आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी अर्ज करावेत– आ.संदीप क्षीरसागर
बीड — इंग्लिश स्कूल तसेच खाजगी शाळेत आपल्या मुलांच्या मोफत शिक्षणासाठी बीड मतदारसंघातील पालकांनी शासनाच्या आरटीई योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
शासनाच्या आरटीई योजनेंतर्गत सर्व खाजगी शाळेत एकूण जागांपैकी २५ टक्के जागा सदरील योजनेसाठी राखीव असतात. या योजनेतून प्रवेश झाल्यावर विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत मोफत शिक्षण मिळते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या आरटीई योजनेसाठी १४ जानेवारी पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २७ जानेवारी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी ३ वर्षे ते ७ वर्षांपर्यंतच्या पाल्यांना अर्ज करता येणार आहे. तरी बीड विधानसभा मतदारसंघातील बीड शहर, बीड तालुका व शिरूर कासार तालुक्यातील जास्तीत जास्त पालकांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
फवारणी पंप घोटाळा धनंजय मुंडें पुन्हा नव्या वादात;हायकोर्टाने विचारला राज्य सरकारला जाब
बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोकोकाचा आरोपी वाल्मीक कराडची संबंध असल्याच्या कारणा वरूनअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. विरोधकांसह महायुतीमधील मित्रपक्षाचे नेते देखील ही मागणी करत आहेत. मागील महायुती सरकारमध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळी त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात केलेल्या बदलामुळे धनंजय मुंडेंना हाय कोर्टाने फटकारले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून वादाच्या भोवऱ्यात धनंजय मुंडे अडकत चालल्याचे पाहायला मिळत आहे.
नागपूर खंडपीठामध्ये राजेंद्र मात्रे यांनी एक जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्यानुसार कृषी विभागाने 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती. पण 2023 मध्ये धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी या धोरणात बदल केला. त्यांनी डीबीटी योजना बंद केली. स्वतः विभागाने कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्य सरकारने 103.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निर्णयामुळे वाढीव खर्चामुळे जास्तीचे नुकसान झाल्याचा आरोप केला जात आहे.
याचिकेत म्हटल्याप्रमाणे हे धोरण बदलताच कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाला. बाजारात स्वस्त असलेले फवारणी पंप चढ्या दराने खरेदी केल्याचे दाखवले. त्यासाठी सरकारी निधीचा वारेमाप खर्च करण्यात आला. 12 मार्च 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार, बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदीसाठी 1500 रुपये प्रतिपंप या दराने 80.99 कोटी रुपयांचा निधी देण्याचे निश्चित केले. परंतु शासनाने तीन लाख तीन हजार 507 पंप हे 104 कोटी रुपयांना खरेदी केले.
याचिकेतील दाव्यानुसार, सरकारला एक पंप हा 3,425 रुपयांना मिळाला. यवतमाळ येथील एका कृषी साहित्य विक्री दुकानात हाच पंप अवघ्य 2,650 रुपयांना मिळतो. सरकार एकदाच इतकी मोठी खरेदी करत असेल तर त्यांना सवलत मिळणे अपेक्षित होते. हा पंप अजून स्वस्तात मिळाला असता, मग चढ्यादराने ही खरेदी का करण्यात आली असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. हायकोर्टाने याबाबत तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना जबाव विचारला आहे. याप्रकरणात न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असून त्यावेळी कृषी मंत्र्यांनी कोणत्या आधारावर कृषी साहित्य खरेदीचे धोरण बदलले असा सवाल कोर्टाने विचारला. तर राज्य सरकारला दोन आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.
