Home Blog Page 42

कायद्याचा धाकच संपला ! ज्यूस सेंटर मधील वेटर बाजूला व्हा म्हटला अन् चौघांनी तो आपटू आपटू  हाणला !!

0

तेलगाव — कायद्याचा धाक नसल्याने रोज मारहाणीच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. ज्यूस सेंटर मध्ये काम करणाऱ्या मजुराला चार-पाच जणांच्या टोळक्याने क्षूल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना तेलगाव मध्ये घडली आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तेलगाव येथील चौकात असलेल्या त्रिमूर्ती ज्यूस सेंटरमध्ये सागर विजय जाधव हा तरुण वेटरचं काम करतो. नेहमीप्रमाणे तो हॉटेलमधील काम करत असताना ही घटना घडली. सागर जाधव रिकामे ग्लास जिन्यावरून खाली आणत असताना जिन्याजवळ काही तरुण उभे होते. पुढे जाण्यासाठी जागा मिळावी म्हणून त्याने त्या तरुणांना “पायरीवरून थोडे बाजूला व्हा” असे सांगितले.
मात्र यातून गैरसमज करून एका तरुणाने सागर जाधवला अडवले आणि त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. संबंधित तरुणाने सागरला ज्यूस सेंटरच्या बाहेर खेचले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांनीही सागरला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.या मारहाणीत सागर जाधव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. किरकोळ कारणावरून तरुणाला अशा प्रकारे मारहाण केल्यामुळे कायद्याचा धाक उरला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

0

मुंबई — दि. 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही.

सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना रोटरी क्लबचा ” चंपावतीरत्न” पुरस्कार

0

बीड —  रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने देण्यात येणारा मानाचा चंपावतीरत्न पुरस्कार यंदा राज्याचे माजी मंत्री जयदत्तआण्णा क्षीरसागर यांना देण्यात येणार आहे दि 22 मार्च रोजी हॉटेल निलकमल मध्ये ग्लोबल विकास ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी मयंक गांधी आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3132चे गव्हर्नर रो सुधीर लातुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल याप्रसंगी रोटरीचे डिस्ट्रिक्ट लर्निंग फ़ेसीलेटर रो ओम मोतीपवळे रोटरी माजी गव्हर्नर रो हरीश मोटवाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे
बीड शहराच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गणमान्य व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो यापूर्वी हा पुरस्कार अभिनेते मकरंद अनासपुरे
स्व केशरबाई क्षीरसागर वे शा स धुंडीराज महाराज पाटांगणकर श्रीहरी तुंगार रामप्रसादजी राठी स्व स्व मोतिरामजी वरपे डॉ श्रीहरी लहाने सुभाषचंद्र सारडा श्री शिवाजीराव पंडित संपादक स्व नामदेव क्षीरसागर आदी मान्यवरांना देण्यात आला आहे
या पुरस्कार सोहळ्यास शहरातील सर्वच सामाजिक आणि सेवाभावी संस्थेतील सदस्यांनी तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन
प्रोजेक्त चेअरमन सीए सुरेश लड्डा रोटरी क्लब अध्यक्ष विकास उमापूरकर सचिव सुमित जैस्वाल यांनी केले आहे

85 लाखाच्या अपहार प्रकरणी खोकरमोहाचे सरपंच श्रीहरी मिसाळ वर अपात्रतेची कारवाई

0

बीड — ग्रामपंचायतीच्या निधीचा गैरवापर, १५ व्या वित्त आयोगाच्या कामात अपहार आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शिरूर कासार (जि. बीड) तालुक्यातील खोकरमोहा ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीहरी अर्जुनराव मिसाळ यांना विभागीय आयुक्तांनी सरपंच पदावरून अपात्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?

​खोकरमोहा येथील रहिवासी सुधाकर विठ्ठलराव मिसाळ यांनी सरपंच श्रीहरी मिसाळ यांच्याविरुद्ध विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) अन्वये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत सरपंचांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोणतीही कामे न करता ७ लाख ४७ हजार ६५५ रुपयांचा अपहार केल्याचे म्हटले होते. तसेच, ‘तंटामुक्त गाव योजना’ खात्यातून १० लाख ९१ हजार रुपये काढून त्याचाही अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

चौकशीत काय निष्पन्न झाले?

​या प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत करण्यात आली. चौकशी अहवालात खालील धक्कादायक बाबी समोर आल्या:
​निधीचा अपहार: १५ व्या वित्त आयोगातून कामे न करताच निधी हडपल्याचे सिद्ध झाले.
​कागदपत्रांची दडपछाप: चौकशी समितीला महिला ग्रामसभा, मासिक सभा यांचे प्रोसिडिंग रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नाही.

