Home Blog Page 156

सासुरवाडीत राहणाऱ्या जावयाचा ऐन दिवाळीत खून

0

अंबाजोगाई — सासरवाडी मध्ये राहणाऱ्या जावयाचा ऐन दिवाळीच्या काळात डोक्यात दगड घालून खून झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील डोंगर पिंपळा येथे उघडकीस आली.

सचिन शिवाजी तिडके वय 35 वर्ष,रा. भोगलवाडी, हल्ली मुक्काम डोंगरपिंपळा, ता. अंबाजोगाई येथील रहिवासी व डोंगरपिंपळा गावचे जावई आहेत. मागील एक वर्षापासून ते सासुरवाडी डोंगरपिंपळा येथे पत्नी व मुलांसोबत राहत होते. मंगळवारी रात्रीपासून सचिन तिडके हे बेपत्ता होते. बुधवारी दुपारी एक वाजता त्यांचा मृतदेह डोंगरपिंपळा शिवारात चेहऱ्यावर दगड मारून चेंदामेंदा केलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घुगे व पो कॉ‌. भागवत यांनी घटनास्थळी धाव घेत सचिन यांचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदरील खून हा सासुरवाडीतील लोकांनीच घडवून आणला असल्याचे सचिन यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. कारण, ते मृतदेहाजवळ गेले असता सासुरवाडीकडील लोकांनी मयताच्या नातेवाइकांना शिवीगाळ व अंगावर दगड घेऊन धावले असल्याचे सांगत आहेत. सचिन यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आईवडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

सगळेच सत्ताधारी पक्षाचे आमदार झाले; विरोधकच उरला नाही; देशात पहिल्यांदाच अशी परिस्थिती

0

गंगटोक — सध्या देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि 13 राज्यांच्या पोटनिवडणुकांचा काळ सुरु आहे. यापैकी महाराष्ट्र विधानसभा आणि उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीवर सगळ्यांचे लक्ष आहे. अशातच पूर्वेकडील राज्यात मोठी घडामोड घडली आहे.

राज्य विधानसभेत विरोधकच नसलेले एकमेव राज्य ठरले आहे.

सिक्कीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. तेथील प्रमुख विरोधी पक्ष सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट (एसडीएफ) संपला आहे. यामुळे सिक्कीम विधानसभा विरोधी पक्षच राहिलेला नाही. सिक्कीममध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. सोरेंग-चाकुंग आणि नामची-सिंघीथांग या जागांवर एसडीएफने उमेदवार उतरविले होते. परंतू, या उमेदवारांचे अर्ज अयोग्य घोषित करण्यात आले आहेत. 13 नोव्हेंबरला या ठिकाणी मतदान होणार होते. यामुळे सत्ताधाऱी एसकेएमचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

देशात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्ष नाही, असे घडले आहे. प्रेम बहादुर भंडारी आणि डेनियल राय यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. यामुळे सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे उमेदवार आदित्य गोळे आणि सतीश चंद्र राय हे बिनविरोध निवडले गेले आहेत. मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या नेतृत्वात एसकेएमकडे आता विधानसभेचे सर्वच्या सर्व 32 आमदार असणार आहेत.

दोन्ही उमेदवारांकडे प्रस्तावकांची अपेक्षित संख्या नव्हती असे अर्ज पडताळणीत समोर आले आहे. यामुळे त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तर पोबिन हंग सुब्बा यांचाही अर्ज अपूर्ण अॅफिडेविट दिल्याने फेटाळण्यात आल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान विरोधी पक्षांनी यावर टीका केली आहे. विरोधी पक्षांनी यावर टीका करताना लोकशाहीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच याविरोधात हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटलांनी समीकरण जुळवलं; मराठा, दलित, मुस्लीम एकत्र

