Home Blog Page 122

जमीन एकाची अन् पिक विमा काढला दुसऱ्यांनीच; चौघां विरुद्ध गुन्हा दाखल

0

परळी — दुसऱ्याच्या जमिनीवर तिसऱ्यानेच पीक विमा काढून फसवणुकीचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी पांगरीतील एका शेतकऱ्याने तक्रार दिली असून परळीतील दोन मल्टी सर्व्हिसेस चालक आणि २ शेतकरी अशा चौघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांगरी शिवारातील गट नं ३९ मध्ये शेतकरी अंगद गणपतराव मुंडे यांनी जमीन आहे. त्यांनी २०२२, २०२३ मध्ये सोयाबीन पिकाचा सात एकर तीन गुंठे जमिनीचा पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरला होता. त्यानंतर काही दिवसांनी पांगरी येथे पीक विमा कंपनीचे अधिकारी आले. अंगद मुंडे यांना भेटून पीक विमा दोनदा का भरला, अशी चौकशी केली. तेव्हा त्यांनी पीक विमान दोनदा भरला नसल्याचे स्पष्ट केले. अंगद मुंडे यांनी चौकशी केली असता गट क्रमांक ३९ मधून मधुकर भगवानराव भारती (रा. लिंबुटा) यांनी देखील पीक विमा भरल्याचे पुढे आले. त्यानंतर अंगद मुंडे यांनी कृषी अधिकाऱ्यांकडून विम्याबाबत माहिती घेतली असता भलताच प्रकार पुढे आला. पांगरीतील रवींद्र दामोदर मुंडे यांनी त्यांच्या जलालपूर येथील आसावरी मल्टी सर्व्हिसेस येथून जुलै ते सप्टेंबर २०२३ दरम्यान पीकविमा भरला होता. त्यामुळे अंगद मुंडे यांचा विमा रद्द करण्यात आला. त्यामुळे त्यांना पीक विम्याचा ९२ हजारांचा चेक मिळालाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अंगद यांनी परळी शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला. ईन पांगरीत पीक विम्याच्या फसवणुकीचा आणखी एक प्रकार पुढे आला आहे. यामध्ये गावातील शेतकरी अशोक किसनराव मुंडे यांच्या गट क्रमांक ७६ या शेतात धनराज उत्तम चौधर यांनी केदारेश्वर मल्टी सर्व्हिसेसमध्ये कौसाबाई लक्ष्मण राठोड, रा. पांगरी तांडा यांचा पीक विमा भरला. त्यामुळे अशोक मुंडे यांचाही पीक विमा रद्द झाला. असे बोगस प्रकार गावात अनेक शेतकऱ्या बाबतीत घडले असून काहींना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे. परळी पोलिसांत दाखल गुन्ह्यानुसार, मधुकर भगवानराव भारती, रवींद्र दामोदर मुंडे (दोघेही रा. लिंबुटा), धनराज उत्तम चौधर (रा. लोकरवाडी), कौसाबाई लक्ष्मण राठोड (रा. पांगरी तांडा) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेकनूर हादरले : नराधम बापाचा पोटच्या अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार!

0

नेकनूर — जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची नात्याला काळीमा फासणारी खळबळ जनक घटना घडली आहे. ही घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात शुक्रवारी घडली
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एका गावातील दाम्पत्यामध्ये घरगुती कारणावरून वाद निर्माण झाले होते. या वादातून आरोपीची पत्नी पुण्याला निघून गेली होती. तर मुलगी एकटी घरी होती. शुक्रवारी रात्री राहत्या घरातच नराधम पित्याने पोटाच्या मुलीवर अत्याचार केला. सदरील प्रकार हा मुलीची आई पुण्यावरून आल्यानंतर समोर आला. पिडीतेच्या आईने याबाबत आज नेकनूर पोलीस ठाण्यात जावून नराधम पित्या विरोधात तक्रार दाखल केली त्यानुसार आरोपीविरोधात बाल लैगिंक अत्याचार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या नराधाम आरोपी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेमुळे नेकनूर परिसरात खळबळ उडाली.

