आ.संदीप क्षीरसागरांच्या प्रयत्नांना यश
बिंदुसरा नदीवरील पूल कम बंधारा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्ता कामाला लवकरच सुरूवात
बीड — बीड शहरातील बिंदुसरा नदीवर पूल कम बंधारा तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका पर्यंतचा मुख्य रस्ता होण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया झाली असून आता निवड झालेल्या कंत्राटदार कंपनीला विभागाकडून स्वीकृती पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे.
मागील टप्प्यातच जरूड ते बार्शी नाका व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिरापूर धुमाळ या रस्त्यांसाठी तब्बल २१३ कोटी रूपयांचा निधी आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून मंजूर होऊन कामदेखील जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु शहरातील मुख्य असलेला बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंतचा रस्ता नव्याने व्हावा याकरिता आ.क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. याबाबत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, महामार्ग विकास प्राधिकरण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा, मागणी करून शेवटी या आ.क्षीरसागरांच्या प्रयत्नातून या कामाला मंजुरी मिळाली आहे. महामार्ग NH 361 F (CH 47+000 To CH 49+500 To Four Lane) २.५ (अडीच) किलोमीटर लांबी अंतर असलेल्या महामार्गाचे चौपदरीकरण, आणि नाली बांधकाम व बार्शी नाक्याजवळील बिंदुसरा नदीवर पूल कम कोल्हापूरी बंधारा बांधणे अशा स्वरुपातील हे काम असणार आहे. राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडून याकामासाठी ४८ कोटी ८५ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरील कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) कोकण भवन, मुंबई यांच्याकडून कंत्राटदार कंपनीला स्वीकृती पत्र देण्यात आले आहे. यानंतर लवकरच कार्यारंभ आदेश होऊन कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. या रस्त्यामुळे रहादारीसाठी तर बिंदुसरा नदीवरील बंधार्यामुळे बीड परिसरात सिंचन आणि पाणी उपलब्धतेसाठी मोठा फायदा होणार आहे. आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांतून बीडसाठी अतिशय फायदेशीर असलेले हे काम लवकरच होणार आहे.
पूल कम बंधार्याचा सिंचन आणि पाणी साठवण्यासाठी मोठा फायदा
बिंदुसरा नदीवरील पूल कम कोल्हापूरी बंधार्यामुळे बीड शहर आणि आजूबाजूच्या साधारण ५ किलोमीटर पर्यंतच्या परिसरात पाणी पातळीत वाढ होणार असा तांत्रिक अंदाज आहे. बीड जिल्ह्यात पावसाची अनियमितता असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होते. परंतु या कोल्हापूरी बंधार्यामुळे पाणी साठवणूक होईल. परिणामी पाणी उपलब्धता आणि शेती सिंचनासाठी याचा खूप मोठा फायदा परिसरात होणार आहे. बिंदुसरा नदीवर बंधारा कम पूल ही संकल्पना मोठी दूरदर्शी होती. ती आ.संदीप क्षीरसागर यांनी डोळ्यासमोर ठेवून हे काम होण्यासाठी निरंतर प्रयत्न केले. शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. अनेकवेळा अधिवेशनातही हा मुद्दा मांडला. दरम्यान आता आ.संदीप क्षीरसागरांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच हे काम पूर्ण झालेले असेल.
मी बीड जिल्ह्याची लेक, पालकत्व मिळालं असता तर…! पंकजा मुंडेचा नाराजीचा सूर?
मुंबई — मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चांगलाच चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याच जिल्ह्याचं पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवले आहे. यावरून मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.“मी बीडची कन्या आहे. मला बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती, तर आनंद झाला असता. त्याशिवाय बीडकरांना देखील खूप आनंद झाला असता. कोणत्याही संविधानिक पदावर नसताना मागची पाच वर्ष पूर्णवेळ संघटनेसाठी काम केले आहे,” असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “माझा पाच वर्षांचा कार्यकाळ हा बीडच्या इतिहासातील विकसनशील कार्यकाळ राहिला असून ते कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. जो निर्णय झाला आहे, त्यावर कोणतीही असहमती न दर्शवता, जे आपल्याला मिळालं आहे, त्यात जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेत मी आहे,” असेही त्या म्हणाल्या आहेत.
इथेनॉल उत्पादन;आता शेतकऱ्यांच्या उसाला मिळेल चांगला दर?