0

जालना — अंतरवाली सराटीमधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मुस्लीम धर्मगुरू, बौद्ध धर्मगुरू आणि दलित नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मुस्लीम, दलित, मराठा समीकरणावर एकमत झालं असून, मराठ, दलित आणि मुस्लीम एकत्र आल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर बंजारा समाज आणि ओबीसी समाजासोबतही चर्चा करणार असल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटीमध्ये मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरू तसेच दलित नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. मुस्लीम, दलित, मराठा समीकरण जुळलं, मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र आले असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, अन्यायाचं संकट आम्हाला परतवून लावायचं आहे, आता गुलामगिरीत जगायचं नाही म्हणजे नाही. बंजारा समजा आणि ओबीसी समाजासोबतही चर्चा करणार आहे. कोणत्या जागा लढवायच्या आणि किती जागा लढवायच्या याबाबत येत्या तीन तारखेला निर्णय घेणार आहे. आम्ही सर्व जागा लोकशाही मार्गानं लढणार आहोत. कोणाचीही दादागिरी आणि गुंडगिरी चालू देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आमच्या देवेंद्र तात्यांनी मला लक्ष केलं. राजकारणाच्या वाटेवर नेऊ नका सांगत होतो, त्यांनी नेलं. आता माझा कोणी विरोधक नाही. मी लोकशाही मार्गाने जात आहे. आम्हाला तुमच्या वाटेनं जायचं नाही. पण आडवा आला तर सोडणार नाही. तुमचा एक कागद आला तरी माणूस मोकळा जाऊ देणार नाही. कुणाचीही जात पाहात नाही. मला एखादा कागद आला तर एका फोनवर मी त्यांचं काम करतो.
दलित, मुस्लीम असो की धनगर असो प्रत्येकाचे काम करतो. मी जात कधीच पाहत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

लाइट’ गेली नो टेन्शन, थेट अंतराळातून मिळणार 24 तास वीज!

0

मुंबई — आजच्या काळात वीज ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. विजेअभावी आपली जवळपास सर्वच कामं ठप्प होऊ शकतात. त्यामुळे विजेला सातत्याने मागणी असते; पण काही कारणांमुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो आणि त्याचा परिणाम अनेक गोष्टींवर पाहायला मिळतो; पण लवकरच ही समस्या दूर होऊ शकते.

आपल्याला 24 तास अखंडित वीज मिळू शकते. ब्रिटनमधली एक स्टार्टअप कंपनी एका अनोख्या प्रकल्पावर काम करत आहे. यात यश मिळालं, तर 24 तास वीजपुरवठा होऊ शकतो. हा वीजपुरवठा थेट उपग्रहाद्वारे होऊ शकतो. अंतराळात वीजनिर्मिती करून ती उपग्रहाद्वारे वितरित केली जाऊ शकते. यासाठी आणखी एका पर्यायावरदेखील विचार सुरू आहे. पृथ्वीवर कोणताही ऋतू किंवा खराब हवामान असलं, तरी वीजपुरवठा अखंडित राहू शकतो.

थोडासा वादळी पाऊस झाला तरी लगेच वीजपुरवठा खंडित होतो. जगभरात भारतासह अनेक देश या समस्येचा सामना करत आहेत. काही वेळा वादळामुळे झाडांसह विजेच्या तारा, खांबदेखील कोसळतात. यामुळे अनिश्चित काळासाठी वीजपुरवठा खंडित होतो. आता ही समस्या कायमची सुटू शकणार आहे. ऋतू कोणताही असला तरी आपल्याला 24 तास 365 दिवस अखंडपणे वीज उपलब्ध होऊ शकणार आहे.
संशोधकांनी ही अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी काम सुरू केलं आहे. जेव्हा हवामान स्वच्छ असतं, तेव्हाच सू्र्यकिरणं आपल्यापर्यंत पोहोचतात; पण अंतराळात कायम सूर्यप्रकाश आणि त्याची ऊर्जा उपलब्ध असते. त्यामुळे संशोधक अंतराळात वीजनिर्मिती करून ती वीज पृथ्वीवर पोहोचवण्याच्या योजनेवर काम करत आहेत.

