Home Blog Page 110

माकडाची लाकडं, चुलीला साकडं; गोसावी म्हणतात गुन्हा नोंद नाही केला तर कोण करणार माझं वाकड?

0

चौसाळा — चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालावर दरोडे टाकायला सुरुवात केली असली तरी गुन्हा नोंद करून घेणं नेकनूरचे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींना जीवावर येऊ लागला आहे. सयाजी शिंदे यांचा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळ्यात सात एकर डाळिंब बागेतील 22 टन फळ चोरून नेली. 22 ते 23 लाखाचा हा दरोडा पडून देखील चोरांना अभयदान देण्याचं काम केलं जात आहे.

( फळ चोरीला जाण्यापूर्वी अशी फळधारणा झालेली होती)

या प्रकरणात आठ दिवस उलटूनही अद्याप गुन्हा नोंद करून घेण्याची गोसावींना गरज वाटली नाही. मग्रुरी इतकी की एस पीं च्या आदेशालाही त्यांनी फाट्यावर मारत हम करे सो कायदा ही भूमिका घेतली आहे.

(चोरी झाल्यानंतर बोडखी झालेली झाड)
गेल्या दोन महिन्यांपासून चौसाळा बायपास वर किरकोळ वाटमारीच्या अनेक घटना घडल्या असल्या तरी या घटनांची दखल पोलिसांनी घेतली नाही. गुन्हा नोंद केला गेला तर नाहीच नाही उलट तक्रार द्यायला आलेल्या लोकांनाच भीती घालण्याचं काम केलं गेलं. “चोरांना मेसाई धार्जीन”अशी म्हण प्रचलित आहे. याचाच अपभ्रंश करून चोरांना “नेकनुर पोलीस धार्जीन” असं म्हटलं जाऊ लागला आहे. अवैध धंद्यांना आश्रय मिळालेलाच आहे. पण आता शेतकऱ्यांच्या शेतमालावर देखील दरोडा पडू लागला आहे. असं म्हणतात की माकडं लाकडं गोळा करून शेकोटी करतात. या शेकोटीला जाळ नसतो. पण ही लाकडं जळणाला जर वापरली तर ती लाकडं जळत नाहीत. न पेटलेल्या लाकडातली उष्णता शेकोटी भोवती बसलेली माकड शोषून घेतात. त्यामुळे “माकडांची लाकडं चुलीला साकडं“अशी म्हण देखील प्रचलित आहे. अशीच काहीशी स्थिती नेकनूरचे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींनी करून ठेवली आहे. कायद्यातली ऊर्जा ताकत त्यांनी शोषून घेतली. परिणामी जनतेला नेकनूर पोलिसांचं साकडे पडू लागला आहे. हे सांगण्याला कारणही तसंच आहे. चौसाळा बायपास वर सयाजी शिंदे यांची सात एकर डाळिंबाची बाग आहे. उन्हाळ्यात तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग सांभाळला, टॅंकरने पाणी आणून झाड जोपासली. उन्हाळ्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी क्रॉप कव्हर टाकण्यात आले. यावर्षी विक्रमी उत्पादन काढण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. डाळिंबाचं पिक जोमान आलं. बागेतली फळ खरेदी करण्यासाठी व्यापारी चकरा मारू लागले. एवढ्यात चोरट्यांची नजर बागेवर पडली. रात्रीत बागेतली सगळी फळ चोरांनी तोडून नेली. 22 टनाहून अधिकचे डाळिंब फळ चोरून नेले. वीस ते पंचवीस लाखाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले.
सकाळी ही बाब लक्षात येताच चौसाळा पोलीस चौकीला फिर्याद देण्यासाठी शिंदेंनी धाव घेतली. पोलिसांनी लेखी तक्रार स्वतःकडे ठेवून घेतली. ठाणे प्रमुख गोसावी रजेवर आहेत दोन दिवसानंतर गुन्हा नोंद करण्यात येईल असं सांगण्यात आलं. पण गुन्हा नोंद झालाच नाही. शिंदेंनी नेकनूरच्या चकरा देखील मारल्या. एक दोन टन माल चोरीला गेल्याची तक्रार द्या. एवढी मोठी चोरी झाल्याची तक्रार घेता येत नाही असं स्पष्ट गोसावींनी सांगितलं. तक्रार दाखल करून घेतली जात नाही म्हणून शेवटी सयाजी शिंदे या शेतकऱ्याने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे धाव घेतली. एसपी समोर त्यांनी कैफियत मांडली. एस पींनी याची दखल घेत तात्काळ गुन्हा नोंद करून घेण्यात यावा असा आदेश चंद्रकांत गोसावींना दिला. पण एसपींच्या आदेश मानतील ते गोसावी कसले? हम करे सो कायदा असं म्हणत एसपींच्या आदेशाला देखील त्यांनी सवयीप्रमाणे फाट्यावर मारलं. या प्रकरणात नऊ दिवसाचा कालावधी उलटून गेला असला तरी अद्याप गुन्हा नोंद झालाच नाही. चंद्रकांत गोसावींच्या चोरांना अभय देण्याच्या मानसिकतेमुळे त्यांच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. वाटमारी करणाऱ्या चोरांना गोसावी कुठपर्यंत अभयदान देणार? एसपींच्या आदेशाला असंच आणखी किती वेळेला फाट्यावर मारणार? माकडाची लाकडं कधी सुटणार जनते पुढचं साकडं? असं म्हणण्याची वेळ आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे सयाजी शिंदे हे शेतकरी पोलीस आयुक्त, गृहमंत्री यांच्याकडे आता तक्रार करणार आहेत. एस पी नवनीत कावत यांच्या कारकिर्दीलाच काळीमा फासण्याचा काम गोसावी सारखी मंडळी करू लागली आहे ‌.शेतकऱ्यांना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या कारकिर्दीत तरी न्याय मिळणार का? असा प्रश्न पडू लागला आहे.

