Home Blog Page 149

अनागोंदी कारभाराने रब्बी पिके धोक्यात;महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

0

लिंबागणेश — बीड तालुक्यातील लिंबागणेश पंचक्रोशीतील गावांना विद्युत पुरवठा असणाऱ्या लिंबागणेश येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील अनागोंदी कारभारामुळे विजेच्या समस्येने तिव्र रुप धारण केले असुन दिवसभरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने तसेच कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने मुबलक पाणी उपलब्ध असुनही वीजे अभावी शेताला पाणी देता येत नाही .

रब्बी हंगामातील कांदा ज्वारी,गहु, हरभरा आदी पिके वाळु लागल्याने शेतकऱ्यांना हातची पिके वाया जाण्याची धास्ती असुन लिंबागणेश येथील ३३ केव्ही.उपकेंद्रातील उप अभियंता पद २ महिन्यांपासून रिक्त असुन लाईनमन वेळेवर ड्युटी करत नसल्याने तसेच मुख्यालयी रहात नसल्याने रात्री अपरात्री ग्रामस्थांना फ्युज टाकणे,केबल बदलणे आदी कामे करावी लागत असुन महावितरणच्या अनागोंदी कारभार विरोधात आज दि.५ सकाळी गुरुवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर ते अहमदनगर ५४८ डी राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्तारोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ,शिवशक्ती भिमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे, मुळुकवाडीचे माजी सरपंच कृष्णा पितळे, मसेवाडीचे तुळशीराम काटकर यांची समायोजित भाषणे झाली.

सावकारे एस.जी.उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग ग्रामीण बीड यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी निवेदन स्विकारताना पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे , मंडळ अधिकारी अशोक डरपे,पो.हे. संतोष राऊत, बाबासाहेब डोंगरे, नवनाथ मुंढे , मधुकर तांदळे, इसाक शेख, उबाळे, कुलकर्णी उपस्थित होते. आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, राजाभाऊ गिरे, विक्रांत वाणी, सुरेश निर्मळ,रमेश पाटील विनायक मोरे, पांडुरंग वाणी, अँड.गणेश वाणी,कृष्णा पितळे, सय्यद बशीर, औदुंबर नाईकवाडे, बोरखेडचे आरुण काकडे, विनायक शिंदे, निळकंठ काकडे , आजिनाथ घरत, शिवाजी घरत, साहेबराव घरत, विश्वंभर गिरी,अशोक जाधव, संतोष भोसले, सहभागी होते.

आश्वासनानंतर आंदोलन मागे

उप कार्यकारी अभियंता महावितरण उप विभाग बीड ग्रामीण यांनी आंदोलनातील मागण्यांच्या अनुषंगाने लिंबागणेश येथील ३३ केव्ही.उपकेंद्रातील सहायक अभियंता रिक्त पदावर पदस्थापना. नियुक्तीसाठी वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा केला आहे.लिंबागणेश व पोखरी ( घाट) गावच्या पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या रोहित्रास जवळच्या ११ केव्ही वाहिनीपासुन तातडीने सर्वे करून अंदाज पत्रक मंजुरीसाठी वरीष्ठ कार्यालयास सादर करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कृषी वाहिनीवर लोड वाढल्याने चक्राकार पद्धतीने विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. लिंबागणेश गावातील दुरूस्ती व केबल व कट आऊट दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. लिंबागणेश येथील विद्युत कर्मचारी यांचा अपघात झाल्याने सद्यस्थितीत अन्य कर्मचाऱ्यांना देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली असल्याचे लेखी दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

