Home Blog Page 61

सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण; बीड जिल्ह्यात 256 रेकॉर्ड ब्रेक आत्महत्या

0

शेतकऱ्यांची घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं

बीड — मराठवाड्यात २०२५ या वर्षात एकूण ११२९ शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यामध्ये बीड जिल्ह्यातील २५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत मरणाला कवटाळले आहे. मागील दोन वर्षांपासून बीड जिल्हा मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये आघाडीवर असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
शासन व प्रशासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, “सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” या घोषणेच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि. ०९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आली.
ही निदर्शने सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
यावेळी आंदोलकांनी सरकार व प्रशासनाने केवळ फोटोसेशनपुरते मर्यादित न राहता शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस व परिणामकारक पावले उचलावीत अशी ठाम मागणी केली.

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांची मालिका सुरूच असून, त्यामागे कर्जबाजारीपणा, नापिकी, सावकारांचा विळखा, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, तसेच प्रशासनाची उदासीनता ही प्रमुख कारणे आहेत.
२०२४ मध्ये मराठवाड्यात ९८४ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या, तर २०२५ मध्ये हा आकडा वाढून ११२९ वर पोहोचला आहे.
यावर्षी मराठवाड्यावर आसमानी संकट कोसळल्याने ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण ठरत असून, प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांनी निव्वळ दिखाऊ उपाय न करता शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठोस धोरणे तात्काळ राबवावीत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनात माजी सैनिक अशोक येडे ( जिल्हाध्यक्ष,आम आदमी पार्टी ,रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), कुलदीप करपे ( जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना ) शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, सुहास जायभाये , माहिती आधिकार कार्यकर्ते शेख मुबीन , पांडुरंग हराळे , गणेश नाईकवाडे (जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ),प्रा.डी.जी.तांदळे(अध्यक्ष म.रा.किसानसभा जि.बीड, प्रा.राजकुमार यादव, डॉ.संजय तांदळे आदी सहभागी होते.

ट्युशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन अत्याचार

0

केज — ट्युशनला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे भरदिवसा कारमधून अपहरण करून तिला निर्जन डोंगराळ भागात नेण्यात आले आणि तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. केज तालुक्यातील एका गावात राहत असलेली अल्पवयीन मुलीची आरोपी धीरज सांजुरे याच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचा गैरफायदा घेत धीरज सांजुरे याने ६ जानेवारी रोजी पीडितेला फिरायला जाण्याचे आमिष दाखवलं. त्यानंतर पीडिता ७ जानेवारीला सकाळी ट्युशनला जाण्यासाठी सकाळी साडे नऊ वाजता निघाली होती. धीरज सांजुरे त्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात थांबवलं. तिला कारमध्ये बसवलं आणि धारूर तालुक्यातील अंबाचोंडी येथील डोंगरात नेलं. डोंगरात एका
निर्जनस्थळी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीनं ही माहिती तिच्या पालकांना दिली. पालकांनी पीडित मुलीसह केज पोलिस स्टेशन गाठून या घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू होणार; 12 जिल्ह्यातील निवडणुकांची घोषणा लवकरच

0

मुंबई — ग्रामीण भागातील राजकारण तापवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.आरक्षणाच्या पेचामुळे रखडलेल्या या निवडणुकांबाबत निवडणूक आयोग सक्रिय झाला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात सध्या ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यामधील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपून बराच काळ लोटला आहे, सध्या प्रशासकीय राजवटीतून कारभार सुरू आहे.

मात्र, यापैकी २० जिल्हा परिषदांमध्ये आणि त्याअंतर्गत ८८ पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक असल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारीला होणार असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरक्षण मर्यादा कायदेशीर चौकटीत असलेल्या १२ जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची तयारी आयोगाने जवळपास पूर्ण केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार, कायदेशीर अडथळे नसलेल्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका घेण्याची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकारण तापणार असून, आगामी विधानसभा व लोकसभा राजकारणालाही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत होणारी निवडणूक घोषणा ही केवळ प्रशासनिक प्रक्रिया न राहता, राज्याच्या राजकीय भवितव्याला दिशा देणारी ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील चार जिल्हे

पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मतदार याद्या, प्रशासकीय तयारी आणि संभाव्य आचारसंहिता लागू करण्याबाबत प्राथमिक नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास 7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

0

बीड — शिरूर पोलिस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या वडीलांकडून मारहाण करत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तब्बल 16 महिन्यानंतर या प्रकरणात नराधम बापाला दोषी धरत न्यायालयाने सात वर्ष सक्षम कारवासासह वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,16 ऑगस्ट 2024 रोजी 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच बापाकडून मारहाण करत वारंवार लैंगिक अत्याचार केला गेला.या  प्रकरणी 18 ऑगस्ट 2024 रोजी शिरूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरनं 147/2024 या अंतर्गत पोस्कोसह लैंगिक अत्याचार प्रकरणातील कलम लावण्यात आले होते. कलम 74,75,76,115 अधिनियम 2012 अंतर्गत कलम 10 व
12 अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. पिडीत अल्पवयीन मुलीचा जबाब, साक्षीदारांचे जबाब आवश्यक असलेले महत्वाचे पुरावे गोळा करून तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल केले होते. हा खटला न्यायमुर्ती एस.एस.घोरपडे विशेष सत्र न्यायालय बीड यांच्या न्यायालयात चालल्यानंतर सबळ पुरावे, पिडीतेची साक्ष या सारख्या बाबी आरोपीस दोषी ठरविण्यास कारणीभूत ठरले. त्यामुळे पोस्को कलम 10 अंतर्गत 7 वर्षाची सक्त मजूरी, पोस्को कलम 12 अंतर्गत 3 वर्षाची सक्त मजूरी, बीएनएस कलम 115 अंतर्गत 6 महिने शिक्षा, आर्थीक दंड व पिडीतेस भरपाई अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ए.बी.तिडके यांचा युक्तीवाद व पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गोविंद सानप यांची भूमिका महत्वाची ठरली.

एस पी साहेब अजून किती देणार लाडक्या गोसावींना पाठबळ; 78 वर्षाच्या आज्जी न्यायासाठी आत्मदहन करायला हतबल

0

बीड — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी पोलीस प्रशासन किती लोकाभिमुख केलं याची टिमकी नववर्षाच्या स्वागताला वाजवली त्याचा भांडाफोड करण्याची वेळ आली आहे.एसपींच्या खास मर्जीतले नेकनूर चे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी यांनी 78 वर्षीय अंजना बन नावाच्या आज्जीला न्यायासाठी आत्मदहन करण्याची वेळ आणली आहे. 11 जानेवारीला नेकनूर पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा इशारा 10 दिवसापूर्वीच देऊनही पोलीस अधीक्षकांनी देखील कुठलीच दखल घेण्याची तसदी घेतली नसल्याचं पाहायला मिळत आहे.

