Home Blog Page 109

भारत बंदची हाक..! बँकिंग, टपाल आणि वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता

0

नवी दिल्ली — देशभरातील 25 कोटींपेक्षा अधिक कामगार उद्या (बुधवार 9 जुलै) केंद्र सरकारच्या श्रमविषयक धोरणांच्या विरोधात ‘भारत बंद’मध्ये सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेससह (आयटक) 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने या बंदचे आयोजन केले आहे.
या आंदोलनात बँकिंग, विमा, टपाल सेवा, कोळसा खाणी, औद्योगिक कामगार आणि परिवहन कर्मचारी सहभागी होणार असून, ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजूर संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बंदचा परिणाम देशभरातील विविध सेवा व्यवस्थांवर जाणवण्याची शक्यता आहे.

कोणत्या सेवा ठप्प, कोणत्या सुरू?

संघटनांच्या माहितीनुसार, बँकिंग, विमा आणि टपाल सेवा ठप्प राहतील, तसेच अनेक राज्यांतील सरकारी वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत होऊ शकते.
दरम्यान, शेअर बाजार आणि सराफा बाजार मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशी माहिती आहे.

मागण्या काय?

कामगार संघटनांनी केंद्र सरकारकडे 17 मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांमध्ये किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, स्थायी रोजगार, निवृत्तिवेतन, आणि कामाचे तास यासारख्या मूलभूत बाबींचा समावेश आहे.

हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंग सिद्धू यांनी सांगितले की, “सरकारने गेल्या 10 वर्षांत एकही वार्षिक श्रम संमेलन घेतले नाही. ही सरकारची कामगारांप्रती असलेली उदासीनता दाखवते.”

सरकारवर गंभीर आरोप

संयुक्त मंचाचा आरोप आहे की, सरकारने अमलात आणलेल्या चार नव्या श्रम कायद्यांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा आली आहे. या कायद्यांमुळे सामूहिक करार प्रक्रियेवर मर्यादा, संघटनांच्या कार्यक्षमतेवर बंधने, आणि संपाचा अधिकार निष्प्रभ करण्याचा प्रयत्न आहे.

संघटनांनी असेही म्हटले आहे की, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण, आउटसोर्सिंग, आणि कंत्राटी कामगार पद्धतीला प्रोत्साहन देत आहे. यामुळे कामगारांचे भविष्य अंधारात जाते आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेवर गदा येते.

आंदोलनाला शेतकरी संघटनांचा पाठिंबा

संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांच्या मंचानेही या संपाला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

संघटनांचे स्पष्ट मत आहे की, सरकारने केवळ भारतीय व विदेशी कॉर्पोरेट्सच्या हितासाठी काम केले असून, कामगार कल्याणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे हा संप म्हणजे केवळ मागण्यांचा लढा नाही, तर कामगारांच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष आहे.

आ. सुरेश धस च्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

याच अपघात स्थळी मृताचे वडील चुलत्यांचाही झाला होता अपघाती मृत्यू

बीड — आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाने सोमवारी (ता.7) कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन शेळके असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नितीन शेळके चा ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी वर्षभरापूर्वी त्यांचे वडील प्रकाश शेळके आणि काही वर्षांपूर्वी चुलते यांचाही अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.

सुपा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नगर-पुणे महामार्गा ७ जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे ही घटना घडली आहे. या अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय ३४, रा. पळवे खुर्द ता.पारनेर) यांचा मृत्यू झाला आहे. आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस हा अपघातावेळी एम.जी. ग्लॉस्टर (क्र. MH 23 BG 2929) ही कार चालवत होता. सुपा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मृत नितीन शेळके हे सह्याद्री खादी हॉटेलवरून आपल्या गावाकडे मोटारसायकलने निघाले होते. जातेगाव फाटा येथे महामार्गावर यु-टर्न घेत असताना पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. जी. ग्लॉस्टर कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात ते रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तातडीने सुपा येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारचालक सागर धस व त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राला ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. ८ जुलै रोजी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आणि पळवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत नितीन शेळके यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच ठिकाणी वर्षभरापूर्वी त्यांचे वडील प्रकाश शेळके आणि काही वर्षांपूर्वी चुलते यांचाही अपघाती मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

आ. संदीप क्षीरसागरांनी महावितरणचा मुद्दा विधानभवनात गाजवला;हायटेक कंपनीच्या चौकशीची केली मागणी

0

प्रस्ताव मंजूर होत नाही अन् झाले तर कामे लवकर होत नाहीत; हायटेक कंपनीच्या चौकशीची केली मागणी