अंतराळातून वीजपुरवठा या संकल्पनेवर अमेरिका, जपानसह युरोपातले अनेक देश काम करत आहेत. ब्रिटनमधल्या एका स्टार्टअप फर्मने 2030 पूर्वी यास सुरुवात होईल असा दावा केला आहे. स्पेस सोलरच्या माध्यमातून किफायतशीर, वाढवता येण्याजोगं आणि पूर्णपणे अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करणं, हा ब्रिटनमधल्या स्पेस सोलर फर्मचा उद्देश आहे. स्पेस सोलर इंजिनीअरिंगच्या स्पेस बेस्ड सोलर पॉवर प्रकल्पासाठी ब्रिटन सरकारने या वर्षी एप्रिलमध्ये सुमारे 13 कोटी रुपयांचा निधीदेखील दिला आहे.
अंतराळातून वीजपुरवठ्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे 24 तास वीजपुरवठा करणं शक्य होईल. याशिवाय ही स्वच्छ, हरित ऊर्जा असेल. यामुळे 2050पर्यंत पृथ्वीवरचं कार्बन उत्सर्जन शून्य करण्याच्या दिशेने मोठी मदत होईल. या माध्यमातून ब्रिटनची विजेची गरज पुरेशा प्रमाणात भागू शकते. सोलर स्पेस कंपनीच्या माहितीनुसार, कंपनी 2030पर्यंत पहिला ऑर्बायटल डेमॉन्स्ट्रेटर सॅटेलाइट पाठवणार आहे. त्यात यश मिळालं, तर तो जगातला अक्षय ऊर्जास्रोतासाठीचा पहिला प्रयत्न असेल.

या प्रकल्पांतर्गत कमी दरात विजेचं उत्पादन हे एक मोठं आव्हान असेल. अंतराळात उभारल्या जाणाऱ्या पॉवर स्टेशनचा पाया आकारने खूप मोठा असेल. याशिवाय पृथ्वीच्या कक्षेतून वीज पुरवठा करणाऱ्या उपग्रहांमध्ये एक किलोमीटर लांबीचा ट्रान्समीटर पृष्ठभाग असू शकतो. त्यामुळे हे काम सोपं नसेल. अंतराळात तयार केलं जाणारं पॉवर स्टेशन स्पेस स्टेशनसारखे असेल; पण त्याची किंमत आणि ते तयार करण्यासाठी लागणारा वेळ या दोन्ही गोष्टी स्पेस स्टेशनच्या तुलनेत खूप जास्त असू शकतात. या दृष्टिकोनातून अंतराळातून मिळणारी वीज फारशी स्वस्त नसेल. स्पेस सोलर इंजिनीअरिंग जर हे तंत्रज्ञान कमी खर्चात विकसित करू शकलं तर ही मोठी कामगिरी ठरेल.

या प्रकल्पात संशोधक मोठी सोलर पॅनेल्स लावलेला एक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करणार आहेत. ही सोलर पॅनेल्स कोणत्याही उपकरणाशिवाय केवळ सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती करतील. ही वीज कोणतीही तार किंवा खांबाशिवाय 2.45 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीने पृथ्वीवरील रिसीव्हरकडे पाठवली जाईल. याशिवाय दुसरा पर्यायाचा विचार करता उपग्रहाद्वारे थेट 30 मेगावॉट ऊर्जेची बीम पृथ्वीवर पाठवली जाईल. यामुळे सुमारे तीन हजार घरांपर्यंत वीज पोहोचू शकेल.
स्पेस सोलर इंजिनीअरिंगच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून 2036पर्यंत सहा वीज स्टेशन्स उभारणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या प्रत्येक स्टेशनसाठी सुमारे 80 कोटी डॉलरपर्यंत खर्च येऊ शकतो. या पॉवर स्टेशनच्या माध्यमातून 24 तास वीजपुरवठा करणं शक्य होईल. पृथ्वीवर कोणताही ऋतू असला तरी त्याचा कोणताही परिणाम वीजपुरवठ्यावर होणार नाही.

परळीकरांची बदनामी करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा – धनंजय मुंडे

0

भावसार समाज, गोंधळी समाज, गवळी समाज तसेच जैन समाजातील बांधवांच्या धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठका

मंदिरे, सामाजिक सभागृह यांसह समाज बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध – धनंजय मुंडेंची ग्वाही

परळी  — सातत्याने काही लोक निवडणुकीच्या तोंडावर परळीत गुंडगिरी, दहशत वगैरे शब्द वापरून परळी शहराची व शहरातील रहिवाशांची बदनामी करत आहेत. इथे सर्व समाजातील लोक गुण्या-गोविंदाने राहतात. परळी हे कायम विकसनशील शहर आहे, या शहराची व शहरातील लोकांची बदनामी करणाऱ्यांना आता जनतेने मतदानातून उत्तर द्यावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना केले आहे.

