Home Blog Page 38

बीडचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर:241 कोटीचा भूसंपादन घोटाळा, 73.4 कोटींचा अपहार; 10 जणांविरोधात फौजदारी

0

बीड — जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे बनावट आदेश व जुन्या तारखांच्या आधारे
राष्ट्रीय महामार्गाच्या 154 प्रकरणातील लवाद प्रकरणात 241.62 कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर केला. यामध्ये 73.4 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली आहे.याप्रकरणी दहा जणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आहेत.तर तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अप्पर जिल्हाधिकारी, तहसलीदार महसूल आणि भूसंपादन कार्यालय बीड कार्यालयास भेटी दिल्या. तसेच जायकवाडी प्रकल्प भूसंपादन आणि उपविभागीय अधिकारी बीड ही कार्यालये तपासली.या दरम्यान काही संचिकांची तपासणी करण्यात आली. भूसंपादन लवाद प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव व पदनाम लिहून वाढीव भूसंपादनाचे आदेश मंजूर केले. त्यावरच्या तारखाही जुन्या होत्या.भ्रमणध्वनी वरील संभाषणातून ही बाब उघडकीस आली.

जुन्या तारखेची 40 प्रकरणे आणखी केले जातील असे उल्लेख असणाऱ्या ध्वनीफिती जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीत आढळून आल्या.1मार्च ते 17 एप्रिल 2025 दरम्याच्या 154 बनावट आदेशाव्दारे 241.62 कोटी रुपयांची वाढीव रक्कम मंजूर असल्याचे कागदपत्र तयार करण्यात आले. या कागदपत्राच्या आधारे छत्रपती संभाजीनगरच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातून 73 कोटी रुपयांचा निधी मिळवून त्याचे वितरण करण्यात आले. 17 एप्रिल रोजी असे 50 बनावट आदेश मंजूर करण्यात आले. त्यादिवशी कोणताही पक्षकार हजर नव्हता. त्यामुळे हा प्रकार संशास्पद असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आले.भूसंपादनातील अधिकारी, कर्मचारी, वकील यांनी संगनमताने हा कोट्यावधीचा घोटाळा केल्याचे दिसून आल्यानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती पाहता बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणात महसूल मधील गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या घोटाळ्यात परळी तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे , अविनाश चव्हाण (कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर, भूसंपादन समन्वय कार्यालय), शेख अजहर शेख बाबू (कंत्राटी ऑपरेटर भूसंपादन जायकवाडी प्रकल्प कार्यालय) व त्रिबंक पिंगळे (सेवानिवृत्त कंत्राटी कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड), पांडुरंग पाटील (सहायक महसूल अधिकारी, भूसंपादन समन्वय कार्यालय) राऊत (राष्ट्रीय महामार्ग कार्यालय), ॲड. एस. एम. नन्नवरे, ॲड.नरवडकर,ॲड. पिसूरे, ॲड.प्रवीण राख यांची नावे आहेत.

अ‍ॅड. असिम सरोदेंवरील कारवाईला स्थगिती! बार काऊन्सिल ऑफ इंडियाचा निर्णय

0

नवी दिल्ली — मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या आदेशाला बार काऊन्सिल ऑफ इंडियानं स्थगिती दिली आहे. त्यामुळं अॅड. सरोदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी असीम सरोदे यांच्यावर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी कारवाई केली होती. पण ही कारवाई अत्यंत टोकाची असल्याचा आरोप यापूर्वी सरोदे यांनी केला होता. पण हे प्रकरण खरोखरच वकिली व्यवसायाच्या गैरवर्तवणुकीचं आहे का? याबाबत सखोल चौकशी करुनच सनद निलंबित करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, असं मत या निर्णयाला स्थगिती देताना बार काऊन्सिल ऑफ इंडियानं व्यक्त केलं आहे. तसंच यावर पुढील सुनावणी लवकरच घेण्यात येईल असं जाहीर केलं.बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या या स्थगिती आदेशावर व्यक्त होताना अॅड. असिम सरोदे यांनी ट्विट केलं असून “सत्य परेशान हो सकता है, पराभूत नही. सत्याचा विजय होण्याची सुरुवात कधीतरी होत असते. बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे आभार! मी पुन्हा येतोय… असं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या पक्ष चिन्हाच्या खटल्यात उध्दव ठाकरे यांची बाजू मांडणाऱ्या असीम सरोदे यांची सनद अचानक 3 नोव्हेंबर 2025 रोजी तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली होती. 12 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी असताना या सुनावणीच्या तोंडावरच ही कारवाई करण्यात आल्यानं यामागे राजकीय कट-कारस्थान असल्याचा संशय खुद्द सरोदे यांनी व्यक्त केला होता. महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनने हा निर्णय घेतला होता. सरोदे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावरुन आपल्या केसबाबत बोलताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्षांविषयी टीकात्मक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानामुळं वकिलांच्या व्यवसायाला धक्का बसल्याचं कारण देत त्यांची सनद रद्द करण्यात आली होती.

