Home Blog Page 132

सरपंचांच्या पगारात मोठी वाढ, राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

0

मुंबई — महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या संदर्भातील अधिकृत आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे.२४ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती

विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार, राज्यातील २७,९५१ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना दुप्पट मानधन मिळणार होते. मात्र, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी रखडली होती. अखेर, वाढीव मानधन देण्याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे मानधन, तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पासून पुढील कालावधीसाठी निधी वितरित करण्यात येणार आहे.यासाठी राज्य सरकारने ३४६,२६,०८,००० रुपयांच्या अनुदानाला आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १९ महिन्यांच्या किमान वेतनाच्या थकबाकीला मंजुरी दिली आहे.

भेसळयुक्त तेलाच्या फेऱ्यात अडकले शनी महाराज; मंदिर समितीने घेतला “हा” निर्णय

0

अहिल्यानगर — जिल्ह्यातील स्वयंभू पाषाण रूपातील शनैश्चर देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिशिंगणापूर येथे भाविक भक्तांची नेहमीच गर्दी दिसून येते. दरवाजा नसलेला गाव म्हणून देखील हे देवस्थान प्रसिद्ध आहे. दरम्यान याच देवस्थानच्या मंदिर समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी एक मार्चपासून करण्यात येणार आहे.

शनी देवाची शिळा एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे. एका व्यापाऱ्याला नवस पूर्तीचा अनुभव आला त्यामुळे त्याने शिळेभोवती चौथरा बांधला, असे सांगितले जाते. या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका प्रचिलित आहेत. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. शनि शिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज होत आहे. शनि देवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास आणि ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला.

शनैश्वर देवस्थान मंडळाने कोणता निर्णय घेतला आहे?
शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र, तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचे सांगितले जात आहे. शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला. हा बदल 1 मार्च 2025 पासून लागू करण्यात येत आहे. त्यामुळे 1 मार्चपासून शनिदेवाला सुट्या तेलाऐवजी भाविकांना ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागणार आहे. भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.

दरम्यान, शनि शिंगणापूर हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते. शनि कृपेची प्राप्ती होण्यासाठी येथे हजारो भाविक तैलाभिषेक करण्यासाठी येतात. शनिशिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य तेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

माजलगावात घरफोडी; 3 लाखाचा मुद्देमाल लंपास

0

माजलगाव — घरात कोणीच नसल्याचे पाहून कुलूप तोडून प्रवेश केलेल्या चोरट्यांनी सोने चांदी सह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरुवारी माजलगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर मध्ये राहणारे आसाराम नानाभाऊ कोरडे वय 52 वर्ष यांच्या घरात कोणीच नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉकर तोडून 5 तोळे 2 ग्राम सोन्या, चांदीचे दागिने किंमत 1लाख 79 हजार रु व नगदी 90 हजार रुपये असे दोन लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी घडली. दरम्यान याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार?

0

मुंबई. — येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काही पक्षांकडून स्वबळाची देखील चाचपणी होत आहे, भाजप देखील स्वबळावर निवडणूक लढू शकतो अशी चर्चा सुरू आहे.

यावर आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले महाजन?

स्वबळाचा नारा मी अजून दिलेला नाही, मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये भाजप 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागा जिंकू शकते. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 70 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल, मित्र पक्षही आमच्यासोबत असतील. जळगाव ,धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा येण्याची शक्यता आहे. या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे, यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लव्ह जिहाद कायदा हा लागू झालाच पाहिजे. आठ राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे, लव्ह जिहाद कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत आणि भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे देखील नारज असल्याची माहिती समोर येत आहे. यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘तिकडे एकाच माणसाला संधी आहे, ते म्हणजे संजय राऊत, क्षमतेपेक्षा जास्त ते त्या ठिकाणी बोलत आहेत. क्षमता नसताना सुद्धा बडबड करत आहेत. बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

राज्य सरकार ॲक्शन मोडवर; लव्ह जिहादविरोधात कायदा करणार

0

मुंबई — मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधात  कठोर पाऊले उचलणार आहे. लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकार आता लव्ह जिहाद विरोधी कायदा आणणार आहे.

यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीचे गठन करण्यात आले आहे.

लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य ठरणार आहे.याबाबत कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

लव्ह जिहाद प्रकरणे रोखण्यासाठी काम करणारी समिती महिला व संस्कृती रक्षणासाठी काम करेल, असे ठाम मत मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

दरम्यान,महायुती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात महिला व बालविकास विभागाची जबाबदारी असताना मंगल प्रभात लोढा यांनी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती गठीत केली होती, या समितीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या घटनांना समोर आणण्यासाठी काम करण्यास मदत होईल.

सुरेश धस धनंजय मुंडेत मांडवली; दोघांच्या साडेचार तासाच्या भेटीमुळे मिळणार कलाटणी?

