Home Blog Page 43

घरगुती गॅसचा वापर पुरवठा विभागाची 3 हॉटेलवर कारवाई

0

बीड — इराण इजराइल अमेरिका युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून व्यावसायिक नफा कमवणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तीन हॉटेलवर पुरवठा विभागाने कारवाई केली आहे. या छाप्यामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे इंधन टंचाईचं संकट उभा राहिला आहे. घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना उपलब्ध व्हावं. यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावलं उचलत एस्मा कायदा लागू करत व्यावसायिक गॅस सिलेंडर चा पुरवठावर बंधन आणले आहे. यामुळे मोठमोठ्या शहरांमधील हॉटेलिंग व्यवसाय धोक्यात आला आहे. मात्र बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक वापरासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. जिल्ह्याचा पुरवठा विभाग ही याकडे आज पर्यंत कानाडोळा करत आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र बीडमध्ये सिलेंडरची उपलब्धता सर्वसामान्य जनतेला व्हावी या उद्देशाने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाने मोठी कारवाई पहिल्यांदाच केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील “श्री” हॉटेल, समाधान हॉटेल आणि रायगड हॉटेल वर छापा मारला. या हॉटेलमधून अवैध पद्धतीने नफाखोरीसाठी घरगुती गॅस वापर होत असल्याचे छाप्यात उघड झाले. या तीनही हॉटेलमधून घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर, मंडळ अधिकारी अनील तांदळे, तलाठी शब्बीर पठाण, तालुका पुरवठा विभागातील अवल कारकून श्रीराम वैभव आणि संतोष मुळीक यांनी केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या कारवाईमुळे हॉटेल, खानावळ, धाबे चालकांच्या धंद्याला लगाम लागणार असून गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर अशा कारवाया वाढवण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले.

पहिल्यांदाच ! कोमात असलेल्या हरीश राणाला इच्छामरणाची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

0

नवी दिल्ली —13 वर्षांपासून कोमात असलेल्या गाझियाबादच्या 31 वर्षीय हरीश राणा यांना इच्छामरणाची परवानगी देत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना मानली जात आहे.
न्यायालयाने हरीश राणा यांना जीवनरक्षक यंत्रणांवरून टप्प्याटप्प्याने हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले असून ती प्रक्रिया रुग्णाच्या सन्मानाचे भान ठेवून पार पाडली जावी, असे स्पष्ट केले आहे.

न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) हरीश राणा यांना उपशामक उपचार विभागात दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली जीवनरक्षक उपचार हळूहळू काढून टाकण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. न्यायालयाने यावेळी रुग्णाची प्रतिष्ठा आणि मानवी मूल्ये जपणे अत्यंत आवश्यक असल्याचेही नमूद केले.

हरीश राणा प्रकरण अत्यंत वेदनादायक आहे. दिल्लीमध्ये जन्मलेले हरीश राणा चंदीगडमधील पंजाब विद्यापीठातून बीटेकचे शिक्षण घेत होते. 2013 मध्ये ते वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली आणि ते कोमात गेले. त्यानंतर ते कधीच शुद्धीवर आले नाहीत. डॉक्टरांच्या मते त्यांच्या मेंदूतील नसांवर गंभीर परिणाम झाला असून त्या पूर्णपणे सुकल्या आहेत. त्यामुळे ते बोलू शकत नाहीत, कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत आणि पूर्णपणे लाइफ सपोर्ट सिस्टमवर अवलंबून आहेत.

अपघातानंतर गेल्या 13 वर्षांपासून हरीश राणा अंथरुणावरच आहेत. डॉक्टरांनी त्यांना ‘क्वाड्रिप्लेजिया’ या गंभीर अवस्थेत असल्याचे घोषित केले आहे. या स्थितीत रुग्णाच्या शरीराच्या चारही अवयवांवर नियंत्रण राहत नाही आणि तो पूर्णपणे फीडिंग ट्यूब व व्हेंटिलेटरवर अवलंबून राहतो. डॉक्टरांच्या मते अशा स्थितीत बरे होण्याची कोणतीही शक्यता नसते.

