लिंबागणेश – मागील आठवडाभरापासून बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, अतिवृष्टी व ढगफुटी झाली. जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ८९ हजार ६७६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची नोंद झाली असून ती सरासरी पेरणीच्या ९७.६ टक्के इतकी आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्यातील २९ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, त्यापैकी लिंबागणेश महसूल मंडळात सर्वाधिक १०७.३ मि.मी. पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे पिके वाहून गेली, शेतजमिनी तळाला गेल्या, घरांची पडझड झाली, तर कापूस, सोयाबीनसह इतर पिके पाण्यात बुडल्यानं शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी आज मंगळवार दि. २३ रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर – अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब मुळे, कृष्णा पितळे, रमेश गायकवाड आदींची भाषणे झाली.तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना फोनवरून संवाद साधला, मंडळ अधिकारी जायभाये,तलाठी पोतदार,कृषी सहाय्यक आनंद वाघ, नेकनुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, सहाय्यक फौजदार बाबासाहेब राख, बाबासाहेब ढाकणे आदींना निवेदन दिले.यावेळी आंदोलनात राजेभाऊ गिरे, कल्याण वाणी,सरपंच बालासाहेब जाधव, दामोदर थोरात, सुरेश निर्मळ,श्रीहरी निर्मळ, ,अँड.गणेश वाणी, बाळासाहेब मुळे, पांडुरंग वाणी, संजय घोलप, शंकर वाणी, श्रीहरी कोटुळे,खंडू वाणी, भगवान मोरे आदी ग्रामस्थ सहभागी होते.
डॉ. ढवळे यांनी स्पष्ट केले की,“आता कसला पंचनामा आणि कसली नोंद? शेतकऱ्यांचं सगळंच वाहून गेलं आहे. प्रशासनाने औपचारिकता न करता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई व कर्जमाफी करावी. अन्यथा शेतकरी आत्महत्यांकडे ढकलले जातील.”
लिंबागणेश – बोरखेड पुल खचला
लिंबागणेश ते बोरखेड मार्गावरील पूल मुसळधार पावसामुळे खचला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यासंदर्भात आठवडाभरापूर्वी तलाठी, ग्रामविकास अधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. मात्र, अद्याप दुरुस्ती न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तातडीने पूल दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