कार्यकर्त्याची भाजप कार्यालयासमोरच दिवसाढवळ्या हत्या

0

माजलगाव —  शहरातील भाजप कार्यालयासमोर भर दिवसा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता तथा आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे याचा खून झाला आहे. कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले.

नारायण शंकर फपाळ याने भर दिवसा हा खून केला असून, या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहेत.शहरात भर दिवसा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. हत्या केल्यानंतर नारायण फपाळ हा आरोपी स्वतः पोलिस ठाण्यामध्ये हजर झाला. अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ भर वस्तीत भाजपचं कार्यालय आहे. तिथं कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ही हत्येची घटना घडल्याने दहशत पसरली आहे. बीडमधील शांतता-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे
आरोपि नारायण फपाळ हा रागारागाने आगे यांच्यावर कोयत्याने वार करत होता, त्यावेळी परिसरात दहशत निर्माण झाली होती. काहीशी पळापळ झाली होती. हा सर्व प्रकार काहींनी व्हिडिओमध्ये कैद केला असून, हे व्हिडिओ आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होऊ लागले आहेत.
मयत बाबासाहेब आगे वय 30 वर्ष हे माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य देखील आहेत. भाजपच्या तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय येथे आले होते. त्या कार्यालयाच्या समोरच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी नारायण फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. बाबासाहेब आगे समोर येताच, फपाळ याने त्यांच्यावर सपासप वार केले. फपाळ याने माजलगाव शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर होऊन हत्येची माहिती दिली

पाटोदा तहसील कार्यालयात चोरट्याने मारला डल्ला,

0

पाटोदा — येथील तहसील कार्यालयातून चोरट्याने चक्क संगणक लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या  विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चक्क तहसील कार्यालयातूनच ही चोरी झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. सोबतच शासकीय कार्यालयही आता चोरट्यांपासून सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. याबाबत पुढे आलेल्या माहितीनुसार, पाटोदा तहसील कार्यालयातील महसूल विभागातून  संगणकाची चोरी झाली आहे. तहसील प्रशासनाने चोरीचा प्रकार उघड होऊ नये यासाठी प्रयत्न केला. मात्र ही बाब नायब तहसीलदार गणेश दहिफळे यांच्या लक्षात येताच त्यांनी ही तक्रार नोंदवली आहे. यात चोरट्याने हा संगणक लंपास का केला? की कार्यालयातूनच याची चोरी झाली. याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र तहसील कार्यालयच असुरक्षित असल्याचा प्रत्यय या निमित्ताने समोर आला आहे.

पुण्याची पुनरावृत्ती बीडात; प्रसूती झालेल्या माहिलेचा रक्तस्त्रावाने मृत्यू

0

बीड — जिल्हा रुग्णालयात एका 24 वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर तासाभरात रक्तस्रावाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.या प्रकरणामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी सांगितले आहे.

तालुक्यातील अंबिल वडगाव येथील छाया गणेश पांचाळ वय 24 वर्ष ही महिला प्रसूतीसाठी शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांची नॉर्मल प्रसूती होऊन तिने एका मुलाला जन्म दिला.प्रकृतीमुळे नवजात मुलास एसएनसीयू (काचामध्ये) ठेवण्यात आले. प्रसूतीनंतर तासाभरातच महिलेला रक्तस्त्राव सुरू झाला. अति रक्तस्त्रावामुळे पहाटे छाया पांचाळ यांचा मृत्यू झाला. प्रसूतीनंतर बाळ सुखरूप आहे, परंतु छाया यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणी चौकशीसाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांचा अहवाल येताच पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी सांगितले आहे.