हरीश यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाने प्रचंड संघर्ष केला आहे. उपचारासाठी कुटुंबाला दिल्लीतील द्वारका येथील स्वतःचे घर विकावे लागले. सध्या ते गाझियाबादमधील दोन खोल्यांच्या छोट्या फ्लॅटमध्ये राहतात. हरीश यांचे वडील अशोक राणा पूर्वी ताज केटरिंगमध्ये नोकरी करत होते. निवृत्तीनंतर त्यांना दरमहा फक्त 3600 रुपयांची पेन्शन मिळते. घरखर्च भागवण्यासाठी ते शनिवार आणि रविवारी गाझियाबादमधील एका क्रिकेट मैदानावर सँडविच आणि बर्गर विकतात.

हरीशच्या उपचारावर दरमहा किमान 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च येतो. गेल्या अनेक वर्षांत औषधे, व्हेंटिलेटर, नर्सिंग आणि देखभाल यावर मोठा खर्च झाल्याने कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचले आहे. त्यातच दीर्घकाळ अंथरुणावर असल्यामुळे हरीश यांच्या शरीरावर गंभीर बेडसोर्स म्हणजे खोल जखमा निर्माण झाल्या आहेत आणि त्यांची प्रकृती सतत खालावत चालली आहे.

हरीश यांची आई निर्मला राणा यांनीच सर्वोच्च न्यायालयात इच्छामरणाची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी मुलाच्या बरे होण्याची आशा गमावली आहे. त्यांच्या पश्चात मुलाची काळजी घेणारे कोणीही नसल्याची भीती त्यांना सतावत आहे. मुलाला अशा अवस्थेत पाहणे त्यांच्या कुटुंबासाठी मानसिकदृष्ट्या अत्यंत वेदनादायक ठरत असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, भारतात इच्छामरणाच्या अधिकाराबाबत 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती. त्यानुसार अत्यंत गंभीर आणि असाध्य अवस्थेत असलेल्या रुग्णांसाठी काही अटींसह जीवनरक्षक उपचार मागे घेण्याची परवानगी देण्यात आली होती.

हरीश राणा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय मानवी प्रतिष्ठा, करुणा आणि वैद्यकीय नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर; बीड मधील काळाबाजारी कधी बंद होणार ?

0

बीड — सर्वसामान्य जनतेचे गॅस टंचाईमुळे हाल होऊ नयेत यासाठी केंद्र सरकारने एस्मा कायदा लागू केलेला आहे मात्र बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी सर्रास केला जात असल्याने होणारी काळाबाजारी कधी रोखली जाणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

जग एकीकडे इंधन टंचाईमुळे त्रस्त आहे. अशावेळी जनतेला घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने कडक पावलं उचलली आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर बंधन आणल्यामुळे सध्या तरी जनतेला घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होऊ लागला आहे. इराण युद्धामुळे आणखी किती दिवस इंधन टंचाई जाणवेल याचा अंदाज बांधणं अवघड झालेलं आहे अशावेळी
पेट्रोकेमिकल विभागातून गॅस वळवल्यामुळे दैनंदिन वापराच्या गॅस उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे केंद्र सरकार राज्य सरकार कडक पावलं उचलत असताना दुसरीकडे मात्र बीड शहरासह जिल्ह्यात
हॉटेल खानावळ, चहाची टपरी, चाट भांडार,धाबे आशा व्यावसायिक ठिकाणी गेल्या सर्रास घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जात आहे. त्यामुळे मोठमोठ्या शहरांमध्ये हॉटेलिंग व्यवसाय धोक्यात आलेला असताना बीडमध्ये मात्र अशा व्यवसायांना कुठलाच फरक पडला नाही.गॅस टंचाई जाणवली नाही. मात्र राजरोस होणाऱ्या या काळाबाजारी मुळे सर्वसामान्य जनतेला गॅस टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी जिल्हा पुरवठा विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत काळाबाजारीला खतपाणी घालत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवला तर याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.व्यावसायिक प्रतिष्ठानासह काळाबाजार करणाऱ्या लोकाविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होऊ लागली आहे.

महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल; राजभवनात पार पडला शपथविधी

0

मुंबई — जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिष्णू देव वर्मा यांना प्रशासन आणि राजकारणाचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच ते त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून ऊर्जा आणि ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. जिष्णू देव वर्मा हे मूळचे त्रिपुराचे असून त्यांचा संबंध त्रिपुराच्या राजघराण्याशी असल्याचेही सांगितले जाते. त्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अधिकृत जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. दरम्यान, त्यांच्या कार्यकाळात राज्यातील विविध प्रशासकीय आणि विकासात्मक कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गॅसचा तुटवडा अन् भारतात ‘एस्मा’ कायदा लागू

0

नवी दिल्ली — इराण युद्धाचे परिणाम जगभर जाणू लागले आहेत.महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्र सरकारने देशभरात एस्मा अर्थात ‘आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम कायद्या’ची अंमलबजावणी केली आहे. आखात देशांमध्ये सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

        भारतात केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा कायद्याचं अधिकृत नाव ‘इसेन्शीअल सर्व्हिसेस मेंटेनन्स अॅक्ट (एस्मा) 1971’ असे आहे. हा कायदा अत्यावश्यक सेवांचा अविरत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या सेवा सुरळीत असाव्यात या हेतूने हा कायदा तयार करण्यात आला आहे.

भारतीय संसदेने 1968 साली ESMA (आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम) हा कायदा मंजूर केला होता. आपातकालीन काळात आवश्यक सेवा आणि सुविधांचा विनाखंड पुरवठा सुरु राहावा, यादृष्टीने हा कायदा तयार करण्यात आला होता.

दैनंदिन वापरात लागणाऱ्या गोष्टी आणि सेवांचा एस्मा कायद्याच्या कार्यकक्षेत समावेश होतो. संपाच्या काळात कामगारांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. एस्मा ऍक्ट द्वारे घरगुती एलपीजी अर्थात गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होईल.

या सेवांमध्ये संप, कामबंद किंवा साठेबाजी झाली तर सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ नये, याकरिता सरकारला विशेष अधिकार दिले जातात. या कायद्यामुळे देशभरात आवश्यक वस्तूंची साठवणूक आणि काळा बाजार करण्यावर प्रतिबंध लागतो.

राज्य सरकार स्वतंत्रपणे किंवा अन्य राज्यांच्या मदतीने आपापल्या प्रदेशात या कायद्याची अंमलबजावणी करु शकते.

रुग्णालये, सार्वजनिक संरक्षण, स्वच्छता, जल पुरवठा, बँकिग सेवा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधित सेवा, पेट्रोलियम, कोळसा, वीज, पोलाद आणि खनिज उत्पादन आणि वितरणाशी निगडीत असलेल्या संस्था आणि कंपन्या एस्मा कायद्याच्या कक्षेत येतात.

सार्वजनिक वाहतूक, दळणवळण आणि खाद्यपुरवठा खरेदी आणि वितरण संबंधित सरकारी संस्थांना एस्मा कायद्याचे पालन करणे अनिवार्य असते. एस्माच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात खंड पडणार नाही याची काळजी सरकार घेते.

दरम्यान, संपामुळे होणारी गैरसोय, आर्थिक नुकसान, आरोग्य धोका टाळण्यासाठीच हा कायदा लागू केला जातो. सध्याच्या स्थितीमध्ये गॅस पुरवठा सुरळीत राहण्यासाठी लागू करण्यात आलेला एस्मा कायदा लागू करण्यात आला आहे.

दंड काय आकारला जातो?

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांनी संप पुकारला किंवा काम बंदचा इशारा दिला तर हा कायदा लागू होतो. कायदा लागू केल्यानंतर 6 महिने किंवा 6 वर्ष जाहीर कालावधीपर्यंत हा कायदा प्रभावी असतो. संप केल्यास, सेवा खंडित केल्यास संबंधित कर्मचारी, युनियन नेते आणि मुख्य अधिकारी यांना अटक करता येते.

पूर्वी एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जायचा आता हा दंड 3 लाखांपर्यंत करण्यात आला आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कारावासाचीही तरतूद कायद्यात आहे.

तसेच साठेबाजी विरोधात आणि अत्यावश्यक सेवेत अडथळा आणणाऱ्यां विरोधात कायद्याने कठोर कारवाई करण्यात येते. याशिवाय कर्मचाऱ्यांना अटक आणि दंडाची तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रात ‘मेस्मा’ कायदा

यावर आधारित महाराष्ट्रात असलेल्या कायद्याचं नाव महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम 2011 (मेस्मा) लागू झाला. 2023 मध्ये यात सुधारणा करून ‘महाराष्ट्र इसेन्शीअल सर्व्हिसेस मेंटेनन्स अॅक्ट 2023′( महाराष्ट्र इसेन्शियल सर्व्हिसेस मेन्टेनन्स ऍक्ट, 2023) (मेस्मा) म्हणून लागू करण्यात आला.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील रुग्णालये, दवाखाने, औषधी दुकाने, अत्यावश्यक सेवा जसे की एसटी, वीज, शिक्षण, अत्यावश्यक सेवा देणा-या अस्थापना यामध्ये सामान्य नागरिकांच्या रोजची कामे असतात, या कामात खंड पडू नये, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा कायदा अंमलात आणल्या जातो. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना संपा पासून परावृत्त करण्यासाठी सरकार या कायद्याचा वापर करते

