Home Blog Page 34

आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून  प्रलंबित पिक विमा नुकसान भरपाईबाबत कृषीमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

0

मुंबई — प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईतून बीड जिल्हा वगळल्या बाबत आ. विजयसिंह पंडित यांनी मंत्रालयात आवाज उठवला, त्यामुळे आज राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सप्टेंबर २०२५ मध्ये बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

एनडीआरएफच्या (NDRF) निकषांनुसार प्रतिहेक्टरी ८,५०० रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. तसेच, रब्बी पेरणीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपये व पीक विमाधारक शेतकऱ्यांना किमान १७,५०० रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री महोदयांनी केली होती. या घोषणेनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात नुकसान भरपाईचे वाटप त्वरित व्हावे, यावर आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून

प्रलंबित नुकसान भरपाईबाबत कृषीमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.

या बाबत माहिती देताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, ​जुन्या पीक विमा योजनेतील महत्त्वाचे निकष (ट्रिगर्स) वगळण्यात आल्यामुळे, सन २०२५-२६ मधील पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकली नाही. त्यामुळे सन २०२६-२७ च्या पीक विमा योजनेत या जुन्या निकषांचा (ट्रिगर्स) समावेश करण्याची मागणी केली.​तसेच, मौजे उमापूर महसूल मंडळातील १,५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पीक विमा हप्ता ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या उमापूर शाखेत जमा केला होता. मात्र, बँक कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या नोंदीमुळे त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी हक्काच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही बँकेने सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केली नाही, या गंभीर प्रश्नावरही आज बैठकीत चर्चा करण्यात आली. मा. कृषीमंत्र्यांनी या विषयावर अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत, कृषी संचालकांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचेही आ. विजयसिंह पंडित म्हणाले.

​या बैठकीला कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

देवस्थान इनाम कायद्याविरोधात बीडमध्ये वारकरी दिंडी; कायदा रद्द करण्याची जोरदार मागणी

0

बीड — महाराष्ट्र सरकारच्या “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६” या प्रस्तावित कायद्याविरोधात आज बीड शहरात सकल वारकरी समाज व मंदिर संरक्षण समितीच्या वतीने वारकरी, भाविक, श्रद्धाळू आणि हिंदू धर्मप्रेमींनी जोरदार आंदोलन छेडले. हिंदू धर्मातील पुरातन मंदिरे, देवस्थान, मठ, गड आणि संस्थानांच्या जमिनी संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत हा प्रस्तावित कायदा तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी (दि.२६) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य वारकरी दिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

देवस्थान इनाम जमिनी या केवळ मालमत्ता नसून त्या धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक व्यवस्थेचा आधारस्तंभ असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. देवस्थाने ही केवळ पूजा-अर्चेची ठिकाणे नसून धर्मप्रसार, संस्कृती संवर्धन, समाजजागृती आणि सामाजिक एकात्मतेची केंद्रे आहेत. प्रस्तावित अधिनियमामुळे देवस्थानांच्या मालमत्तेवर अतिक्रमण, अनाधिकृत हस्तांतरण आणि व्यापारीकरण वाढण्याची शक्यता असून भविष्यात प्रभावशाली पुढारी व धनदांडग्यांच्या ताब्यात या जमिनी जाण्याचा धोका असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात निघालेल्या दिंडीने शहराचे वातावरण भक्तिमय झाले होते. आंदोलनकर्त्यांनी “देवस्थान जमीन वाचवा”, “हिंदू धर्मावरील अन्याय बंद करा” अशा घोषणा देत शासनाचा निषेध नोंदविला.

