Home Blog Page 2

विवाहितेला उचलून नेत अत्याचार, चावडीला बांधून ठेवले; बालविवाह प्रकरणी पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवकावर होणार गुन्हे दाखल

0

बीड — अल्पवयीन महिलेस घरातून नेऊन तिच्यावर अत्याचार करुन बेशुद्ध अवस्थेत चावडीच्या खांबाला बांधल्याच प्रकरण घडलं होतं. या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली असून पीडित महिला अल्पवयीन असून बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील हिवरा पहाडी येथे अल्पवयीन विवाहित महिलेला रात्री उचलून घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.पिडीता बेशुद्ध पडली असताना तिला गावच्या चावडीत खांबाला बांधून ठेवले

झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले, अत्याचार केला चावडीच्या खांबाला बांधून आरोपी पळाला

. ही बात सकाळी गावकऱ्यांच्या नजरेस पडली. त्यानंतर खांबाला बांधलेल्या पीडीतेची सुटका करण्यात आली. सुटका करण्यापूर्वी तिचा व्हिडिओ देखील काढण्यात आला होता. ही घटना राज्यभर गाजली असून महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तपास अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधला. आता, पीडित अल्पवयीन महिलेच्या विवाहावरुनही गुन्हा दाखल करण्याचे आदेश तपास अधिकारी अतुल कुमार लांडगे यांना दूरध्वनीवरून दिल्या आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 137(2),333,64(2)(i) आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वैभव पटेकर याला अटक करण्यात आली आरोपीला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तपासा दरम्यान पीडित मुलीचा गेल्याच वर्षी बालविवाह लावून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या बालविवाहाच्या दृष्टीनेही गुन्हा दाखल करून लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीसह भारतातील 5 राज्यात निवडणुका जाहीर

0

नवी दिल्ली — निवडणूक आयोगाने चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशासह महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांची तारीख आज निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केली.
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यात निवडणुका होणार आहेत. तर, महाराष्ट्रात पोटनिवडणूक होणार आहे. 5 राज्यामध्ये भारतातील पावरफुल नेत्यांची सत्ता आहे.

आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. तामिळनाडूमध्येही २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. याशिवाय, 9 एप्रिल आणि 23 एप्रिल रोजी आठ विधानसभा जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. यात महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बारामती आणि राहुरीत 23 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. पाचही राज्यांच्या विधानसभा जागांची आणि पोटनिवडणुकांची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी निवडणुका होत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सध्या सत्तेत आहे.आसाम विधानसभेत 126 जागा आहेत. सध्याचे सरकार भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे युती आहे, ज्याचे नेतृत्व हिमंता बिस्वा शर्मा करत आहेत.तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागा आहेत. एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) हा सत्ताधारी पक्ष आहे.केरळमध्ये 140 जगांसाठी निवडणूका होत आहेत. येथे सरकार पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीकडे आहे.पुद्दुचेरी विधानसभेत 30 जागा आहेत. येथील सध्याचे सरकार एन. रंगासामी यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय एनआर काँग्रेस आणि भाजपचे युती आहे.

झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले, अत्याचार केला चावडीच्या खांबाला बांधून आरोपी पळाला

0

बीड — घरामध्ये झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून गावाबाहेर नेले.तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला गावामध्ये आणले व गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवल्याचा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी या विवाहितेची सुटका केली. या घटनेने खळबळ माजली आहे.
पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडलेल्या घटनेने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पवयीन विवाहिता अकरा मार्च रोजी आपल्या घरात झोपलेली होती. यावेळी वैभव पटेकर याने तिला उचलून नेले. नदी कडील भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घरातून उचलून घेऊन जात असताना तिने विरोध देखील केला मात्र तिचं तोंड दाबून धरण्यात आल्यामुळे प्रतिकार कमी पडला गेला. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिला गावात आणून चावडीवरील खांबाला बांधून टाकले. ही घटना सकाळी ग्रामस्थांनी पीडीतेला खांबाला बांधल्याचं पाहिल्यानंतर घटना उघडकीस आली. गावचे सरपंच व पिडीतेच्या कुटुंबातील सदस्य चावडीवर आल्यानंतरच तिला सोडवण्यात आले.
दरम्यान या घटनेने विवाहिता प्रचंड घाबरलेली होती, त्यामुळे तिने पोलीसात तक्रार दिली नाही. त्यानंतर, आज कुटुंबीयांना ही घटना संपूर्ण घटना सांगितल्यानंतर पीडित अल्पवयीन विवाहितेने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसांसह पिंक पथकाकडून तपास केला जातोय. परंतु या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडिता ही अल्पवयीन असल्याने आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

