मुंबई : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुट ( NEET Paper Leak Case) प्रकरणानंतर आता महाराष्ट्रातील MHT-CET Examination प्रवेश परीक्षेबाबतही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत ( Sachin Sawant ) यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप करत एमएच-सीईटी परीक्षेत मोठ्या गैरप्रकाराचा संशय व्यक्त केला आहे.

सचिन सावंत यांनी दावा केला की, इयत्ता १२ वीच्या परीक्षेत अवघे ३७ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला एमएच-सीईटीमध्ये थेट ९९ पर्सेन्टाईल गुण मिळाले आहेत. एवढेच नव्हे तर १० वी आणि १२ वीमध्ये ४० ते ४५ टक्के गुण मिळवणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये १०० टक्के गुण मिळवल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, “बारावी बोर्ड आणि एमएच-सीईटीचा अभ्यासक्रम जवळपास समान आहे. एमएच-सीईटीसाठी अकरावी-बारावीच्या अभ्यासाचा सखोल पाया आवश्यक असतो. मग बोर्ड परीक्षेत कमी गुण मिळवणारे विद्यार्थी सीईटीमध्ये थेट टॉपर कसे ठरतात? हा अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार आहे.”
त्यांनी या संदर्भातील काही विद्यार्थ्यांची यादी आणि पुरावेही माध्यमांसमोर सादर केल्याचा दावा केला. या प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.
सावंत यांनी सोशल मीडियावरूनही या मुद्द्यावर आवाज उठवला होता. मात्र, राज्य सीईटी सेलने दिलेले उत्तर “उडवाउडवीचे आणि बेफिकिरीचे” असल्याचा आरोप त्यांनी केला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित इतक्या गंभीर विषयावर सीईटी सेलने जबाबदारीने उत्तर देणे अपेक्षित होते,” असे ते म्हणाले.
दरम्यान,राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र(State Common Entrance Test Cell Maharashtra ) यांच्याकडून अद्याप या आरोपांवर सविस्तर अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांकडून जोर धरू लागली आहे.