महंतांची लक्षणीय उपस्थिती

या वारकरी दिंडीत महंत ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे (बंकट स्वामी संस्थान, नेकनूर आळंदी पंढरपुरी), महंत ह.भ.प. संभाजी महाराज (उत्तराधिकारी, श्रीक्षेत्र नारायणगड), महंत ह.भ.प. तुकाराम महाराज भारती (बेलेश्वर संस्थान, बेलगाव), रामायणाचार्य ह.भ.प. नाना महाराज कदम, ह.भ.प. सुरेश महाराज जाधव, ह.भ.प. त्रिंबक महाराज मातकर, ह.भ.प. रामेश्वर महाराज जाधव, ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज उबाळे, ह.भ.प. गोकुळ महाराज उबाळे आदी महंतांची लक्षणीय उपस्थिती होती.

तसेच या दिंडीत पांडुरंग महाराज शिंदे, लोखंडे महाराज, ओमतात्या खवतड, सिताराम महाराज, गजानन जोशी, मुकुंदराव खडकीकर, रविंद्र कुलकर्णी, शरद कुलकर्णी, प्रणव राखे, स्वामी महाराज हातळे, श्रीकृष्ण खोसे, महेश मुळीक, जनार्दन महाराज ढेरे, विष्णु घोलप, सुंदर नांगरे, रामहरी घोडके, लग्न महाराज गाडे, अक्षय महाराज मस्के, शरद घोलप, सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे, रामनाथ खोड, शेख युनुस, बाजीराव ढाकणे, राजेंद्र आमटे, संजय शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी, हिंदूप्रेमी, श्रद्धाळू आणि भाविक सहभागी झाले होते.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६” हा प्रस्तावित कायदा तात्काळ मागे घ्यावा, पुरातन मंदिरे, देवस्थान, मठ, गड आणि संस्थानांच्या जमिनींचे संरक्षण करावे, देवस्थान जमिनींचे डिजिटल अभिलेखीकरण करण्यात यावे, तसेच इनामी आणि देवस्थान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच देवस्थानांच्या पारदर्शक व्यवस्थापनासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी स्वतंत्र धोरण राबवावे, देवस्थान जमिनींसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भाविक, विश्वस्त आणि पुजारी यांची सुनावणी घ्यावी, अशाही मागण्या आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे केल्या

परळीत शिवसेना नेत्यावर प्राणघातक हल्ला, आरोपींनी पैसेही लुटले

0

परळी —  शहरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते शिवाजी शिंदे यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोंढा परिसरातील त्यांच्या मालकीच्या ‘रिद्धी सिद्धी’ हॉटेलमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवाजी शिंदे यांना प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास परळी संभाजीनगर पोलीस करत आहेत.

माझी त्याच्याशी ओळखही नव्हती” – शिवाजी शिंदे

हल्ल्यानंतर शिवाजी शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “सुरवसे नावाच्या तरुणाची माझी कोणतीही ओळख नव्हती. मात्र, त्याचा आणि माझ्या मुलामध्ये काही वाद झाल्याचे समजले. तो काल रात्री माझ्या गावी घरासमोर आला होता. त्यावेळी त्याने माझ्या आणि मुलाच्या विरोधात अश्लील शिवीगाळ केली. मी त्याला समजावून परत पाठवले होते.”

हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने हल्ला

शिंदे पुढे म्हणाले की, “दुसऱ्या दिवशी दुपारी मी माझ्या पत्नीसमवेत मोंढा परिसरातील ‘रिद्धी सिद्धी’ हॉटेलमध्ये बसलो होतो. त्यावेळी तो युवक आणि त्याचे तीन ते चार सहकारी हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी अचानक कोयत्याने हल्ला केला.”
या हल्ल्यात शिंदे यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असून हात-पायावरही अनेक वार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हल्लेखोरांनी त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

हत्या की लूट?

