बीड — जिल्ह्यात एका पोलिस उपनिरीक्षकाला (पीएसआय) लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक आणि खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साखरपुडा झाल्यानंतर मुलीने लग्नास नकार दिला. त्यानंतर संबंधित पीएसआयला “२५ लाख रुपये द्या, नाहीतर वर्दी उतरवू आणि हातपाय तोडू,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चकलांबा येथील अंगद शाहूराव निंबाळकर (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे भाऊ पवन निंबाळकर हे बीड येथे पीएसआय म्हणून कार्यरत आहेत. मातोरी (ता. शिरूर कासार) येथील गीतांजली जरांगे हिच्याशी त्यांचा विवाह ठरवण्यात आला होता. १४ डिसेंबर २०२५ रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला.
फिर्यादीनुसार, साखरपुड्यासाठी सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि कपड्यांवर सुमारे ४ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, १५ मार्च २०२६ रोजी गीतांजली हिने पवन निंबाळकर यांना फोन करून “माझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न ठरवण्यात आले असून माझ्या मनात कोणत्याही भावना नाहीत,” असे स्पष्ट सांगितले.
यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये चकलांबा येथे बैठक घेण्यात आली. बैठकीत गीतांजली हिने सर्वांसमोर लग्नास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी काही नातेवाईकांनी पीएसआय पवन निंबाळकर यांना धमकावून २५ लाख रुपयांची मागणी केली. “रस्त्यात गाठून हातपाय तोडू, ड्युटी करू देणार नाही,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच, साखरपुडा आणि लग्नाच्या नावाखाली एकूण १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चकलांबा पोलिसांनी सरसराम जरांगे, आसाराम जरांगे, रामप्रसाद जरांगे, प्रकाश जरांगे, ज्ञानेश्वर जरांगे, तात्याराम जरांगे, गीतांजली जरांगे, मीना जरांगे, रुक्मिणी जरांगे यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.




