बीड — जिल्ह्यातील बहुचर्चित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेला तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यास शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात १५४ लवाद आदेशांच्या माध्यमातून तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांचा वाढीव मावेजा मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या घोटाळ्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी भूसंपादन सतीश धुमाळ यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती.
त्यानुसार महसूल विभागातील अधिकारी, कंत्राटी कर्मचारी तसेच काही वकिलांसह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान एसआयटीकडून तांत्रिक पुरावे, संगणकीय नोंदी आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या तपासातून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याचा सहभाग समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
यानंतर गुरुवारी रात्री लातूर येथून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. पुढील तपासासाठी न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या कालावधीत एसआयटीने संबंधित संचिका, लॅपटॉप, संगणक तसेच मोबाईल रेकॉर्डिंगची तपासणी केली. तसेच पाठक यांच्या आवाजाचे नमुनेही तपासासाठी घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान न्या. एस. आर. शिंदे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अविनाश पाठक याला २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू असून भूसंपादन मावेजा घोटाळ्यात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