खाजगी क्लासेस लैंगिक छळ प्रकरणातील पवारचा आणखी एक कारनामा समोर

0

बीड — उमाकिरण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोघांची पोलीस कोठडी वाढवण्यात आल्यानंतर विजय पवार चा आणखी एक कारनामा समोर आला.
. विजय पवार हा माझ्या मुलीला केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचा असा आरोप कथित पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून त्रास दिला गेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. माझ्या मुलीलाही शाळेबाहेर उभा करायचे. तर कधी केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचे असा आरोप या पालकांनी केला आहे. या सर्व प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी संबंधित पालकाने गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला. परंतु अद्याप कारवाई झालेली नाही. आता पोलीस अधीक्षकांनी आवाहन करताच या पालकांनी समोर येत ही तक्रार केली आहे. आता या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांकडून तपास केला जाणार आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर 14 जुलैला सुनावणी

0

नवी दिल्ली — शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी पुढील सुनावणी 14 जुलै रोजी घेणार आहे.

https://x.com/ANI/status/1940287755730256082
ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी या आठवड्यात अथवा पुढील आठवड्यात तत्काळ सूचिबद्ध करण्याची मागणी केली.दरम्यान, खंडपीठाने आंशिक न्यायालयीन कामकाजाच्या दिवसांत ही याचिका सूचीबद्ध करण्यास सहमती दर्शवली नाही. तर एकनाथ शिदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी असे सादर केले की, 7 मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने तत्काळ सुनावणीची विनंती फेटाळून लावली होती. त्यावर, ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील कामत म्हणाले की न्यायमूर्ती कांत यांच्या खंडपीठाने न्यायालयीन सुट्टीत हा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी दिली होती.त्यानंतर खंडपीठाने 14 जुलै रोजी हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे निश्चित केले.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर आता 14 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