शाळकरी मुलाचे अपहरण; एका तासात सुटका आरोपी जेरबंद

0

बीड — पांगरी रोड भागातून एका शाळकरी मुलाचे अपहरण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती मात्र स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी अशोक दुबाले व मुन्ना वाघ यांनी गतीने तपास करत आरोपीला बेड्या ठोकत मुलाची सुखरूप सुटका केली सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली होती.
बीड शहरातील पांगरी रोड भागातून एका 9 वर्षीय मुलाला जगदीश गायकवाड रा. अंबिका चौक,बीड या आरोपीने अपहरण करून पळविले होते.आरोपी बीड बसस्थानकाकडे आला होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी अशोक दुबाले आणि मुन्ना वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान अवघ्या तासाभरातच स्थानिक गुन्हे
शाखेने मुलाची सूटका करत मोठी कामगिरी बजावली आहे. सदर मुलाच्या वडिलांना फोन करून आरोपी गायकवाड याने पाच लाखांची मागणी देखील केली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. पोलीस अधिक्षकांनी यात स्वतः लक्ष घालून तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. आरोपी सध्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून त्याला
शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. पोलीस कर्मचारी दुबाले आणि वाघ यांनी केलेल्या कामगिरीचे सध्या सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

पवनचक्की कंपन्यांच्या आर्थिक अनियमिततेचा कळस; पा”ठकां”च्या कारभाराची येतेय किळस ✒️ भाग –3