फौजदारी गुन्हा:

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सरपंचांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४०९ व ४२० अन्वये आधीच गुन्हा (F.I.R. No. 0217/2024) दाखल करण्यात आला आहे.
​प्रशासकीय कारवाई: तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याला यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित आहे.

विभागीय आयुक्तांचा अंतिम आदेश

​दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सीईओ बीड यांचा फेरचौकशी अहवाल विचारात घेऊन विभागीय आयुक्त जितेंद्र पाथळकर यांनी ५ मार्च २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सरपंचांनी पदाचा दुरुपयोग करून शासकीय निधीचा अपहार केल्याचे स्पष्ट झाल्याने, त्यांना तात्काळ प्रभावाने सरपंच पदावरून अपात्र करण्यात आले आहे. तसेच, अपहार केलेली रक्कम संबंधितांकडून व्याजासह वसूल करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मारू नका ना वंऽऽ पत्नीची विनवणी तरीही ऊसतोड मजुराला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मारहाणीच्या घटना बीड जिल्ह्यात नेहमीच घडत असल्याचं व त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. असाच एक ऊसतोड कामगाराला बागायतदाराकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना धारूर तालुक्यातील खारेवाडी भागात घडली. ऊसतोड कामगाराला बेदम मारहाण करत असताना मारू नका ना वं असं म्हणत आक्रोश करताना दिसून येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

गणेश बाळासाहेब वाघ असं ऊसतोड कामगाराचं नाव आहे. धारूर तालुक्यातील खरेवाडी येथे उसाच्या वाड्याला कांडी का ठेवली असं म्हणत चार ते पाच जणांनी गणेश वाघ याला काठी लाठ्यासह बेदम मारहाण केली. या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हायरल व्हिडिओत आरोपींनी गणेश वाघच्या नरड्यावर पाय दिल्याचं दिसत आहे. मारहाण होत असताना त्याची पत्नी मारू नका ना वं असं म्हणून ओरडताना देखील ऐकू येत आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गब्बू खाडे, श्रीकांत खाडे, अजय वसंत खाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ऊसतोड कामगाराच्या भावाला व पत्नीला देखील मारहाण झाल्याचं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.खारेवाडी भागात घडलेल्या मारहाणीच्या घटनेत ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.या घटनेमुळे ऊसतोड कामगाराचं संपूर्ण कुटुंब प्रचंड घाबरलेलं आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा बीड चर्चेत आले असून पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं बोललं जात आहे.

वन्यजीव धोक्यात : वनविभागातील कृत्रिम पाणवठे कोरडे ; वन्यप्राण्यांची वस्तीकडे धाव

0

बीड – सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नैसर्गिक पाणीस्रोत असलेल्या तलाव, साठवण तलाव आणि धरणांतील पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी बीड तालुक्यातील करचुंडी वनक्षेत्र अंतर्गत बेलगाव, पिंपरनई, फुकेवाडी, सोमनाथवाडी परिसरातील वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे कोरडे पडले आहेत.

यामुळे हरीण, मोर, लांडोर, वानर आदी वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असून ते पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे तसेच गाव तलावांकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

वनविभागाने तयार केलेले अनेक कृत्रिम पाणवठे कोरडेठाक पडले असून त्यामध्ये नियमितपणे पाणी सोडले जात नाही. काही ठिकाणी महिनाभरापूर्वी सोडलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ साचल्याने ते पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे.

वन्यजीव पाण्यासाठी मानवी वस्तीकडे येत असल्याने त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याचा तसेच अज्ञात वाहनांच्या धडकेत जीव गमावण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमितपणे स्वच्छ पाणी सोडून वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

लक्षवेधी ! खरवंडी — राजूरी महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाची अनियमितता ;आ.क्षीरसागर आक्रमक