मुंबई — बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता यासह नागरीकांच्या दैनंदिन अडचणींवर लक्ष केंद्रित केले आहे. अनेकवेळा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन ही काहीच फरक पडत नसल्याने, सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उत्तर सत्रात महावितरण कंपनीच्या गलथान कारमाराची चिरफाड केली.
               बीड शहर, बीड ग्रामीण व शिरूर कासार तालुक्यात महावितरणचा गलथान कारभार सुरू आहे. या विरोधात आज आ. संदीप क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करीत महावितरण आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या मिलिभगतवर बोट ठेवत चिरफाड केली असून, आधीच प्रस्ताव मंजूर होत नाही आणि झाले तरी काम लवकर पूर्ण होत नाही. तसेच मागील दोन वर्षांपासून आरमोड केबल चे काम पूर्ण न केलेल्या हायटेक कंपनीची चौकशी करावी अशी मागणी केली. आ.क्षीरसागर म्हणाले की, महावितरणचे कोणतेही काम असले की, प्रथम आरडीएसएस योजनेचे नाव पुढे केले जाते. या योजनेतून एखादे काम करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला तरी त्यास लवकर मंजुरी मिळत नाही. मंजुरी मिळाली तर ते काम लवकर होत नाही. माझ्या शहरात १५ सप्टेंबर २०२३ पासून मंजूर असलेले आरमोड के बल टाकण्याचे काम सुरु आहे. दोन वर्ष झाली हे कामच पूर्ण होत नाही. हे काम हायटेक कंपनीकडून करण्यात येत आहे. हा गैरप्रकार महावितरण आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे. यासोबतच बीड तालुक्यातील पाली येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्र मंजूर आहे. परंतु याचे काम सुरू नाही. तसेच ११ के.व्ही. लाईन बदलणे, तसेच जीर्ण तारा बदलणे, पोल शिफ्टिंग अशी कामे कधी होणार आहेत? आणि दोन वर्षांपासून केबल टाकण्याचे काम संथगतीने करणाऱ्या हायटेक कंपनीची चौकशी करणार का? असे प्रश्न आ. क्षीरसागर यांनी सभागृहात उपस्थित केले.

नराधम शिक्षक विजय पवार वर बाललैंगिक अत्याचारासह ॲट्रॉसिटी चा दुसरा गुन्हा दाखल

0

बीड — उमाकिरण लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच बाललैंगिक अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पालक व विद्यार्थ्यांनी पुढे येऊन गुन्हा नोंद करावा असे आवाहन केले होते. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवार व प्रशांत खटोकर या दोघांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शनिवारी भेट घेत पीडितेची व पालकांशी चर्चा केली. 2023 मध्ये विजय पवार विरोधात जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे बाललैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. मात्र या प्रकरणात काहीच कारवाई झाली नव्हती. या प्रकरणात चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना चाकणकर यांनी दिल्या होत्या. दरम्यान विजय पवार विरोधात बाललैंगिक अत्याचार (पाॅक्सो अॅक्ट) तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच पवारच्या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मुलीच्या पालकांनी पुढे येत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयातील नोकऱ्यांमध्ये आता ओबीसींनाही आरक्षण लागू

0

नवी दिल्ली — सर्वोच्च न्यायालयातील नोकऱ्यांमध्ये केवळ एससी-एसटीच नाही तर ओबीसी-दिव्यांग जनांनाही आरक्षण मिळणार आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच कर्मचारी नियुक्त्यांमध्ये इतर मागासवर्गीय ( ओबीसी ) प्रवर्गासाठी आरक्षण लागू केले आहे.
त्याच प्रमाणे शारीरिकदृष्ट्या अपंग, माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या आश्रितांसाठी देखील आरक्षण देण्यात आले. याआधी सर्वोच्च न्यायालयात असे कोणतेही आरक्षण नव्हते.
दरम्यान, न्यायालयात कर्मचारी नियुक्त्यांमध्येअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(एससी/एसटी)साठी आरक्षण लागू करण्याचा अलीकडेच घेण्यात आला होता. त्यानंतर आता ओबीसी आरक्षणदेखील लागू करण्यात आले आहे. तब्बल ६४ वर्षांनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून आता सर्वोच्च न्यायालय कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये ओबीसी, एससी, एसटी, दिव्यांगजन, माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.महत्त्वाचे म्हणजे, सरन्यायाधीशांनी एक खूप मोठा व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सर्वोच्च न्यायालय त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भरतीत एससी/एसटी व्यतिरिक्त ओबीसी, दिव्यांग जन, माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना आरक्षणाचा लाभ देणार आहे. सर्वोच्च न्यायालयातही समाजातील सर्व घटकातील लोकांना नोकरीत समान संधी मिळावी यासाठी हा बदल करण्यात आला आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

नवीन निर्णय काय आहे?