हिंगणीत सोयाबीनच्या 62 कट्ट्यांची चोरी

0

चौसाळा — जवळच असलेल्या हिंगणी (बु) येथील शेतकरी शहाजी वायसे यांच्या घराबाहेर ठेवलेलं सोयाबीनची 62 कट्टे बुधवारी मध्यरात्री चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे चौसाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगणी (बु.) येथील शेतकरी शहाजी शंकरराव वायसे यांनी घराबाहेर सोयाबीन पोत्यांची थप्पी लावलेली होती. बुधवारी रात्री वायसे कुटुंबातील सगळे झोपलेले असताना मध्यरात्रीच्या
सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोबत आणलेले वाहन चौसाळा नांदूर रस्त्यावर उभे केले. चोरट्यांनी सोबत आणलेल्या माणसाच्या साह्याने सोयाबीन थप्पीतील 62 पोते जवळपास एक हजार फूट अंतरापर्यंत पाठीवर घेऊन जात. सोबत आणलेल्या वाहनात भरून ते लंपास केले. चोरीला गेलेले सोयाबीन अंदाजे 40 क्विंटल इतके होते. अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला असून नेकनूर पोलिसांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने मात्र खळबळ माजली असून भीतीचे सावट पसरले आहे.

आष्टी:शाळेत जाणाऱ्या 15 वर्षीय मुलीवर ट्रेनमधून उतरून तिघांनी केला अत्याचार

0

आष्टी — वीट भट्टीवर दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या मजुराच्या पंधरा वर्षीय मुलीवर रेल्वेतून उतरलेल्या तिघांनी लैंगिक अत्याचार घटना घडली. पीडिता नऊ महिन्याची गर्भवती असल्यानंतर ही बाब समोर आली.

याप्रकरणी तिघांविरुद्ध सोमवारी आष्टी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील एक कुटुंब मागील दोन वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यातील एका गावात वीटभट्टीवर कामासाठी आले होते. याच कालावधीत मार्च 2024 नक्की तारीख माहीत नाही.15 वर्षीय अल्पवयीन मुलगी याच गावातील शाळेत रेल्वे पटरीच्या बाजूने जात असताना अनोळखी तिघे जण रेल्वेतून उतरले व यातील दोघांनी तिच्या हाताला धरून शेजारच्या शेतात नेले. यातील एकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना समोर आली. पीडिता यातून 9 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून 2 डिसेंबर रोजी अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे करीत आहेत.

विकासकामांच्या वचनपूर्तीसाठी कटिबद्ध राहू-डॉ.योगेश क्षीरसागर

0

बीडमध्ये संत सावता महाराज मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

बीड — नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण विकासाचे व्हिजन मांडले होते. महायुती सरकारच्या माध्यमातून आपण विकासकामांच्या वचनपूर्तीसाठी कटिबद्ध राहणार आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली.

बीडमध्ये संत सावता महाराज मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन बुधवारी (दि.४) करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नागरिक नामदेवराव दुधाळ, माजी नगरसेवक बाबूराव दुधाळ, नितीन साखरे, शुभम धूत, बिभीषण लांडगे, मोहनराव गोरे, प्रा.लक्ष्मण गुंजाळ, रमेश दुधाळ, राजेंद्र शेलकर, राजेश साळुंके, गोरख यादव, संतराम पानखेडे, दिलीप बेदरे, मयुर आखाडे, मनोज काळे, निलेश घाडगे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, शहरातील सावता माळी चौक परिसरातील बिंदूसरा नदीकाठेला संत सावता महाराजांचे भव्य मंदिर निर्माण केले जात आहे. या मंदिरासमोरील सभागृहासाठी मी व माजी मंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर यांनी यापूर्वी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. याठिकाणी लोकवर्गणीतून ४० लक्ष रुपयांचे मंदिर उभारले आहे. आपण मंदिर, सभागृह व परिसर विकासाकरिता निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे काम अंतिम टप्यात असून मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी आता २० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या मंदिराचे काम पूर्णत्वास जात असून लवकरच प्राणप्रतिष्ठापणा सोहळा आयोजित केला जाणार आहे. या धार्मिक कार्यात आपला खारीचा वाटा असल्याचे मनाला समाधान वाटते, असेही डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एपीआय गणेश मुंडे यांची गेवराई येथे बदली

0

बीड — जिल्ह्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे एपीआय गणेश मुंडे यांची गेवराई येथे महामार्ग पोलीस विभागात बदली करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वीच एपीआय गणेश मुंडे यांची नळदुर्ग येथे बदली करण्यात आली होती. मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे अवैध धंद्ये करणाऱ्यांचे धाबे दणाणत असत. 3 डिसेंबर रोजी त्यांची नळदुर्ग येथून गेवराई येथील महामार्ग पोलीस विभागात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक (मुख्यालय) अरविंद साळवे, अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक मुंबई यांनी हे आदेश काढले आहेत.

