
गेवराई — तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत पत्नी आणि सासरच्या मंडळींना कंटाळून जावयाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन तलवाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भागवत अंकुश राठोड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई सुनिता राठोड यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार भागवत राठोड याला पत्नी, सासरा आणि मामेसासरा हे मानसिक त्रास देत होते. त्यामुळे तो नैराश्यात होता असे म्हटले आहे.
त्यातूनच त्याने 1 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली, ज्यात होणाऱ्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. मुलाच्या निधनाच्या दुःखातून सावरल्यानंतर भागवतच्या आईने पोलिसांत ही तक्रार नोंदविली आहे.दरम्यान, याप्रकरणी त्याची पत्नी राणी राठोड, सासरा संतोष राठोड आणि मामेसासरा दत्ता राठोड यांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, सासरच्या त्रासाल कंटाळून जीव देण्यापर्यंत टोकाचे पाऊस भागवतने का उचलले, याचाही तपास पोलीस करत आहेत.

