे यांना त्याचा प्लॅन सांगितला. त्यानुसार त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदार मित्र संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे वय २८ वर्ष, रा. उमरगा मन्त्रा ता. उदगीर जि.लातूर ह. मु. पुणे), व विशाल सूर्यकांत सुळ(रा. माजलगाव ह.मु. पुणे) यांना कटात सामील केले.
आरोपींचे प्लॅन नुसार २५ जानेवारी रोजी एकनाथ कपाले व संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे यांनी फिर्यादी यांचे रेकी करून ते आठवडी बाजारास निघाल्यानंतर त्यांचा पाच आरोपीतांनी दोन दुचाकीवर पाठलाग करून शस्त्राचा धाक दाखवून गुन्हा केला आहे. आरोपीतांचे ताब्यातून १८ तोळे सोन्याचे दागिने व १ किलो चांदी असा एकूण ३० लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे यासही ताब्यात घेतले असून एकूण चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व एक फरार आरोपीचा शोध सुरु आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोविंद पांडव हे करीत आहेत.

कायद्याच्या इज्जतीची लक्तरं पुन्हा टांगली गेली; 25 वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या

0

केज — जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेची लक्तर रोज वेशीवर टांगली जाऊ लागली आहेत. पोलीस अधीक्षक मात्र अशा घटनांकडे दुर्लक्ष करून महिमा मंडन करण्यात मश्गुल आहेत.परिणामी खाकीचा धाक राहिलेला नसल्याने गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच केज मधील हनुमंत पिंपरी शिवारात 25 वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली.
पोलीस अधीक्षकांची माध्यमांकडे पाहण्याची धृतराष्ट्रासारखी भूमिका, पोलीस अधिकाऱ्यांना दिलं जाणार पाठबळ यामुळे अवैध धंद्यांसोबतच गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. खाकीचा धाक उरला नाही त्यामुळे राजरोसपणे मुडदे पाडले जात आहेत. पोलीस यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाला आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात असताना सर्वसामान्यांच जीवन मात्र अवघड होऊन बसला आहे. त्यातच हनुमंत पिंपरी मध्ये 25 वर्षाच्या तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली.विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव असं मृत तरुणाचं नाव आहे. केवड आणि हनुमंत पिंपरीच्या शिवारात विक्कीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. अज्ञात हल्लेखोराने विक्कीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. जखम खोल असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी 10 च्या सुमारास ही घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.घटनेची माहिती मिळताच केज पोलीस दलासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटेश देशपांडे, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, इनामदार आणि अशोक सोनवणे यांनी घटना स्थळाचा पंचनामा करून तपास वेगाने सुरू केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत महेश चंदनशिव नावाच्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. हा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खात्याची जबाबदारी; खातेवाटप जाहीर

0

मूंबई — उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतली आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा साधेपणात शपथविधी पार पडला.
शपथविधीनंतर अवघ्या दोन तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावर पुढील तीन खात्यांची जबाबदारी सोपवली आहे. क्रीडा विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग या तीन खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवली आहे. अजित पवार यांच्याकडे असलेले वित्त (अर्थ) व नियोजन खाते सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले नाही. अर्थखात्याबाबत भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अद्याप हिरवा कंदील नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

फडणवीस सरकार मधील हे आहेत मंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती आणि इतर शिल्लक खाती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगर विकास आणि गृहनिर्माण (सामाजिक उपक्रम)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क विभाग
1)चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2) राधाकृष्ण विखे पाटील- जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
3)हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4) चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज
5) गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6) गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7) गणेश नाईक – वन
8) दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9) संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10) दत्तात्रय भरणे – कृषिमंत्री
11) मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12) उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13) जयकुमार रावल – पणन, राजशिष्टाचार
14) अदिती तटकरे – महिला व बालविकास
15) शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
17) जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
18) नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
19) संजय सावकारे – कापड
20) संजय शिरसाट – सामाजिक न्याय
21) प्रताप सरनाईक – परिवहन
22) भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन
23) मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
24) नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
25) आकाश फुंडकर – कामगार
26) बाबासाहेब पाटील – सहकार
27) प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
28) पंकजा मुंडे – पशु संवर्धन, पर्यावरण, वातावरण बदल
29) अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास, उर्जा नूतनीकरण
30) अशोक उईके – आदिवासी विकास
31) शंभूराज देसाई – पर्यटन, खाण, व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
32) आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; पार पडला शपथविधी

0

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच विमान अपघातात बुधवारी निधन झालं. त्यांच निधन होताच राजकीय हालचालींनी वेग पकडला रिक्त झालेली त्यांची जागा भरून काढण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी घेतली.राजभवनातील लोकभवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.

शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती.
सरकारमधील अनेक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, भाजप आणि शिवसेना त्यांची उपस्थिती होती. कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा पार पडला आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी शपथविधीबद्दल माहिती नसल्याचं म्हटलं होतं. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, आपल्याला याबाबत काहीही सांगितलं नसल्याचं पवार म्हणाले होते. त्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि शपथविधीचं निमंत्रण दिल्याचं सांगितलं गेलं. मात्र शरद पवार हे शपथविधीसाठी हजर नव्हते.

दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे जात अजित पवारांच्या आईंची भेट घेतली. एकीकडे मुंबईत शपथविधी सोहळा सुरु होता तर दुसरीकडे बारामतीमध्ये मात्र शोकाकूल वातावरण होतं. वेगाने घडलेल्या या राजकीय घडामोडींच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे

परळीतील साई लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

0

बीड — परळीतील टोकवाडी भागात असलेल्या साई लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा मारून पर्दाफाश केला यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
बाहेरच्या जिल्ह्यातून महिलांना आणून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. हा व्यवसाय टोकवाडी भागातील साई लॉजवर सुरू असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष परळी ग्रामीण पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच
पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव व परळी ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद मेंडके यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. त्यावरून वरिष्ठांनी या ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले.त्यावरून परळी ग्रामीण चे पीआय मझहरअली सय्यद, एपीआय सदानंद मेंडके स्टाफसह व अ. मा. वा. प्र. कक्षाच्या प्रमुख पी एस आय पल्लवी जाधव या त्यांच्या संपूर्ण स्टाफसह तसेच डमी ग्राहक व दोन शासकीय पंचासह सापळा पूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेले. डमी ग्राहकास या ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या एजंटने वेश्या गमनासाठी होकार देवून त्यासाठी 1500 रुपयांची मागणी केली. डमी ग्राहकाने ठरल्या प्रमाणे रक्कम देवून पोलीस पथकास ठरलेला इशारा केला असता, पोलीस पथकाने या लॉजवर छापा मारला. पैसे स्वीकारलेल्या पुरुषाला त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव नाशर नशीर शेख असे सांगितले.या पुरुषाची पंचासमक्ष झडती घेतली असता, डमी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या 500 रू. दराच्या 3 नोटा सापडल्या. पंचासमक्ष नोटा जप्त केल्या. लॉजवर दोन पीडित महिला मिळून आल्या . त्यापैकी डमी ग्राहकासोबत रूम मधे मिळून आलेल्या पीडीत महिलेला विश्वासात घेवून चौकशी केली असता , तीने सांगितले की, ती भिवंडी ठाणे ची असून दत्ता अंतराम मुंडे याने मला फोन करून इथे बोलावून घेतले आहे. तसेच दुसरी महिला पुणे येथून आली आहे. प्रत्येक ग्राहकाकडून 1500 रू घेतात व त्यापैकी आम्हाला 500 रु देतात अशी माहिती दिली. एजंट नाशर नशीर शेख व लॉजचा मॅनेजर सोमनाथ ज्ञानोबा मुंडे रा. टोकवाडी तसेच दत्ता अन्तराम मुंडे रा. कन्हेरवाडी ता. परळी जि बीड पीडीत महिलांना बोलवून घेतात व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेवून, पीडीत महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे सांगितले. तसेच रुमची झडती घेतली असता 6 विना वापरलेले निरोध मिळून आले आहे. आरोपी , पीडीत महिलेस स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बोलावून घेऊन, स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करुन त्याच कमाईवर उदरनिर्वाह करुन वेश्याव्यवसाय करण्यास लावले व सदर महिलांचे शोषण करण्याच्या उद्देशाने बोलावले म्हणून त्यांच्या विरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 कलम 3,4,5,6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. हि कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे अंबाजोगाई उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मझहरअली सय्यद , परळी ग्रामीणचे सपोनि सदानंद मेंडके, पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव, अंकुश निमोने, महीला पोलीस हवालदार उषा चौरे, पोलीस हवालदार अशोक शिंदे, राजेंद्र मिसाळ, नवनाथ हारगावकर, रमेश तोटेवाड, तुळशीराम परतवाड, रावसाहेब मुंडे, विठ्ठल परजणे, पोलीस शिपाई योगेश निर्धार, महादेव केदार यांनी केली.

