Home राज्य रक्ताचा थेंब पडला तरी महाराष्ट्र बंद’; जरांगे पाटलांचा इशारा, 12 सप्टेंबरला अंतरवालीत...

रक्ताचा थेंब पडला तरी महाराष्ट्र बंद’; जरांगे पाटलांचा इशारा, 12 सप्टेंबरला अंतरवालीत निर्णायक बैठक

0
7

जालना — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला थेट इशारा दिला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी येताना एखाद्या आंदोलकावर हल्ला झाला आणि त्याच्या अंगावर रक्ताचा एक थेंबही पडला, तर अवघ्या 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

रक्ताचा एक थेंब पडला तरी 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद करा

सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्यांवर वेळकाढूपणाची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यामुळे आता पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटीत मोठी बैठक घेण्यात येणार आहे.

पुणे, नगर, नाशिक तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील मराठा समाजाने हातातील कामे बाजूला ठेवून या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना कितीही त्रास दिला तरी मराठा समाजाने पोलिसांना त्रास देऊ नये, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, बैठकीसाठी येताना एखाद्या आंदोलकावर हल्ला झाला आणि डोक्यातून रक्ताचा थेंब जरी निघाला, तरी 10 मिनिटांत संपूर्ण महाराष्ट्र बंद झाला पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.

मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईकडे जाण्याचा निर्णय कायम असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुंबई आंदोलनाचे नियोजन करण्यासाठीच अंतरवालीत बैठक बोलावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईकडे निघाल्यानंतर आंदोलकांना अडवण्याचे सरकारचे नियोजन असल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांची चूक नसेल तर या संपूर्ण प्रकाराला सरकारमधील नेतृत्व जबाबदार असेल, असा दावा त्यांनी केला.

भाजपलाही जरांगेंचे थेट आव्हान

मराठा समाजासाठी शरद पवार आणि काँग्रेसने काय केले, असा सवाल भाजपकडून केला जात असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी भाजपलाही प्रत्युत्तर दिले. ‘तुम्ही आधी मराठा समाजासाठी काय केले, हे स्पष्ट करा,’ असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

आता 12 सप्टेंबरच्या अंतरवाली बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा आणि मुंबई आंदोलनाचे नियोजन निश्चित होणार असल्याने या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here