.                  बीड जिल्ह्यात खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबार, अपहरण, राजरोस चालणारे अवैध धंदे यांच्यापुढे हे प्रकरण तसं पाहिलं तर अतिशय क्षूल्लक आहे.पण पोलीस अधीक्षकांनी नववर्षाच्या स्वागतालाच किती लोकाभिमुख कामं केली आहेत.पोलीस प्रशासन किती सतर्क आहे. याचा ढोल वाजवला. तो वाजवायला ही हरकत नाही. पण कायदा सुव्यवस्था आणि एस पी चा आदेश कितपत मानला जातो. हा खरा प्रश्न सगळ्याच परिस्थितीतून निर्माण होतो. एसपींनी मर्जीतली माणसं अनेक ठिकाणी जनतेच्या माथी बळच मारली. अनेक वेळा कंट्रोलला बसवा असे सांगूनही एसपींनी त्यांच्या विनंतीला मान दिला नाही. मग काय? नंगा नाच करायला अख्खं रान यांना कमी पडू लागलं. अवैध धंद्यांची भरमार झाली. त्यातून स्वतःचे बंगल्यांचे इमले बांधले गेले. ही कहाणी आहे एसपींच्या मर्जीतल्या नेकनूरच्या ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी ची त्याच्या अकार्यशैलीची गौरव गाथा माध्यमांनी अनेक वेळा मांडली.पण पिंडीवरच्या विंचवाला ठेचायचं कसं हे माध्यमांना देखील कळालं नाही. शेवटी अनेकांनी आपल्याच पापाचे भोग आहेत म्हणून घडतय ते घडू द्या म्हणून गोसावी चा नंगानाचाकडे दुर्लक्ष केलं.पण लोकाभिमुख प्रशासनाचा ढोल वाजवला त्यामुळे सत्य सांगण्यासाठी अशा गोष्टी पुढे आणण्याची वेळ “सह्याद्री माझा”वर आली.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील घारगाव येथील अंजना दगडू बन या 78 वर्षाच्या आज्जीवर न्यायासाठी आत्मदहनाची वेळ चंद्रकांत गोसावी यांनी आणली अंजना बन या गावाकडे एकट्याच राहतात परडी चा जोगवा मागून उदरनिर्वाह करतात परडी हेच एकमेव त्याचं जगण्याचं साधन. घरी कुणीच नसल्यामुळे मंदिरात झोपण्याच्या कारणावरून गणेश अंकुश सपकाळ याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. नुसती धमकीच दिली नाही तर नाकातली सोन्याची “मोरणी” काढून घेतली. याची रीतसर तक्रार नेकनूर पोलीस ठाण्याला दिली. तक्रारीला दीड महिना उलटून गेला मात्र कुठलीच कारवाई झाली नाही. चौसाळा पोलीस चौकीचा जमादार गर्जे याने तक्रार करणाऱ्या आज्जीलाच दापदडप करायला सुरुवात केली. “चोराला मेसाई धार्जिन” या म्हणीप्रमाणे “चोराला गोसावी धार्जीन” असं म्हणण्याची वेळ आणली. आज्जीने चंद्रकांत गोसावी ची देखील भेट घेतली. नातवासारख्या असलेल्या गोसावींनी देखील आज्जीची फरपटच केली. गर्जेची व आरोपीची बाजू घेतली. शेवटी अंजना बन यांनी 29 डिसेंबर 2025 रोजी येत्या आठ दिवसात गर्जे साहेब व गोसावी तसेच आरोपीवर कारवाई केली नाही तर 11 जानेवारी 2026 ला नेकनुर पोलीस ठाण्यात आत्मदहन करणार असल्याच निवेदन पोलीस अधीक्षकांना दिलं. पोलीस अधीक्षकांनी देखील पिंडीवरच्या विंचवालाच नेहमीप्रमाणे वरदान दिलं. निवेदन देऊन दहा-बारा दिवस होत आले तरी कुठलीच कारवाई कांवत यांनी देखील केली नाही. आत्मस्तुतीच्या ढोलाच्या आवाजात म्हाताऱ्या जोगवा मागून खाणाऱ्या निराधार आज्जीची आर्त हाक स्वतःला कर्तव्यदक्ष समजणाऱ्या पोलीस अधीक्षकांच्या कानावर गेली नाही. जर इतकी बिकट परिस्थिती असेल तर पोलीस अधीक्षकांनी प्रशासनाला लोकाभिमुख केल्याचे ढोल वाजवणं बंद करावं अशी मागणी जनतेतून केली जाऊ लागली आहे.

जबरी चोरी प्रकरणाचा काही तासातच छडा; दोन सख्या भावांच्या घराला पोलिसांचा वेढा

0

आष्टी — तालुक्यातील सराटेवडगाव येथील शेळके वस्तीवर 4 जानेवारीच्या मध्यरात्री झालेल्या जबरी चोरीच्या घटनेचा अंभोरा पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. 17 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने 150 किलोमीटरची शोधमोहीम राबवून, चोरीतील दोन सख्ख्या भावांना त्यांच्या घरातून अटक केली.
अक्षय गारमन चव्हाण वय 23 वर्ष आणि रिजवान गारमन चव्हाण वय 20 वर्ष, रा. शेरी बु. अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सराटेवडगाव येथे ग्यानबा राजपुरे यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी मारहाण करत दागिने आणि रोकड लंपास केली होती. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी तातडीने तपासचक्र फिरवून सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण केले.
चोरटे आष्टी तालुक्यातील शेरी येथील असल्याची खात्री पटताच, मंगळवारी पहाटे पोलिसांनी आरोपींच्या घराला वेढा घातला. आरोपी गाढ झोपेत असतानाच पोलिसांनी त्यांच्या दारात उभे राहून मुसक्या आवळल्या. पोलीस तपासात चोरट्यांची एक धक्कादायक पद्धत समोर आली आहे. चोरीला जाताना हे आरोपी स्वतःचे मोबाईल दुसऱ्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात ठेवतात, जेणेकरून त्यांचे लोकेशन सापडू नये.