मोटार सायकल चोरास अटक, चोरलेल्या सहा मोटार सायकल जप्त्

0

 स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बीड —  मोटार सायकल चोरणाऱ्या अट्टल चोराची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने परळी रोड बार्शी नाका या भागातून सापळा लावून पकडले. या कारवाईत अनेक ठिकाणी मोटार सायकली चोरी केल्याच्या घटना उघडकीस आल्या असून तीन लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेने जिवन रामदास गाडे, वय 24 वर्ष, रा बार्शी नाका,बीड यास चोरीची दुचाकीसह पोलीसांनी परळी रोड येथे सापळा लावुन पकडले. जीवन गाडे हा आरोपी पूर्वीपासून पोलीस रेकॉर्डवर होता .आरोपी जिवन रामदास गाडे यास ताब्यात घेवुन तपास केला असता त्याने ईतरही बीड शहरातील व पुण्यामधील मौटार सायकली चोरल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीकडुन एकुण सहा मोटार सायकली जप्त् करण्यात येवुन 3 लाख 50  हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे मोटार सायकलच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपी  जिवन रामदास गाडे याच्या कडुन खालील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
1. पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 321/2025 कलम 303(2) बी.एन.एस
2. पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 103/2023 कलम 379 भा.दं.विधान
3. पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 199/2023 कलम 379 भा.दं.विधान
4. पोलीस ठाणे चंदननगर, पुणे शहर गु.र.नं 255/2024 कलम 379 भा.दं.विधान
5. पोलीस ठाणे भोसरी गु.र.नं 1037/2023 कलम 379 भा.दं.विधान
वरील पाच मोटार सायकलचे गुन्हे आरोपी नामे जिवन रामदास गाडे याने केल्याची कबुली दिली आहे. तसेच ईतर एक मोटार सायकल बाबत कोणताही अभिलेख मिळुन आला नाही. त्या बाबत पोलीस तपास करीत आहे. सदरचा जिवन रामदास गाडे हा यापुर्वी वडवणी पेालीस ठाणे यांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्हयात अटक केली होती.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड,  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, पोलीस हवालदार विकास राठोड, राहुल शिंदे, मनोज परजणे, आशपाक सय्य्द, सुनील राठोड यांनी केली आहे.

बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी होणार; दोषींकडून सर्व रक्कम वसूल करणार – मंत्री भूसे

0

मुंबई — नागपूरमध्ये उघडकीस आलेल्या बनावट शिक्षक ओळख क्रमांक (शालार्थ आयडी) घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून राज्याच्या अनेक भागातून अशाच तक्रारी येत आहेत. सरकारे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून वरिष्ट सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाच्या(एसआयटी) माध्यमातून या घोटाळ्याची तीन महिन्यांत चौकशी केली जाईल‌.यातील दोषींवर कठोर कारवाई करतानाच त्यांच्याकडून अपहाराची सर्व रक्कम वसूल करण्यात येईल , अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

नागपूरसह काही जिल्हयात बोगस शिक्षक ओखळ क्रमांक (शालार्थ आयडी) अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे पात्र शिक्षकांच्या यादीत घूसवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आहे. भाजपाचे प्रविण लटके, प्रशांत बंब, नरेंद्र बोंडे आदींनी लक्षेवधीच्या माध्यमातून या गंभीर घोटाळ्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. नागपूरमध्ये शिक्षण संस्था, शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी संगनमताने मृत शिक्षणाधिकाऱ्याच्या बोगस सह्या तसेच बनावट शालार्थ आयडीच्या माध्यातून सन २०१२ ते २०१९ या दरम्यान सरकारचे कोट्यावधी रुपये लाटले.

या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असून राज्यातील अनेक जिल्ह्यात अशाचप्रकारे बोगस शिक्षकांच्या नावे वेतन व भत्यांच्या माध्यमातून सरकारला फसवण्यात आले आहे. या घोटाळ्यातील सर्व दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी सदस्यांनी केली. शिक्षण मंत्र्यांच्या नाशिक जिल्हयात विशेषत: मालेगावमध्येही शिक्षण विभागात मोठा घोटाळा झाला असून शिक्षण विभागाचे अधिकारी २० वर्षापासून मालेगावमध्येच ठाण मांडून बसल्याचा आरोप काही सदस्यांनी केला.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही नागपूरमध्ये मोठा घोटाळा झाल्याची आणि त्याची व्याप्ती अन्य जिल्ह्यातही असल्याची कबुली देताना संपूर्ण राज्यातच अशा प्रकारच्या तक्रारी येत असून त्याची चौकशी करण्याची घोषणा केली. राज्यात गेल्या काही वर्षांपासून हा घोटाळा सुरू असून त्याची विशेष तपास पथकाच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. एसआयटीमध्ये वरिष्ठ सनदी, पोलीस अधिकारी आणि विधि व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