“शितल” छत्रछायेत अवैध धंद्यांना ऊत; डीवायएसपी पवार यांच्याकडून हवाला रॅकेट उध्वस्त

0

बीड — अवैध धंद्यांच्या बाबतीत “शितल” भूमिका घेत हप्ते खोरीत “बल”लावत “लाळ टपकवणाऱ्या ठाणे प्रमुखाच्या कारभारामुळे एलसीबी असो की डीवायएसपी यांच्यावर अवैध धंद्यांच्या बाबतीत कारवाई करण्याची वेळ आली आहे. डीवायएसपी पूजा पवार यांनी हवाला रॅकेटवर कारवाई करत 17 लाख रुपयांची रोकड शहर पोलीस ठाणे हद्दीत जप्त केली आहे.ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये पूजा पवार यांनी ही मोठी कारवाई केल्याने शहरात मोठया प्रमाणावर शहर ठाणे प्रमुखाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.
बस स्थानकासमोर सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात डी वाय एस पी ना दोन वेळा कारवाई करावी लागली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने झमझम कॉलनीत कारवाई करून लाखोंचा गुटखा जप्त केला. या तीन कारवाया चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या. मात्र तरीही अवैध धंद्यांना आपल्या छत्रछायेत बळ देण्याचं काम शहर पोलीस ठाणे प्रमुखांकडून होत आहे. तर याच ठाणे प्रमुखावर पोलीस अधीक्षकांचा प्रचंड विश्वास तर आहेच शिवाय आशीर्वाद देखील आहेत. असा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. बीडमध्ये ठाणे प्रमुखांची खांदेपालट झाली. मात्र शहर पोलीस ठाणे प्रमुखाची खुर्ची यामुळेच बळकट राहिली की काय? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित केला जात होता. दरम्यान नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना देखील अवैध धंद्यांना आळा घालावा गुन्हेगारी कमी करावी याची उपरती शहर पोलीस ठाणे प्रमुखाला झाली नाही. त्यामुळे आजही राजरोस अवैध धंदे सुरूच आहेत. जर डीवायएसपींनी, स्थानिक गुन्हे शाखेंच्या पथकानेच कारवाया करायच्या अवैध धंद्यांना आळा घालायचा प्रयत्न करायचा तर ठाणे प्रमुख बुजगावण्याचीच भूमिका घेत राहणार का? नुसता अवैध धंद्यांनाच ते आशीर्वाद देणार का ? हप्ते खोरीतच आत्म मग्न राहणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ठाणे प्रमुखाच्या बुजगावण्या भूमिकेचाच  परिपाक म्हणून निवडणुकीच्या रणधुमाळीत हवाला रॅकेट उध्वस्त करण्याची गरज डी वाय एस पी पूजा पवार यांना वाटली.मसरत नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये पैशांचा बाजार भरवून हवाला सुरु असल्याची माहिती डीवायएसपी पूजा पवार यांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी त्यांच्या टीम ने छापा मारला असता घरात 17 लाखांची रोकड आढळून आली आहे. यावेळी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून सध्या शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक पूजा पवार, एपीआय पुजारी, सचिन आगलावे, मनिषा केदार यांनी केली आहे.

पोलीस आपल्या बांधावर हि एसपींची संकल्पना हवेतच विरली; उदंड वडगावातील रक्तरंजित थराराने जनता हादरली!

