संतोष देशमुख हत्या प्रकरण:नाव ऐकताच गुन्हेगारांना भरती धडकी; कोण आहेत न्यायमूर्ती एम एल ताहलियानी ?
न्यायमूर्ती तहलियानी यांचा जन्म 23 डिसेंबर 1953 रोजी राजस्थान राज्यातील सरदार शहरात झाला. कायद्याची पदवी (एलएलबी) प्राप्त केल्यानंतर, त्यांनी मे 1977 मध्ये गोंदिया आणि चंद्रपूर येथे प्रॅक्टिस सुरू केली. 14 डिसेंबर 1979 रोजी त्यांची गडचिरोली येथे सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. गडचिरोलीनंतर त्यांनी सिरोचना, दसाईगंज आणि वरोरा येथे वकिली केली आहे.
सरपंच हत्या प्रकरण:न्यायालय आवारात राडा; पोलिसांनी केले गुन्हे दाखल
बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर वाल्मीक कराड समर्थकांनी न्यायालय आवारात घोषणाबाजी केली. यासोबतच आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी घोषणाबाजी करत जमावबंदीचे आदेश तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मकोका गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याला आज 15 जानेवारी रोजी बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात हजर करण्यात आले होते. त्या अनुषंगाने बीड जिल्हा न्यायालय परीसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. आरोपीस कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस वाहनांतुन 4.40 ते 5 वा. दरम्यान परत बाहेर घेवून जात असताना बीड कोर्टाचे परीसरात सुनिल श्रीरंग फड वय 50 वर्षे. रा. परळी,ता. परळी,ज्ञानोबा दगडू मुंडे वय 36 वर्षे, रा. उखळी ता. गंगाखेड, जि. परभणी, जिवन माणीक कराड वय 30 वर्षे रा. पिराचीवाडी ता. केज, जि. बीड व इतर अनोळखी 30 ते 35 यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून वाल्मीक कराड यांच्या वरील खोटा गुन्हा मागे घ्यावा अशी घोषणाबाजी करुन जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सपोनी विलास श्रीमंतराव मोरे वय 39 वर्षे, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, बीड यांच्या फिर्यादीवरुनगु.र.नं. 29/2025बी.एन.एस.एस. कलम 132, 221. 189 (2), 189(3), 191(2), 190 सह म.पो.का. कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला.
याबरोबरच न्यायालय परिसरात हेमा श्रीहरी लोमटे (पिंपळे) रा. स्वराज्य नगर,बीड, मनिषा गंगाधर कुपकर रा. अंबीका नगर, बीड, संगीता कोकाटे व इतर 10 ते 12 महीला यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन संतोष देशमुख यांचे मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहीजे अशी घोषणाबाजी करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक निता गजानन दामधर शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरुन बी.एन.एस.एस. कलम 132, 221, 189 (2), 189(3), 191(2), 190 सह म.पो.का. कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
पोलीसांकडुन आवाहन
सध्या बीड जिल्ह्यात मा.जिल्हाधिकारी साहेब, बीड यांचे जमावबंदी आदेश लागु असुन कोणीही गैरकायदेशीर जमाव जमवुन बेकायदेशीरपणे आंदोलन करुन सार्वजनीक शांतता भंग होईल असे कृत्य करु नये तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य प्रत्यक्ष अथवा सोशल मिडीयावर करु नये अथवा आक्षेपार्ह मजकुर लिहू नये असे आढळुन आल्यास प्रचलीत कायद्यान्वये संबंधीता विरुध्द गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार; समिती गठित
बीड –संतोष देशमुख हत्या प्रकरणात एस आय टी, सीआयडी नंतर आता न्यायालयीन चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात या संदर्भात घोषणा केली होती.सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलीयानी ही चौकशी करणार आहेत.एम एल ताहलियानी यांनी दहशतवादी कसाब खटल्यातील न्यायाधीश म्हणून काम केल्याची माहिती आहे.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीसोबतच न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती मात्र या संदर्भात कुठलेही आदेश निघाले नसल्याने विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत होते.अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलियानी यांची नियूक्ती करण्यात आली आहे. चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहणार असून समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा तसेच कागदपत्रे जप्त करण्याचा, झाडाझडतीचा अधिकार राहणार आहे. सहा महिन्याच्या आत समितीकडून आपला अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; चारित्र्य पडताळणी करून होणार नवी नियुक्ती
बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठे राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष होता, तर या प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचा आरोप असलेलाअसलेल्या वाल्मिक कराडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.त्यामुळे पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे याचे नाव आरोपी म्हणून समोर आल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. यामुळेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
खंडणीला अडथळा ठरल्यानेच संतोष देशमुखांचा खून; वाल्मीक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी!
बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या व अवादा कंपनीला मागितलेली खंडणी दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे. खंडणीला अडथळा ठरत असल्याने संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची महत्त्वाची माहिती एसआयटीने आज वाल्मीक कराडला न्यायालयात हजर केल्यानंतर दिली.त्यामुळे, याप्रकरणाच्या आणखी तपासासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याचं सांगत आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. त्यानुसार, वाल्मिक कराडला न्यायालयाने 7 दिवसांची एस आय टी कोठडी दिली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीने बीड न्यायालयात दिलेल्या माहितीत अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. आरोपींकडून वारंवार अवादा कंपनीकडे खंडणीची मागणी होत होती,पण कंपनीने ती पूर्ण केली नाही.त्यावेळी, संतोष देशमुख हेच खंडणीसाठी अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचं एसआयटीने न्यायालयात म्हटलं आहे. एसआयटीने आज न्यायालयात 7 दावे केले आहेत. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला आहे.