हल्लेखोरांनी हॉटेलमधील काही रक्कमही लुटल्याचा आरोप शिवाजी शिंदे यांनी केला आहे. “त्यांचा उद्देश माझी हत्या करणे होता की लूट करणे हेच समजत नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या घटनेनंतर परळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेना कार्यकर्त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दारू दुकानातील वादातून कर्मचाऱ्याची हत्या; आरोपी ‘लाला’ स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

0

बीड —  शहरातील बालेपीर परिसरात दारू दुकानातील हिशोबाच्या वादातून एका कर्मचाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी शेख इरफान ऊर्फ लाला याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता उमेश दळवी (वय 28, रा. गोरेवस्ती, बालेपीर, बीड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती उमेश नवनाथ दळवी (वय 35) हे एका दारू दुकानात काम करत होते. दुकानातील काम व्यवस्थित होत नसल्याच्या कारणावरून आरोपी शेख इरफान ऊर्फ लाला याने यापूर्वीही उमेश दळवी यांना मारहाण केली होती.
दरम्यान, 23 मे 2026 रोजी दुकानातील हिशोबात घोळ झाल्याच्या कारणावरून आरोपीने उमेश दळवी यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 124/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 115(1), 351(2), 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 3(1)(4), 3(1)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू करण्यात आला होता. 26 मे रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.
तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत आरोपी बालेपीर परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपी शेख इरफान ऊर्फ लाला शेख समद (वय 38, रा. इंदिरा गांधी शाळेजवळ, आमराई, नगर रोड, बालेपीर, बीड) याला ताब्यात घेतले.
पोलिस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून पुढील तपासासाठी त्याला उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर तसेच त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

बीडमध्ये पोलीस विभागात मेगा फेरबदल; अधिकाऱ्यांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश

0

बीड —  जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी रविवारी (दि. २४) पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या व्यापक बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह पोलीस प्रशासनाला गती देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
या बदली प्रक्रियेत प्रशासकीय कारणांसोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जांचाही विचार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये नवीन प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने पोलीस विभागात चर्चेला उधाण आले आहे.

पोलीस निरीक्षकांच्या प्रमुख बदल्या

या आदेशानुसार पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची बीड शहर पोलीस ठाण्यातून केज पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पाटोदा येथील पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांची बीड शहर पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.
नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले वैभव पाटील यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली असून शिवाजीनगरचे प्रभारी प्रवीणकुमार बांगर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसेच उमाकांत कस्तुरे यांची प्रभारी पाटोदा पोलीस ठाणे येथे नियुक्ती झाली असून स्वप्नील उनवणे यांची केजवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जातही मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. संदीप मांजरमे यांची प्रभारी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात, राजेंद्र घुगे यांची धारूर येथे, तर संतोष जाधवर यांची केज पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय सतिष कोटकर, अतुलकुमार लांडगे, गोरकनाथ दहिफळे, रंगनाथ जगताप, मच्छिंद्रनाथ शेंडगे, देविदास वाघमोडे, मधुसूदन घुगे, विजय नरवाडे, प्रल्हाद मुंडे, बाबा राठोड, मंगेश साळवे, नित्यानंद उबाळे, देविदास सोनवळे, विक्रांत हिंगे, दिपक लंके आणि राजेश गडवे यांच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस उपनिरीक्षकांमध्येही फेरबदल

पोलीस उपनिरीक्षक स्तरावरही अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. रमेश घुले यांची अंबाजोगाई शहर येथे, शेखर औटे यांची स्थानिक गुन्हे शाखेत, अनिल शिंदे यांची अंबाजोगाई शहर ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच केरबा माकणे, स्वप्निल कोळी, संजय कुकलारे, अप्पासाहेब रोकडे, श्रीकृष्ण शिंदे, अर्जुन गोलबाल, नितीन काकरवाल, राजू राठोड, देविदास खांडखुळे आणि आनंद जाधव यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
सायबर पोलीस ठाणे बीड येथे कार्यरत महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती लहाणे यांना त्याच ठिकाणी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रशासनाला गती देण्याचा प्रयत्न

बीड जिल्हा पोलीस दलातील या व्यापक बदल्यांमुळे अनेक पोलीस ठाण्यांच्या कारभारात नव्या अधिकाऱ्यांची एंट्री झाली असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नीट पेपरफुटी प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी 

0

बीड — देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबा गणेश कर यांच्या नेतृत्वाखाली बीडमधील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिक व सुजाण बीडकरांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे” एनपीए प्रशासन मुर्दाबाद, भ्रष्ट शिक्षण व्यवस्था मुर्दाबाद, पेपरफुटी करणा-यांची संपत्ती जप्त करा ” आदी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात एनटीए संस्था बरखास्त करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनकर्त्यांनी पेपरफुटीच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी तसेच पेपरफुटीमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही केली.

जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.

यावेळी आंदोलनात डॉ. गणेश ढवळे, शेख युनुस, रामनाथ खोड, मुबीन शेख,बाळासाहेब मोरे पाटील, किष्किंधा पांचाळ,सिताबाई भोसले,माजी सैनिक अशोक येडे,सय्यद सादेक, रामधन जमाले, शेख मुबीन, बाजीराव ढाकणे, प्राचार्य डी. जी. तांदळे, गणेश आजबे,नितिन जायभाये,राजु गायके,भिमराव कुंटे, कैलासचंद पालिवाल, रफीक पठाण, सुदाम तांदळे, शेख अमर, नितिन सोनावणे, कालिदास वनवे,आदी उपस्थित होते.

डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले की, वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणारे लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेत असताना कथित पेपरफुटी, निकालातील संशयास्पद बाबी आणि गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला आहे. शिक्षण व्यवस्थेचे वाढते बाजारीकरण आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

एनटीए संस्थेने विश्वासार्हता गमावली असून ती तात्काळ बरखास्त करावी, दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पारदर्शक व सुरक्षित परीक्षा प्रणाली लागू करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

भाशिप्रच कस तर भ्रष्टाचार आपल्या बुडाला अन् ज्ञान सांगे लोकांना ; “संस्कार, समर्पण की स्वार्थाचा अड्डा? संस्थेतील कारभारावर प्रश्नचिन्ह