0
बीड — राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ खरवंडी ते नवगन राजुरी रस्त्यासंबधी आ.संदीप क्षीरसागर यांनी लक्षवेधी मुद्दा उपस्थित करीत या रस्त्याचे काम मागील अनेक वर्षापासून रखडले आहे. हा रस्ता पूर्ण होणार की, नाही ? रस्त्याचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून याची आयआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांची चौकशी करण्याची मागणीही आ.क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.
             राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ चे काम पूर्ण करण्याचा कालावधी हा १८ महिन्यांचा होता. मात्र ९ वर्ष झाले तरी हा रस्ता अपूर्ण असून, आजही २५ टक्के काम राहिलेले आहे. तसेच या रस्त्याचे काम करणान्या कंत्राटदाराला ६० टक्क्‌यांपेक्षा जास्त रकम देण्यात आली आहे. काम रखडण्याचे कारण कोरोना आणि भूसंपादन असल्याचे सांगितले जात आहे. पण कोरोना काळ हा दोन वर्षांचा होता, तर १० टक्के भूसंपादन राहिले आहे. राष्ट्रीय महामार्गाची वर्क ऑर्डर निघण्याआधी पूर्ण होत असते तरीही यात हलगर्जीपणा झाला आहे. १० टके भूसंपादन ९ वर्षात पूर्ण करु न शकणारे अधिकारी, कर्मचारी याला कारणीभूत असल्याच सांगितले आहे. तसच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या मात्र त्याचा मोबदला ही मिळाला नसल्याचे आ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या लक्षवेधी सूचनेत सांगताना रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून यापेक्षा पाणंद रस्ता बरा असे सांगत याची आयआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, यासोबतच हे काम कधीपर्यंत पूर्ण होणार आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. यावर मंत्र्यांनी उत्तर देताना भूसंपादन मावेजासाठी केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली असून, येत्या मे महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांच्याकडे पदवी नसतानाही कार्यकारी अभियंता पदाचा, अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. यामुळे यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली. याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यासंदर्भात सविस्तर चौकशी करण्याचीही घोषणा केली.
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची उंची वाढवून सुशोभीकरण करण्याची केली मागणी
बीड शहरापासून जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील महालक्ष्मी चौकात छत्रपती संभाजी महाराज पांचा पुतळा उभारण्यात आला आहे. याठिकाणी काही दिवसांत उड्डाणपूल होणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकाच्या धर्तीवर या पुतळ्याची उंची वाढवून सुशोभीकरण करण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी याच लक्षवेधी मांडताना केली. याला ही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

फार्मर आयडी मधील तांत्रिक त्रुटी महिनाभरात दुरुस्त होणार

0

आ. विजयसिंह पंडित
यांच्या लक्षवेधी सूचनेला कृषी मंत्र्यांचे उत्तर

मुंबई —  फार्मर आयडी हा शेतकऱ्यांचा एकमेव ओळख क्रमांक असून शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी तो महत्वाचा आहे. फार्मर आयडी ची नोंदणी करताना शेतजमीनीच्या क्षेत्रातील तफावत, गट क्रमांक, नावातील चुका, गावाच्या नावातील बदल यांसह अनेक तांत्रिक त्रुटी झाल्यामुळे हजारो शेतकरी शासन योजनांच्या रास्त लाभापासून वंचित आहेत. वांरवार तक्रारी देऊनही फार्मर आयडी मधील त्रुटींची दुरुस्ती होत नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गऱ्हाणे आ. विजयसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून थेट विधानसभेत मांडले. कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय बैठक घेऊन एक महिन्यात फार्मर आयडी मधील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करून दिल्या जातील असे आश्वासन दिले आहे. नादुरुस्त फार्मर आयडीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आ. विजयसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.

सन २०२३ मध्ये बीड जिल्ह्यात फार्मर रजिस्ट्री पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला, पायलट प्रोजेक्ट राबविताना शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या फार्मर आयडीमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक चुका झाल्या, अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र १.९९ हेक्टर नोंद झाले परिणामी नादुरुस्त फार्मर आयडीमुळे अनेक शेतकऱ्यांना शासन योजनांच्या रास्त लाभापासून वंचित रहावे लागले. फार्मर आयडी दुरुस्त करणे संदर्भात सर्वाधिक तक्रारी गेवराई विधानसभा मतदार संघातून येत होत्या. आ. विजयसिंह पंडित यांनी याप्रकरणी पुढाकार घेऊन तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेतल्या, स्थानिक स्तरावर फार्मर आयडीमधील त्रुटी दूर करण्याची यंत्रणा नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे राज्याच्या जमाबंदी आयुक्तांकडे या बाबत सविस्तर माहिती दिली. तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे आ. विजयसिंह पंडित यांनी हा विषय लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला.

