Home Blog Page 109

5 वी आणि 8 वी तील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द

0

नवी दिल्ली — केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आता पाचवी आणि आठवीच्या वर्गातही मुलांना नापास केलं जाऊ शकतं. इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल.

त्यातही ते नापास झाले तर नापास होतील आणि पुन्हा त्याच वर्गात शिकावे लागेल.

आत्तापर्यंत मुलांना आठवीपर्यंत नापास करण्याची तरतूद होती. 2010-11 पासून इयत्ता 8 वी पर्यंतच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याच्या तरतुदीवर बंदी घालण्यात आली होती. म्हणजे मुले नापास होऊनही त्यांना पुढच्या वर्गात बढती मिळाली. मात्र शिक्षणाचा स्तर हळूहळू घसरत गेल्याचे दिसून आले, त्याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांवर होऊ लागला. या विषयावर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर नियमात बदल करण्यात आला.

नापास मुलांकडे विशेष लक्ष देण्यात येणार

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. जर एखादा विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याला 2 महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी मिळेल, मात्र त्यातही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात पदोन्नती दिली जाणार नाही, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र या काळात पुन्हा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्याकडे शिक्षक विशेष लक्ष देतील आणि पालकांना वेळोवेळी मार्गदर्शनही करतील.

काय होती नो डिटेन्शन पॉलिसी?

नो डिटेन्शन पॉलिसी ही शिक्षण हक्क कायदा 2009 चे महत्त्वाचे धोरण होते. या धोरणांतर्गत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या मुलांना वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले नाही. या धोरणांतर्गत पारंपारिक परीक्षांना सामोरे न जाता सर्व विद्यार्थ्यांना आपोआप पुढील वर्गात बढती देण्यात आली. या धोरणात मुलांचे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन करण्यावर भर देण्यात आला होता.

भय इथले संपत नाही…! पिंपळनेर हद्दीत शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला दुचाकी जाळली , पोलिसांचा धाक संपला

0

एस पी. कांवत समोर नव “नीत” आव्हानं

पिंपळनेर — शेतात राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण करत मोटार सायकल जाळून टाकल्याची घटना पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील लिंबारूई देवी येथे रविवारी रात्री घडली.

मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं जगन्नाथ ज्ञानोबा नांदे वय 57 वर्ष असं नाव आहे. पिंपळनेर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे दरम्यान शेतकरी दि.22 रोजी वार राञी 8 वाजण्याच्या सुमारास ‌शेतात गहू ,हरभरा , भुईमूग पिकासाठी पाणी देणे, वन्यप्राण्यांपासून बचाव करण्यासाठी पिकांची राखन करण्यासाठी शेतातच बाज टाकून शेतात बाजावर बसलेले असताना अचानक अज्ञात दोन तीन व्यक्ती आले आणि काठी ने बेदम मारहाण करून प्राणघातक हल्ला चढवला आणी बेशुद्ध होई पर्यंत मारहाण करण्यात आली तसेच रस्त्यावर लावण्यात आलेली मोटार सायकल MH 13BW3293मोटार सायकल जाळली असल्याची माहिती मारहाण झालेल्या शेतकरी नांदे यांचे बंधू भास्कर नांदे यांनी दिली आहे. सदरील घटना गंभीर असल्याने शेतकऱ्यांना शेतात बेदम मारहाण झाल्यामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे मारहाण करणाऱ्यांना आरोपींना तात्काळ शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

सरपंच देशमुख हत्याप्रकरणी न्याय झालाच पाहिजे, आता शनिवारी भव्य मोर्चा !

0

बीड — स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्म्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा निघणार आहे.

स्व.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांना स्व.संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली.

बीड जिल्ह्यातील आपल्या बांधवाला न्याय देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी, दहशत व जातीयवाद मोडीत काढण्यासाठी या बैठकीत अनेक मत सर्व उपस्थितांनी मांडले.

स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करायला हवे असे मत या बैठकीत मांडले.

यावेळी उपस्थित सर्वांनी एकमताने दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीड मध्ये भव्य मोर्चा काढावा असे ठरवले गेले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार आहे.

खाते वाटपानंतर 11 जिल्ह्यात पालक मंत्री पदासाठी रस्सीखेच

0

बीड — राज्यातील नवनिर्वाचित मंत्र्यांना नुकतंच खातेवाटप करण्यात आलं असून आता राज्यात पालकमंत्री पदावरूनही रस्सीखेच पाहायला मिळत आहे. बीड सह 11 जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे.

या जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच

1. पुणे ▶️ अजित पवार, चंद्रकांत पाटील

2. ठाणे ▶️ एकनाथ शिंदे, गणेश नाईक, प्रताप सरनाईक

3. सातारा ▶️ शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील

4. छ. संभाजीनगर ▶️ अतुल सावे संजय शिरसाट
5. यवतमाळ ▶️ संजय राठोड, अशोक उईके, इंद्रनील नाईक
6.
नाशिक ▶️ माणिकराव कोकाटे, दादा भुसे, नरहरी झिरवाळ

7. जळगाव ▶️ गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, संजय सावकारे
8. बीड ▶️ धनंजय मुंडे, पंकजा मुंडे

9. रायगड ▶️ भरत गोगावले, अदिती तटकरे

10. कोल्हापूर ▶️ हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर

11. रत्नागिरी उदय सामंत, योगेश कदम

बसची दुचाकीला धडक; जिल्हा परिषद शिक्षकाचा मृत्यू

0

गेवराई — भरधाव एसटी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 45 वर्षीय जि.प. शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीसह शिक्षकाला बसने जवळपास दोनशे फूट फरफटत नेले होते. ही घटना गेवराई-शेवगाव रस्त्यावरील महारटाकळी येथे रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.

फय्याज खान वय 45 रा.महारटाकळी ता.गेवराई असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. फय्याज खान हे तालुक्यातीलच अर्धपिंपरी याठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. ते आपल्या गावालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर रोज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात होते. दरम्यान रविवारी क्रिकेट खेळून फय्याज खान हे सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घराकडे परतत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या माजलगाव-पुणे या बस क्र. एम.एच.13 सी.यू.7836 ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात ऐवढा भिषण होता की, अपघातानंतर बसने दुचाकीसह फय्याज खान यांना जवळपास दोनशे फुट फरफटत नेले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात फय्याज खान या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चकलांबा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करुन फय्याज खान यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला होता.

जनतेच्या सुरक्षेसाठी 24 तास तयार; कायद्याची घडी बसवणार– एस.पी. कांवत

0

बीड — आयपीएस नवनीत कॉंवत यांनी शनिवारी रात्री पावणे आकरा वाजता पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारून कामाला सुरूवात केली आहे. रविवारी सकाळी त्यांनी पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेवून जिल्ह्याचा आढावा घेत त्यांना अनेक सुचनाही केल्या आहेत. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भुमिका प्रसार माध्यमां समोर मांडली. जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी 24 तास तत्पर राहणार असून प्रत्येकाला सुरक्षीत वाटले पाहिजे असेच काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखविले आहे. त्याअनुषंगाने ते उद्या जिल्ह्यातील ठाणेदारांची बैठक घेवून त्यांनाही पुढील कामासंदर्भात अनेक सुचना देणार आहेत.

नवनीत कॉंवत यांनी यापुर्वी लोणावळा येथे डीवायएसपी, धाराशिव येथे अप्पर पोलिस अधीक्षक तर छ.संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावलेले आहे. पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची बीड जिल्ह्यातील ही पहिलीच पोस्टींग आहे. त्यानुसार त्यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारून कामाला प्रत्यक्ष सुरवात केली आहे. रविवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भुमिका स्पष्ट केली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी 24 तास तत्पर राहणार असून जिल्ह्यातील प्रत्येकाला सुरक्षीत वाटले पाहिजे असेच काम करणार असल्याचा विश्‍वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला आहे. तसेच कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे सर्वांनी नियमाचे, कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. कायदा मोडणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही, संरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमधील फरार आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल, विशेष म्हणजे याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, आरोपींना कडक शिक्षा होईल त्याअनुषंगाने पुरावे गोळा केले जातील, असाही विश्‍वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला आहे. याअनुषंगानेच त्यांनी रविवारी सकाळी पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून बीड जिल्ह्याचा आढावा घेत त्यांना सुचना केल्या आहेत. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी विश्‍वाभंर गोल्डे, उमेश कस्तूरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख, शितलकुमार बल्लाळ, मारूती खेडकर, शिवाजी बंटेवाड, अशोक मोदीराज, श्री. गात, डीएसबीचे कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती. तर उद्या एसपी बीड जिल्ह्यातील ठाणेदारांची बैठक घेवून त्यांना चोख कर्तव्य बजावण्याच्या सुचना करणार आहेत.

बीड जिल्ह्यात अनेक जण खोटे गुन्हे दाखल करून गोरगरिबांना त्रास देण्याचे काम करत आहेत. अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांवरही पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांची करडी नजर राहणार आहे.

निराधारांना मिळणार संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचा लाभ

0

आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश

बीड— बीड तालुक्यातील अनेक निराधारांना संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून आधार मिळणार आहे.‌ गेल्या अनेक दिवसांपासून या योजनांच्या रखडलेल्या मंजुरी अखेर झाल्या असून नवीन लाभार्थ्यांची यादी तयार झाली. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासकीय स्तरावर अनेकवेळा पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे.