एसआयटीने न्यायालयात सात मुद्दे मांडले
🌑 9 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला. याकाळात सुदर्शन घुले, विष्णू चाटे व वाल्मिक कराड यांचे घटनेच्या अगोदर, नंतर का घटनेदरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे सीडीआरवरुन दिसत आहेत.
🌑 29 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्वी ऑक्टोबर महिन्यात सुदर्शन घुले याने सदर कंपनीचे काम बंद पाडले होते.
🌑 अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेकवेळा परळी येथील कार्यालयात बोलवून आरोपी वाल्मिक कराडने दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती, आणि न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती.
🌑 29 नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने विष्णू चाटे याच्या फोनवरुन सुनिल शिंदे यांना फोन करुन काम बंद करण्याची व सुदर्शन म्हणतो त्याप्रमाणे करण्याची धमकी दिली होती.
🌑 त्याचदिवशी सुदर्शनने अवादा कंपनी येथे जाऊन वाल्मिक कराड यांची डिमांड पूर्ण करण्याची नाहीतर काम बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींच्या मागण्या पूर्ण न झाल्याने दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्यांच्या साथीदारांनी पुन्हा अवादा कपंनी येथे जाऊन तेथील गार्ड व शिवाजी थोपटे यांना मारहाण, शिवीगाळ व धमकी दिली होती.
🌑 त्यादिवशी मयत संतोष देशमुख व गावकऱ्यांनी विरोध केल्यावरुन 9 डिसेंबर 2024 रोजी खंडणीला अडथळा ठरणाऱ्या मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला आहे.
🌑 दरम्यान, वरील सर्व घटना होत असतानाच्या काळात आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या फोनवरून संपर्कात असल्याचे सीडीआरवरुन दिसून येत आहे.
वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी एस आय टी ने दिली ही कारणं
या गुन्हयातील आरोपींनी कट करुन अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला आहे. सदर गुन्हयातील एक आरोपी अटक होणे बाकी असून तो आरोपी फरार होण्यामध्ये वाल्मीक कराड यांनी काही मदत केली आहे का ? त्याबाबत तपास करणे आहे. नवीन अटक झालेले आरोपी व सदर आरोपी यांचेकडे एकत्र बसवून गु्न्ह्याचे संबंधाने तपास करणे बाकी आहे. आरोपी वाल्मिक कराडने मयत संतोष देशमुख यांना दिलेल्या धमकीबाबत तपास करणे आहे. आरोपी घटनेच्या दरम्यान मोबाईलवरुन एकमेकांच्या संपकांत होते, त्यांचेत काय बोलणे झाले याचा तपास करणे आहे. सदरच्या गुन्हयामध्ये आणखी कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का याबाबत तपास करणे आहे. सदर आरोपी संघटीत गुन्हे करण्यामध्ये सवयीचे असून या संदर्भात सखोल तपास करणे आहे, म्हणून 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी एसआयटीने कोर्टात केली होती. मात्र, 7 दिवसांची म्हणजेच 22 जानेवारी पर्यंत एस आय टी कोठडी सुनावण्यात आली आहे.
धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबतची भेट 10 मिनिटात उरकली परळीला रवाना झाले !
मुंबई — खंडणी प्रकरण व सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापलेले असताना वाल्मीक कराडला मकोका लावण्यात आला. त्यानंतर परळी येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. कराड समर्थकांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला तर रात्री एका कार्यकर्त्यांनी पेटवून घेतले. त्यात तो जखमी झाला आहे. दरम्यान मुंबईत मंत्री धनंजय मुंडे यांनी देवगिरी निवासस्थानी जात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीला विशेष महत्त्व होते परंतु अवघ्या 10 मिनिटांत ही बैठक संपवून धनंजय मुंडे परळीच्या दिशेने रवाना झाले. परळीतील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी परळीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. परळीत सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बीड शहर पोलीस स्टेशनबाहेर सकाळपासून मोठ्या संख्येने कराड समर्थक जमले होते. वाल्मिक कराडची आई आणि पत्नीसह इतर महिला ठिय्या आंदोलनासाठी बसल्या होत्या. वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करत समर्थकांनी परळी बंदचीही हाक दिली होती. त्यात कराड समर्थकांमधील २ तरुणांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला.
परळीत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि तणाव निर्माण झाला असून त्याच बाबतीत धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेऊन माहिती दिली.
अजित पवारांना परळीतील स्थितीचा आढावा देऊन धनंजय मुंडे परळीच्या दिशेने रवाना झालेत. पुढील २ दिवसांनी परळीतील परिस्थिती शांत झाल्यानंतरच माध्यमांशी संवाद साधला जाईल. बीड प्रकरणात जे म्हणणं आहे त्याबाबत भूमिका मांडू असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
आज दिवसभरात काय घडलं?
मस्साजोग येथील आवादा ऍनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना २ कोटी रुपयाची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकी प्रकरणी वाल्मिक कराड १५ दिवस पोलीस कोठडीत होता. आज मंगळवारी दुपारी केज येथील न्यायालयात हजर केले असता, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश दिशांत गोळे यांनी त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी मिळताच वाल्मिक कराडला मकोका लागल्यामुळे पुढील तपास करण्यासाठी त्याला आमच्या ताब्यात देण्यात यावे. असा अर्ज ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांनी केला. यातच परळीत वाल्मिक कराड समर्थकांनी बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर जमून घोषणाबाजी केली. काही समर्थकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला.
वाल्मीक कराड वर मकोकाची संक्रांत; परळी शहर झाले अशांत
बीड — वाल्मीक कराड वर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होताच परळी येथील वातावरण आणखी तापलं आहे. अवघ्या दहा मिनिटात परळी शहर बंद झालं.सकाळपासून पोलीस ठाण्यासमोर वाल्मीक कराडच्या आईने ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. काही महिलांसह कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न केला.