गुटखा गोदामावर एलसीबीचा छापा पावणे दोन लाखाचा माल जप्त

0

बीड — पत्र्याच्या शेडमध्ये अवैध पद्धतीने साठवलेल्या बशीरगंज परिसरातील गुटखा गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून दीड लाखाचा मुद्देमालासह व आरोपीस अटक केली आहे.

शहरातील बशीरगंजमध्ये शेख इरफान जब्बार रा. जुनी भाजी मंडई बुंदेलपुरा, बीड याने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी सलमान रफिक बागवान रा. बशीरगंज, बीड याच्या सांगण्यावरून स्वतःच्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच सोमवारी दुपारी या ठिकाणी छापा मारला. या छाप्यामध्ये एक लाख साठ हजार 240 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला. यावेळी शेख इरफान या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सलमान रफिक बागवान हा फरार झाला आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. युनूस बागवान, गोविंद राख, अंकुश वरपे, स्वाती मुंडे, अशपाक सय्यद, मनोज परजणे, बबन सलगर, चालक नितीन वडमारे यांनी केली.

वय उलटले, लग्न नाही,मुलगी द्यायला कोणी तयार नाही फसवणुकीच्या चक्रव्यूहात तरुणाई ; विधानसभेत आ.सोळंकेची लक्षवेधी

0

मुंबई — माजलगावचे आ. प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या असून, लग्नासाठी मुलांनाच हुंडा द्यावा लागत आहे,’ अशा शब्दांत सोळंके यांनी ग्रामीण तरुणांची व्यथा मांडली. या परिस्थितीमुळे फसवणुकीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले असून, सरकार यावर काय उपाययोजना करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी ग्रामीण समाजात निर्माण होत असलेल्या या गंभीर सामाजिक प्रश्नावर सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
लक्षवेधी सूचनेदरम्यान बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले की, ‘मी ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतो आणि तिथली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आज प्रत्येक लहान-मोठ्या खेडेगावात २५ ते ३० वयोगटातील किमान ५० ते १०० तरुण असे आहेत, ज्यांचे वय उलटून गेले तरी लग्न झालेले नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे हे तरुण शेतीचा व्यवसाय करतात. आज ग्रामीण भागात शेती करणाऱ्या मुलाला मुलगी द्यायला कुणीही तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे.’

लग्नाच्या या टंचाईमुळे ग्रामीण भागात एक नवी आणि घातक प्रथा रूढ होत असल्याचे सोळंके यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, ‘पूर्वी मुलींकडून हुंडा घेतला जात असे, पण आता परिस्थिती उलटी झाली आहे. मुलाला लग्न करण्यासाठी मुलीच्या कुटुंबाला हुंडा द्यावा लागत आहे. या हतबलतेचा फायदा घेऊन फसवणुकीचे मोठे जाळे विणले जात आहे. ‘बोगस मुली’ आणून त्यांचे विवाह लावून दिले जातात. अडीच-तीन लाख रुपये लुटले. धक्कादायक म्हणजे, एकाच मुलीचे चार-चार विवाह लावून तरुणांना लुटण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.’
लग्नासाठी होणारी वणवण आणि समाजात मिळणारी वागणूक यामुळे ग्रामीण भागातील अविवाहित तरुण मोठ्या प्रमाणावर नैराश्यात जात आहेत. ‘लग्न होत नसल्याने अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत. हे केवळ एका कुटुंबाचे नुकसान नसून सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न आहे. अशा तरुणांचे विवाह लागावेत यासाठी सरकार काही विशेष योजना किंवा मदत करणार का?’ अशी विचारणा सोळंके यांनी केली आहे.