0

बीड — गाव पातळीवर काम करताना दलाल मध्ये घालत त्यांना भरमसाठ पैसा देणे, तहसीलदार,गिरदावर, तलाठी, पोलीस ठाणे प्रमुख यांच कंपन्यांचं प्रामाणिकपणे काम करणं
गुंडांची टोळी सक्रिय असण,विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेला भरमसाठ दिलेला मोबदला, मावेजा देताना ठेवलेली कमालीची गुप्तता यासारख्या एक ना अनेक बाबी लक्षात घेतल्या तर कंपन्यांच्या आर्थिक अनियमिततेने कळस गाठत नवे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. पण करणार काय? इथं जिल्हाधिकारी पदावर बसलेल्या अविनाशी पा”ठका”ने शेतकऱ्यांना ठकवण्याचाच जणू चंग बांधला आहे. शेतकरी हा प्रगतीतला अडथळा आहे. असं वातावरण निर्माण करून आपल्या निष्ठा कंपन्यांच्या पायाशी वहात तळवे चाटण्याचा किळसवाणा प्रकार सुरू ठेवला आहे.
पवनचक्की सौर ऊर्जा कंपन्यांच्या आर्थिक मायाजालात दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी अविनाश पा”ठक”च पुरते अडकले. आपली खुर्ची, अधिकार निष्ठा कंपन्यांच्या पायाशी वाहिल्या. परिणामी इंग्रज, मोगल या दोन्ही पूर्वीच्या सत्याधीशांच्या नीतीचा अवलंब करत फोडा,तोडा राज्य करा हे धोरण त्यांनी अवलंबिलं. या मध्ये उणीव राहू नये यासाठी मोगलाई नीतीचा वापर करून शेतकऱ्यावर अत्याचाराला सुरुवात देखील केली. याचीच प्रचिती अंबाजोगाई येथील जवळगाव मध्ये पाहायला मिळाले. सोलार कंपनीला गायरान जमीन देण्यासाठी गायरान धारकांची घर उध्वस्त केली. शेतकऱ्यावर विष पिऊन आत्महत्या करण्याची वेळ आणली. कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती जिल्हा भरात पाहायला मिळू लागली. कंपन्यांनी आर्थिक जोरावर गुंडांच्या टोळ्या निर्माण केल्या त्यातून ग्रामीण भागात दहशतीचं वातावरण तयार केलं. गाव पातळीवर काम करताना गावातला एखादा माणूस आपलासा करायचा त्याला भरमसाठ पैसा पुरवायचा यातून आपला मार्ग सुकर करायचा. मग या दलालाने शेतकऱ्यांच रक्त भरमसाठ पिलं. कंपन्यांनी आशा निर्माण केलेल्या दलालांना पूरून उरत त्यांच्या धमक्यांना भीक न घालणाऱ्या, गुन्हे दाखल करूत आशा धमक्या देणाऱ्या पोलिसांनाही न जूमानणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना भरमसाठ मोबदला दिला.यातून अनेक हजारो शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घालण्याचं काम कंपन्यांच्या दलालांनी केलं. एरवी पोलीस ठाण्यात फोन करून दुर्घटनेची माहिती दिली तर मदतीला न धावणारे पोलीस ठाणे प्रमुख कंपन्यांच्या एका फोनवर बंदोबस्तासाठी कंपन्यानी पैसा भरलेला नसताना देखील पार्श्वभागाला पाय लावत हूजरे गिरी करायला गेलेले पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांनी पोलीस ठाण्यात नेऊन डांबून ठेवण्याचे प्रकार घडले. पोलीस अधीक्षक सामाजिक न्याय अन्यायाची जाणीव ठेवणारे असले तरी एकट्याच्या प्रयत्नाने प्रशासन सुधारणे किती अवघड बनते याची प्रचिती सध्या येत आहे.
जिल्ह्यात भरमसाठ वाळू उपसा सध्या देखील सुरू आहे. अवैध गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याकडे पाहिला जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नाही. मात्र कंपन्यांची काम सुरळीत व्हावीत यासाठी त्यांच्याकडे भरमसाठ वेळ आहे. रात्रीची झोप घ्यायला देखील त्यांच्याकडे उसंत नाही. जिल्ह्याचा प्रमुख लाळ घोटणारा असेल तर महसूल कर्मचाऱ्यांची वेगळी त-हा कशी असेल? तलाठी, गिरदावर इतकंच नाही तर तहसीलदार देखील कंपन्यांच्या दिमतीला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बसले. एरवी शेतकरी आसमानी संकटात असेल तर त्याची दखल न घेणारी, शासकीय कार्यालयात कधीच हजर नसलेली, सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे डोळे झाक करणारी, वाळू उपसा, गौण खनिज उत्खनन, यात आर्थिक हित पाहणारी ही मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर कंपन्यांसाठी जाते की काय आर्थिक फायदा झाल्याशिवाय थोडीच जाते हे न कळण्या इतकी दूध खुळी जनता नक्कीच नाही. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना भरमसाठ मावेजा देताना कमालीची गुप्तता या कंपन्यांनी पाळली परिणामी खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. अपेक्षित मावेजा गोरगरीब शेतकऱ्यांना मिळाला नाही यातून शेतकरी नागवण्याचं काम कंपन्यांसह पा”ठक” सारख्या वरिष्ठ अधिकार पदावर बसलेल्या दलाल पासून गाव पातळीवर दलालांपर्यंतच्या साखळीने केलं.
कंपन्यांचा प्रकल्प उभारणीचा आकडा करोडो रुपयांमध्ये गेला असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. आर्थिक अनियमितता झालेली असताना यात काळा पैसा किती फिरला याची मोजदाद आता करणार कोण? या आर्थिक अनियमिततेची दखल सनियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घेणे अपेक्षित आहे. पण इथे जिल्हाधिकारी पा”ठकां”चा कारभार च बरबटलेला आहे. मग कंपन्यांच्या आर्थिक अनियमिततेची दखल घेणार कोण? एकंदरच शेतकरी नागवला गेला असला तरी व्यवस्थेतले कंपन्यांनी निर्माण केलेले हे घटक मात्र मालामाल झाल्याचं चित्र जिल्ह्यात निर्माण झाला आहे.

ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवणे शक्य; अमेरिका इंटेलिजन्सच्या दाव्यानं जगभरात खळबळ

0

नवी दिल्ली — देशाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय असेल, तो म्हणजे, ईलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले.

