Home Blog Page 60

तहसीलदार चंद्रकांत शेळकेंची साक्षाळपिंप्री नदीपात्रात वाळू चोरी विरोधात कारवाई

0

बीड — तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे सिंदफना नदीपात्रातून अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत दोन ट्रॅक्टरवर कार्यवाही केली आहे . ही कारवाई १२ जानेवारी रोजी पारगाव सिरस महसूल मंडळाच्या हद्दीत साक्षाळपिंपरी येथे करण्यात आली .
पहिल्या घटनेत महसूल पथकाने अफसर शेख याचे ट्रॅक्टर अडवले असता त्यामध्ये सुमारे एक ब्रास वाळू विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले . सदर वाळू सिंदफना नदीपात्रातून चोरट्या पद्धतीने उपसा करून वाहतूक करण्यात येत होती . तहसीलदार शेळके यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर थांबवून कागदपत्रांची मागणी केली असता कोणतेही वैध परवाने अथवा रॉयल्टी पावती सादर करण्यात आली नाही . कारवाईदरम्यान संबंधित आरोपी अफसर शेख याने महसूल कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून ट्रॅक्टर घटनास्थळावरून पळवून नेले . याबाबत पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे .
त्यानंतर लगेचच त्याच परिसरात दुसरे एक ट्रॅक्टर महसूल पथकाच्या निदर्शनास आले . सदर ट्रॅक्टर सुनील बेदरे यांचे असल्याचे निष्पन्न झाले . तपासणीदरम्यान या ट्रॅक्टरमधूनही अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले . या प्रकरणी महसूल पथकाने ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेतली असून , चालक व मालकाविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे .
छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या सातत्यपूर्ण सूचनांनुसार गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाया करण्यात येत आहेत . बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अवैध वाळू वाहतुकीवर शून्य सहनशीलतेचे धोरण राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत . अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्याकडून याबाबत नियमित आढावा घेतला जात असून , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांचा मंडळाधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे सातत्याने तगादा असतो .
बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव या अवैध चोरट्या वाहतुकीविरोधात सक्रिय असून , बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बीड तालुक्यात कुठेही अवैधरित्या वाळू वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे .
या कारवाईत पारगाव सिरस विभागाच्या मंडळ अधिकारी स्मिता गुंजाळ , ग्राम महसूल अधिकारी यशवंत सानप व दादासाहेब शेळके तसेच महसूल सहायक भरत भंडाणे यांनी सक्रिय सहभाग घेतला .महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून , पुढील काळातही अशा प्रकारच्या कडक कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे .

जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

0

मुंबई —  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत .त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे.

राज्यातील एकूण 32 जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यापैकी 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली असल्याने निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता त्यात सुधारणा करत १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

आरक्षणासंदर्भातील अडचणींमुळे निवडणुका रखडल्या होत्या. मात्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया वेगाने राबवावी लागणार आहे.

ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्या पुढीलप्रमाणे:

अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच राज्यातील ग्रामीण राजकारण तापण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे लवकरच मंत्रिमंडळात दिसतील; प्रफुल्ल पटेल यांचे संकेत

0

तपास यंत्रणेच्या तपास/चौकशीत धनंजय मुंडे यांचे नाव नाही किंवा त्यांचा संबंध नाही – प्रफुल्ल पटेल

मुंबई — माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या नंतर मागील एक वर्षापासून सरकारच्या बाहेर असून, लवकरच ते मंत्रिमंडळात पुनरागम करतील असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केले आहेत.

एका प्रसिद्ध राष्ट्रीय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी धनंजय मुंडे यांना सहन कराव्या लागलेल्या मनस्ताप व त्रासाबद्दल देखील वक्तव्य केले आहे.

बीड जिल्ह्यात तत्कालीन निर्माण झालेल्या परिस्थिती मध्ये जनभावनेचा विचार करून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला होता. त्या प्रकरणात चौकशी देखील पूर्ण झाली असून यामध्ये कुठेही धनंजय मुंडे यांचे नाव नाही, त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही, तसेच कुठेही त्यांचा संबंध आढळून आलेला नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील केले जाईल, असे वक्तव्य श्री पटेल यांनी केले आहे.

विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी एका दुसऱ्या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देखील असेच वक्तव्य केले होते, त्यांनंतर आज एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे.

दरम्यान कुठल्याही चौकशीत धनंजय मुंडे यांचा कुठलाही संबंध नसून ते लवकरच मंत्री म्हणून काम करताना दिसतील असे स्पष्ट करत प्रफुल्ल पटेल यांनी सुसंकेत दिले आहेत!

काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतल्याने या चर्चांना सुरुवात झाली होती. नुकतेच बीड येथील एका कार्यक्रमानंतर धनंजय मुंडे आपला पुढील दौरा अचानक रद्द करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत हेलिकॉप्टर मधून गेले, त्यामुळेही राज्यातील राजकारणात मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असल्याचे दिसून येते.

लग्नाचे अमिष दाखवून शारिरीक संबंध; एकावर गुन्हा

0

आष्टी — लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवत साखरपुडा झाल्यानंतरही लग्नास नकार दिला. या प्रकरणी पोलिस अंमलदाराविरुद्ध अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
आष्टी तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय
पीडितेशी मच्छिंद्र हरिभाऊ राठोड याने १ एप्रिल
२०२२ ते १ मार्च २०२५ या कालावधीत लग्नाचे
आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. आरोपी पोलिस भरती झाल्यानंतरही गावी आल्यावर हा प्रकार सुरू होता. प्रकरण उघडकीस आल्यानंतर साखरपुडा झाला, मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिला. या प्रकरणी पीडितेने अंभोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंभोरा पोलिस करीत आहेत.

अंकुश नगर मधील प्लंबर हत्या प्रकरणातील आरोपी अखेर पकडला

0

बीड — अंकुश नगर भागात प्लंबर हर्षद तुळशीराम शिंदे याच्यावर आधी गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हत्या करण्यात आल्याची घटना 6 जानेवारी रोजी घडली होती.दरम्यान या प्रकरणातील फरार आरोपी विशाल सूर्यवंशी च्या मुस्क्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
हर्षद तुळशीराम शिंदे (वय 38) याचा आरोपी विशाल सुर्यवंशी याने अंकुश नगर भागामध्ये फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करत असताना मंगळवार दि. 6 जानेवारी खुन केला होता. हर्षद शिंदेवर सुरूवातीला विशाल सूर्यवंशी याने दोन गोळ्या झाडल्या मात्र त्या गोळ्या हर्षदला न लागल्यामुळे त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा पाठलाग करून विशालने हर्षदची हत्या केली. अंकुशनगर भागात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. मंगळवारी घटना घडल्यापासून आरोपीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन व शिवाजी नगर पोलिसांचे एक पथक मागावर होते. अखेर रविवारी सायंकाळच्या सुमारास कळंबवरून केजकडे येत असताना
दुचाकीसह आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचे व शिवाजी नगर पोलिसांच्या टीमने ताब्यात घेतले आहे. हर्षद शिंदे याची हत्या विशाल सूर्यवंशी ने का केली याचे कारण उघडकीस येणार आहे