उसन्या पैशाच्या वादातून धक्काबुक्की; तरुणाचा मृत्यू

0

सिरसाळा — उसणे दिलेल्या पैशांच्या वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजू गंगाराम उबदे वय 40 वर्ष, रा.सिरसाळा असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
येथील मसनजोगी वस्तीत राहणारे सायलू रामलू पस्तमवाड आणि गंगा पस्तमवाड यांचा संजू उबदे याच्याशी पैशांच्या उसने दिलेल्या दोनशे रुपयाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सायलू आणि गंगा यांनी संजू उबदे यांना पाठीवर जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे संजू यांचा तोल गेला आणि ते तोंडावर जमिनीवर आदळले. यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सिरसाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

केजचा माजी सरपंच व व्यापारी तामिळनाडूत बनावट नोटा खपवताच पकडला; साडेआठ लाखाच्या नोटा जप्त

0

केज — तालुक्यातील एका माजी सरपंचासह एका कृषी पंप व्यापाऱ्याने तामिळनाडू राज्यात बनावट नोटा चालवण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला. तामिळनाडू पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून साडेआठ लाख रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवाकुडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.या प्रकरणाचा तपास तामिळनाडूच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे.
केज येथील माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे आणि मूळचा राजस्थानचा असलेला व्यापारी नारायण राम पटेल हे दोघे त्यांच्या खाजगी कार क्र.एम.एच 44 झेड 2383 ने तामिळनाडूत फिरायला गेले होते. बुधवारी इंधन भरताना त्यांनी एका पेट्रोल पंपावर 200 रुपयांच्या काही नोटा दिल्या. तेथून ते निघूनही गेले मात्र कर्मचाऱ्याला नोटांचा स्पर्श आणि कागदावरून संशय आला. त्याने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी मंजाथिदल चेक पोस्टवर सापळा रचून ही कार अडवली. कार अडवल्यानंतर
पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये 200 रुपयांच्या बनावट नोटांचे तब्बल 41 बंडल दडवून ठेवलेले आढळले. कारवाईत सापडलेल्या 8 लाख 37 हजार 800 रुपयांच्या नोटा या बनावट असल्याचे समोर आले. तपासादरम्यान या दोघांनी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर भागात यापूर्वीच अनेक नोटा चलनात आणल्याची कबुली दिली आहे.
या बनावट नोटा त्यांना कोणी पुरवल्या? या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत? आणि तामिळनाडूमध्ये त्यांना कोणी आश्रय दिला होता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता गुप्त वार्ता विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभाग सक्रिय झाला आहे. या घटनेमुळे केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अजित दादा या शतकातले जननायक — अमरसिंह पंडित

0

गेवराई येथे शोकाकुल वातावरणात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

