मध्य पूर्वेतील तणावामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात 3 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. CNG दरातही 2 रुपयांची वाढ झाली असून आजपासून नवे दर लागू झाले आहेत.
देशभरात इंधन दरवाढ लागू; सामान्यांच्या खिशाला झळ
नवी दिल्ली — मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट भारतातील नागरिकांवर दिसू लागला आहे. देशात आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रती लिटर 3 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली असून, सीएनजीच्या दरातही प्रती किलो 2 रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या वाहतूक खर्चात मोठी वाढ होणार आहे.

राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीचा नवा दर 79.09 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दिल्ली-एनसीआरसह देशातील विविध शहरांमध्येही नवे दर लागू करण्यात आले आहेत.
मोदींच्या आवाहनानंतर दरवाढीचे संकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी ऊर्जा बचतीचे आवाहन केल्यानंतर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) आणि आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांनी इंधन दरवाढीचे संकेत दिले होते.
तेल कंपन्यांवरील आर्थिक दबाव सातत्याने वाढत असल्याने दरवाढ जास्त काळ रोखता येणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी अखेर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ जाहीर करण्यात आली.
इराण-अमेरिका तणावाचा भारतावर परिणाम
सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक गॅसच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.
भारत जवळपास 60 टक्के नैसर्गिक गॅस आयात करतो. आयातीचा खर्च वाढल्याने आयजीएल आणि एमजीएलसह विविध गॅस कंपन्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव खर्चाचा बोजा अखेर ग्राहकांवर टाकावा लागत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.
तेल कंपन्यांना मोठा आर्थिक फटका
सरकारच्या माहितीनुसार, तेल कंपन्यांना डिझेलवर प्रती लिटर सुमारे 20 रुपयांचे तर पेट्रोलवर प्रती लिटर 10 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. कच्च्या तेलाचा पुरवठा घटल्याने आणि आयात खर्च वाढल्याने कंपन्यांवरील दबाव आणखी वाढला आहे.
यामुळे आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, वाहतूक, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किंमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.