0

बीड — सुरेश धस व धनंजय मुंडे यांची चार दिवसाआधी एका खासगी रुग्णालयात गुप्तपणे भेट झाल्याचा दावा केला जात असून यामुळे दोघांमध्ये समेट झाल्याची चर्चा रंगली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. विरोधी पक्षासह भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ उठवून त्यांना चांगलेच घेरले होते. धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता दोघांमध्ये समेट झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या दोघांची चार दिवसाआधी एका खासगी रुग्णालयात गुप्तपणे भेट झाल्याचा दावा केला जात असून ही भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.
संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात असून त्याचा आका मुंडे असल्याचे आरोप करत धस यांनी धनंजय मुंडे यांना घेरले होते. बीडमधील दहशतवाद मोडून काढण्याची भाषा करत धस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. त्यातच मुख्यमंत्री फडवीस यांचीही त्यांनी भेट घेतली होती. यानंतरही धस यांनी मुंडेंवर आरोप करणे सुरुच ठेवले होते. परंतू, आता या भेटीमुळे धस आणि मुंडे यांच्यातील वैर संपल्याची चर्चा सुरु झाली आहे. मुंडे आणि धस यांची भेट एखा खासगी रुग्णालयात घडवून आणण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिल्यानंतर बावनकुळे यांनी ही भेट झाल्याची कबुली दिली होती, मात्र मुंडेंच्या कार्यालयाने अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगून हे वृत्त फेटाळले आहे. या भेटीबाबत बावनकुळे म्हणाले की, आम्ही चार तास एकत्र होतो. सुरेश धस व धनंजय मुंडे यांच्यात भेट झाली. त्यांच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत. ते दूर होतील.

दरम्यान धस-मुंडे भेटीवर अंजली दमानिया यांनी म्हटले की, मला हे चार-पाच दिवसांपूर्वी समजलेले. बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याचे मला सांगितले गेले होते. अशी भेट झाली तर ती खूप दुर्दैवी आहे. धस आता मुंडेंविरोधात लढतील की नाही, काही खरे नाही.
या भेटीबाबत सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, ते म्हणाले की, मी स्वत: धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. तब्येतीची विचारपूस करणं आणि त्यांच्याविरोधातील लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. बीड प्रकरणात मी त्यांच्या विरोधातच राहणार आहे. याचबरोबर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. बावनकुळे यांच्यासोबत भेट झाली का, या प्रश्नावर बावनकुळे यांची माझी आता भेट होईल. बावनकुळे काय म्हणाले ते माहिती नाही. मी परवा मुंडेंच्या घरी गेलेलो. तब्येतीची चौकशी करणे यात गैर नाही. संतोष देशमुख हत्येचा लढा आणि चौकशी यात कोणताही संबंध नाही, असे धस यांनी सांगितले.

निवडणुक आयोगाला मिळणार नवे आयुक्त; “या” अधिकाऱ्याचं नाव चर्चेत

0

नवी दिल्ली — देशाला लवकरात लवकर निवडणूक आयुक्त मिळणार आहेत. कारण आता सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ संपणार आहे.त्यानंतर सेवाजेष्ठतेच्या नियमानुसार वरिष्ठ निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त होण्याची शक्यता जास्त आहे.

त्याचबरोबर आयोगामध्ये तिसरे नवे आयुक्त नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी 17 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खाली निवड समितीची बैठक होईल. तर सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे 18 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांनी अडीच वर्ष पदभार सांभाळला.नव्या मुख्य निवडणूक आयुक्ताच्या निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी तीन सदस्यांची निवडसमिती बनवण्यात आली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्ष तसेच कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी देखील सहभागी आहेत. या अगोदर निवडणूक आयोगाला असलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर दोन पैकी सेवाजेष्ठतेच्या नियमानुसार तसेच निवृत्त होणाऱ्या आयुक्तांच्या सल्ल्याने आगामी आयुक्तांची निवड केली जात होती. मात्र आता निवड समिती आणि बहुमत या आधारे आयुक्तांची नेमणूक केली जाते.तर 17 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीसाठी निवड समितीने तब्बल 480 उमेदवारी अधिकाऱ्यांमधून पाच जणांची नावे आगामी निवडणूक आयुक्त पदासाठी पाठवले आहेत ज्यामध्ये 1988 च्या बॅच अधिकारी आणि सध्याचे वरिष्ठ निर्वाचन आहेत ज्ञानेश कुमार यांचे नाव सर्वात जास्त चर्चेत आहेत. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांनी लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या अगदी काही दिवस अगोदर पदभार स्वीकारला होता.

शेतकऱ्यांची भिकाऱ्यांशी तुलना; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे केकाटले

0

अमरावती — महायुती सरकारच्या काळात पीक विमा योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक वादग्रस्‍त वक्तव्य केले आहे.हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने वादंग निर्माण झाल आहे.