गेवराई — अजितदादा पवार हे सामान्य माणसाचे नशीब बदलणारे नेते होते, सगळे व्यवस्थित होत असताना त्यांचे जाणे आम्हा सर्वांना उध्वस्थ करणारे आहे. अजितदादा शेवटच्या घटकाची नोंद करणारे नेते होते, त्यांचे असे अकाली जाणे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. दादांना कुणीही विसरणार नाही. अजितदादा हे या शतकातले जननायक होते अशा भावना माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी भावनिक होऊन व्यक्त केल्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक दु:खद निधनाच्या निमित्ताने गेवराई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सर्पक्षीय नेते उपस्थित होते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक दु:खद निधनाच्या निमित्ताने गेवराई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित,
आ. विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख उद्धव मडके, भाजपाचे समन्वयक श्रीकांत सानप, रिपाईचे तालूकाध्यक्ष किशोर कांडेकर, कॉग्रेसचे महेश बेदरे, शरद पवार गटाचे राजेंद्र मोटे, सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे, सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, सावता परिषदेचे दादासाहेब चौधरी, महेश दाभाडे, भाजपचे सचिन दाभाडे, राजेश पवार, राजेंद्र बेदरे, विठ्ठलराव शेळके, शेख खाजा, शितल धोंडरे यांसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण म्हणाले की, अजित दादा कार्यकर्त्यांची काळजी घेणारे नेते होते, विकासकामावर त्यांचे बारीक लक्ष होते. आ. विजयसिंहना त्यांचे सतत मार्गदर्शन होते. कामाचा झपाटा असणारा नेता गेला, त्यांनी केलेला संकल्प आपल्याला पुर्ण करावयाचा आहे. दादांची स्वप्न पुर्ती हीच त्यांना आदरांजली असेल असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी भावनिक होऊन बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, नियती कठोर आणि निर्दयी असते. दादांच्या अपघाताने होत्याचे नव्हते झाले, अजितदादा कर्तृत्ववान होते. लोकांच्या मनातील नेते होते. जाती पातीचा विचार त्यांनी केला नाही, असा नेता आपला पालकमंत्री व्हावा हे आपल्या जिल्ह्याचे भाग्य होते. सगळे चालीजुपीला लागले असताना असे घडणे आम्हला उद्ध्वस्त करुन गेले आहे. अजितदादांकडून शिस्त आणि वक्तशीरपणा आम्ही शिकलो. त्यांना श्रद्धांजलीसाठी शोकसभा घ्यावी असे कधीच वाटले नाही. शेवटच्या घटकाची नोंद करणारे अजितदादा होते. सामान्य लोकांसाठी त्यांचे जाणे दुर्दैवी आहे. दादांना कुणीही विसरणारा नाही. दादा हे या शतकातले जननायक होते असेही ते यावेळी म्हणाले.

आपल्या भावना व्यक्त करताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, ही घटना मनाला चटका लावणारी आहे. आज दादा आपल्यात नाहीत हे मनाला पटत नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर हा मोठा आघात आहे. अतिशय कमी कालावधीत त्यांनी जे केले ते विचार करण्याच्या पलिकडे आहे. अनेक विकासकामे दिली. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मोठे नियोजन त्यांनी केले होते.

यावेळी शोकसभेत बोलताना भाऊसाहेब नाटकर म्हणाले की, दादांचे जाणे आपल्यासाठी दुर्भाग्य आहे, असा नेता पुन्हा होणार नाही‌. शिवसेना शिदें गटाचे तालुकाप्रमुख उद्धव मडके म्हणाले की, बीड जिल्ह्याला वरदान ठरलेले दादा आता आपल्यात नाहीत हे अतिशय वेदनादायक आहे. आज त्यांच्याबद्द बोलताना शब्द फुटत नाहीत. रिपाईचे तालूकाध्यक्ष किशोर कांडेकर म्हणाले की, दादांचे जाणे सर्वांना वेदना देऊन गेले आहे. ही वेदना सांगण्या पलीकडची आहे. मानवी हक्क अभियानाचे कडुदास कांबळे म्हणाले, अजितदादा हे खुप मोठे व्यक्तीमत्व होते, त्यांच्या जाण्याने खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भाजपाचे समन्वयक श्रीकांत सानप म्हणाले की, अजितदादा यांच्या तोडीचा राज्यात नेता नव्हता, आपला जिल्हा विकासाला मुकला. कॉग्रेसचे महेश बेदरे म्हणाले की, अजितदादाच्या रुपाने एक धाडसी व करारी नेतृत्व हरपले. बीड जिल्ह्याचे हे दुर्दैव. विकासाचे नेतृत्व त्यांच्या माध्यमातून मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेंद्र मोटे म्हणाले की, महाराष्ट्र एका गुणी नेतृत्वाला मुकला. त्यांच्या अकाली निधनानंतर बीड जिल्हा आणि महाराष्ट्र मागे जाणार आहे. अजितदादा हे रिफ्लेसमेंन्टचा विषय नाही, त्यांच्या आदर्शावर आपण चालू हीच त्यांना आदरांजली आहे. गणेश सावंत म्हणाले की, दादा हे राजा मनाचे माणूस होते. दादा कळायला दादांना मरावे लागले. आपण या पुढील काळात काम करुन दादांना आदरांजली आणि दादांचा संकल्प आपण पुर्ण करु. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे, बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार, सौ. शितलताई धोंडरे, गेवराई नगर परिषदेचे गटनेते शेख खाजामामू यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी ऋषिकेश बेदरे, बीड बाजार समितीचे उप सभापती शामराव पडुळे, प्रकाश सुरवसे, परमेश्वर वाघमोडे यांच्यासह सर्वपक्षिय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अजित दादा पवार यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार; सुनेत्रा पवार उद्या घेणार शपथ!