0

बीड — देश प्रेम, संस्कार, त्याग, समर्पण हा कथित देखावा असल्याचे चित्र भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा कारभार पाहिल्यानंतर उघड होतं. याच संस्कार समर्पणाचं पीक चांगलं यावं यासाठी संघाने मशागतीसाठी हातात घेतलेलं “खुरप” च संस्थेच्या अंगलट आलं.कथित संघ विचारधारेच पीक नष्ट करून भ्रष्टाचाराचं तन फोफवायला मदत करू लागलं.परिणामी “अमर“वेलाने संघाचं पीक असं झाकोळून टाकलं की तेच संस्थेचा “नाथ” (स्वामी) बनलं. यामध्ये झाकोळून गेलेल्या संघाच्या विचार पिकाला “प्रभाकर“(सूर्य) कधी दिसणार की अशीच बजबजपुरी कायम राहून ते नष्ट होणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
रक्ताचं पाणी करून अनेकांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना करत त्याचा वटवृक्ष बनवला. संघ विचारधारेनुसारच त्यांनी याची जोपासना केली. मात्र काळ कोणताही एक सारखा राहत नसतो असं म्हणतात त्याचप्रमाणे
सध्याची संस्थेची परिस्थिती पाहिली तर हा सगळा साळसूदपणाचा पांघरलेला बुरखा तर नव्हता ना? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. हा बुरखा “खुरपे” प्रेमात अडकून टर टरा फाटल्याचं पाहायला मिळत आहे.
सह्याद्री माझा” ने नीट पेपर फुटी प्रकरणात घडलेल्या खळबळजनक घटनांचा विचार केला तर शिक्षण क्षेत्रात तळागाळापासून ते वर पर्यंत किती बरबटलेली लोक आहेत याचा भांडाफोड करण्याचा छोटासा प्रयत्न सुरू केला आहे. संघ विचारधारेच्याच भाशिप्र मंडळाची बोगस इंग्रजी शाळा चालवत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा लातूरच्या रेनीसन्स सीबीएसई इंग्लिश स्कूल चा अध्यक्ष असलेला बालरोग तज्ञ डाॅ. मनोज शिरुरे याला नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने ताब्यात घेतलं अन् संघ विचारधारा नुसतीच संस्काराच्या देश प्रेमाच्या गप्पा मारते का हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या संस्थांचं वानगी दाखल उदाहरण देखील आमच्या हाती आलं.
सन 2022 -23 मध्ये भाशिप्र संस्था संचलित अंबाजोगाई अंतर्गत येणाऱ्या माजलगाव मधील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात ई.5 वी ते 10 वी च्या प्रवेश केलेल्या 612 विद्यार्थ्यांकडून 15 हजार रुपये डोनेशनच्या नावाखाली खंडणी वसुली करण्यात आली. हा आकडा 91 लाख 80 हजार इतका होता.
या प्रकरणात माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी लक्ष घातल्यानंतर कारवाई करण्यात आली. माजलगाव पं स चे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गू.र.नं 142/2022 नुसार कलम 384,34 भा दं वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत 1 लाख 76 हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे, सहशिक्षक सदाशिव ढगे, परमेश्वर आदमाने, कमलाकर झोडगे यांच्यावर हे प्रकरण संस्थेचा स्थानिक समन्वय समितीचा कार्यवाह “अमरनाथ खुरपे” याच्या सांगण्यावरून चांगलेच शेकले गेले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान हे आरोपी जामिनावर सध्या तरी बाहेर आहेत. बरं विशेष म्हणजे जमा केलेला असा काळा पैसा संस्थेच्या खात्यावर कुठेही जमा केला जात नाही तो स्वतःच्या तुंबडी भरण्यासाठीच वापरला जातो. “आपण सगळे भाऊ भाऊ जमा झालेली रक्कम वाटून खाऊ“असा मूलमंत्र जपत आजही अनेक भ्रष्टाचाराची लफडी भाशिप्र संस्थेत होताना दिसून येत आहेत.
दरम्यान एवढं मोठं प्रकरण उघडकिस येऊन महाराष्ट्रात गाजलं संघ संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तरी देखील आजही सिद्धेश्वर विद्यालयातील भ्रष्टाचाराचा मुख्य सूत्रधार भाशिप्र संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी विराजमान आहे. हे भ्रष्टाचाराचे प्रकरण उजेडात येऊन जवळपास चार वर्षाचा कालावधी होत आहे. तरीदेखील संस्थेने कुठलीच कारवाई केली नाही.परिणामी पौर्णिमेच्या “चंद्र”कलेप्रमाणे भ्रष्टाचाराचा हा ‘कांत’ आपली पाळे “मूळे” खोलवर रुजवत “खुरपे” हातात घेऊन “अमर”वेलीच्या छायेत संघसंस्काराचं पीक उध्वस्त करत आहे.
त्याच्याच अखत्यारीत अजूनही बिनधास्त हे गोरखधंदे राजरोस सुरू आहेत. यावरूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्याग समर्पण देश प्रेम संस्कार हे शब्द फक्त लोकांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी आहेत काय? सिद्धेश्वर विद्यालयात झालेला भ्रष्टाचार माहित असूनही कमीत कमी न्यायालयातून निर्दोष सुटेपर्यंत तरी नैतिकता म्हणून आरोपी सदस्याची पदावरून हकालपट्टी का केली गेली नाही? पैशापुढे संघ विचारधारेत देखील नैतिकता राहिली नाही काय? कष्टाने उभा केलेली संस्था बांडगुळच खाऊन जाणार का? भाशिप्र संस्था भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थेचा सूर्योदय कधी पाहणार? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

केज उपविभागीय विशेष पथकाची कारवाई; 6.53 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