21 वर्षानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मिळणार गती

0

मुंबई — खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत अखेर मोठी हालचाल सुरू झाली आहे. तब्बल २१ वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली असून त्यासाठी नवीन नियम आणि पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत.’महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२६’ या नावाने ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमांच्या आधारेच राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

राज्यातील अनेक शाळांमध्ये २००५ नंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. त्यामुळे शाळांमधील प्रशासनिक कामकाज, ग्रंथालय व्यवस्था, प्रयोगशाळेचे व्यवस्थापन आणि इतर दैनंदिन कामांवर मोठा परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर विविध कर्मचारी संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील संघटनांनी सातत्याने शासनाकडे भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत २०१९ मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध जाहीर करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात झाली नव्हती.

आता २०२६ मध्ये शासनाने या विषयावर निर्णायक पाऊल उचलत नवीन नियमावली तयार केली आहे. या नियमांमध्ये शिक्षकेतर पदांसाठी आवश्यक पात्रता, पदांची रचना तसेच नियुक्ती प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या निर्णयामुळे दीर्घकाळापासून भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

नवीन आकृतीबंधानुसार राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे निर्माण होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लिपिक पदांची संख्या १७ हजार ६९५ इतकी प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ लिपिक पदे ४ हजार ९१२ आणि मुख्य लिपिक पदे ९२३ इतकी असतील. याशिवाय शाळांमधील ग्रंथालय व्यवस्था सक्षम करण्यासाठी २ हजार ११८ ग्रंथपाल पदांची तर प्रयोगशाळेच्या कामकाजासाठी नववी-दहावी स्तरासाठी ४ हजार ६८५ आणि उच्च माध्यमिक स्तरासाठी २ हजार ४० प्रयोगशाळा सहाय्यक पदांची रचना करण्यात आली आहे. या सर्व पदांचा विचार करता राज्यात सुमारे ३० हजार शिक्षकेतर पदांची भरती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या भरती प्रक्रियेसाठी शासनाने विविध पदांसाठी आवश्यक पात्रता निकषही स्पष्ट केले आहेत. कनिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने समतुल्य घोषित केलेली अर्हता आवश्यक आहे. तसेच मराठी टंकलेखनाची गती प्रतिमिनिट किमान ३० शब्द किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती प्रतिमिनिट ४० शब्द असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त असणे बंधनकारक राहील.

वरिष्ठ लिपिक पदासाठी नियमित वेतनश्रेणीवर कार्यरत असलेल्या कनिष्ठ लिपिकांमधून पदोन्नतीद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक असून ज्येष्ठता आणि गुणवत्ता यांचा विचार करून पदोन्नती दिली जाईल. त्याचप्रमाणे मुख्य लिपिक पदासाठी वरिष्ठ लिपिक पदावर किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांमधून पदोन्नती दिली जाणार आहे.

ग्रंथपाल पदासाठी उमेदवाराकडे सांविधिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदविका असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्याही शाखेतील पदवीही आवश्यक राहील. प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाकडून इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर शिपाई किंवा सेवक पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे ही पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

याशिवाय काही पदांवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्याची तरतूदही या नियमांमध्ये करण्यात आली आहे. शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या धोरणानुसार संबंधित विभागाकडून या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. एकूणच राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत शासनाने घेतलेला हा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या पदांमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असून शाळांमधील प्रशासनिक आणि शैक्षणिक कामकाज अधिक सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच रोजगाराच्या संधींच्या दृष्टीनेही हा निर्णय राज्यातील हजारो तरुणांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

