महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. कोणत्या जिल्ह्यांत होणार मतदान? वाचा सविस्तर अपडेट….!
मुंबई — महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून या जागा रिक्त होत्या. कारण राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. आता निवडणुका पार पडल्याने संबंधित मतदारसंघात आवश्यक असलेली ७५ टक्के मतदारांची अट पूर्ण झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.
या जिल्ह्यांतील विधान परिषद जागांवर होणार निवडणूक
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील खालील १७ जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे :
अहिल्यानगर
सोलापूर
ठाणे
जळगाव
सांगली-सातारा
नांदेड
यवतमाळ
पुणे
भंडारा-गोंदिया
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
नाशिक
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
परभणी-हिंगोली
अमरावती
धाराशिव-लातूर-बीड
संभाजीनगर-जालना
नागपूर
विधान परिषदेत बदलणार राजकीय समीकरण?
महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ आहे. यापैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडले जातात. सध्या त्यातील तब्बल १७ जागा रिक्त असल्याने या निवडणुकीकडे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तासमीकरणाचा थेट परिणाम या निवडणुकांवर दिसण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय ताकद या निवडणुकांमधून स्पष्ट होऊ शकते. पावसाळी अधिवेशनापूर्वी निवडणुका पार पडल्यास विधान परिषदेतील राजकीय चित्रात मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
कोणत्या पक्षाला फायदा?
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पक्षांचे संख्याबळ अधिक आहे, त्यांना विधान परिषद निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समित्यांमधील सत्तासमीकरण आता निर्णायक ठरणार आहे.
राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