रेन्यू पॉवर कंपनीची मनमानीः संमती न घेता वहीती शेतात उभे केले विद्युत पोल

0

बीड — शेतकऱ्याची संमती न घेता सामूहिक शेती असलेल्या ठिकाणी पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या रेन्यू पॉवर या कंपनीचे बीड तालुक्यातील मोरगाव हद्दीमध्ये कार्यालय असून तेथील संबंधित गुत्तेदाराने मनमानी करत शेतकऱ्यांची पूर्ण परवानगी न घेता वहीत शेतामध्ये विद्युत पूल उभे केले असून ते पोल काढून टाकण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे सदर निवेदन संबंधित कंपनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, नेकानूर पोलीस स्टेशन तहसीलदार बीड यांना दिले आहे.
बीड तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी विलास नरहरी चौरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्या रिन्यू पावर कंपनी ही सौर ऊर्जा (पवनचक्की) निर्माण करणारी कंपनी असून या कंपनीचे मोरगाव हद्दीमध्ये मांजरसुंबा लिंबागणेश रस्त्यावर कार्यालय असून या कंपनीने विद्युत लाईन ओढण्यासाठी काही कंत्राटदाराची नेमणूक केली आहे प्रामुख्याने ज्यांच्या वहीती असलेल्या शेतामधून किंवा मालकी हक्कातून पोल किंवा लाईन ओढली जाणार आहे त्यापूर्वी संबंधित शेतकऱ्याची परवानगी घेणे बंधनकारक असताना या कंपनीने मनमानी करत गुत्तेदाराकरवी नियमबाह्यरित्या विद्युत पोल उभे केले आहेत विशेषतः हे पोल उभे करताना ज्या गटातून शेतातून विद्युत लाईन किंवा पॉल उभे केले जाणार आहेत त्या शेतकऱ्यांची संमती घेणे गरजेचे असताना ती घेतली गेली नाही सामूहिक शेती असेल तर सर्वांची संमती घेणे गरजेचे असताना ती घेतली गेली नाही विशेष म्हणजे यापूर्वीच गाव तलावासाठी आमची जमीन शासनाने संपादित केली आहे आणि आमच्या कुटुंबाची उपजीविका आता त्याच वहिती जमिनीवर असल्याने त्याच वहिती जमिनीवर मनमानी पद्धतीने रेन्यू पॉवर कंपनीने व त्यांच्या गुत्तेदाराने विद्युत पूल उभे केल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे भविष्यातही ही जमीन नापीक होऊ शकते तेव्हा माझ्या जमिनीमध्ये उभे केलेले रेन्यू कंपनीने विद्युत पोल त्वरित काढण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे संबंधित कंपनीला निवेदन देण्यासाठी गेली चार दिवस चकरा मारल्या मात्र तेथे कोणीही अधिकारी आढळून आला नाही म्हणून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले

चोर नेकनूर पोलीस मौसेरे भाई; कोपरापर्यंत ओघळ येईपर्यंत लोकांना खाई; नेकनूरच्या बाजारातून 15 किलो चांदी चोरीला