अल्पवयीन मुलीला घरात बोलावून हातपाय बांधून पाशवी बलात्कार

0

परळी — घरात बोलावून घेत तोंडात बोळा कोंबून अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना तालुक्यातील धारावती तांडा येथे घडली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पीडित मुलगी १६ वर्षांची अल्पवयीन असून दोन जणांनी तिला गोड बोलून आपल्या घरी बोलावले.मुलगी घरात जाताच आरोपींनी घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर एका नराधमाने पीडितेचे हात-पाय घट्ट बांधले व ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. यानंतर दोन्ही नराधमांनी तिच्यावर क्रूरपणे लैंगिक अत्याचार केला.
अत्याचारानंतर पीडितेची सुटका करताना नराधमांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला संपवून टाकू, असे म्हणत तिला दहशतीखाली ठेवले. धमकीमुळे प्रचंड घाबरलेल्या मुलीने कशीबशी आपली सुटका करून घर गाठले आणि घडलेला सर्व संतापजनक प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. पालकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली.

पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४, १२७(२), ३५१(२), ३५२, ३(५) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ च्या कलम ४ आणि १७ नुसार गुन्हा रजिस्टर नंबर १२५/२०२६ दाखल केला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून या प्रकरणाचा सखोल तपास अंबाजोगाई उपविभागाचे पिंक पथक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव करत आहेत.

काळाबाजारीसाठी घरात ठेवलेला गॅस सिलेंडर साठा जप्त

0

बीड — इराण अमेरिका युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झालेली असतानाच काळाबाजार देखील होऊ लागला आहे. काळाबाजार रोखण्यासाठी पेठ बीड पोलीस व पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर यांनी इमामपूर रोडवरील शिवनेरी नगर परिसरात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास छापा मारला. यावेळी वेगवेगळ्या कंपनीच्या 29 सिलेंडर जप्त करण्यात आले.

शिवनेरी नगर भागात नफा कमवण्याच्या उद्देशाने काळाबाजार करण्यासाठी सिलेंडर साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहिती आधारे पोलीस व पुरवठा विभागाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अजय मोहन घोडके याच्या घरावर छापा मारला. यावेळी घरामध्ये साठवून ठेवलेल्या इंडेन, भारत गॅस, एचपी कंपनीच्या 29 सिलेंडर आढळून आले. 12 व्यावसायिक वापराच्या सिलेंडरांपैकी 1 भरलेला आणि 17 घरगुती सिलेंडरांपैकी 8 भरलेले सिलेंडर असा एकूण 73 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान ही कारवाई
पेठ बीड पोलिस स्टेशनचे एपीआय नित्यानंद उबाळे यांच्या नेतृत्वाखाली नितीन राठोड, कल्याण जाधव, अंकुश राठोड, पठाण यांनी ही कारवाई केली.तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर, कारकून श्रीराम वायभट व संतोष मुळीक यांनी देखील कारवाई सहभाग घेतला. प्राथमिक तपासात सिलेंडर अनधिकृतपणे भरले गेले असल्याचे निदर्शनास आले असून, लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 78/2026 नोंदवला असून, भारतीय न्याय संहिता कलम 287, 288 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 अंतर्गत तपास सुरू आहे. पुढील तपास पीएसआय बारगळ करीत आहेत.

कायद्याचा धाकच संपला ! ज्यूस सेंटर मधील वेटर बाजूला व्हा म्हटला अन् चौघांनी तो आपटू आपटू  हाणला !!

0

तेलगाव — कायद्याचा धाक नसल्याने रोज मारहाणीच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. ज्यूस सेंटर मध्ये काम करणाऱ्या मजुराला चार-पाच जणांच्या टोळक्याने क्षूल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना तेलगाव मध्ये घडली आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तेलगाव येथील चौकात असलेल्या त्रिमूर्ती ज्यूस सेंटरमध्ये सागर विजय जाधव हा तरुण वेटरचं काम करतो. नेहमीप्रमाणे तो हॉटेलमधील काम करत असताना ही घटना घडली. सागर जाधव रिकामे ग्लास जिन्यावरून खाली आणत असताना जिन्याजवळ काही तरुण उभे होते. पुढे जाण्यासाठी जागा मिळावी म्हणून त्याने त्या तरुणांना “पायरीवरून थोडे बाजूला व्हा” असे सांगितले.
मात्र यातून गैरसमज करून एका तरुणाने सागर जाधवला अडवले आणि त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. संबंधित तरुणाने सागरला ज्यूस सेंटरच्या बाहेर खेचले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांनीही सागरला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.या मारहाणीत सागर जाधव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. किरकोळ कारणावरून तरुणाला अशा प्रकारे मारहाण केल्यामुळे कायद्याचा धाक उरला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

0

मुंबई — दि. 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही.

सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना रोटरी क्लबचा ” चंपावतीरत्न” पुरस्कार

0

बीड —  रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने देण्यात येणारा मानाचा चंपावतीरत्न पुरस्कार यंदा राज्याचे माजी मंत्री जयदत्तआण्णा क्षीरसागर यांना देण्यात येणार आहे दि 22 मार्च रोजी हॉटेल निलकमल मध्ये ग्लोबल विकास ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी मयंक गांधी आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3132चे गव्हर्नर रो सुधीर लातुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल याप्रसंगी रोटरीचे डिस्ट्रिक्ट लर्निंग फ़ेसीलेटर रो ओम मोतीपवळे रोटरी माजी गव्हर्नर रो हरीश मोटवाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे
बीड शहराच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गणमान्य व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो यापूर्वी हा पुरस्कार अभिनेते मकरंद अनासपुरे
स्व केशरबाई क्षीरसागर वे शा स धुंडीराज महाराज पाटांगणकर श्रीहरी तुंगार रामप्रसादजी राठी स्व स्व मोतिरामजी वरपे डॉ श्रीहरी लहाने सुभाषचंद्र सारडा श्री शिवाजीराव पंडित संपादक स्व नामदेव क्षीरसागर आदी मान्यवरांना देण्यात आला आहे
या पुरस्कार सोहळ्यास शहरातील सर्वच सामाजिक आणि सेवाभावी संस्थेतील सदस्यांनी तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन
प्रोजेक्त चेअरमन सीए सुरेश लड्डा रोटरी क्लब अध्यक्ष विकास उमापूरकर सचिव सुमित जैस्वाल यांनी केले आहे

85 लाखाच्या अपहार प्रकरणी खोकरमोहाचे सरपंच श्रीहरी मिसाळ वर अपात्रतेची कारवाई

0

बीड — ग्रामपंचायतीच्या निधीचा गैरवापर, १५ व्या वित्त आयोगाच्या कामात अपहार आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शिरूर कासार (जि. बीड) तालुक्यातील खोकरमोहा ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीहरी अर्जुनराव मिसाळ यांना विभागीय आयुक्तांनी सरपंच पदावरून अपात्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?

​खोकरमोहा येथील रहिवासी सुधाकर विठ्ठलराव मिसाळ यांनी सरपंच श्रीहरी मिसाळ यांच्याविरुद्ध विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) अन्वये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत सरपंचांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोणतीही कामे न करता ७ लाख ४७ हजार ६५५ रुपयांचा अपहार केल्याचे म्हटले होते. तसेच, ‘तंटामुक्त गाव योजना’ खात्यातून १० लाख ९१ हजार रुपये काढून त्याचाही अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

चौकशीत काय निष्पन्न झाले?

​या प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत करण्यात आली. चौकशी अहवालात खालील धक्कादायक बाबी समोर आल्या:
​निधीचा अपहार: १५ व्या वित्त आयोगातून कामे न करताच निधी हडपल्याचे सिद्ध झाले.
​कागदपत्रांची दडपछाप: चौकशी समितीला महिला ग्रामसभा, मासिक सभा यांचे प्रोसिडिंग रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नाही.

फौजदारी गुन्हा:

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सरपंचांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४०९ व ४२० अन्वये आधीच गुन्हा (F.I.R. No. 0217/2024) दाखल करण्यात आला आहे.
​प्रशासकीय कारवाई: तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याला यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित आहे.

विभागीय आयुक्तांचा अंतिम आदेश

​दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सीईओ बीड यांचा फेरचौकशी अहवाल विचारात घेऊन विभागीय आयुक्त जितेंद्र पाथळकर यांनी ५ मार्च २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सरपंचांनी पदाचा दुरुपयोग करून शासकीय निधीचा अपहार केल्याचे स्पष्ट झाल्याने, त्यांना तात्काळ प्रभावाने सरपंच पदावरून अपात्र करण्यात आले आहे. तसेच, अपहार केलेली रक्कम संबंधितांकडून व्याजासह वसूल करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.