तीन-चार महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाईल. त्यात दोषी आढळणाऱ्या शिक्षण विभागील अधिकारी, संस्था चालक, मुख्याध्यापक आणि बोगस शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच त्यांनी आजवर घेतलेल्या वेतनाची पूर्ण वसूली केली जाईल असेही भूसे यांनी सांगितले. नागपूरमधील घोटाळयात १९ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस आणि शिक्षण विभागाच्या योजना संचालकाच्या माध्यमातून स्वतंत्र चौकशी सुरूआहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

बीड लैंगिक छळ : शिक्षकांची पोलीस कोठडी 5 जुलैपर्यंत वाढली

0

बीड –अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन शिक्षकांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना आज बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच जुलै पर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे.
या प्रकरणात आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज ती कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर बीडमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून हे दोघेही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असल्याचं समोर येत असल्याने राजकीय वातावरणही तापलं.विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छेड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केला जात होता. घडलेला प्रकार मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितला. मात्र, शिक्षकांकडून होणारा त्रास असाह्य झाल्याने मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. या तक्रारीनंतर दोन्ही शिक्षकांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लैंगिक छळ प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी करणार; मुख्यमंत्र्यांची  घोषणा

0

धनंजय मुंडे यांच्या मागणीला 24 तासातच यश

प्रकरण अतिशय गंभीर, आरोपी आणि त्यांना आश्रय देणारे, कुणालाही सोडणार नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई  – माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी बीड शहरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी केलेल्या मागणीला राज्य सरकारने २४ तासातच मान्य केले असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता एका वरिष्ठ महिला आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) मार्फत केला जाणार असून, याबाबतची अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात केली आहे.

बीड येथे घडलेले प्रकरण अतिशय गंभीर व माणुसकीला आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणात अशाच प्रकारे आणखी काही मुलींचे देखील लैंगिक शोषण झाल्याची शंका नाकारता येत नाही, त्यामुळे असे प्रकार घडलेल्या मुलींनी आता स्वतःहून समोर येऊन तक्रार द्यावी, या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागावा, यातील दोषी व त्यांना मदत करणारे तसेच त्यांना राजकीय किंवा सामाजिक बळ देणारे हे कोण आहेत, ते निष्पन्न व्हावेत व त्यांना कठोर शिक्षा व्हावी, ही सरकारची व नवनियुक्त SIT समितीची भूमिका असेल, दोषी असलेल्या कुणालाही सोडले जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडे यांच्या सह आज सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनीही आज हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. दरम्यान या तपास पथकाला कालमर्यादा निश्चित करून दिली जाणार असून, त्यांनी दिलेल्या वेळेत तपास पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे, असेही श्री फडणवीस म्हणाले.

या घोषणेनंतर धनंजय मुंडे यांनी आपण केलेली मागणी राज्य सरकारने २४ तासांच्या आत मान्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले असून, या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळेपर्यंत आपण हे प्रकरण लावून धरू असा निर्धार मुंडेंनी व्यक्त केला आहे.

संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर पलटवार; “मी 150 दिवस पळून गेलो नाही!”

0

बीड– ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थिनीच्या छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार, हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केला होता.
मुंडे यांनी थेट संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करत, विजय पवार याच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या रात्री तो क्षीरसागरां सोबत असल्याचे म्हटले होते. तसेच, पीडितेच्या वडिलांना दोन दिवसांत 20 फोन केल्याचा गंभीर आरोपही मुंडे यांनी केला होता. आता या आरोपांवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संदीप क्षीरसागर यांनी आज धनंजय मुंडे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना स्पष्ट केले की, मुंडे यांची मागणी एसआयटी चौकशीची आहे आणि त्याला पूर्ण संमती आहे. “जो प्रकार घडला तो अत्यंत चुकीचा आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच आरोपी शिक्षकांना अटक झाली आहे,” असे क्षीरसागर म्हणाले. प्रशासनासोबत चर्चा सुरू असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचेही त्यांनी सांगितले. “माझ्या जवळचे असले तरी कारवाई करायला मागे-पुढे बघू नका, असे मी स्वतः पोलिसांना सांगितले आहे,” असेही त्यांनी नमूद केले. पीडितेने तक्रार दिल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल झाला. दहा दिवस लागले नाही. असं सांगत त्यांनी हे प्रकरण तातडीने हाताळले गेल्याचे सांगितले.
यावेळी संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. “मी काही त्यांच्यासारखं 150 दिवस पळून गेलो नाही,” असे ते म्हणाले. त्यांचे मंत्रीपद गेल्याने त्यांना दुःख झाले असून, त्यामुळेच ते या प्रकरणात बोलत असल्याचा आरोपही क्षीरसागरांनी केला. “या प्रकरणात ते जसे बोलत आहेत, तसेच त्यांनी ‘मस्साजोग’ प्रकरणीही आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती,” असा पलटवार त्यांनी केला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, असेही क्षीरसागर म्हणाले.
संदीप क्षीरसागर यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणात पोलीस देखील तत्परतेने कारवाई करत आहेत. “मी आता बोलण्यापेक्षा सत्तेत मुंडे आहेत, त्यांनी जोर लावला पाहिजे,” असे ते म्हणाले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना 150 दिवस बाहेर राहावे लागले, त्यांचे मंत्रीपद गेले, त्यामुळेच त्यांना दुःख आहे असेही क्षीरसागर यांनी पुन्हा अधोरेखित केले. “लोकप्रतिनिधी म्हणून मी रोज रस्त्यावर काम करतो. चहाच्या टपरीवरही मी जातो, तिथे लोक भेटतात. संबंधित लोक माझ्या ओळखीचे आहेत. पीडितेकडे मी जाणार होतो, पण सध्या जाणं योग्य नाही म्हणून गेलो नाही,” असही त्यांनी स्पष्ट केलं.

