लिंबागणेश –– जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने कालवा फुटून पाणी सरळ शेतकऱ्यांच्या शेतात घुसले यामुळे जमीन वाहून गेल्याने तसेच सिमला मिरचीचे मोठे नुकसान झाले. याबाबत नुकसानभरपाई मिळावी म्हणून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यावरच पाटबंधारे विभागाने गुन्हा दाखल केला असल्याचाप्रकार उघडकीस आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

बीड तालुक्यातील मसेवाडी येथील तलावातून कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्यात येते, पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारामुळे मसेवाडी लघु सिंचन तलावातून जास्त पाणी सोडण्यात आले. यामुळे अंजनवती शिवारात कालवा फुटला हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले, यामुळे कैलास येडे रा. अंजनवती, स्वामी येडे यांचे सिमला मिरचीचे मोठे नुकसान झाले. सत्यभामा येडे यांच्या शेतात पाणी गेल्यामुळे ज्वारीचे चिपाड देखील जागेवर राहिलं नाही. याशिवाय श्रीराम वारकरी भास्कर येडे गणेश येडे या शेतकऱ्यांच्या शेतासह पिकांचे नुकसान झाले.कालवा फुटल्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आली पण कोणीच फिरकले यामुळे पाण्याची तर नासाडी झालीच पण शेतकऱ्यांचे पिकांचे आणि माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. हा सततचा प्रकार असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली असता पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल केले. 24 तास नशेत असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना नुकसान झालं तरी जाब विचारायची सोय राहिली नाही. उलट बाई माणसाला दमदाटी करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात असल्याची कैफियत आशाबाई येडे यांनी मांडली. याबरोबरच पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांची तक्रार केली त्यामुळे कैलास येडे या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला.यामुळे घटनेचा निषेध करीत पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देऊन पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिला आहे.