निराधार वयोवृद्ध नागरिक यांना निर्वाहासाठी निधी देणारी श्रावणबाळ योजना तसेच निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, दिर्घ आजार, घटस्फोटीत स्त्रिया इत्यादी दुर्बल घटकांना आर्थिक मदत पुरवणारी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि अशाप्रकारच्या इतर योजनांच्या समितीची गेल्या अनेक दिवसांपासून बैठक झाली नव्हती, त्यामुळे गोरगरीब आणि गरजू या योजनांच्या लाभापासून वंचित होते. बर्‍याच दिवसांपासून प्रस्ताव आणि अर्ज दाखल करून देखील लोकांंना लाभासाठी प्रतिक्षा करावी लागत होती. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासकीय स्तरावर अनेकवेळा पाठपुरावा करून, बैठका घेऊन संबंधित यंत्रणा व योजना समितीच्या बैठका घेऊन नवीन पात्र लाभार्थी यादीत समाविष्ट करून पात्र आणि गरजूंना लाभ देण्यासाठी निर्देशीत केले होते. यावर आता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत बीड तालुक्यातील ग्रामीण भागातून असलेल्या १२९ व शहरातील ९७ नवीन लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच संजय गांधी निराधार पेन्शन योजनेंतर्गत शहरातील ७६ व ग्रामीण भागातील ११२ पात्र आणि गरजू लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली सदरील योजनांची बैठक होऊन नवीन लाभार्थींचा योजनेच्या यादीत सामावेश केला गेला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून वंचित असलेल्या गोरगरीब, निराधार, दुर्बल घटकांना आ.संदीप क्षीरसागरांच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान ज्या लाभार्थ्यांचे अर्ज त्रुटीत पडले आहेत, त्यांनी लवकरात लवकर त्रुटीपूर्तता करावी असे आवाहनही आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

स्व.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी सर्व पक्ष, समाज आणि संघटना एकत्र येणार; सोमवारी सामूहिक बैठक

0

बीड — केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची अमानवीय पध्दतीने निघृण हत्त्या केल्याच्या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी सर्व पक्ष, समाज व संघटना आणि एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी (दि.२३) रोजी बीड शहरातील आशिर्वाद लॉन्स येथे सकाळी १० वा. सामूहिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मस्साजोग येथील सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अतिशय निघृणपणे स्व.देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल १४ दिवस उलटूनही स्व.देशमुख यांचे मारेकरी आणि या प्रकरणाचा सुत्रधार अद्याप मोकाट आहेत. इतके गंभीर प्रकरण असताना प्रशासनाकडून आरोपींच्या अटकेत चालढकल केली जाते आहे. आरोपी हे सत्तेच्या राजाश्रयात असल्याने त्यांना अटक केली जात नाही.‌ सत्तेचा इतका दुरूपयोग जनसामान्यांना घातक ठरत चालला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आणि सर्व विचारांचे लोक एकत्र येऊन सर्वसमावेशक आंदोलन उभे करणार आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित केलेल्या सामूहिक बैठकीला सर्व पक्ष, संघटना आणि सर्वच विचारांच्या लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या अब्रूचे अविनाशी धिंडवडे निघाल्याने एस पी ‘बार’ गळले; नव “नीत” आव्हानांचा काॅंवत यांच्यापुढे डोंगर

0

बीड — मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे लोकसभेसह विधानसभेत निघाल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यांच्या जागी आता छत्रपती संभाजी नगर येथे उपायुक्त पदी असलेले कांवत बीडचा कारभार पाहणार आहेत. हत्या, गुटखा माफिया,वाळू तस्करी, वित्तीय घोटाळे यासारख्या “नव” नीत आव्हानांचा सामना करत कायदा सुव्यवस्थेचे राज्य कावत यांना निर्माण करावे लागणार आहे.