अमरावतीमध्ये ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली होती. मात्र, काही लोकांनी त्याचा गैरउपयोग केला. पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे, त्याचा योग्य लाभ शेतक-यांना मिळाला पाहिजे. पीक विमा योजनेबाबत चांगले-वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहेत. पीक विमा कंपन्या शेतक-यांची लुटमार करतात.

सरकारला पीक विमा योजना बंद करायची नाही. पीक विमा योजनेत सुधारणा करायची आहे. पीक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले. पीक विमा योजनेत अशाप्रकारचे गैरप्रकार झाले आहेत की, बाकीच्या राज्यातील लोकांनी ऑनलाईन अर्ज केले.

त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोफावले, त्यातून असे वाटत आहे की पीक विमा खूपच चांगली योजना आहे की काय. पण प्रत्यक्ष चौकशी केल्यावर आम्हाला कळले की आम्ही 4 लाख अर्ज नामंजूर केलेत. सरकार त्यामध्ये कुठेही अडचणीत आलेले नाही. पण अशा पद्धतीने लोक अर्ज भरतात, कुठेतरी एजन्सी केंद्रवाले हे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे. त्याची चौकशी सुरु आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

आ. क्षीरसागरांकडून एमआयडीसी, महामार्ग प्राधिकरणाच्या विभागीय कार्यालयात बैठका

0

छ. संभाजीनगर  — बीडच्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवर आ.संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवारी (दि.14) एमआयडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विभागीय कार्यालयात बैठका घेतल्या. यावेळी बीड येथील एमआयडीसीचा विकास आणि बीडच्या बायपासवरील स्लीप सर्व्हिस रोड व उड्डाणपूलांच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली.

बीड जिल्ह्याचा औद्योगिक विकास होण्यासाठी नवनवीन उद्योग बीडमध्ये यावे लागतील. त्यामुळे सर्वप्रथम बीड शहरात असलेल्या एमआयडीसीचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन आ.संदीप क्षीरसागर यांचा, बीडच्या एमआयडीसीच्या विकासाबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. गेल्या आठवड्यातच आ.क्षीरसागर यांनी बीड येथील शासकीय विश्रामगृहात औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली होती. यानंतर आता पुन्हा छत्रपती संभाजी नगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयात आ.क्षीयसागर यांनी याच विषयावर बैठकप घेऊन एमआयडीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत सविस्तर चर्चा केली. यासोबतच बीडच्या बाह्यवळण रस्ता म्हणजेच बायपासवर उड्डाणपूल नसल्यामुळे नियमितपणे अपघात होत होते. तसेच स्लीप सर्व्हिस रोड नसल्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. याबाबतही आ.संदीप क्षीरसागरांनी शासन, प्रशासन आणि न्यायालयात पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. आता बीडच्या बायपासवर महालक्ष्मी चौक, जिरेवाडी व छत्रपती संभाजी महाराज चौक, समनापूर या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल आणि परळी रोड, नाथापूर रोड, इमामपूर रोड या ठिकाणांवर स्लीप सर्व्हिस रोडच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. याबाबतचा आढावाही आ.संदीप क्षीरसागर बैठकीत घेतला. संभाजीनगर येथे झालेल्या एमआयडीसीच्या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, प्रकल्प संचालक श्री.रवींद्र इंगोले यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

चाटे स्कूल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थी कलाकारांच्या सादरीकरणावर प्रेक्षकांनी धरला ठेका

0

केज — शहरातील समर्थनगर भागातील चाटे स्कुल मध्ये मंगळवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.

कार्यक्रमास जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, डॉ नितीन चाटे,शिवाजी ठोंबरे,दिनकर चाटे,भगवान चाटे,रामधन चाटे ,अजय चाटे , राजेभाऊ चाटे , अंनिस चे हनुमंत भोसले, दुर्गादास लांब, डॉ हनुमंत सौदागर, श्रीराम तांदळे,अनिल गलांडे,अर्शद शेख,मुबशीर शेख, दिनकर चाटे, संस्थेचे सचिव शिवाजी चाटे आदींची उपस्थिती होती .

चाटे इंग्लिश स्कूल येथील चौथ्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी,विविध गीतांवर ठेका धरत प्रेक्षकांची मने जिंकली. सोशल मीडिया च्या अतिवापराचे दुष्परिणाम, अंधश्रद्धा निर्मूलन , पर्यावरण , देशभक्ती आदी विषयावर नाट्य,गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रास्तविक शिवाजी चाटे यांनी केले


हनुमंत भोसले सर यांनी विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, संगीत या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत व्यक्त केले. व विद्यार्थ्यांची आवड कशात आहे हे पालकांनी व शिक्षकांनी ओळखून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून प्रोत्साहन द्यावे मला खात्री आहे की चाटे स्कुल च्या रोपातून वटवृक्ष उभा राहत आहे.विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून मैदानी खेळ खेळावेत असे मत व्यक्त केले. स्नेहसंमेलन कार्यक्रमास पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.