“बप्पा “गिरलेल्या दिलाची प्रचिती देण्यापेक्षा विमा, आरक्षण, पवन ऊर्जेचे प्रश्न लोकसभेत मांडा!

0

बीड — लोकसभेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर पासून सुरू झालेलं असताना खासदार बजरंग सोनवणे जिल्ह्यातील जनतेला गिरलेल्या दिलाची प्रचिती देत आहेत. बजरंग बप्पांनी पत्रकारांना शिव्या देण्यापेक्षा मराठा आरक्षण, पिक विमा, पवन ऊर्जा कंपन्यांची शेतकऱ्यावर सुरू असलेली दादागिरी यावर संसदेत आवाज उठवत रान पेटवून संकटमोचक म्हणून “बजरंग” नावाला साजेस काम करावं.अन्याय, अत्याचाराची लंका दहन करा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

एकीकडे लोकसभेच अधिवेशन सुरू असताना त्याला गैरहजर राहत खा.बजरंग सोनवणे यांची गाडी पत्रकारांवरच घसरली त्यांच्या बायको लेकरावर अशोभनीय टिका टिप्पणी केली. पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेताच सल्लेवजा गिरलेल्या दिलाची प्रचिती देत टोमणे वजा दिलगिरी व्यक्त केली.आपल्याला ज्या पदावर जनतेने बसवले आहे.त्या पदाच्या प्रतिष्ठेची धूळधाण केली. ज्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने स्वतःच्या कष्टातून कमावलेला पैसा खर्च करत बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं. त्यांच्या आरक्षण मुद्द्याचा विसर बजरंग सोनवणे यांना अधिवेशन काळातच पडला हे समाजाच दुर्दैव आहे. 2020 चा पिक विमा शेतकऱ्यांच नुकसान होऊन देखील न्यायालयीन तसेच रस्त्यावरची आंदोलनाची लढाई लढून देखील अजून मिळालेला नाही. 2024 चा पिक विमा अजूनही मिळण्यासाठी प्रशासनाच्या कुठल्याही हालचाली नाहीत. अनुदानाचा प्रश्न देखील मोठा आहे.