बीड जिल्ह्याची स्थिती बिहार पेक्षा ही वाईट झाली आहे. मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये नंतर येथील कायद्या सूव्यवस्थेची लक्तर लोकसभेसह विधानसभेत देखील टांगली गेली. वाळू तस्करी, खंडणी, हत्या, दरोडे, गुटखा तस्करी, पतसंस्थांच्या माध्यमातून सामान्यांच्या खिशावर पडलेले दरोडे ,गोळीबार यासारख्या प्रकरणांनी कळस गाठला आहे. दररोज कायदा सुव्यवस्थेची धिंडवडे निघत असल्याने परिस्थिती चिंताजनक व स्फोटक बनली आहे. जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ प्रकरणानंतर अपयशाचा कलंक घेऊन बाहेर पडलेले नंदकुमार ठाकूर यांच्यानंतर एस पी म्हणून आलेले अविनाश बारगळ देखील गुन्हेगारीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरले. एस पी ची पडछाया समजल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेची अवस्था तर शेळपटासारखी बनली गेली. ही यंत्रणा नेमकी जिल्ह्यात काय करत होती हा प्रश्न वादातीत बनला गेला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या हायवा वाळू तस्करीत सहभागी असल्यामुळे पोलीस ठाण्यात लावलेले वाळूचे हायवा देखील राजरोसपणे पसार करण्यात यश मिळाले. कायदा सुव्यवस्था राबवणारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडली गेली. त्याचाच परिपाक म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर व खंडणी प्रकरण उजेडात आल्यानंतर गुन्हेगारीने किती कळस गाठला आहे. हे महाराष्ट्राला कळालं. परिणामी लोकसभा विधानसभेत हा विषय संदीप क्षीरसागर,सुरेश धस, नमिता मुंदडा, विजय राजे पंडित या लोकप्रतिनिधींनी विधानसभेत तर खा. बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत लावून धरल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कायदा सुव्यवस्था राबवताना अविनाशी कलंक जिल्ह्याला लावून ते (बार) गळले. बारगळ यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त पदी कार्यरत असलेले आयपीएस नवनीत कांवत हे आले आहेत. 2017 च्या बॅचचे ते तरुण आयपीएस अधिकारी आहेत. सैनिकी शाळेत शिक्षण पूर्ण केल्यामुळे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून कांवत यांची ओळख आहे. त्यांनी आयआयटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केली असून तीन वेळेस आय ई एस, आय आर एस, आयपीएस अशी यूपीएससी उत्तीर्ण झालेले आहेत.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढून डागाळलेली खाकी स्वच्छ करण्यासह कायदा सुव्यवस्थेच राज्य असल्याची खात्री जनतेला पटवून देण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. जनतेच्या अपेक्षा ते पूर्ण करतील अशी इच्छा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

पिकांचे गुणधर्म ओळखुन शेतकऱ्यांनी पिकाची लागवड करावी – जगदीश खोकड

0

हिंगणी येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, मर्या. अकोला, (महाबीज) कंपनीचे बीज प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न
चौसाळा — बीड तालुक्यातील हिंगणी (बु.) येथे महाबीज जिल्हा कार्यालय बीड यांच्या कडून “महाबीज” तूर वाण  “गोदावरी” “या पिकाचे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम मंगळवार  दि.17 डिसेंबर रोजी सकाळी हिंगणी ( बु.) येथे चौसाळा – नांदूरघाट रस्त्यावर प्रकाश कुलकर्णी यांच्या शेतात आयोजित करण्यात आला होता.


यावेळी महाबीज कंपनीचे विभागीय व्यवस्थापक जगदीश खोकड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेती क्षेत्रात सतत होणारे बदल आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा होणारा वापर तसेच वातावरणीय बदल, महाबीज कंपनी कडून घेण्यात येणारे बीजोत्पादन याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा वापर, महाजैविकचा वापर सविस्तर पणे सांगितला. शेतकऱ्यांनी विविध पीक पद्धतींचा वापर करून स्वतः च्या शेतात पिकणाऱ्या पिकांची मार्केटिंग आदी विषयी माहिती दिली. तसेच विविध पीक पद्धती, पिकांत हवामानानुसार होणारे बदल आणि पिकांचे गुणधर्म ओळखून शेतकऱ्यांनी पिकाची लागवड कशी करावी या विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.


जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतीमध्ये होणारे नवनवीन बदल तसेच कृषी विभागाच्या योजना आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर पाणी फौंडेशन चे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी गट शेती, सेंद्रिय शेती आदी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच गट शेती व सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रगतशील शेतकरी दत्ता जाधव, श्रीकांत कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, सेवानिवृत्त कृषी अधिकारी पी. जी. कुलकर्णी आदींनी आपले अनुभव शेतकऱ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा व्यवस्थापक महाबीज बीड चे अजय फुलझेले यांनी केले. सूत्रसंचलन सचिन धस यांनी केले तर आभार उपसरपंच अंकुश गोरे यांनी मानले. यावेळी पाणी फौंडेशनचे तालुका समन्वयक शिवलेश्वर मेदने, प्रवीण काठवटे, सागर गोरे, विशाल करंडे, विशाल घोलप, कृषी पत्रकार विठ्ठल घरत, महाबीजचे डीलर योगेश मंत्री व श्री कोटेचा, परिसरातील शेतकरी उपसरपंच अंकुश गोरे, सुधाकर गुंजाळ, रामुकाका, चंदन नाईकवाडे, संजय गुंजाळ, रविंद्र चव्हाण, वामन मुंडे, सौरभ निनाळे, खंडाळा येथील शेतकरी गटाच्या महिला आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन महाबीज कंपनी बीड कृषी क्षेत्र अधिकारी, (विपनन) सचिन धस व कृषी क्षेत्र अधिकारी, (उत्पादन) अविनाश केदार यांनी विशेष परिश्रम घेऊन केले होते.