0

नेकनूर — ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावीं चा कारभार वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी चक्क नेकनूरसह चौसाळ्याचा आठवडी बाजार चोरांना आंदण दिला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सणाच्या ऐन मोक्यावर नेकनूरच्या आठवडी बाजारातून सराफा व्यापाऱ्याची 15 किलो चांदी असलेली पेटीसह 50 हजार रुपयांची रोकड डल्ला मारून चोर घेऊन गेला. व्यापाऱ्यावर जवळपास 35 लाख रुपयाची संक्रांत आली.विशेष म्हणजे ही घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सकाळी दहाच्या सुमारास घडल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांच्या कृपेने या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. मोबाईल चोरीला गेला, खिसा कापला गेला, महिलांच्या गळ्यातील दागिने गेले तर पोलीस ठाण्यात तक्रारदाराचीच होणाऱ्या उलट तपासणीमूळे नव्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे तक्रारी ही करायला कुणी धजावत नाही तपास व्हायचा तर विषयच येत नाही अशा चोर पोलिसांच्या अडकित्यात जनता मात्र भरडली जात असताना एसपी मात्र कायदा सुव्यवस्थेची घडी बसवल्याचा ढोल कशाच्या जीवावर वाजवत आहेत. असा प्रश्न विचारला जात आहे.
नेकनूर चा आठवडी बाजार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. पण सध्या तो चोरांचा बाजार बनलं असल्याचं पाहायला मिळत आहे. मोबाईल चोर, खिसे कापू यांना सुगीचे दिवस आले आहेत. जी स्थिती नेकनुर ची ‌ तीच चौसाळा बाजार ची. विशेष म्हणजे अशा तक्रारी घेऊन ‌ कागदं काळे करायला पोलिसांना वेळ नाही. एखादी मोठी घटना चोरीची अथवा अन्य गुन्ह्यांची घडलीच तर नेकनूर पोलीस ठाण्याला तक्रार द्यायची. पुन्हा दखल घेतली नाही म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सयाजी शिंदेंचा डाळिंबाचा बाग चोरीला गेला. त्याकरता तक्रारदाराला एसपींची भेट घ्यावी लागली. एस पीं नी गुन्हे दाखल करा असे आदेश देण्या ऐवजी विनंतीच्या सुरात चंद्रकांत गोसावींना घ्या तक्रार असं सांगितलं. त्यानंतरही तक्रारीची दखल घेतली नव्हती. माध्यमांनी बोंब ठोकली त्यावेळी कसातरी गुन्हा नोंद केला. तीच स्थिती जोगवा मागून खाणाऱ्या घारगावच्या अंजना बन यांची झाली. देवळात झोपायचं नाही म्हणून एकाने मारहाण केली नाकातली मोरणी चोरली.आजींनी रीतसर तक्रार दिली. एसपींना आत्मदहनाचा इशारा दिला. तरीही दखल घेतली गेली नाही. शेवटी या प्रकरणात देखील माध्यमांना ओरड करण्याची वेळ आली. ओरड होताच तात्काळ कारवाई झाली. आजीला न्याय मिळाला. नेकनूर बस स्थानक, बँक, शिक्षक कॉलनीत चोरीच्या अनेक घटना घडल्या. या प्रकरणांमध्ये देखील काहीच झालं नाही. अनेक शेतकऱ्यांचा दारात ठेवलेला सोयाबीन सारखा माल चोरांनी रात्रीच भरून नेला. त्यातही तक्रार देऊनही पुढे काहीच झालं नाही. पोलिसांना चोर सापडलेच नाही. सापडतील कसे तपास झालाच नाही. ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींना तो करावासा वाटला नाही. आपण तर एसपी चे लाडके म्हणून खाकी वर्दीची इज्जत त्यांनी ठेवली नाही. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी तक्रारदाराने ठाण्याला येण्याची गरज नाही. क्यू आर कोड स्कॅन करा तक्रार दाखल करा असा आधुनिकतेचा मंत्र जनतेला दिला. याचाही ढोल नगारा माध्यमांनी जोरात वाजवला. पण जिथे प्रत्यक्षात तक्रार देऊन काही होत नाही. तिथे क्यू आर कोड ची दखल कोण घेणार? असा प्रश्न जनतेला का पडू नये अशी स्थिती सध्याची तरी आहे.
नेकनूर पोलीस आठवडी बाजारात येणाऱ्या वाहनांना अडवून निधी संकलन करतात. चौसाळ्यात तर “खास” नेकनूर मधून माणूस रिक्षावाल्यांकडून वसुली करण्यासाठी पाठवला जातो.बाजारात चोर चुपचाप खिसे कापून, महिलांचे दागिने लंपास करून, मोबाईल चोरून पोलिसांच्या नाकावर टिच्चून निघून जातात. वसुली पुढे पोलिसांना होणाऱ्या चोऱ्यांशी काहीच देणे घेणे नाही. तक्रार घेऊन एखादा ठाण्यात आलाच तर दाप दडप करून कसा पिटाळून लावायचा‌ त्याचीच उलट तपासणी कशी घ्यायची यामध्ये नेकनूर पोलिसांचा हात कोणीच धरू शकणार नाही अशी स्थिती आहे. आज नेकनूरच्या आठवडी बाजारात पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर बबन पांडुरंग कानडे नावाच्या सराफा व्यापाऱ्याची 35 लाख रुपये किमतीची 15 किलो चांदी असलेली पेटी चोरांनी पळवली. नुसती पेटीच पळवली नाही तर 50 हजार रुपयांची रोकड देखील लंपास केली. संक्रांतीचा बाजार असल्यामुळे व्यापाऱ्यावर देखील सकाळी दहाच्या सुमारास चोरांची संक्रांत आली. चोरांचा दुपारपर्यंत शोध सुरू होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात तरी पोलीस अधीक्षक सराफा व्यापाऱ्याला न्याय देऊ शकतील का? चंद्रकांत गोसावींच्या कारभाराला आळा घालू शकतील का? गोसावी लाडके आहेत म्हणून पुन्हा त्यांना पाठीशी घातलं जाणार का? यासारखे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

माजलगावमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; दोघे ताब्यात, चौघांवर गुन्हा दाखल

0

माजलगाव —  तालुक्यामध्ये धार्मिक कार्याच्या नावा खाली बेकायदेशीर निधी जमवण्याच्या आरोपावरुन चार जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.अहिल्यानगरमधील वैध ट्रस्टचा नोंदणी क्रमांक चोरी करून बनावट ट्रस्ट तयार करुन हा निधी गोळा केला जात होता.लातूरमध्ये पाच वेगवेगळी खाते उघडून धार्मिक कामाच्या नावाखाली चार कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपयांचा निधी जमा करण्यात आला.

संबंधित रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळील पात्रुड गावात गुरुवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास छापा मारून दोघांना ताब्यात घेतले. तर चार जणांविरुद्ध माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी दुजोरा दिला आहे.

इमरान कलीम शेख (सदर बाजार, अंबाजोगाई), मुज्जम्मिल नूर सय्यद (सत्तार गल्ली पात्रुड), अहमदुद्दीन कैसर काझी (रोजा मोहल्ला, केज) व तौफीक जावेद काझी, अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील मुज्जम्मिल नूर व अहमदुद्दीन काझी या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या संदर्भाने मिळालेल्या माहितीनुसार वरील आरोपींनी पात्रुडमध्ये गुलजार ए रझा या नावाच्या ट्रस्टचा फलक लावला होता. निती आयोगाच्या नियमानुसार ट्रस्टची नोंदणी दर्पण पोर्टलवर करणे आवश्यक आहे.

मात्र, गुलजार ए रझाचे चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याचे कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये आढळून आले. या न्यासाच्या नावाने लातूरमधील ॲक्सिस बँकेमध्ये पाच बोगस खाते तयार करण्यात आले होते. त्यामध्ये चार कोटी रुपये जमा करण्यात आले होते. हा निधी धार्मिक कामाच्या संदर्भाने जमा करण्यात येत असल्याची माहिती आहे. गुलजार ए रझाची बीड जिल्ह्यातील ११ ही तालुक्यांमधील दुय्यम निबंधक कार्यालयांकडून माहिती घेतली असता तेथेही त्यांची नाेंदणी आढळून आली नाही.

महाराष्ट्रामध्ये काेणत्याही ट्रस्ट किंवा संस्थेने त्यांची  नाेंदणी धर्मादाय आयुक्तांकडे करणे आवश्यक आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडूनही वरील ट्रस्टची माहिती घेतली असता त्यांच्याकडे नाेंदणी नसल्याचे कळवले आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे ताे इम्रान शेख हा गुलजार ए रझा ट्रस्टचा अध्यक्ष, सय्यद मुज्जम्मिल हा उपाध्यक्ष, असमदुद्दीन कैसर काझी हा सचिव तर ताैफीक काझी याचा विश्वस्त म्हणून बँकेच्या खात्यांमध्ये नाेंदणी असल्याची माहिती पुढे आली आहे.

गणेश डोंगरेंच्या कुटुंबांला न्याय मिळण्यासाठी अजित पवारांचा कारखाना बंद पाडला

0

धाराशिव — काही दिवसांपूर्वी ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा ऊस कारखान्यात ट्रॉलीखाली दबून मृत्यू झाला होता. या प्रकरणी डोंगरे कुटुंबीयांना मदत मिळावी, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारखान्यावर ऊसतोड कामगारांनी तीव्र आंदोलन केलं.डोंगरे यांच्या नातेवाईक आणि आंदोलकांनी कारखानाच बंद पाडला.