शेतीवर उपजीविका करणारा शेतकरी वर्ग विशिष्ट जातीचा जरी नसला तरी बहुसंख्य मराठा समाज या क्षेत्रात आहे याचा विसर देखील खासदार महोदयांना पडला. पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा अशी सद्बुद्धी त्यांना कधी येणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून देखील विचारला जात आहे. याचबरोबर ज्या बालाघाटाने बजरंग सोनवणे यांना निवडणुकीत डोक्यावर घेतलं. प्रचंड मताधिक्य दिलं. ज्या मताधिक्याच्या जोरावर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं दुर्दैवाने त्या बालाघाटाचीच सध्या ससेहोलपट होताना दिसून येत आहे. ज्या केंद्र सरकारने अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताला महत्व देत मोठमोठ्या प्रकल्पाला मंजूरी दिली. या प्रकल्पामध्ये उतरलेल्या पवन ऊर्जा कंपन्या शेतकरी वर्गालाच कच्चं खाण्याचं काम सध्या करत आहेत. दादागिरी, गुंडगिरी आमिष दाखवत शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्याकडे लक्ष द्यायला मात्र खासदार महोदयांना वेळ नाही. पवन ऊर्जा कंपन्या पोलीस यंत्रणा हाताशी धरून शेतकऱ्यांच जगण हराम करत आहेत त्या कंपन्या विरोधात मात्र खासदार शब्दही बोलायला आज तयार नाहीत. मंगळवारी पवन ऊर्जा कंपनी व पोलीस यंत्रणेच्या दादागिरीने निर्माण केलेल्या सुलतानीला कंटाळून शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न सुलतानपूर मध्ये केला. तळहाताच्या फोडासारख जपलेल्या पिकाची तार ओढण्यासाठी नासाडी केली जात होती. एवढं घडूनही त्यावरही चकार शब्द बोलायला देखील जिभ जड होऊ लागली आहे. उलट त्या शेतकऱ्यावरच सरकारी कामात अडथळा आणणे, आत्मदहनाचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं सांगत मानसिक अत्याचार करण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणे कडून केला गेला. एवढं सगळं घडत असताना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले की त्यांना शिव्या हसडायच्या ही कुठली पदाची प्रतिष्ठा असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे, जाती,मातीचे ज्वलंत प्रश्न संसदेत पेटवून “बजरंग” नावाची बुज राखा अशी मागणी जनतेतून केली जात आहे. तुमच्याकडून पत्रकारांना अजूनही शिव्या दिल्या गेल्या तरी चालतील पण जनतेचे प्रश्न लोकसभेत उठवून रानपेटवत अन्याय अत्याचाराची “लंका” दहन करण्याचं काम आता तरी करा अशी मागणी जनतेतून होत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला अजगराची सूस्ती; दराडे यांनी उतरवली गुटखा माफियाची मस्ती

0

बीड — अजगरासारखी स्थानिक गुन्हे शाखा सुस्तावलेली असताना एसपींच्या विशेष पथकाने मात्र पुन्हा कारवायांचा धडाका सुरू केला आहे.अंबाजोगाई शहरात गुटख्याच्या गोदामावर मंगळवारी (दि.3) सायंकाळी सातच्या सुमारास छापा टाकला यावेळी 10 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला.

पोलीस यंत्रणेत स्थानिक गुन्हे शाखा देखील असते हे जनतेच्या विस्मरणातून जाऊ लागले आहे. भक्ष गिळून पडलेल्या अजगरासारखी स्थिती स्थानिक गुन्हे शाखेची बनली आहे. निष्क्रिय अधिकारी म्हणून उस्मान शेख यांची ओळख निर्माण झाली आहे. हप्ते खोरीतच शाखा ही अग्रेसर आहे की काय असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. पोलीस अधीक्षकांना देखील याचं काहीच कसं वाटत नाही? ही खुर्ची नुसती उबवायला नाही? त्यांच्यावर कारवाई का होत नाही?त्यांच्या कामाचा लेखाजोखा का पाहिला जात नाही?याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. फुटकळ कारवाया करायच्या अन गावभर दवंडी द्यायची अशी पद्धती एलसीबीची झाली आहे.यातच पोलीस यंत्रणेत बाळराजे दराडे यांच्याच कारवाया जनतेच्या मनावर सध्या तरी राज्य करू लागल्या आहेत.सहा.पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी अंबाजोगाई शहरातील एका गुटख्याच्या गोदामावर मंगळवारी छापा मारला. हा छापा अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजन च्या गोदामावर मारून रजनीगंधा, आर.एम.डी, विमल, गोवा, बाबा या नावाचा गुटखा ताब्यात घेतला आहे. या कारवाईत 10 लाख 67 हजारांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.गणेश बिडवे, किरण रविंद्र शेटे या दोन गुटखा व्यापाऱ्यांना देखील पकडण्यात आले. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे,मोराळे, मुंडे,नागरगोजे,मस्के, नामदेव सानप यांचा सहभाग होता.

सुलतानपुरात पवनचक्की कंपनीसह पोलिसांची सुलतानी! गुन्हेगारापुढे शेपूट घालणाऱ्या पोलिसांची शेतकऱ्यांवर दादागिरी ?

