गया (बिहार) — निवडणूक आयोगा विरोधात राहुल गांधी यांनी चांगलेच दंड थोपटले आहेत.व्होट चोरी म्हणजे भारतमातेवर हल्लाच असून ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यावर मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांवर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज दिला.
मतदार अधिकार यात्रे’दरम्यान येथे घेतलेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. ”पंतप्रधान मोदी ज्याप्रमाणे विशेष पॅकेजबाबत बोलत असतात, त्याचप्रमाणे आयोगानेही मतदारयादी पडताळणीच्या रूपाने नवे पॅकेज आणले आहे. हा मतदान चोरीचाच नवा प्रकार आहे. ही चोरी उघडकीस आल्यानंतरही निवडणूक आयोग मला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगत आहे. मात्र सर्व देश त्यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत आहे. आम्हाला आणखी थोडा वेळ द्या, प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतचोरी आम्ही उघडकीस आणू आणि तुम्हाला जनतेसमोर उभे करू,” असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावरही थेट टीका केली. ”मी कधीही खोटे बोलत नाही. मात्र या तीन निवडणूक आयुक्तांनी भाजपचे सदस्यत्व घेतले असून ते त्यांच्यासाठीच काम करत आहेत. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही बिहारमध्ये आणि केंद्रात सत्तेवर येऊ, तेव्हा तुम्हा तिघांवर कारवाई करू. तुम्ही तिघांनी मतचोरी केली आहे,” असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले.
‘घटना म्हणजेच भारतमाता’
पावसातही सभा सुरूच ठेवत राहुल म्हणाले, ”राज्यघटना हीच भारतमाता आहे. ही राज्यघटना डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार पटेल व पंडित नेहरू यांच्यासारख्या नेत्यांनी तयार केली. हाच भारताचा आत्मा आहे. जेव्हा मतांची चोरी होते, तेव्हा भारतमातेवर हल्ला झालेला असतो.”