हा निर्णय मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक(सेवेच्या अटी आणि आचारसंहिता) नियम, १९६१ च्या नियम ४अ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. राज्यघटनेच्याकलम १४६(२) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयस्वतःचकर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नियम ठरविते. आता या सर्व राखीव वर्गांना केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आरक्षणानुसार लाभ मिळणार आहे.

सावकार डॉ. लक्ष्मण जाधव च्या त्रासाला कंटाळून कपडा व्यापाऱ्याची आत्महत्या

0

बीड — भाजप पदाधिकारी डॉ.लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी यांच्या सावकारकीतून झालेल्या त्रासाला कंटाळून 42 वर्षीय कपडा व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


राम दिलीप फटाले वय 42 वर्ष.रा काळा हनुमान ठाणा बीड असं आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. राम फटाले हे कपड्याचा व्यापार करत होते आठवडी बाजारात ते दुकान लावून कपडे विक्री करायचे. कपडा व्यवसायासाठी त्यांनी डॉ. लक्ष्मण जाधव या सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम व्याजासह देऊन देखील जाधव पती-पत्नीकडून मानसिक त्रास देत शिवीगाळ केली जात होती. सावकाराने फटाले यांच्याकडून चेक घेतला होता. पैसे परत देऊनही आणखी पैशाची मागणी करत चेक परत देण्यास इन्कार केला जात होता. याबरोबरच त्यांनी काही पतसंस्थांकडून देखील कर्ज घेतलेले होते. कोरोना नंतर कपडा विक्रीत घट झाली धंदा बसला खर्च वाढला. त्यामुळे व्याजही वाढत गेले जानेवारी महिन्यामध्ये सावकाराच्या रकमेची परतफेड देखील केली. शनिवारी रात्री फोनवरून सावकाराने शिवीगाळ केली. पहाटे पाच च्या सुमारास राम फटाले यांची पत्नी सुलभा झोपेतून उठली. तोपर्यंत राम यांनी पंख्याला दोरी बांधून लटकल्याचे दिसले. त्यांनी मृत्यूपूर्वी सावकार डॉ. लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सात पानी चिठ्ठी लिहून ठेवली.डाॅ. लक्ष्मण जाधव हा भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास चव्हाण करत आहे.

महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

0

मुंबई — महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र राहणार आहोत. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही एकत्र असणार आहोत.’, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मराठी भाषा विजय दिवस साजरा केला. यानिमित्ताने २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर राज ठाकरेंनी यावेळी भाषण करताना थेट सरकारवर जोरदार टीका केली.तसंच, ‘हिंदी भाषा बोलणारी राज्यच आर्थिकदृष्या मागास आहेत. ज्या राज्यांना आर्थिक विकास करता आला नाही आणि आम्ही त्यांची हिंदी भाषा शिकायची का? हिंदी भाषासाठी वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही चांगलीच असते. एक भाषा उभी करायला खूप मेहनत असते. अशाच भाषा उभ्या राहत नाहीत. हा भाषेचा मुद्दा कुठून आला. या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे मराठ्यांनी राज्य केले. इतक्या प्रदेशावर आम्ही राज्य केले तर आम्ही मराठी लादली का? मराठा साम्राज्य सगळीकडे पसरले होते तेव्हा आम्ही मराठी लादली का? महाराजांच्या काळात हिंदी भाषा नव्हती ती २०० वर्षापू्र्वी आली.’, असा इतिहास सांगत राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकले यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यावर आता राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. ‘आम्ही मराठी माध्यमात शिकलो. आमची मुलं इंग्रजीत शिकले. तर आम्हाला विचारचात हे इंग्रजी मिडियम मध्ये शिकतात. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजीबद्दल शिकले होते. त्या दोघांबदद्ल तुम्ही शंका घेऊ शकता का? लालकृष्ण आडवाणी क्रॉन्वेंट स्कूलमध्ये शिकले होते. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? दक्षिण भारतात बघा तमिळ, तेलगूच्या प्रश्नांवर सर्व एकत्र उभे राहतात. उद्या मी हिब्रू भाषेत शिकेल. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तुमचा कडवटपणा तुम्ही कुठून शिक्षण घेतेले यामध्ये नसतो. बाळासाहेब ठाकरेंनी मराठीच्या अभिमानाबद्दल तडजोड नाही केली. म्हणे एक भाषा सर्वांना बांधून ठेवते. आजपर्यंत काय वाकडे झाले?’, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला.
सरकार पुढे काय राजकारण करणार याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘यांचं पुढचं राजकारण म्हणजे पुन्हा जातीत विभागायला सुरूवात करतील. पुन्हा जातीत तुम्हाला विभागतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही.’ यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना असे देखील सांगितले की, ‘विनाकारण कुणाला मारायची गरज नाही. पण जास्त नाटकी केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची पाहिजे. असं कोणतीही गोष्ट कराल त्याचे व्हिडीओ काढू नका. आपले आपल्यामध्येच त्यांना कळाले पाहिजे. मारणारा कधी सांगत नाही तर मार खाणारा सांगत असतो मला मारलं. याचा अर्थ उटसूट कुणाला मारायचे नाही.’