काँग्रेस सुरुवातीपासून ईव्हीएमचा निकाल मान्य नाही. आता अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सने ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करताना, ईव्हीएम हॅक करून निकाल बदलणे शक्य आहे, असा दावा केला आहे. या दाव्यामुळे भारतातील विरोधकांच्या ईव्हीएम विरोधाला भविष्यात आणखी धार चढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सनच्या तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम मशीन सहजपणे हॅक करून निवडणुकीच्या निकालात घोटाळा केला जाऊ शकतो, असा दावा केला आहे. यामुळे संपूर्ण अमेरिकेत मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया लागू करण्याची गरज व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थित तुलसी गबार्ड यांनी मत व्यक्त केल्याने ईव्हीएमच्या विश्वासर्हतेविषयी पुन्हा जगभरात चर्चा सुरू झाली आहे.तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम मशीनविषयी उपस्थित केलेली शंका, त्यावरील मत समाज माध्यमांवर  वेगानं व्हायरल होऊ लागलं आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटू लागले आहे. विशेष म्हणजे, तुलसी गबार्ड यांना समाज माध्यमातून पाठिंबा देखील वाढू लागला आहे. परंतु काहींनी तुलसी गबार्ड यांच्या शंकेमागे राजकीय अजेंडा असल्याची भावना व्यक्त केली आहे. टेस्लाचे सीईओ इलाॅन मस्क यांनी देखील गेल्या वर्षी इलेक्ट्राॅनिक्स मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित केले होते.

भारतीय निवडणूक आयोगाचा दावा

अमेरिकेच्या तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या दाव्याचे पडसाद भारतात देखील उमटू लागले आहेत. यावर भारतीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत मतदानात पाच कोटींहून अधिक व्हीव्हीपॅटवरील मतांशी जुळणी झाली आहे. ईव्हीएम मतांशी जुळत आहे. हा ईव्हीएमबाबतच्या विश्वासर्हतेचा सर्वात मोठा पुरावा आहे. भारतातील ईव्हीएम आणि इतर देशातील ईव्हीएम मशीन सिस्टम वेगळ्या आहेत, असा दावा देखील भारतीय निवडणूक आयोगाने केला आहे.

भारतातील ईव्हीएम प्रोग्राम सिस्टम वेगळी

अमेरिकेची ईव्हीएम मशीन ‘विंडो’, ‘लिनक्स’वर चालतात, भारताची ईव्हीएम अगदी ऑफलाईन आहे. वाय-फाय, ब्लूटुथ नाही. अमेरिकी यंत्र इंटरनेटशी जोडलेले असते. भारतातील ईव्हीएममधील प्रोग्रामिंगनंतर बदला येत नाही. अमेरिकी यंत्रात ते शक्य आहे. भारतीतील ईव्हीएममध्ये मुद्रित पावती देखील पाहता येते. अमेरिकेतल्या यंत्रांमध्ये तसे नाही, असे तुलनात्मक वर्णन भारतीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

शहराच्या पाणी प्रश्नासाठी आ.संदीप क्षीरसागरांची भर उन्हात धावपळ

0
 म्हाळसजवळा येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामाची पाहणी करून जलदगतीने काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना
बीड —  सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने नागरिकांना पाण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांची धावपळ सुरू आहे. शनिवार (दि.१२) रोजी भर उन्हात आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी म्हाळसजवळा येथे जाऊन सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जलदगतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि शहरातील नागरिकांना वेळेत पाणी मिळावे यासाठी आमदार क्षीरसागर यांचा प्रयत्न सुरू आहे.
               सध्या उन्हाच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर देखील होऊ लागला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे काम म्हाळसजवळा परिसरात सुरू आहे. शनिवारी दुपारी भर उन्हात आ. संदीप क्षीरसागर आणि माजी आ. सय्यद सलीम यांनी म्हाळसजवळा येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी आ. संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या आहेत तसेच काम अधिक गतीने पूर्ण करण्याचेही निर्देश दिले आहेत.