0

बीड — जिल्ह्यात सगळीकडे अवैध धंदे बोकाळलेले असताना गुन्हेगारीवर आळा घालताना शेपूट घालणारी पोलीस यंत्रणा शेतकऱ्यावर मात्र मर्दानगी दाखवू लागली आहे. बालाघाटावर पवनचक्की कंपन्यांचा धुमाकूळ सुरू असून पोलीस यंत्रणा मावेजा न देता शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची नासाडी करणाऱ्या कंपन्यांना संरक्षण देत कर्तबगार हे दाखवू लागले आहेत. या त्रासाला कंटाळून वैतागलेल्या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्यावरच गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र आत्महत्येची वेळ आणणाऱ्या कंपन्यांचे मात्र पोलीस तळवे चाटत असल्याचे चित्र सुलतानपूर मध्ये पाहायला मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसापासून बालाघाटावर पवनचक्की कंपन्या धुमाकूळ घालत आहेत. बीडच्या आमदारांसह परळीतून देखील पवनचक्की कंपन्यांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप होत आहे. चौसाळा जवळील सुलतानपूर येथील शेतकऱ्यांना एक रुपया देखील मावेजा न देता त्यांच्या उभ्या पिकातून स्टिंगिंग म्हणजेच तार ओढण्याचा काम ओ टू कंपनीने अक्षरशः पोलीस संरक्षणात सुरू केल आहे. मावेजा मिळाल्यानंतर काम सुरू करा ही मागणी शेतकऱ्यांनी केली असता भाडोत्री गुंड व पोलिसांच्या मदतीने शेतकऱ्यावर दादागिरी आज केली गेली. तार ओढण्याचे सुलतानपुर शिवारातील गट नंबर 247,250,251 मधील
काम थांबत नसल्याने, मावेजा मिळत नसल्याने, उभ्या पिकाचे नुकसान न पाहवल्याने शेतकऱ्याने कंटाळून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. मात्र सुलतानपूरचे शेतकरी पंजाब अनुरथ नाईकवाडे वय 42 वर्ष व त्यांचे वडील अनुरथ नाईकवाडे यांना शासकीय कामात अडथळा आणला व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी चौसाळा पोलीस चौकीत आणले गेले. एरवी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या पोलिसांनी मात्र आम्हाला पोलीस अधीक्षकांचा आदेश आहे त्या आदेशाने आम्ही गुन्हा दाखल करणारच अशी भूमिका घेतली.

पोलिसांसह पवनचक्की कंपन्यांची सुलतानी कधी संपणार?
गेल्या एक ते दीड वर्षापासून पवनचक्की कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक व आमीष दाखवत वेळप्रसंगी दादागिरी करत हे राज्य सुलतानाचं आहे याचा प्रत्यय वारंवार आणून दिला.एरवी एखादा मोठा गुन्हा घडला तर दिरंगाई करणारे पोलीस मात्र या सुलतानांचे पाय चाटत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस संरक्षण न मागता देखील अनेक वेळा पैसा मिळतो म्हणून कंपन्यांच्या गाड्याला संरक्षण दिल्याचे पाहायला मिळाले. राजकीय अभय बीडच्या आमदाराकडून तसेच परळी कडून मिळत असल्याने हे प्रकार होत असल्याचा आरोप वारंवार होऊ लागला असला तरी याचा खंडन मात्र दोघांनीही केलेलं नाही. त्यामुळे या आरोपात तथ्य असल्याचं शेतकरी आता उघड उघड बोलू लागले आहेत.

बारगळ साहेब..! माफियावर कारवाई करताना शेपूट घालणारी पोलीस यंत्रणा इथेच मर्दानगी का दाखवू लागली?
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना वाळू वाहतूक करणारे टिप्पर स्वतःला पकडावे लागले. पोलीस संरक्षणात हे पकडलेले टिप्पर ठेवलेले असताना त्यांना अर्ध्या रात्रीत पाय फुटले. गुन्हेगारीने जिल्ह्यात कळस गाठलेला असताना तुमचे डोळे सावली समजली जाणाऱ्या गुन्हे शाखेचे अधिकारी खुर्च्या उबवित तोंडावर बोट हाताची घडी अशा स्थितीत बसलेले आहेत.गुन्हेगारांनी उच्छाद मांडलेला असताना शेपूट घालणारी तुमची पोलीस यंत्रणा शेतकऱ्यांच्या बाबतीतच मर्दानगी का दाखवू लागली आहे? असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.