गुन्ह्यासाठी ते वेगळी सिमकार्डे आणि मोबाईल वापरतात. मात्र, अंभोरा पोलिसांनी 150 किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या हुशारीला मात दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मंगेश साळवे आणि त्यांच्या पथकाने केली. फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध आता पोलीस घेत आहेत.

एकाच दिवसात ३० लाख वृक्षलागवडीचा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डचा झब्बा झोल; फट गया सारा ढब्बा ढोल

0

बीड — हवामान बदल, प्रदूषण आणि जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड केल्याचा गाजावाजा करण्यात आला. या उपक्रमाची “इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये नोंद झाल्याचा अभिमान व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मात्र, या वृक्षलागवडीचा खरा चेहरा वेगळाच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला आहे.
“वृक्षलागवड ही केवळ इव्हेंट म्हणून न करता, तिचे संगोपन व संवर्धन महत्त्वाचे असते. निदान बीड रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील लागवड केलेल्या झाडांची तरी जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्घाटनाच्या झगमगाटानंतर झाडांची दुरवस्था

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड शहरातील पालवण येथील नव्या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार, पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उद्घाटनापूर्वी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य सिमेंट रस्त्याच्या कडेला १२ ते १५ फूट उंचीची झाडे लावण्यात आली होती. मात्र उद्घाटनाचा सोहळा संपताच या झाडांचे संगोपन पूर्णतः दुर्लक्षित करण्यात आले.

आज त्या ठिकाणी अनेक झाडे पाण्याअभावी वाळून गेली, काही मोडून पडली, तर काही झाडे पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांची दिशाभूल?

जिल्हाधिकाऱ्यांनी वर्षभरात १ कोटी रोपे लावण्याचा संकल्प जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात वृक्षसंगोपनाची जबाबदारी झटकली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत पुढील चार वर्षांत १०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र हे स्वप्न फक्त कागदोपत्रीच पूर्ण केले जात असल्याचा आरोप आता पुढे येत आहे.

“इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून सन्मान स्वीकारण्यापेक्षा, जमिनीवर लावलेल्या झाडांचे प्राण वाचवणे अधिक गरजेचे आहे. वृक्षलागवडीचे इव्हेंट करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता तरी प्रत्यक्ष जबाबदारी घ्यावी,” अशी ठाम मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

नेकनूरसह चौसाळ्यात गो मांसाची खुली विक्री; पहिल्यांदाच पोलिसांची दृष्टी झाली वक्री