0

बीड — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी “पोलीस आपल्या बांधावर”ही संकल्पना नेहमीसारखीच तोंडातून निघालेल्या वाफेसारखीच ठरली. शेतीच्या वादातून चौघा जणांना लोखंडी पाईप, रॉड आणि लाठ्या काठ्याने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना उदंड वडगाव येथे घडली.
संतोष देशमुख हत्याकांडाने राज्य हादरले गेले. त्यानंतर पोलीस दलाचा भार पोलीस अधीक्षक नवनीत कांवत या प्रामाणिक अधिकाऱ्यावर सोपवण्यात आला.ते प्रामाणिक जरी असले तरी पोलीस दलातील अधिकाऱ्यावरचा अतिविश्वास कायदा सुव्यवस्थेला घातक ठरवू लागला आहे. मारहाणीच्या घटनांचे अनेक व्हिडिओ संतोष देशमुख प्रकरणानंतर देखील समोर आले. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असले माध्यमामधून याची वाच्यता केली जात असली तरी माध्यमांकडे दुर्लक्ष करण्याचं धोरण सर्वसामान्यांच्या अंगलट येऊ लागला आहे. नेकनूर सारख्या ठिकाणी तर पोलीस यंत्रणेवरचा विश्वास देखील ठाणे प्रमुखाच्या कार्यशैलीमुळे उडाला आहे. पोलीस अधीक्षकांच्या पोलीस अधिकाऱ्यांवरच्या दुर्लक्षामूळे आराजकतेला खतपाणी घातले जात आहे. परिणामी “पोलीस आपल्या बांधावर”हा उपक्रम पोलीस अधीक्षकांनी राबवला संवादातून शेतीचे वाद विवाद मिटवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा असे आवाहन देखील केले. मात्र जिथे ठाणे प्रमुखानेच विश्वास गमावला तिथे शेतकरी जाणार कसा? यातूनच उदंड वडगाव मध्ये शेतीच्या वादातून रक्त रंजीत थरार घडला गेला. याचा व्हिडिओ समाज माध्यमात सध्या धुमाकूळ घालत आहे.जमिनीची मोजणी चव्हाण कुटुंबीयांनी केली. भावकीतीलच शेजाऱ्याकडे एक एकर शेती जास्तीची असल्याचे यात स्पष्ट झाले. तुम्हीही जमिनीची मोजणी करून आमचं क्षेत्र आम्हाला परत द्या असं सांगितलं गेलं. तोपर्यंत जास्तीचं तुमच्याकडे गेलेल क्षेत्र वहिवाटू नका असही सांगितलं मात्र यातून वाद उफाळला गेला.सात-आठ लोकांच्या गटाने चार जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीसाठी लोखंडी रॉड लाठ्या काठ्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. हा वाद पाहून गावातील बरेच जण घटनास्थळी धावून आले. या मारहाणीत एकाच्या कानाजवळ तेरा टाके पडले आहेत. हात मोडल्यामुळे हातात राॅड टाकावे लागल्याच सांगितलं जात आहे. ‌समाधान चव्हाण, मनोज चव्हाण, जीवन चव्हाण आणि सुदाम चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीड मधील जीवन ज्योती खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची नेकनूर पोलीसात तक्रार देऊन देखील फारसा प्रतिसाद तक्रारदाराला मिळाला नाही. माणसं मरणाच्या दारात पोहोचली तरी पोलिसांना जवाब घ्यायला लवकर वेळ मिळाला नाही. कसंतरी जखमींचा जवाब नोंदवला मात्र एफ आय आर दाखल करून घेत कारवाई करण्यास वेळ मिळाला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

माजलगावात होलसेल दुकान फोडून दहा लाखाच्या सिगरेट पळवल्या

0

माजलगाव — जिल्ह्यात सर्वत्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.गजानन नगर रोडवर असलेल्या श्रीकृष्ण ट्रेडर्स या होलसेल दुकानाचे शटर वाकून चोरट्याने आतील दहा लाख रुपये किमतीचे सिगारेटचे आठ बॉक्स व नगदी 75 हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चार चोरट्याविरुद्ध माजलगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गजानन रोडवर श्रीकांत श्रीनिवास रुद्रवार यांचे श्रीकृष्ण ट्रेडर्स हे होलसेल दुकान असून ते नेहमीप्रमाणे रविवारी रात्री लवकर दुकान बंद करून गेले होते. सोमवारी त्यांना सकाळी सात वाजता शेजारील दुकानदाराने फोन करून सांगितले की तुमचे दुकान फोडले असून तुम्ही तात्काळ इकडे या, यावर ते दुकान कडे गेले असता त्यांना दुकानचे शटर वाकलेले दिसले.