0

केज — बीड जिल्ह्यातील केज उपविभागीय विशेष पथकाने मोठी कारवाई करत महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 6 लाख 53 हजार 945 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके तसेच सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.
दिनांक 23 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी युसुफवडगाव हद्दीत सापळा रचला. यावेळी संजय रामलिंग तपसे (वय 47, रा. चंदनसावरगाव, ता. केज) याच्या ताब्यातून प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विमल पान मसाला, दिलबाग पान मसाला, गोवा गुटखा-1000 पूडे यांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा TUV-300 (MH-46-BK-8119) या वाहनाचा समावेश आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपीने हा माल रंजीत नागनाथ आगाडे (रा. इंदिरानगर, कळंब, जि. धाराशिव) याच्याकडून आणल्याची माहिती दिली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 142/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 123, 274 आणि 275 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलीस हवालदार धोंडीराम मोरे, राजू वंजारे आणि विशाल क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग! 10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; दिल्लीत पेट्रोल 100 पार

0

नवी दिल्ली — मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण युद्धाच्या (Iran War) वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतातील सर्वसामान्य नागरिकांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याने वाहनधारकांचे बजेट कोलमडले आहे.


सोमवार, 25 मे रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपयांची तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेला आहे.

प्रमुख महानगरांमधील आजचे पेट्रोल दर

मुंबई : 111.21 रुपये (2.71 रुपयांची वाढ)
दिल्ली : 102.12 रुपये (2.61 रुपयांची वाढ)
कोलकाता : 113.51 रुपये (2.87 रुपयांची वाढ)
चेन्नई : 107.77 रुपये (2.46 रुपयांची वाढ)

प्रमुख महानगरांमधील आजचे डिझेल दर
मुंबई : 97.83 रुपये (2.81 रुपयांची वाढ)
Delhi : 95.20 रुपये (2.71 रुपयांची वाढ)
कोलकाता : 99.82 रुपये (2.80 रुपयांची वाढ)
चेन्नई : 99.55 रुपये (2.57 रुपयांची वाढ)
10 दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ
देशात मे महिन्यात इंधनाच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत.
15 मे : पेट्रोल-डिझेल दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ
19 मे : दोन्ही इंधनांच्या दरात सरासरी 90 पैशांची वाढ
23 मे : पेट्रोल 87 पैसे, डिझेल 91 पैशांनी महाग
25 मे : पेट्रोल 2.61 रुपये, डिझेल 2.71 रुपयांनी वाढ
सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम
बस आणि ऑटो भाडे वाढण्याची शक्यता
इंधन दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतूक, रिक्षा, ऑटो आणि शालेय बसच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मालवाहतूक खर्च वाढणार
ट्रक आणि टेम्पोच्या इंधन खर्चात वाढ झाल्याने मालवाहतूक शुल्क वाढू शकते. त्यामुळे भाजीपाला, फळे, धान्य आणि किराणा वस्तू महागण्याची शक्यता आहे.
शेती उत्पादन खर्च वाढणार
डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर, पंपिंग सेट आणि शेती उपकरणांचा खर्च वाढणार असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढू शकतो.

आष्टीत साखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी जेरबंद, तीन गुन्ह्यांची कबुली

0

बीड  — बीड जिल्ह्यातील आष्टी परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी बीड जिल्ह्यातील तीन साखळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी पायी जात असताना दोन अज्ञात इसम मोटारसायकलवर आले आणि त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून फरार झाले. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 191/2026 दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी आष्टी परिसरात अशाच प्रकारच्या आणखी दोन घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांकडून सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी 25 हून अधिक गुन्हेगार वस्त्यांमध्ये चौकशी केली, हिस्ट्रीशीटरांची पडताळणी केली तसेच 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना विकास गडया भोसले (वय 22, रा. चिखली ता. आष्टी) याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गुन्हा आपल्या साथीदार अरुण बप्पा काळे (वय 23, रा. बोलेगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यासोबत केल्याची कबुली दिली.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी बीड जिल्ह्यातील तीन साखळी चोरीचे गुन्हे केल्याची प्राथमिक कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, अर्जुन यादव, पोलीस अंमलदार आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे व पोलीस ठाणे आष्टी येथील पोलीस उपनिरीक्षक शिंदे, प्रविण क्षीरसागर, सत्यवान वाणी, तागड, तांबे चालक सिध्देश्वर मांजरे यांनी केली आहे.