0

बीड — नेकनूर गोमांस तस्करीचा अड्डा तर आहेच शिवाय चौसाळात देखील खुलेआम गोमांस विक्री केली जाते. मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा धंदा सुरू असला तरी पहिल्यांदाच नेकनूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत बुधवार बाजारात आलेलं अंदाजे 90 किलो गोमांस जप्त केलं आहे. पोलिसांच्या या कधी नवे ते कर्तव्यदक्षतेमुळे कौतुक केलं जात आहे.
नेकनूर अतिशय संवेदनशील भाग म्हणून ओळखल जातं. गुरांचा आठवडी बाजार प्रसिद्ध असतानाच गोमांस तस्करी मध्ये देखील नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्याचप्रमाणे चौसाळा शहरात देखील गेल्या कित्येक महिन्यांपासून राजरोस गोमांसाची विक्री केली जात आहे. पोलिसांना याची सगळीच माहिती आहे.मात्र कायद्यापेक्षा मिळणारा “हप्ता” महत्त्वाचा त्यामुळे आज पर्यंत कारवाई कधीच झाली नाही. बुधवारी बाजारात देखील खुले आम विक्री सुरूच असते.पण चौसाळा शहरातून जात असलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पवित्र प्रार्थनास्थळाच्या जवळच शुक्रवार मंगळवार आणि रविवारी गोमांसाची विक्री केली जाते. कायदा काय सांगतो यापेक्षा पोलिसांनी गोमांस विक्री व्यवसायाला आश्रय दिला तो गोरगरिबांची पोट भरावीत आणि रोजगारांच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात यासाठी त्यामुळे कधीच कारवाई केली गेली नाही. एखाद्याची चुकून तक्रार गेलीच तर वरवरची चौकशी चा ड्रामा करून त्या तक्रारीला केराची टोपली कशी दाखवायची याची हातोटी ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींना चांगलीच माहित आहे. त्यामुळे गोमांस विक्रीला कायद्याने बंदी असली तरी संविधानापेक्षा गोसावींनी राबविलेला कायदा मोठा आहे.मग कारवाई करायची कशाला माध्यमांनी तरी अवैध धंद्यांच्या गोष्टी प्रसिद्ध कराव्यात कशाला ? शेवटी चंद्रकांत गोसावी यांचा कार्यकाळ संपत आला आहे. विशेष म्हणजे ते पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे मर्जीतले आहेत.
गोसावींनी अनेक वेळा मला कंट्रोल ला टाका असं एसपींना अर्जव केलं मात्र दरवेळी त्यांच्या या मागणीला एस पीं नी दुर्लक्षित केलं. हीच बाब कायद्याचे तीन तेरा वाजवून सुव्यवस्थेला सूरुंग लावण्यासाठी महत्त्वाची ठरली मग कोणाच्या भावना दुखावल्या तरी चालेल पण मर्जीतला माणूस पदावर राहणं हे महत्त्वाचं मानलं गेलं. पोलीस अधीक्षक कर्तव्यदक्ष आहेत निष्कलंक आहेत हे वास्तव जरी असलं तरी माध्यमांच्या बातम्यांकडे ते करत असलेल्या दुर्लक्षामुळे व आपल्या सहकाऱ्यांवर असलेल्या अति विश्वासामुळे कायदा सुव्यवस्थेची घडी सगळी सडली आहे. अवैध धंदे नेकनूर परिसरात पोलिसाश्रयात चालत आहेत. पोलीस प्रमुख पदावर कोणीही बसलं तरी सामान्य जनतेने केलेल्या पापाची फळ त्यांना भोगायचीच आहेत असं म्हणून गप्प बसण्याची वेळ सध्या तरी आलेली आहे.
आज बुधवारी चौसाळाचा आठवडी बाजार असल्याने पोलिसांनी बाजारात धाडसी कारवाई केली. याला धाडसीच म्हणावं लागेल कारण कारवाई आजपर्यंत कधीच झाली नव्हती ती अखेर झाली. पोलिसांनी बाजारात खुलेआम विक्री होत असलेलं अंदाजे 90 किलो गोमांस जप्त केलं. ज्या तीन चाकी रिक्षातून हे गोमांस आणला गेलं तो रिक्षा ही पोलिसांनी जप्त केला. तीन जणांना पोलिसांनी बाजारातून उचललं ही धाडसी कारवाई पोलीस उपनिरीक्षक आहेर साहेब, पो, हे, जायभाय, पो, हे, क्षीरसागर, विद्वान , यांच्यासह चौसाळा ठाणे अमलदार मुरुमकर, पो, हे, पुंडे, पो, ना, घुले यांनी केली आहे.