0

मुंबई — अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार यांच्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विराजमान होण्याची शक्यता असून, तशी तयारी सुरु झाली आहे.

उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. त्या आता उद्या सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीने सूनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार असल्याची माहिती देण्यात आल्याचं समजत आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की दादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले त्यामुळे सर्वांची झोप उडाल्यासारखं झालं आहे. आता कोणाकडे तरी सर्व जबाबदारी देऊन पक्ष किंवा सरकार चालवावं तर लागणार आहे. विधीमंडळाच्या सदस्यांची उद्या बैठक बोलावली आहे. त्याच्यात विधिमंडळ पक्षनेतेपद जे अजित पवारांकडे होतं ते देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. सुनेत्राताईंकडे पद द्यावं अशी अनेकांची मागणी आहे आणि ते चूक आहे असं वाटत नाही. पण निर्णय बैठकीत होईल,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.
अजित पवार राष्ट्रवादीसंदर्भातील कामांवर आम्ही लक्ष देत आहोत असं सांगताना त्यांनी आपल्याला 14 बैठका झाल्याची काही कल्पना नसल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्रीपदाची जागा रिकामी आहे ती, सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून कशी भरता येईल याकडे लक्ष आहे. पक्ष ठरवेल त्याप्रमाणे निर्णय होईल. उद्या विधिमंडळ पक्षनेता ठरवला जाईल आणि कदाचित एकमत झालं आणि प्रक्रिया झाली तर उद्याच शपथविधीही होऊ शकतो”.
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत सूनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवडीचे पत्र दिले जाणार आहे.
ही निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. या शपथविधीसाठी कोणतीही जय्यत तयारी केली जाणार नाही, अत्यंत साधेपणाने तो पार पडेल. या शपथविधीनंतर सूनेत्रा पवारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल. यासह राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील

ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा; साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

0

बीड — बीड बायपास जवळील शेतात ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या सात जनांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडून त्यांच्याकडून पाच लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास जवळील घाटे यांच्या शेतातील उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाइन जुगार खेळला जात आहे. या माहिती आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे गोविंद राख, मनोज परजणे, राहुल शिंदे, अश्फाक व चालक वडमारे यांनी 27 जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास छापा मारला.या ठिकाणी वैभव आण्णासाहेब आमटे वय 21 वर्षे रा. खांडे पारगाव ता. जि.बीड व अभिषेक भारत आमटे वय 23 वर्षे रा. खांडे पारगाव ता.जि.बीड यांच्यासह इतर सात जणांनी मिळून त्यांच्या सर्वाच्या आर्थिक फायद्याकरीता लोकांना जास्त पैसे मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन विनापरवाना बेकायेदशिररित्या लोटस् 365 अँपमध्ये विविध खेळावर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून घेवुन जुगार खेळत व खेळवित असतांना आढळून आले. यावेळी आरोपींकडून लॅपटॉप, टॅब, मोबाईल फोन असा एकुन 5 लाख26 हजार रूपयांचा मुद्देमालासह मिळुन आला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.