“भय इथले संपत नाही”गोळीबाराच्या घटनेने अंबाजोगाई हादरले
अंबाजोगाई — शहरातील मोरेवाडी परिसरातील माऊली नगर येथे राहणाऱ्या नवनाथ कदम यांच्या घरासमोर रेणापूर तालुक्यातील गोविंद नगर येथील गणेश पंडित चव्हाण या युवकाने गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, मात्र शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पंडित चव्हाण याचा कदम यांच्या पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होता. मागील काही दिवसांपासून तो सतत धमक्या देत होता. याबाबत कदम कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वीच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.आज सकाळी चव्हाण कदम यांच्या घरी आला आणि वाद घालत त्यांच्या सिद्धेश्वर या मुलावर गोळीबार केला. सुदैवाने गोळी सिद्धेश्वर याला लागली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गोळी झाडण्यासाठी चव्हाण याने गावठी कट्ट्याचा वापर केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याच्याकडे शस्त्र परवाना नसल्याची माहिती मिळाली आहे.घटनेनंतर तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे तपास करत आहेत. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी चार तासात आरोपीला जेरबंद केले आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याचा केज मध्ये आढळला मृतदेह
केज — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या अवादा पवन ऊर्जा कंपनीचा कर्मचारी केज मधील एका दारूच्या दुकानासमोर मृत अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ माजली आहे.
पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. केज – अंबाजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.पोलिसांनी याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.दरम्यान सदरील मृतदेह आढळल्यानंतर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. मात्र सदरील व्यक्तीचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस आणि रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
आ. संदीप क्षीरसागरांची नवी संकल्पना; प्रशासन मतदारसंघातील प्रत्येक गावात जाणार
शासकीय योजनांची माहिती गावकऱ्यांना देण्यासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कॅम्प
बीड — ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना शासनस्तरावरील योजनांची माहिती देण्यासाठी गावोगावी जाऊन प्रशासनाने शिबीर घ्यावेत आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांची माहिती द्यावी अशी नवीन संकल्पना आ.संदीप क्षीरसागर यांनी सुचवून याबाबतचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बीड तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन प्रशासनाकडून शिबीर घेण्यात येणार आहेत.
शासनाच्या योजना विविध योजना शेतकरी, दुर्बल घटक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिक प्रभावी मार्गाचा अवलंब केला जावा. या हेतूने आ.संदीप क्षीरसागर यांनी नवीन संकल्पना सूचविली. महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग यांसह इतर विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी गावोगावी जाऊन संयुक्तरित्या शिबीर घ्यावेत. या शिबीरांमध्ये प्रत्येक घटकातील लोकांसाठी असलेल्या योजनांची त्या-त्या लोकांना देऊन त्यांना असलेल्या शंका आणि समस्यांचे निराकरण करावे. असे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना दिले होते. यावर आता तहसिलदार यांनी आदेश काढले आहेत. दि.२२ जानेवारी ते ३१ जानेवारी या काळात बीड तालुक्यातील प्रत्येक गावात असे शिबीर घेण्यात येणार आहेत. दरम्यान आ.संदीप क्षीरसागरांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
भीषण हत्याकांडाने आष्टी हादरले; दोन सख्ख्या भावाची हत्या तिसरा गंभीर
आष्टी — तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी दि.16 जानेवारी रात्री दहाच्या दरम्यान जुन्या वादातून तीन सख्खा भावांवर त्यच्याच समाजातील काही लोकांनी लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन चुलत सख्खा भावांचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली.
अजय विलास भोसले, भरत विलास भोसले असे मयताचे नावे असून कृष्णा विलास भोसले तिघे राहणार हतोळण ता. आष्टी हा गंभीर जखमी आहे आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवार (दि.१६) रोजी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नाही. दोन्ही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
धनंजय मुंडेंचा परळीत जनता संवाद, जगमित्र कार्यालय गजबजले
परळी — नियमित प्रमाणे परळीत आल्यानंतर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील आपल्या जगमित्र या कार्यालयामध्ये बसून मतदारसंघातून व मतदारसंघ बाहेरून आलेल्या नागरिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत त्यांची कामे अडचणी समजून घेतल्या तसेच ती मार्गी लावण्याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देत संबंधितांची कामे मार्गी लावली.