शेतकऱ्यावर गुन्हा मग आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे तळवे का चाटता?
मावेजा न मिळाल्यामुळे पवनचक्की दादागिरीला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला असं नेकनूर पोलीस म्हणत आहेत. मग एस पी साहेब ज्यांनी शेतकऱ्यावर आत्मदहनाची वेळ आणली त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले जात नाहीत?त्यांचे तळवे तुमची पोलीस यंत्रणा का चाटत आहे याचंही उत्तर आता शेतकरी मागे लागले आहेत.

पोलिस प्रशासन पवनचक्की कंपन्यांच्या संरक्षणासाठी सर्वात पुढे पिडीत शेतकऱ्यांची जबाबदारी कोणाची?

पवनचक्की कंपन्यांनी बालाघाटावर गेल्या २ वर्षांपासून उच्छाद मांडला असुन शेतकऱ्यांच्या अडाणी पणाचा फायदा घेऊन स्थानिक व बाहेरील गुंड बाळगुन आर्थिक लुट सुरू असुन पोलिस प्रशासनाला हाताशी धरून मनमानी कारभार करत आहेत. बालाघाटावरील शेतकरी पवनचक्की कंपन्यांच्या दहशतीखाली असुन पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली कंपन्यांपुढे लोटांगण घालत असुन शेतकऱ्यांवर दडपशाही करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मग नेमका प्रश्न पडतो पोलिस प्रशासन शेतकऱ्यांसाठी काम करतंय की पवनचक्की कंपन्यांसाठी असा प्रश्न उपस्थित करत मग पिडीत शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी कोणाची?? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे.

आपणच गरुड असल्याचा आव; घाणीत चोंचं बुडवण्याचा कसा जाईल कावळ्याचा स्वभाव?

