बीड जिल्ह्यातील भूसंपादन मोबदला घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. 154 बनावट मोबदला आदेश प्रकरणात तपासाला वेग.
बीड — बीड जिल्ह्यातील बहुचर्चित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना लातूर न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील चौकशीसाठी बीडकडे आणले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांना ताब्यात घेऊन रवाना होणार असल्याची माहिती मिळताच महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील कथित भूसंपादन मोबदला घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरीचा वापर करून तब्बल 154 भूसंपादन प्रकरणांमध्ये बनावट मोबदला आदेश तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी भूसंपादन उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे, अविनाश चव्हाण, शेख अजहर शेख बाबू, त्रिंबक पिंगळे, पांडुरंग पाटील, श्री. राऊत तसेच अॅड. एस. एम. नन्नवरे, अॅड. नरवडकर, अॅड. पिसूरे आणि अॅड. प्रवीण राख यांचा समावेश आहे. यापैकी संजय हांगे, त्रिंबक पिंगळे आणि शेख अजहर शेख बाबू या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. उर्वरित सात आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्याकडे होता. मात्र त्या रजेवर गेल्यानंतर तपासाची जबाबदारी एम. व्यंकटराम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तपासादरम्यान आता तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनाही ताब्यात घेण्यात आल्याने या घोटाळ्याचा तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव समोर आल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