आमदार सोळंके यांनी मांडलेली ही वस्तुस्थिती राज्य सरकारने गांभीर्याने घेतली आहे. यावर उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, ‘आमदार प्रकाश सोळंके यांनी मांडलेली माहिती ही वर्तमान परिस्थितीचे वास्तव चित्र आहे. शासन या बाबीची गंभीर दखल घेणार असून संबंधित सूचनांचा अभ्यास करून आवश्यक त्या उपाययोजना आणि योजना तयार करण्याबाबत विचार केला जाईल,’ असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

आरटीई प्रवेशाची एक किलोमीटरची अट रद्द — उच्च न्यायालय

0

नागपूर — राज्य सरकारच्या आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या घरापासून फक्त एक किलोमीटरच्या परिसरातील शाळाच निवडता येईल अशी घातलेली अट उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. या निर्णयाचा पालकांना आरटीई अंतर्गत शाळा निवडण्यासाठी अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे.

आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. या कायद्याचा मुख्य उद्देश आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास कुटुंबांतील मुलांनाही दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी हा आहे. मात्र, या प्रवेश प्रक्रियेबाबत राज्य सरकारने अलीकडेच एक नवीन नियम लागू केला होता. या नियमानुसार आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून फक्त १ किलोमीटरच्या परिसरात असलेली शाळाच निवडता येणार होती. या अटीमुळे अनेक पालक आणि सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली.

ॲड. बोधी रामटेके आणि ॲड. दीपक चटप यांनी राज्य सरकारच्या या नियमाला आव्हान दिले. तसेच सामाजिक कार्यकर्ते आशिष फुलझेले आणि अनिकेत कुत्तरमारे यांनीही या विषयावर स्वतंत्र याचिका दाखल केली होती. या सर्व याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या १ किलोमीटरच्या अटीवर स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने स्पष्ट केले की, शिक्षण हक्क कायद्यात कुठेही विद्यार्थ्यांनी केवळ १ किलोमीटरच्या परिसरातील शाळाच निवडावी अशी अट नमूद केलेली नाही. हा कायदा केंद्र सरकारचा असल्यामुळे राज्य सरकारने त्यामध्ये अशा प्रकारची अट घालणे योग्य नाही. तसेच अशी अट लादणे म्हणजे एका हाताने विद्यार्थ्यांना अधिकार देणे आणि दुसऱ्या हाताने तो अधिकार काढून घेण्यासारखे असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडलेल्या मुद्द्यांनुसार, शिक्षण हक्क कायद्याचा उद्देश समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देणे हा आहे. मात्र, १ किलोमीटरची अट लागू केल्यास अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मर्यादित होते. त्यामुळे ही अट मनमानी, अवैध आणि संविधानाच्या भावनेला विरोध करणारी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. दरम्यान, न्यायालयाने राज्य सरकारच्या या अटीवर स्थगिती दिल्यामुळे आता पालकांना आपल्या मुलांसाठी आरटीई अंतर्गत अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या राहत्या घरापासून फक्त १ किलोमीटरपर्यंत मर्यादित न राहता इतर शाळांमध्येही प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे अनेक पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. तसेच या निर्णयामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत पुन्हा एकदा पालकांना अधिक स्वातंत्र्य मिळाल्याचेही मानले जात आहे

गेवराई बाजार समितीकडून  कांदा मार्केटचा भव्य शुभारंभ

0

कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराई — गेवराईसह बीड जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावत वाढलेले आहेत व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, वेळेत पैसे मिळावे व फसवणुक होऊ नये या दृष्टीकोनातून बाजार समितीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन गेवराई येथे कांदा मार्केट सुरु केलेले आहे. अनेक व्यापाऱ्यांशी संपर्क केलेला आहे आणि शेतकऱ्यांचा कांदा योग्य पध्दतीने लिलाव व्हावा जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यांची फसवणुक होवू नये यासाठी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीमध्ये लिलावासाठी आणावा असे प्रतिपादन जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई बाजार समितीकडून गेवराई शहरात कांदा माकेटचा भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

गेवराई बाजार समितीमध्ये नवीन फळे व भाजीपाला मार्केट यार्ड आणि भव्य कांदा लिलावाचा जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासहेब मोटे, खरेदीविक्री संघाचे उपाध्यक्ष गणपत राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शिवाजीराव मोटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, गेवराई बाजार समितीने कायम शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले. कोल्ड स्टोरेज झाल्यानंतर याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांच्या मालाला अधिकचा भाव मिळेल, नवीन मार्केट यार्ड येथे शेतकरी भवन बांधल्यानंतर शेतकरी मेळावा, मार्गदर्शन शिबीरे, आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन अशा प्रकारचे शेतकरी हिताचे आणि समजोपयोगी उपक्रम बाजार समितीच्या वतीने राबविण्यात येतील. अलिकडच्या काळात गेवराई तालुक्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झालेले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी गेवराई बाजार समिती कटिबध्द राहील. यावर्षी बाजार समितीच्या माध्यमातून कांदा लिलावाचा पहिला प्रयोग केलेला आहे तो शंभर टक्के यशस्वी करू, शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळावा, त्यांची फसवणुक होऊ नये म्हणून हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीत जास्तीत जास्त प्रमाणात आणावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