आ. विजयसिंह पंडित यांनी या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करताना शासनाच्या महा डीबीटी वरील सर्व योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पिक विमा, नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान, कर्जमाफी यांसह शासनाच्या ई-सेवासाठी फार्मर आयडीचा उपयोग होत असल्याचे सांगितले. शासन योजनांचा लाभ घेण्यासाठी क्षेत्र मर्यादा २ हेक्टर असल्यामुळे आणि फार्मर आयडीमधील चुकीच्या नोंदीमुळे सुमारे २ लाख ४१ हजार शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीवर १.९९ हेक्टर क्षेत्राची नोंद झाल्यामुळे हे शेतकरी शासन योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. फार्मर आयडी दुरुस्त करण्याची सुविधा तालुकास्तरावर करा, ॲग्री स्टॅक प्रणालीमध्ये नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भाने तक्रारींचा निपटारा लवकर करा, गट नंबर, गाव तालुक्यातील बदल, मोबाईल नंबर दुरुस्त करणे आदी लहान-सहान बदलांबाबतचे अधिकार तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांना द्या, फार्मर आयडीमधील दोषमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबवून तालुकास्तरावर वेगळा संगणक कक्ष उभारा अशी मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी विधानसभेत केली.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून आ. विजयसिंह पंडित यांनी उपस्थित केल्याचे सांगताना राज्याचे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी याप्रकरणी महिनाभरात बीड जिल्ह्यातील विशेषतः गेवराई विधानसभा मतदार संघातील फार्मर आयडीच्या दुरुस्ती करणार असल्याचे आश्वासित केले. जमाबंदी आयुक्त, ॲग्री स्टॅकचे संचालक, तंत्रज्ञ आणि सेंट्रल प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिटची टिम यांच्यासोबत आ. विजयसिंह पंडित यांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन करून सर्व फार्मर आयडी दुरुस्त करून दिले जातील असे त्यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नाला सभागृहात वाचा फोडून या बाबत कार्यवाहीचे आश्वासन मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी आ. विजयसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले आहे.

अवैध वाळू वाहतुक करणारा हायवा पकडला; साडे अठरा लाखाचा मुद्देमाल जप्त

0

गेवराई — अवैध वाळू वाहतूक करणाऱा हायवा पोलिसांनी पकडला असून साडेअठरा लाख रुपयांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी पहाटे करण्यात आली.


पोलीस ठाणे गेवराई येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हिमांशु नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने बुधवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास संभाजी चौकाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील झमझम पेट्रोल पंप परिसरात नाकाबंदी केली होती.यावेळी बीडकडे वाळू भरून जाणारा एक हायवा येताना दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. चालकाने आपले नाव साहिल शांताराम कापसे वय २० वर्ष, रा. अचानक नगर, गेवराई असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आले.पोलिसांनी एमएच-१२-क्यूडब्ल्यू-४२२२ क्रमांकाचे हायवा वाहन (अंदाजे किंमत १८ लाख रुपये) तसेच सुमारे ३० हजार रुपये किमतीची पाच ब्रास वाळू असा एकूण १८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चालक साहिल कापसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

लाडकी बहिण’ योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक, आरोपी अटक

0

बीड — ‘लाडकी बहिण’ योजनेच्या नावाखाली समाज कल्याण विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन व भांड्यांचे किट देण्याचे आमिष दाखवत ऑनलाईन पैसे उकळणाऱ्या आरोपीला अंमळनेर पोलिसांनी जालन्यातून अटक केली आहे.
गोरक्षनाथ नवनाथ पन्हाळकर रा. नाळवंडी, ता. पाटोदा, ह.मु. तळेगाव, जि. बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलांना फोन करून आपण समाजकल्याण विभागातून बोलत असल्याचे सांगितले. “तुमची शासनाच्या ‘लाडक्या बहिणी’ योजनेत विशेष निवड झाली असून तुम्हाला पिठाची गिरणी, शिलाई मशीन व भांड्यांचे किट देण्यात येणार आहे,” असे सांगून विश्वास संपादन केला. मात्र या वस्तू पाठविण्यासाठी वाहतूक खर्च म्हणून आधी ऑनलाईन पैसे पाठवावे लागतील, असे सांगत फोन-पेवर रक्कम पाठवण्यास सांगितले.या आमिषाला बळी पडत पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील पाच महिलांनी मिळून सुमारे ९ हजार रुपये आरोपीला पाठवले. मात्र पैसे पाठवूनही कोणतीही वस्तू न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने १५ फेब्रुवारी २०२६ रोजी अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला. तपासादरम्यान सुमारे २५ ते ३० मोबाईल क्रमांकांचे सीडीआर काढून हजारो मोबाईल क्रमांकांची पडताळणी करण्यात आली. आरोपी वारंवार सिम कार्ड बदलत तसेच मोबाईल सुरू-बंद करत असल्याने तपासात अडचणी येत होत्या. मात्र तांत्रिक मदतीच्या साहाय्याने आणि बारकाईने तपास करत पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर ९ मार्च २०२६ रोजी जालना येथील रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश बहिरवाळ, दिलीप घोशीर, पूजा तिपटे व शितल पवळ यांनी केली. पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बबन शिंदे, विलास माळी, भरत राठोड, शाम खाडे, संतोष कसाब, गणेश गोसावी, मारुती म्हेत्रे, शत्रुघ्न दिंडे व चालक ईसूफ शेख हे करीत आहेत.