नाळवंडी नाक्यावरील६३ लाख रुपये किंमतीच्या रस्ता कामाचे आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते उद्घाटन

0

नाळवंडीच्या उर्वरित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू —आ.विजयसिंह पंडित

बीड — नाळवंडी नाका ते नाळवंडी रस्त्यावरील ६४ लाख रुपय किंमतीच्या रस्ता कामाचे उद्घाटन
आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सदर काम जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत करण्यात येत असून उर्वरित नाळवंडी रस्त्याच्या कामाचा प्रश्न देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावू अशी ग्वाही यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित यांनी दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी नाळवंडी नाक्याच्या पुढे ते उड्डान पुलापर्यंत रस्ता कामासाठी व नळकांडी पुलासाठी ६३ लाख रुपयाचा निधी जिल्हा वार्षिक विकास योजनेअंतर्गत दिलेला आहे. या रस्ता कामाचे उद्घाटन मंगळवार दिनांक ६ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ, नगरसेवक दत्ता जाधव, अरिफ खान, नगरसेवक शेख निजामभाई, आनंद पवार, भाऊसाहेब डावकर, इनामदार खय्युम, ईश्वर पवार, बाबूलाल पवार, संतोष जाधव, विलास घनवट, अनिल देवकर, संजय इटकर, अनिल पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून विकास कामांना गती येत आहे. नाळवंडी नाका ते नाळवंडी या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. खरंतर हा रस्ता पूर्वीच होणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही. आता हा रस्ता जिल्हा वार्षिक नियोजन मधून ९०० मीटर होत आहे पुढे या रस्त्यावर एक पूल असून त्याबरोबर उर्वरित रस्त्याचे काम देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून लवकरच मार्गी लावू, रस्ता कामांमध्ये गुणवत्ता आणि दर्जा घसरता कामा नये अशा सूचनाही आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या .

यावेळी नाळवंडी रोडवरील खडी क्रेशर चालक संघटनेच्यावतीने बीड नगरपालिकेत आ. विजयसिंह पंडित यांना मोठ्या प्रमाणात यश आल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी खडी क्रेशर चालख हरिभाऊ क्षिरसागर, राजाभाऊ कानडे, सतीश चिपाडे, बाळासाहेब कानडे, आनंद पवार, अमोल गायकवाड, प्रेमराज गुंजाळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

चंदन चोरांची टोळी जेरबंद; सव्वा आठ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

0

बीड — पोलिसांनी धर्मापुरी पानगाव रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या गायरान जमिनीत छापा मारून चंदन चोरांची सात जणांची टोळी जेरबंद करण्यात यश मिळवलं. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत तीन लाख रुपयाचे 104 किलो चंदनासह सव्वा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अंबाजोगाई चे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना सोमवार दि. 5 जानेवारी रोजी चंदनाची खरेदी विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली. माहिती मिळताच धर्मापुरी पानगाव रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या गायरान जमिनीत रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी छापा मारला. यावेळी बेकायदेशीररित्या चंदनाची तस्करी पप्पु बाबुराव सूर्यवंशी वय 40 वर्ष, राहुल पप्पु सूर्यवंशी वय 23 वर्ष, तेजस कल्लप्पा कांळीबे वय 25 रा. अशोक नगर, परळी, जि. बीड,नितीन सटवा जाधव वय 22, रा. हनुमान नगर, परळी, जि. बीड अविनाश व्यंकट जाधव वय 23 वर्ष,व्यंकट रामचंद्र जाधव वय 45 (दोन्ही रा. फुलेनगर, उदगीर, जि. लातूर ,भारत निवृत्ती गायकवाड वय 40, रा. नाकलगाव, ता. माजलगाव, जि. बीड.हे आढळून आले. यावेळी दोन लाख साठ हजार रुपये रुपये किमतीचे 104 किलो लाकूड , 39 हजार रुपये किमतीची चंदन साल 39 किलो,टाटा इंडिगो चारचाकी कार ,दुचाकी वाहने अंदाजे एक लाख 60 हजार रुपये एक विनानंबर दुचाकी वीस हजार रुपयांची, 7 मोबाईल फोन लोखंडी तराजू व वाकस 1 हजार रुपये असा एकुण मुद्देमाल 8 लाख 21 हजार रुपये पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोलीस अंमलदार सतेश कांगणे यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 317(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान ही कारवाई
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहा.पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक असद शेख परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निमोने, पोह. बासर, बिक्कड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील सतेश कांगणे, सोडगीर, उत्तरेश्वर केदार, खंदारे यांनी केली आहे.