आत प्रवेश केला असता दुकानातील सिगरेटचे दहा लाख किमतीचे आठ बॉक्स व गल्ल्यातील नगदी 75 हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले. तर दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर ही चोरट्याने तोडून नेल्याचे दिसले. यावरून त्यांनी बाजूला असलेल्या बँकेचे सीसीटीव्ही चेक केले असता दुकान समोर सकाळी पाच वाजता स्विफ्ट गाडीत आलेल्या चार चोरट्यांनी सिगरेट बॉक्स पळवल्याचे दिसून आले.शहर पोलीस आणि घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्हीची पाहणी करत शहरात अनेक ठिकाणी या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहे. याप्रकरणी दुकान मालक श्रीकांत श्रीनिवास रुद्रवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक थांबणार का? सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

0

नवी दिल्ली — महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने सोमवार 17 नोव्हेंबर रोजी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे.
न्यायमूर्ती सूर्या कांत आणि ज्योमल्या बाघची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, ‘कोर्टाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका. 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही.

2022 च्या जे.के. बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती कायम राहील.’ या निर्णयामुळे 30 ते 40 नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षण 50 टक्के पेक्षा जास्त गेले असल्यास ते रद्द होण्याची शक्यता आहे.

कोर्टाने म्हटले की, राज्य सरकार आणि आयोगाने घटनापीठाच्या 6 मे 2025 च्या आदेशाचा विपर्यास करू नये. चालू निवडणूक प्रक्रियेचा हवाला देऊन मर्यादा ओलांडता येणार नाही. जर असे केले तर कोर्ट निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करेल आणि थांबवेल. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विनंतीवर पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला ठेवण्यात आली असून, राज्य सरकारने दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे कोर्टाने सांगितले.

सुप्रीम कोर्टाने मे 2025 मध्ये ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली होती, पण आयोगाच्या अहवालानुसार 27 टक्के कोटा लागू करण्यासाठी ‘ट्रिपल टेस्ट’ पाळणे आवश्यक आहे. यापूर्वी 2021-22 मध्ये कोर्टाने आरक्षण थांबवले होते, यामुळे निवडणुका रखडल्या. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये गडचिरोली, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
आता राज्य सरकारची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास

0

बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

बीड — अल्पवयीन मुलीचा 31 ऑगस्ट 2023 व एक सप्टेंबर 2023 रोजी लैंगिक छळ करणाऱ्या शिरूर तालुक्यातील नराधमास वीस वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश – 1 एस एस घोरपडे यांनी दिली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी 2 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळच्या सुमारास घरी आले. यावेळी नातवंडामध्ये भांडण झाली होती. यावेळी नातवाने थांब तू काल काय केले होते हे घरच्यांना सांगतो अशी बहिणीला धमकी दिली. यावेळी नातीला याबाबत विचारणा केली असता ती मोठ्याने रडू लागली. विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर तिने सांगितले की,31 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी दीड वाजता शाळा सुटून घरी आले असता आरोपी दारामध्ये बसलेला होता. त्यावेळी दुसऱ्या आरोपीने त्याच्या घरासमोर उभे राहून मला बोलावून घेतले. माझ्या अंगाला हात लावला. नेमका त्याच वेळी भाऊ बोलवायला आला त्याने दारातून आवाज दिल्यामुळे आरोपीने मला सोडले व मी घरी आले. पीडीतेने शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कलम 376 अ, 376 ड, भा द वि तसेच 5 (ग),6,11(1)12 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डीपी कोळेकर यांनी केला. जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश -1 मा. एस एस घोरपडे यांच्या न्यायालयापुढे झाली. दरम्यान आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्ष तर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात पिडिता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वैद्यकीय अधिकारी तपासी अधिकारी यांचा पुरावा व सहा. सरकारी वकील अजय तांदळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस कलम सहा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 अन्वये दोषी ठरवून वीस वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीला 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ

0

मुंबई –विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. या ईकेवायसीची मुदत उद्या संपणार होती.मात्रअद्यापही २ कोटी ५४ लाख महिलांपैकी केवळ दीड कोटी महिलांचे ईकेवायसी पूर्ण झाले आहे. एक कोटींवर महिलांचे ईकेवायसी अद्याप झालेले नसल्याने ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

राज्यात अडीच कोटी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहिना १५०० रुपये जमा केले जातात. अडीच लाख रुपये उत्पन्नाची अट असताना या योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी तसेच अडीच लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांकडून घेतला जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे अशा बोगस लाभार्थींना या योजनेतून वगळण्यासाठी ईकेवायसीची अट घालण्यात आली.

