बीड — भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात अटकेत असलेला बीडचा माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राज्य शासनाने त्याच्यावर अखेर निलंबनाची कारवाई केली आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात ७ मे रोजी अविनाश पाठक याला अटक करण्यात आली होती. सुरुवातीला न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुढील सुनावणीत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
दरम्यान, एका सनदी अधिकाऱ्याला न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर राज्य शासनाने प्रशासकीय नियमांनुसार पुढील कारवाई करत अविनाश पाठकच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. शासन आदेशानुसार हे निलंबन अटकेच्या तारखेपासून लागू करण्यात आले असून निलंबन कालावधीत त्याचे मुख्यालय बीड येथेच राहणार आहे.
भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणामुळे आधीच बीड जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू असताना आता झालेल्या निलंबन कारवाईमुळे या प्रकरणाला आणखी वेग आला आहे. तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आगामी काळात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