0

बीड — कावळा गरुडावर स्वार झाला. त्याकडे दुर्लक्ष करत गरुडाने उंच भरारी घेतली मात्र त्या कावळ्यालाच आपण किती उंच भरारी घेऊ शकतो.आपण गरुडा पेक्षा शक्तिशाली झालो असा भास होण स्वाभाविक बनलं पण घाणीत चोंच बुडवण्याची सवय कशी जाणार ? याचा विचार मात्र केला जात नसल्याचं चित्र अनेक वेळा पाहायला मिळतं.अशीच स्थिती बीडमध्ये लाटेवर स्वार होऊन नशीबाच “खास”असलेलं “दार” उघडलेल्याची निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.
घाणीत तोंड घालायचं हा कावळ्याचा मूळचा स्थायीभाव तो कधीच विसरला जात नाही.मग तो कावळा एखाद्या मंदिराच्या कळसावर बसो की आणखी गरुडावर स्वार होवो.आणखी त्याला एखाद्या देवाच्या नावाने कोणी लाडाने हाक मारो त्याच्यात बदल काय होणार? अशीच प्रवृत्ती काही मंडळींमध्ये देखील आढळते. मग ती कितीही उच्च पदावर गेली तरी मूळचा स्थायी भाव कधीच विसरत नाही.हे प्रत्यक्ष प्रमाण बीडच्या जनतेला तरी सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणात तर अशा डोमकावळ्यांची कमतरता कधीच भासत नाही. नगरपंचायत च्या निवडणुकीत एखाद्याला निवडून आणण्याची क्षमता नसलेली व्यक्ती निर्माण झालेल्या लाटेवर स्वार होतो मतलबासाठी पक्षाची अदलाबदल करतो. सुदैवाने तो निवडूनही येतो. निवडून येताना प्रत्येक घटकाला तितकच महत्त्व देतो. मात्र निवडून येताच ज्या लाटेवर आपण स्वार झालोत. त्या लाटेच्या जीवावर आपल्यासाठी “खास”असलेलं नशिबाचं “दार”उघडलं हे चक्क विसरून जातो.ती लाट निर्माण करणाऱ्यांनाच पश्चातापाची वेळ आणतो. कृतघ्नपनाची परिसिमा गाठतो. आपली चूक झाली याची जाणीव मदत करणाऱ्यांना होईल अशी वर्तवणूक करतो. ज्या भागातून आपल्याला मताधिक्य मिळालं. त्याला स्वतःच कर्तुत्व समजतो. ज्याने पायाला भिंगरी बांधून गावोगाव हिंडत याच्यासाठी प्रत्येकापुढे झोळी पसरली,अंधारलेल्या स्थितीत असताना (सं) “दीप” पेटता ठेवत भविष्य प्रकाशमान केलं त्याच्याच बाबतीत तो कसा काजवा होता याची वानगी वाटत वाट्टेल इतक्या बोंबा मारल्या. गेल्या महिनाभर तर गरुड झेप घेण्यात आपण कसे तुर्रम खान आहोत याच्या भूशारक्या
देखील मारल्या. त्या कितीही “बजा” “बजा” के मारलेल्या असल्या तरी त्याचा “रंग” उघडाच पडला
गरुडाचा आव आणून ज्याने जनतेला फसवले त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे कावळ्याला त्याची जागा जनतेने दाखवली. त्याच्या भूशारकीला भिक घातली गेली नाही. अनेकांना कावळ्याच्या नादी लागून नुकसान मात्र सहन करावे लागले. असे असले तरी
जनरोषाच्या वादळात देखील (सं) दीप च एकटा तेवत राहण्यात यशस्वी ठरला.पण ज्यांनी गरुडावर स्वार झालेल्या कावळ्याला गरुड असल्याचीच आवई उठवण्यात मदत केली त्यांनाच चोंच मारण्याचं काम आता सुरू केलं आहे. कावळा कळसावर बसून तेथून प्रत्येकाला कस्पटासारखा पाहू लागला. कळसावर घाण करण्याची वृत्ती देखील विसरला नाही. कळसावर बसून आपल्यात कळसाचं पावित्र्य आलं असा भास देखील झाला.मात्र घाणीत चोंच बुडण्याच्या स्थायी भावाने मात्र गरुडावर स्वार होऊन उंच घेतलेली भरारी आकाशाशी केलेलं हितगुज क्षणार्धात कवडीमोल झालं.

बीडच्या विकासासाठी डॉ. योगेश क्षीरसागरांना विधान परिषदेवर घ्या — संजय धुरंधरे

0

बीड — बीड विधानसभेत जातीपातीच्या राजकारणात महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांचा अवघ्या ५ हजार मतांनी निसटता पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना बीडच्या जनतेने ९६५५० मते दिली असून या मताची किंमत ठेवून पक्षश्रेष्ठींनी बीडच्या जनतेच्या मनातील खरा आमदार डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना विधानपरिषदेचे संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय धुरंधरे यांनी केली आहे.

केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी जनतेने मोठा कौल दिला आहे. बीड विधानसभेत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे बीड विधानसभेचे अध्यक्ष डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर हे तत्पर असून त्यांनी मागील काही वर्षात महायुतीच्या काळात विविध विकासकामे करून जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले याची पावती म्हणून महायुतीकडून डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना विधानसभेची उमेदवारी दिली गेली मात्र या निवडणुकीत डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांचा निसटता पराभव झाला आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार राजेश विटेकर हे विधानसभेत विजयी झाले आहेत. त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली असून अजित दादा आपण विटेकरांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड विधानसभेचे अध्यक्ष डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना बीड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी विधान परिषदेची संधी देऊन बीडच्या जनतेच्या मनातील खरा आमदार म्हणून संधी द्यावी अशी मागणी बीड शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय धुरंधरे यांनी केली आहे.