परळी शहरातील भावसार समाज, गोंधळी समाज, गवळी समाज, रावळ समाज, तसेच जैन समाजातील बांधवांच्या धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज मॅरेथॉन बैठका संपन्न झाल्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी विविध समाज बांधवांच्या समस्या तसेच मागण्या समजून घेतल्या.

समाज बांधवांच्या विविध मंदिरांची उभारणी तसेच सभागृहांच्या उभारणीसाठी जागेसह निधीचे प्रश्न सोडवले जातील, तसेच ज्या ठिकाणी रस्ते व विजेची समस्या आहे ते प्रश्न निवडणूक क्षमताच प्राधान्याने सोडवले जातील अशी ग्वाही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली.

कधी म्हणतात परळीत बोगस बूथ आहेत, कधी म्हणतात परळीतल्या लोकांनी बोगस मतदान केले, इथल्या लोकांच्या भावनांचा व आमच्यावरील प्रेमाचा अनादर करून यांना केवळ परळीची बदनामी साधायची आहे अशा लोकांना जनतेने मतदानातूनच धडा शिकवावा असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.

या बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यासह सुरेश अण्णा टाक, अय्युब पठाण, प्रा.विनोद जगतकर, ऍड.मनजीत सुगरे, दत्ताभाऊ सावंत, चेतन सौंदळे, महेंद्र रोडे, अनिल अष्टेकर, यांच्यासह प्रभाकर हजारे, गोपाळ मामा, सारिका तांदळे, विलास सुगावे, अरुण अर्धापुरे, बाबू काका तांदळे, गवळी समाजातील मुन्ना बागवाले, अरुण चिखले, नितीन बागवाले, मारुती काळे, बापू शिंदे, संभाजी काळे, बंडू बागवाले,सोनाप्पा बागवाले, गोंधळी व रावळ समाजातील जगदीश इगवे, दत्ता दुलदुले, राहुल इगवे, वैजनाथ घोटकर, दीपक सुपले, सचिन मांडे, गणपत इगवे, लिंबाजी ढवळे, रतन मिरगे, नरसिंह मिरगे, गजानन रेणुके यांसह विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारा वाजता तेरा गोटे, रांधपिणीचे कुले मोठे; उस्मान शेखची हीच स्थिती

0

बीड — कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध धंद्या विरोधात फास आवळला असला तरी स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीवर बसलेले
उस्मान शेख यांची कामगिरी मात्र लज्जास्पद असल्याचं पाहायला मिळत आहे. मालवणी भाषेत सांगायचं तर बारा वाजता तेरा गोटे, रांधपिणीचे कुले मोठे; उस्मान शेखची हीच स्थिती
स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे एस पी ची सावली मानल्या जाते. या शाखेला जिल्ह्यात कुठेही कारवाई करायला मुभा असते. मोठ मोठाल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी या शाखेचा वापर पोलीस अधीक्षकांकडून केला जातो. मात्र बीडच्या एलसीबी शाखेची परिस्थिती मात्र दयनीय असल्याचं पाहायला मिळत आहे. बाळराजे दराडे सारखा एपीआय दर्जाचा माणूस जिल्ह्यात कारवाया करतो. गुटखा माफिया, आर्थिक घोटाळ्यातील आरोपीचा शोध घेऊन बनावट ऑईलचा कारखाना उध्वस्त करू शकतो तेही एसटीच्या सांगण्यावरून. मात्र स्थानिक गुन्हे शाखा एक दोन मोटार सायकल चोरी करणारा भुरटा चोर पकडून फुटकळ कारवाया करत स्वतःचीच मुसळाने बडवून घेत असल्याचं सध्यातरी पाहायला मिळत आहे. पोलीस अधीक्षकांच्या कर्तव्यदक्षतेलाच सुरुंग लावला जात आहे.यावरून मालवणी भाषेतील म्हण मात्र पी आय उस्मान शेखच्या कारभाराला चपखल बसत आहे. कोकणात शेतीच्या वेळी झाडून सगळे शेती कामासाठी शेतावर जातात. एखादी कामाचा कमी उरक असणारी स्त्री घरी रहाते.शेतातील कामकऱ्यांच्या पेज पाण्याचे पाहणे एवढेच तिला सोपविलेले काम. अशा वेळी दुपारच्या वेळी कोणी अनाहूतपणे पाहुणा आला तर त्याचा व्यवस्थित पाहूणचार व्हावा. हा त्यामागे उद्देश असायचा. मात्र पाहुणा बघून तिची तारांबळ उडे. चुलीकडे बसुन काही शिजवण्या ऐवजी शोधाशोध करण्यात तिचा वेळ जाई. बाहेर बसलेला पाहुणा स्वयंपाकघरातल्या या हालचाली टिपे. बाईच्या इतक्या खटापटीनंतर आता आपल्याला सुग्रास अन्न मिळेल या आशेवर असलेल्या पाहुण्याला शेवटी मिळते काय तर भरपूर निवळ असलेली थोडेसेच भातगोटे असलेली उरलेली पेज आणि लोणचे. इतका वेळ स्वयंपाकघरात वावरणाऱ्या नववारीतील स्त्रीच्या हालचाली न्याहाळतांना पदरी पडले काय तर ” बारा वाजता तेरा गोटे, रांधपिणीचे कुले मोठे”. थोडक्यात मोठा भ्रमनिरास होतो ! हीच स्थिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या एपीआय उस्मान शेख कडून सध्यातरी होऊ लागली आहे.

महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना 87, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना इतक्या जागा?

0

मुंबई — महायुतीतील जागावाटपाची स्थिती स्पष्ट झाली आहे. भाजपाला १४८, शिंदे शिवसेना ८५ तर अजित पवारांच्या वाट्याला ५१ जागा आल्या आहेत. अशातच महाविकास आघाडीचेही जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मविआने छोट्या मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत. तर पाच जागांवर दोन-दोन उमेदवार दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी संपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही तासांपर्यंत महायुतीकडून उमेदवारी याद्या प्रसिद्ध करण्यात येत होत्या. दोन्ही आघाडी, युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ एवढे प्रदीर्घ चालले होते की शेवटचा दिवसही या याद्या प्रसिद्ध करण्याचाच होता.

तिन्ही पक्षांना अंदाज असल्याने आपापल्या उमेदवाराकडे एबी फॉर्म पोहोचेल याची सोय करण्यात आली होती. परंतू, यामुळे पाच ठिकाणी दोन दोन उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या एबी फ़ॉर्मवर अर्ज भरले आहेत. याचे चित्र आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम आकडा समोर आला आहे. या आकड्यानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपाला १४८ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाला ८५ आणि अजित पवार गटाला ५१ जागा आल्या आहेत. उर्वरित ४ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत.

महाविकास आघाडीमध्येकाँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेस १०२ जागांवर लढत आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९६ जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८७ जागा मिळाल्या आहेत. पाच जादाचे उमेदवार सोडले तर या जागा २८० होत आहेत. यानुसार मविआने मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत.
पाच जागांवर तीनपैकी दोन पक्षांचे उमेदवार असलेले मतदारसंघ हे मिरज, सांगोला, पंढरपूर, परांडा, दिग्रस हे आहेत. आता या जागांवर कोण माघार घेते किंवा मैत्रिपूर्ण लढत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

काकडहिरा शिवारात गाड्यांचे बनावट ऑइलचा कारखाना उद्ध्वस्त

0

बीड — गेल्या अनेक दिवसापासून बीड जवळील काकडहिरा शिवारात नामवंत कंपनीचे बनावट ऑइल तयार करण्याचा धंदा जोरात सुरू होता. याची माहिती मिळताच सपोनी बाळराजे दराडे यांनी छापा मारून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध धंद्यावर विरोधात करडी नजर ठेवायला सुरुवात केली आहे. सपोनी बाळराजे दराडे यांना जिल्ह्यात अवैध धंद्या विरोधात कारवाई करण्याची मुभा देण्यात आल्यामुळे दराडे यांच्या कारवाया वाढल्या आहेत. दरम्यान बीड जवळील काकडहिरा शिवारात जिओ पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या शेडमध्ये बनावट ऑइल तयार करून विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यावरून मंगळवारी दुपारनंतर बाळराजे दराडे यांनी छापा मारून केलेल्या कारवाईत टाटा मोटर्स, गल्फ ऑइल, भारत बेंझ चे बनावट फाईल आढळून आले. याबरोबरच ऑइल तयार करण्यासाठी लागणारी मशिनरी, मोटर्स यासोबतच तीनशे पोते युरिया चा साठा या ठिकाणी आढळून आला. यावेळी बनावट तेलाचे 300 डबे जप्त करण्यात आले.पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई सपोनि बाळराजे दराडे यांच्यासह एपीआय राठोड, मोराळे यांचा समावेश होता.