पवनचक्क्या कंपन्यांची हुजरे गिरी करणाऱ्या अविनाशी पा”ठकां”ना महामानवाच्या संगीत रजनीचं वावड का? ✒️ भाग –2

0

बीड — समता न्याय बंधुत्व याची शिकवण देत देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कायदे एकीकडे जिल्हाधिकारी पदावर बसून अविनाश पाठक पवन ऊर्जा कंपन्यांना संरक्षण देत पायदळी तुडवत आहेत.शेतकऱ्यावर अत्याचार करत आहेत. तर दुसरीकडे महामानवाच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या संगीत रजनी कार्यक्रमाच्या परंपरेला परवानगी नाकारण्याचं काम केलं आहे. पवनचक्क्या कंपन्यांना संरक्षण द्यायला यांच्याकडे पोलीसांचा फौज फाटा आहे.पण शांततेने होणाऱ्या या कार्यक्रमा बाबतही अन्यायकारक दुटप्पी भूमिका जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी घेतल्याने खळबळ माजली आहे.
बीड जिल्ह्यात सध्या अविनाश पाठक यांना “वाटतो तोच कायदा”बाकी सब झूट अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी पदावर बसून न्यायाची भूमिका घेण अपेक्षित असताना पवन ऊर्जा कंपन्यांची चाटायची एवढीच भूमिका अविनाश पाठक सध्या घेत आहेत. परिणामी विकासाच्या नावाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होतो आहे. कंपन्यांची दांडगाई, त्यांना मिळणारं पोलीस संरक्षण, अविनाश पाठक यांची धृतराष्ट्राची भूमिका यामुळे रझाकाराच्या जमान्यात जगतो आहोत असं शेतकऱ्यांना वाटू लागला आहे. कायदे पायदळी तुडवत जिल्हाधिकारी कारभार हाकत शेतकऱ्यांचं जीन हराम करत आहेत. पवनचक्क्या कंपन्यांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांचा मुबलक फौज फाटा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. पोलीस बळाच्या जीवावरच शेतकऱ्यावर त्राही माम् म्हणण्याची वेळ पाठक यांनी आणली आहे. सगळी लाज लज्जा शरम हया त्यांनी कंपन्यांच्या पायाशी वाहिली आहे. माध्यम या विरोधात आवाज उठवत असली तरी कुठलही सोयर सुतक पाळायला अविनाश पाठक तयार नाहीत. पवनचक्की सौर ऊर्जा कंपनी यांना संरक्षण द्यायला यांच्याकडे पोलीस यंत्रणा आहे. पण त्याचवेळी महामानवाच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित भीम गीतांचा संगीत रजनी कार्यक्रमाच यांना वावड व्हावं हे संविधान देणाऱ्या महामानवाचे दुर्दैव नाही काय? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने जयंतीच्या पूर्वसंध्येला बीडच्या बाजार तळावर संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दरवर्षीच्या परंपरेनुसार यावर्षी देखील कार्यक्रमासाठी परवानगी मागण्यात आली. या संगीत रजनी कार्यक्रमाला ग्रामीण भागातील आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावते. रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेली समता ज्योत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर पोहोचते. या ठिकाणी महामानवाला अभिवादन करून आंबेडकरी जनता आप आपल्या घरी जाते. या परंपरेला यावर्षी मात्र फाटा बसणार आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांच्या हरकतीचा मुद्दा पुढे केला आहे. या ठिकाणी बाजार भरतो त्यामुळे परिसरातून गर्दी वाढू शकते त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर ला परवानगी देण्यास पोलीस अधीक्षकांनी हरकत घेतली आहे. सायंकाळी सातच्या सुमारास बाजार संपतो. त्यानंतर बाजार तळाचे मैदान रिकामे राहणार आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना मात्र लक्षात आली नाही का? विशेष महत्त्वाची बाब म्हणजे रामनवमीच्या दिवशी बीडचा बाजार नगरपालिकेने बंद ठेवला होता. त्याच पद्धतीने यावेळी देखील बाजार बंद ठेवता आला असता. पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग इच्छाच नसेल तर शेवटी करणार काय? आले पाठकांच्या मना तेथे कोणाचे चालेना असं म्हणण्याची वेळ आली आहे.आजपर्यंत संगीत रजनी कार्यक्रम शांततेत पार पडला. कधीही आंबेडकरी जनतेने गालबोट लागू दिले नाही. असं असताना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी परवानगी नाकारणे अन्याय करणारे असल्याची भावना जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अशा मनमानी कारभाराला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.