पुणे — इथेनॉल उत्पादन करून देशातील सहकारी साखर कारखाने किमान ९ महिने सुरू ठेवण्यासाठी आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्यात येणार आहे.
त्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने ८ टक्के व्याज दराने मुदत कर्ज देण्याचे मान्य केले आहे, तर केंद्र सरकार यात व्याजदराचा निम्मा भार उचलणार असून, कारखान्यांना हे कर्ज केवळ ४ टक्के दरानेच मिळणार आहे.
याचा फायदा राज्यातील ३५ कारखान्यांना, तर देशातील एकूण ६३ कारखान्यांना होणार आहे. कर्जाबाबतचा आदेश येत्या आठवडाभरात निघणार असून साखर हंगाम संपल्यानंतर लागलीच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
इथेनॉल उत्पादनाला अधिक चालना मिळण्यासाठी कोणती पाऊले उचलावीत यावर विचार करण्यासाठी देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणारे अधिकारी व तज्ज्ञांची पुण्यात शुक्रवारी बैठक झाली.
महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य साखर संघांचे व्यवस्थापकीय संचालक, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, केंद्रीय सहकार विभागाचे संचालक डी. के. वर्मा, एनसीडीसीचे संचालक गिरिराज अग्निहोत्री, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार उपस्थित होते.
सहकारी साखर महासंघाचा पुढाकार
● सहकार क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्रीय सहकार विभागाने आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन केल्यास हे प्रकल्प वर्षभर चालतील आणि त्यातून कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असा होरा आहे.
● आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधार करण्यासाठी कारखान्यांना अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने पुढाकार घेतला. त्याला केंद्र सरकारकडून प्रतिसादही मिळाला आहे. त्यानुसार राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने ८ टक्के दराने मुदत कर्ज देण्याचे मान्य केले आहे, तर केंद्र सरकारनेही व्याजातील निम्मा भार उचलण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार हा व्याजदर केवळ ४ टक्के राहील.
● याबाबतचा आदेश येत्या आठवडाभरात निघेल, अशी माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.या निर्णयाचा फायदा देशातील एकूण ६३ सहकारी कारखान्यांना होणार असून यात राज्यातील ३५ कारखान्यांचा समावेश असल्याची माहिती नाईकनवरे यांनी दिली.
दीर्घ मुदतीचे करार
● सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम साधारणपणे एप्रिलमध्ये संपतो. त्यानंतर इथेनॉलचे उत्पादन चालू ठेवायचे असेल तर ते धान्यावर चालते.
● इथेनॉल उत्पादन किमान ९ महिने करता येण्यासारखे आहे आणि त्याचा आर्थिक फायदा कारखान्यांना होऊ शकेल. सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या सध्याच्या आसवनी प्रकल्पांचे मल्टिफिडमध्ये रूपांतर केल्यास इथेनॉल उत्पादनाला गती येईल.
● ऑइल मार्केटिंग कंपन्या याबाबत साखर कारखान्यांशी दीर्घ मुदतीचे करार करण्याबाबत अनुकूल आहेत. तसेच इथेनॉलची खरेदी सहकारी
आसवनींकडून प्राधान्याने करण्याचे आदेशही जारी झाले आहेत.
दिनेश वाघमारे राज्याचे नवे निवडणूक आयुक्त
मुंबई –राज्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनेश वाघमारे यांचे नाव राज्यपालांकडे पाठविले होते.
ते नाव अंतिम करण्यात आल्यानंतर सरकारने नियुक्तीची अधिसूचना काढली आहे. ते सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव होते.
राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान हे सप्टेंबरमध्ये निवृत्त झालेले आहे. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. नव्या आयुक्तांची निवड गेल्या काही महिन्यांपासून रखडली होती. आयुक्तपदासाठी माजी मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे(बीपीटी) माजी अध्यक्ष राजीव जलोटा, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह डझनभर सनदी अधिकारी इच्छुक होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील महानगर पालिकांवर, जिल्हा परिषदांवर प्रशासकराज आहे. या निवडणुकी येत्या दोन ते तीन महिन्यात होऊ शकतात. त्यामुळे या निवडणुका पार पाडण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
प्रशासनातील 26 वर्षाचा अनुभव
दिनेश वाघमारे हे 1994 च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. ते सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत. वाघमारे यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील २६ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (व्हीएनआयटी) केले आहे. ते आयआयटी खरगपूरचे एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) इंजिनिअर आहेत. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून एमएसस्सी केलेली आहे.
आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली नगरपालिकेची आढावा बैठक
बीड शहरातील नागरी प्रश्नांबाबत दिले निर्देश
बीड — शहरातील मुलभूत नागरी प्रश्नांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२०) रोजी नगर पालिकेची आढावा बैठक घेतली. स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, वीज आदि मुद्यावरून आ.संदीप क्षीरसागर यांनी अधिकार्यांना सुनावले. प्रत्येकवेळी कोणतेही काम सांगितले तर निधी नाही असे कारण सांगणार्या अधिकार्यांनी नगर पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी काय प्रयत्न केले ? असा सवालही आ.संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला. पाणी पुरवठ्यात हयगय खपवून घेणार नाही. स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य द्या आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करा असे निर्देश यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी दिले.

बीड नगर पालिकेतील मुख्याधिकार्यांच्या दालनात झालेल्या बैठकीस आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, मुख्याधिकारी निता अंधारे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी नागरीकांनी देखील आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे शहरातील समस्या मांडल्या. आ.संदीप क्षीरसागर आणि माजी आ.सय्यद सलीम यांनी नगर पालिकेच्या उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सुचना देखील यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी दिल्या. नगरपालिकेतील पाणी पुरवठा व जलनिस्सारण विभाग, बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग, अभिलेख विभाग, कर विभाग, लेखा परीक्षण विभाग, विद्युत विभाग, संगणक विभाग आदींसह नगररचना विभागाचा आढावाही आ.क्षीरसागर यांनी घेतला. यासोबतच गेल्या काही वर्षांपासून शहरातील मालमत्तांचा रिव्हीजन सर्व्हे झालेला नाही. हा सर्व्हे दर चार वर्षांनी केल्यास उत्पन्न वाढवता येईल. बीओटी तत्वावरील काही इमारती धुळखात पडलेल्या आहेत. त्या वापरात आणून त्यातूनही उत्पन्न वाढविता येऊ शकते. अशा उपाययोजना यावेळी सुचविण्यात आल्या. बीड शहरात एकाही ठिकाणी नगर पालिकेची पार्किंग नाही,त्यामुळे काही जागा ज्या पडीक आहेत, किंवा वापरात नाहीत अशा ठिकाणी व्यवसायीक गाळे आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध केल्यास त्यातूनही उत्पन्न वाढवता येईल अशा देखील सुचना यावेळी करण्यात आल्या. नाविण्यपुर्ण योजनेतून नगर पालिकेला निधी मिळावा त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी दिल्या. शहरात ठिकठिकाणी लोखंडी कचरा कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या जाग्यावरच सडून चालल्या आहेत. त्याच्या खरेदीच्या अनुषंगानेही कार्यवाही करावी, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, वीज हे मुलभूत प्रश्न तात्काळ मार्गी लावा त्यात हयगय करू नका लोकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवा अशा सक्त सुचना आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांनी अधिकार्यांना दिल्या.
बीड शहरातील जुन्या भाजी मंडईत नगर पालिकेने मच्छीमार्केटसाठी इमारत बांधलेली आहे. रेडिरेकनर प्रमाणे त्याचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. भाडे जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी कोणताच व्यवसायीक पुढे येत नाही त्यामुळे नाममात्र दरात तेथील गाळे व्यवसायीकांना दिल्यास नगर पालिकेचे उत्पन्न वाढू शकते अशी सुचना यावेळी अधिकार्यांना करण्यात आली. त्याचबरोबर जुन्या भाजी मंडईत बीओटी तत्वावरील आणखी कॉम्पलेक्स बांधता येतील का ? या दृष्टीनेही नगर पालिकेने प्रयत्न करावेत. जेणेकरून पालिकेच्या उत्पन्नात भरत पडेल अशीही चर्चा या बैठकीत करण्यात आली.
व्यायाम करणाऱ्या तीन तरुणांना बसने चिरडले; पोलीस व्हायचे स्वप्न भंगले
बीड — पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घोडका राजुरी जवळ आज पहाटे घडली. या दुर्दैवी घटनेत तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रस्त्यावर अक्षरशः रक्त मांसाचा सडा पडला होता.