रील स्टार आणि ऊसतोड मजूर असलेल्या गणेश डोंगरे याचा ३ जानेवारी २०२५ रोजी उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार कारखान्यावर ऊस ट्रॉलीच्या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. गणेश डोंगरेच्या मृत्यू नंतर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. घटनेला ६ दिवस उलटले तरी कारखाना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. एवढंच नाहीतर डोंगरे कुटुंबीयांना मदतही दिली नाही.

त्यामुळे डोंगरे कुटुंबीय आणि स्थानिकांनी कारखान्यासमोर जोरदार आंदोलन केलं. मयत गणेश डोंगरे याच्या पश्चात ३ लहान मुलं आहे. त्याच्याा कुटुंबीय आणि मुलांना दहा लाखाची मदत करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. पण, कारखाना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे कारखान्यावर अपघातामध्ये मृत झालेल्या गणेश डोंगरेच्या कुटुंबाला मदत न केल्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले. कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उतरून महिला मुला बाळांसह आंदोलन केलं.

यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी उमरगा तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा क्यू एनर्जी संचलित भाऊसाहेब बिराजदार कारखाना बंद पाडला. या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. कारखान्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.कारखाना प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत कारखान्याच्या गव्हाणीमध्ये नागरिकांनी ठिय्या मांडला. कारखान्याचे गाळप पूर्णतः बंद पाडले. या आंदोलनात गणेश डोंगरे यांच्या पत्नी अश्विनी डोंगरे, त्यांच्या तीन लहान मुली, भाऊ, आई सहभागी झालेल्या असून आंदोलकांनी कारखाना प्रशासनासमोर गणेश डोंगरेंच्या तिन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी १० लाख रुपये आणि जखमींना दोन लाखांची मदत द्यावी, अशी मागणी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

बीडच्या सहयोग नगर मधील स्क्रॅप गोडाऊनला आग; आगीत मोठे नुकसान

0

बीड — शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या सहयोगनगर परिसरारतील गणपती मंदिराजवळ एका गल्लीत स्क्रॅप गोडाऊनला आज सकाळी अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने आक्राळविक्राळ रुप धारण केल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बीड नगरपालिकेकडे अग्निशामक दलाची गाडी नसल्याने आग विझविण्यासाठी नागरिकांना खासगी टँकरसह स्थानिक बोअरवेलमधून पाणी उपसावा लागला. तब्बल एका तासाच्या प्रयत्नानंतर सदरील आग आटोक्यात आली.

बीड न. प.अग्निशामक दलाकडे चार अग्निशामक गाड्या आहेत त्या तात्काळ दुरुस्त करून सेवेत दाखल करण्याच्या सूचना आ. विजयराजे पंडित पालिका प्रशासनाला यावेळी दिल्या.जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घेण्याचा निर्णय घेतलेला असून त्या लवकरच बीडकरांच्या सेवेत दाखल होतील असे ही आ. पंडित यांनी सांगितले.
अग्निशामक दलाचे बंब उपलब्ध नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर पहावयास मिळाला. शहरात एखादी मोठी आग लागली तर ती विझवायची कशी ? असा प्रश्नही या वेळी उपस्थित झाला. या आगीत मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
बीड शहरातल्या सहयोगनगर परिसरात गणपती मंदिराजवळ एका गल्लीत अग्रवाल यांचे स्क्रॅप गोडाऊन आहे. आज या गोडाऊनला अचानक आग लागली. बघता बघता आगीने मोठे स्वरुप धारण केले. सदरचं गोडाऊन हे मध्यवर्ती वस्तीत असल्याने आजुबाजुच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरले. त्यामुळे काही काळ या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील नागरिकांनी आपल्याकडील आहे त्या भांड्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. खासगी टँकरही बोलवण्यात आलं. स्थानिक नागरिकांच्या घरातले बोअर चालू करून ही आग विझविण्याचा प्रयत्न झाला. अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.