जि.प. तांदळवाडी घाट व तांदळेश्वर विद्यालयांमध्ये अवतरली पंढरी

0

चौसाळा — आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळवाडी घाट व तांदळेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून दिंडी काढण्यात आली.

जिल्हा परिषद तांदळवाडी घाटच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली विठ्ठल रुक्मिणीची भूमिका खास आकर्षण ठरली व प्रत्येक दारात या विठू रुखमायीची पूजा करण्यात आली,व ग्रामस्थांनी या दिंडीचे स्वागत आपल्या दारात सडा रांगोळी ने केले,पालखी मध्ये विठ्ठल रुखमाई ची मूर्ती, विद्यार्थ्यांची वारकऱ्यांची वेशभूषा यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

गावकऱ्यांनी महिला भगिनींनी मोठ्या उल्हासात दिंडीमध्ये सहभाग घेत फुगडी, गवळण,अभंग,भजन करत यामध्ये मंत्रमुग्ध झाले..दिंडीची सांगता विठ्ठल मंदिरात झाली.. दिंडी साठी विशेष सहकार्य शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.प्रशांत खोसे यांचे लाभले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसादाची व्यवस्था शिक्षण प्रेमी श्री.अनिल विक्रम खोसे ,श्री.समाधान भैरू खोसे,श्री.शहादेव लक्ष्मण खोसे, यांच्यातर्फे करण्यात आली.. याप्रसंगी श्री.गोरख जगताप,श्री.आनंद खोसे व प्रचंड संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनीनी हिरीरीने सहभाग नोंदवला..
तांदळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.श्यामजी डाके सर व जि.प.प्रा.शाळा,तांदळवाडी घाट शाळेचे मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण क्षीरसागर सर यांनी सर्वांचे आभार मानले..

लैंगिक अत्याचार प्रकरणी विजय पवार व खटोकर ला न्यायालयीन कोठडी

0

बीड — कोचिंग क्लासेस मधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खटोकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.दोन्ही आरोपींना आज न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते.
लैंगिक छळ प्रकरणात या दोघांना यापूर्वी दोन दिवसांची आणि त्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी
आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी 30 जणांचे जबाब नोंदवले असून पीडितेच्या मैत्रिणी, कुटुंबीय, क्लासमधील काही जणांचा समावेश आहे. पोलिसांनी खाटोकरची दुचाकी जप्त केली असून दोघांचे मोबाइल, टॅब, लॅपटॉपही जप्त केले आहेत. तर क्लासमध्ये 40 सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यांचे डीव्हीआर जप्त केले आहेत. पोलिसांनी या घटनेतील लॅपटॉप, मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले आहे. तसेच 30 पेक्षा अधिक जणांचे जबाब देखील नोंदवले आहेत. आज प्रशांत खाटोकर व विजय पवार यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील तपासासाठी पोलिसांकडून पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू आहे.

आ.संदीप क्षीरसागरांच्या पुढाकारातून मिळणार निराधारांना आधार

0

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे नवीन ३७८ प्रस्ताव मंजूर

बीड — बीड ग्रामीण व शहरी भागातील ३७८ निराधार, दुर्बल‌ लोकांचे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत प्रस्ताव मंजूर झाले असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नातून निराधारांना आधार मिळणार आहे.
पात्र वयोवृद्ध निराधार, अपंग, विधवा, परिक्तत्या, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या समाजातील दुर्बल घटकांना शासनाकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते. बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील नागरिकांच्या, या योजनांच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करून निकषपात्र नागरिकांना लाभ देण्याचे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले होते. त्यावर प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करत २९ मे २०२५ च्या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत शहरी भागातील ४५ तर ग्रामीण भागातील ६२ नागरिकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत शहरी भागातील ४६ तर ग्रामीण भागातील २२५ नागरिकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत‌. दरम्यान काही अर्ज त्रुटीत असून त्याच्या पुर्ततेसाठी तहसील कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहनही आ.क्षीरसागर यांनी केले आहे.