याप्रसंगी जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, किसान सेलचे सुनिल पाटील, गजानन काळे, नंदकिशोर गोर्डे, गेवराई न.प.गटनेते शेख खाजामामू, शाहरूख पठाण, शांतीलाल पिसाळ, चंद्रकांत पंडित, बाबूराव काकडे, बप्पासाहेब घाटूळ यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, रामभाऊ चाळक, कृष्णा राऊत, हनुमान कोकणे, बाबुराव जाधव, रमेश साखरे, जगन्नाथ शिंदे, सुभाषराव मस्के, शिवाजी मोटे, दिनकर काळे, पांडुरंग कोळेकर, अशोक लांडे, शंकर पवार, शंकर तौर, संभाजीराव पवळ, साळीकराव चव्हाण, खालेद कुरेशी, श्रीराम आरगडे, अण्णा गव्हारे, विकास सानप, बिपीन डरपे, बळीराम साबळे, गोकुळ चोरमले, शरद आष्टेकर, बाळकृष्ण सोनकांबळे, कांदा उत्पादक शेतकरी नारायण राऊत, लहूराव राऊत, रावसाहेब कापले, विकास आगलावे, जालिंदर कोळेकर, सतिष कदम, हनुमान दिवे, अशोक शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महादेव मुंडे खून तपास प्रकरणी खोटी माहिती पसरवल्यास कायदेशीर कारवाई – पोलिसांचा इशारा

0
खोटे आरोप करणाऱ्या राजाभाऊ फड यांच्यावर कारवाई होणार?

बीड — जिल्ह्यातील परळी तालुक्यात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या आणि संपूर्ण राज्यभर गाजलेल्या महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाबाबत खोटी माहिती किंवा अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बीडच्या विशेष तपास पथकाने (SIT) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

सदर प्रकरणातील तपास, विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचे अहवाल व इतर तपासाशी संबंधित माहिती ही अत्यंत गोपनीय स्वरूपाची असून ती कुठेही प्रसिद्ध किंवा प्रसारित करण्यात आलेली नाही, तसेच ती प्रसारमाध्यमे किंवा सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, परळी शहरातील शरदचंद्र पवार गटाचे राजाभाऊ फड या कार्यकर्त्याने दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन महादेव मुंडे खून प्रकरणात काही लोकप्रतिनिधींवर बेछूट आरोप केले होते. हे आरोप करताना ब्रेन मॅपिंग व लाई डिटेक्टर चाचणीतून पुढे आलेली माहिती आपल्याला समजली असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात मोठी खळबळ उडाली होती.

मात्र आता स्वतः पोलिसांनीच प्रसिद्धीपत्रक काढून या प्रकरणात स्पष्ट खुलासा केल्याने अशा प्रकारची माहिती अधिकृतपणे कोणालाही देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खोटी माहिती देऊन अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे परळी शहर, जि. बीड येथे गुन्हा क्र. 191/2023, भा.दं.वि. कलम 302 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या या गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक (SIT), बीड यांच्या मार्फत सुरू आहे. तपासादरम्यान काही संशयित इसमांच्या पॉलीग्राफ (लाई डिटेक्टर), BEOS / ब्रेन मॅपिंग तसेच व्हॉईस अॅनालिसिस अशा मानसशास्त्रीय चाचण्या करण्यात आलेल्या आहेत.

या चाचण्यांचे अहवाल अत्यंत गोपनीय स्वरूपाचे असून ते तपास यंत्रणेकडे सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. हे अहवाल कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, प्रसारमाध्यमांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेले नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अलीकडे या प्रकरणाबाबत विविध माध्यमांतून तसेच सोशल मीडियावरून अप्रमाणित माहिती व अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणीही खोटी माहिती प्रसारित करत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक, बीड यांच्यामार्फत योग्य पद्धतीने व पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेनुसार सुरू असून तपासाच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची सखोल पडताळणी करण्यात येत आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.