संजय दौंड व धनंजय मुंडे यांचे मनोमिलन; पत्रकार परिषदेतून दिली माहिती

0

माझ्यात आणि संजय भाऊंमध्ये कोणतेही मतभेद किंवा मनभेद कधीच नव्हते – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे माझे बंधू, त्यांची निवडणूक मी माझी समजून पूर्ण क्षमतेने प्रचार करणार – संजय भाऊ दौंड

अंबाजोगाई — माजी आ.संजय भाऊ दौंड यांनी महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी सर्व ताकदीने उभे राहण्याचा निर्णय घेतला असुन, ते आजपासूनच धनंजय मुंडे यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे आज धनंजय मुंडे व माजी आ.संजय भाऊ दौंड यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

माजी आ.संजय भाऊ दौंड हे विधानसभा निवडणुकीत इच्छुक असून, ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील का, या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे.

2014 व 2019 या दोनही विधानसभा निवडणुकीत आम्ही दोघे सोबत होतो. एकदिलाने आम्ही एकत्र काम केले. 2019 च्या निवडणुकीत मी विजयी झालो, त्यात संजय भाऊंचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनंतर संजय भाऊंना पण विधानपरिषद सदस्यत्वाची संधी मिळाली. आता पुन्हा मी विधानसभा निवडणुकीत सामोरा जात आहे, तेव्हा संजय भाऊ हे पूर्ण ताकदीने माझ्या सोबत आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे, असे धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

आगामी काळात पक्ष संजय भाऊंना आणखी उत्तम संधी मिळवुन देईल, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

धनंजय मुंडे हे माझे बंधू आहेत. मागच्या आठवड्यात मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि आज धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय मी जाहिर करत आहे. धनंजय मुंडे यांची ही निवडणूक ही माझी निवडणूक आहे, असे समजून मी पूर्ण क्षमतेने प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचे माजी आ.संजय दौंड यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मुंडे-दौंड कुटुंबातील स्नेह कधीच कमी होणार नाही, आम्ही कायम एकदिलाने काम करत राहू, असेही धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, शिवाजी सिरसाट, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, विश्वाम्भर फड, रणजित लोमटे, राजवर्धन दौंड यांसह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

लाचखोरांनी लाज सोडली; 2 हजाराच शेण खाताना तलाठी एसीबीने पकडला

0

बीड — भोगवटादार प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी करणाऱ्या लाचखोर तलाठ्यास दोन हजार रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

मदन लिंबाजी वनवे वय 35 वर्ष रा. गायकवाड यांचे घर, पंढरी, धानोरा रोड बीड असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या मित्राने मौजे तळेगाव येथे गट क्रमांक 192 मधील मालमत्ता क्रमांक4309 चे मुख्त्यारपत्र तयार करून दिले होते. सदर प्लॉटची ग्रामीण गुंठेवारी करण्यासाठी भोगवटादार प्रमाणपत्राची गरज होती. प्रमाणपत्र देण्यासाठी तलाठी लोकसेवक मदन वनवे याने लाचेची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार एसीबी कडे करण्यात आल्यानंतर पंचा समक्ष तलाठी वनवे याने तीन हजार रुपये मागितले. मात्र तडजोडी अंती दोन हजार रुपये घेण्यास तलाठी तयार झाला. दरम्यान लाचे चे पैसे स्वीकारताना मदन वनवे यास त्याच्या खाजगी कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेख युनूस, किरण बगाटे, पोलीस अंमलदार, भरत गारदे, हनुमंत गोरे, संतोष राठोड, अविनाश गवळी. गणेश मेहेत्रे यांनी केली.