१८ नोव्हेंबरपर्यंत असलेली ही मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ईकेवायसीत येणाऱ्या अडचणी, संगणकीय सर्व्हरमध्ये येणाऱ्या समस्यांमुळे ही मुदत वाढविण्यात येत असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान ज्या महिलांच्या पती आणि वडिलांचे निधन झाल्यामुळे तसेच घटस्फोटीत असल्याने संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त करणे अशक्य होते. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक होते. अशा महिलांनी संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

अनेक महिलांचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहेत. त्याचप्रमाणे अनेक महिला किंवा त्यांचे पती हे सरकारी सेवेत आहेत. त्यामुळे अशा महिला ईकेवायसीसाठी पुढे येत नसल्याचे महिला व बालविकास विभागाच्या निदर्शनास आले आहे. आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची प्रकरणे पुढे आली असून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे.

त्याचप्रमाणे त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले. अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या अशा सुमारे ५० ते ६० हजार महिला या ईकेवायसीच्या माध्यमातून या योजनेतून वगळल्या जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पुढील 48 तास धोक्याचे, 6 जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरणार!

0

पुणे — राज्यातील तापमान सतत घसरत असून थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

विशेषतः 16 नोव्हेंबर रोजी शीतलहरीचा इशारा दिल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढणार आहे. आज मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना अधिकृतपणे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रकोप अधिक जाणवणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान साधारण 29 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. या सर्व भागांमध्ये आकाश पूर्णपणे स्वच्छ राहणार असून, दिवसभर गारवा टिकून राहील.

हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांनाही कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी तापमानात झपाट्याने घट होऊन थंडीसह कोरडे वातावरण जाणवेल. पुढील तीन दिवस या भागातील तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हाडं गोठवणारी थंडी वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी रात्री बाहेर पडताना आणि सकाळी लवकर बाहेर जाताना विशेष काळजी घ्यावी.

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही हवामान कोरडेच राहणार आहे. लातूरमध्ये दिवसाचे तापमान साधारण 28 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, तर रात्रीचे तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरू शकते. या भागांतही तापमानातील घट कायम राहिल्यामुळे थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

एकूण पाहता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या सहा जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून शीतलहरीचा इशाराही दिला आहे. ही परिस्थिती किमान पुढील 48 तास कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पालघर साधू हत्याकांड: मुख्य आरोपीचा ठपका ज्याच्यावर ठेवला त्यालाच भाजपने पक्षात प्रवेश दिला

0

पालघर — कोरोना काळात 2020 मधील एप्रिल महिन्यात पालघरच्या गडचिंचले येथे काही साधूंचा मारहाणीत मृत्यू झाला आणि संपूर्ण देश या घटनेने हादरला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपने हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. यावेळी  काशिनाथ चौधरी यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते. या साधू हत्याकांडमध्ये काशिनाथ चौधरी हे मुख्य आरोपी असल्याचे आरोप भाजपकडून करण्यात येत होते. पण, आता त्याच काशिनाथ चौधरी यांनी रविवारी (16 नोव्हेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण आता भाजपनेच केलेल्या आरोपांचे काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उपस्थित करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते काशिनाथ चौधरी यांच्यावर भाजपने गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात गंभीर आरोप केले होते. यावेळी भाजपने तत्कालीन ठाकरे सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केले होते. त्यानंतर साधू हत्याकांड सहन झाले नसल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षफुटी केली. असे असतानाही रविवारी पालघर जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत चौधरी यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. खासदार हेमंत सावरा आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या उपस्थितीत डहाणू येथे चौधरी यांनी शक्तिप्रदर्शन करत कमळ हाती घेतले. काशिनाथ चौधरी यांच्यासोबत 3 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

नेमकं प्रकरण काय?

16 एप्रिल 2020 रात्री सुरतच्या दिशेने निघालेल्या दोन साधू आणि त्यांचे वाहनचालक निघाले होते. दरम्यान, पालघरमध्ये काही गावांत लहान मुले पळवण्याची टोळी फिरत असल्याची बातमी पसरली होती. असे असताना गडचिंचले येथे जमावाने सुरतकडे निघालेल्या त्या दोन साधूंची गाडी अडवली आणि त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांना संशय आला आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल 200 जणांना अटक केली होती. या प्रकरणात एकूण 108 साक्षीदारांचा जबाब नोंदवला गेला. त्यावेळी ठाकरे सरकारवर भाजपने गंभीर आरोप केले होते.