आषाढी वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार! गळ्याला कोयता लावून दागिने लुटले

0

पुणे — आषाढी वारीसाठी पंढरपूर इथं निघालेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर दोन तरूणांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडली.
त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दीड लाख रूपयांचे दागिने लुटण्यात आले आहेत. या प्रकारामुळं एकच खळबळ उडाली असून सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त असताना हा घृणास्पद प्रकार घडल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली (ता. दौंड) इथं 30 जून रोजी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. आषाढी वारीसाठी महामार्गाने पंढरपूरकडे चारचाकी वाहनात निघालेलं एक कुटुंब चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबले होतं. तेव्हा दुचाकीवरून दोन तरूण तिथं आले. त्यांनी हातातील शस्त्राचा धाक दाखवून त्या कुटुंबीयांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली. त्यानंतर चहा पिण्यासाठी वाहनातून खाली उतरलेल्या तीन महिलांच्या अंगावरील सोन्याचं डोरलं, कर्णफुले व मंगळसूत्र अमानुषपणे ओरबाडून काढलं.

त्यानंतर कुटुंबीयांसह असलेल्या अल्पवयीन मुलीला चहाच्या टपरीच्या मागे असलेल्या नाल्याकडं नेण्यात आलं तिथं शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकारानं संबंधित अल्पवयीन मुलगी व तिचे कुटुंबीय पूर्णपणे हादरुन गेलेलं आहे. आषाढी वारीसाठी सर्वत्र पोलिस बंदोबस्त असताना आणि दौंड पोलिसांची गस्त सुरू असतानाही हा घृणास्पद प्रकार घडल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञाताविरूध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात पॉक्सो व बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

परळी — तालुक्यातील सिरसाळा येथील शेत जमिनीकडे जाणारा रस्ता खुला करून देण्यात यावा अशी मागणी करणार निवेदन देऊनही कुठलीच कारवाई झाली नाही. शेवटी संतापलेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हाणून पाडला.
ज्ञानेश्वर दहिफळे यांची सिरसाळा येथील गट नंबर 390 मध्ये शेती असून त्या शेतीकडे जाणारा रस्ता अडविण्यात आल्यामुळे ते आपल्या जमिनीवर कोणतेही शेतीकाम करू शकत नाहीत. परिणामी, जमीन पडीक पडली असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या संदर्भात दहिफळे यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज, निवेदने दिली. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दहिफळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. अखेर सोमवारी तहसील कार्यालयासमोर त्यांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

सोमवारी सकाळी ड्युटीच्या वेळी हेल्मेट नसणारा विरुद्ध कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाजवळ पोलिसांचे पथक आले होते तेव्हा परळी शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंगणे, पोलिसा अंमलदार आकाश जाधव, ट्राफिक पोलीस अंमलदार प्रल्हाद भताने या पोलिसांनी वेळेवर धाव घेत शेतकऱ्याला ताब्यात घेतले.