Home Blog Page 104

इथेनॉल उत्पादन;आता शेतकऱ्यांच्या उसाला मिळेल चांगला दर?

0

पुणे — इथेनॉल उत्पादन करून देशातील सहकारी साखर कारखाने किमान ९ महिने सुरू ठेवण्यासाठी आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्यात येणार आहे.

त्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने ८ टक्के व्याज दराने मुदत कर्ज देण्याचे मान्य केले आहे, तर केंद्र सरकार यात व्याजदराचा निम्मा भार उचलणार असून, कारखान्यांना हे कर्ज केवळ ४ टक्के दरानेच मिळणार आहे.
याचा फायदा राज्यातील ३५ कारखान्यांना, तर देशातील एकूण ६३ कारखान्यांना होणार आहे. कर्जाबाबतचा आदेश येत्या आठवडाभरात निघणार असून साखर हंगाम संपल्यानंतर लागलीच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

इथेनॉल उत्पादनाला अधिक चालना मिळण्यासाठी कोणती पाऊले उचलावीत यावर विचार करण्यासाठी देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणारे अधिकारी व तज्ज्ञांची पुण्यात शुक्रवारी बैठक झाली.

महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य साखर संघांचे व्यवस्थापकीय संचालक, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, केंद्रीय सहकार विभागाचे संचालक डी. के. वर्मा, एनसीडीसीचे संचालक गिरिराज अग्निहोत्री, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार उपस्थित होते.
सहकारी साखर महासंघाचा पुढाकार
● सहकार क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्रीय सहकार विभागाने आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन केल्यास हे प्रकल्प वर्षभर चालतील आणि त्यातून कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असा होरा आहे.
● आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधार करण्यासाठी कारखान्यांना अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने पुढाकार घेतला. त्याला केंद्र सरकारकडून प्रतिसादही मिळाला आहे. त्यानुसार राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने ८ टक्के दराने मुदत कर्ज देण्याचे मान्य केले आहे, तर केंद्र सरकारनेही व्याजातील निम्मा भार उचलण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार हा व्याजदर केवळ ४ टक्के राहील.
● याबाबतचा आदेश येत्या आठवडाभरात निघेल, अशी माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.या निर्णयाचा फायदा देशातील एकूण ६३ सहकारी कारखान्यांना होणार असून यात राज्यातील ३५ कारखान्यांचा समावेश असल्याची माहिती नाईकनवरे यांनी दिली.

दीर्घ मुदतीचे करार
● सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम साधारणपणे एप्रिलमध्ये संपतो. त्यानंतर इथेनॉलचे उत्पादन चालू ठेवायचे असेल तर ते धान्यावर चालते.
● इथेनॉल उत्पादन किमान ९ महिने करता येण्यासारखे आहे आणि त्याचा आर्थिक फायदा कारखान्यांना होऊ शकेल. सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या सध्याच्या आसवनी प्रकल्पांचे मल्टिफिडमध्ये रूपांतर केल्यास इथेनॉल उत्पादनाला गती येईल.
● ऑइल मार्केटिंग कंपन्या याबाबत साखर कारखान्यांशी दीर्घ मुदतीचे करार करण्याबाबत अनुकूल आहेत. तसेच इथेनॉलची खरेदी सहकारी
आसवनींकडून प्राधान्याने करण्याचे आदेशही जारी झाले आहेत.

दिनेश वाघमारे राज्याचे नवे निवडणूक आयुक्त

0

मुंबई –राज्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनेश वाघमारे यांचे नाव राज्यपालांकडे पाठविले होते.

ते नाव अंतिम करण्यात आल्यानंतर सरकारने नियुक्तीची अधिसूचना काढली आहे. ते सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव होते.

राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान हे सप्टेंबरमध्ये निवृत्त झालेले आहे. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. नव्या आयुक्तांची निवड गेल्या काही महिन्यांपासून रखडली होती. आयुक्तपदासाठी माजी मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे(बीपीटी) माजी अध्यक्ष राजीव जलोटा, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह डझनभर सनदी अधिकारी इच्छुक होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील महानगर पालिकांवर, जिल्हा परिषदांवर प्रशासकराज आहे. या निवडणुकी येत्या दोन ते तीन महिन्यात होऊ शकतात. त्यामुळे या निवडणुका पार पाडण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

प्रशासनातील 26 वर्षाचा अनुभव
दिनेश वाघमारे हे 1994 च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. ते सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत. वाघमारे यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील २६ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (व्हीएनआयटी) केले आहे. ते आयआयटी खरगपूरचे एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) इंजिनिअर आहेत. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून एमएसस्सी केलेली आहे.

आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली नगरपालिकेची आढावा बैठक

0

बीड शहरातील नागरी प्रश्नांबाबत दिले निर्देश

बीड — शहरातील मुलभूत नागरी प्रश्नांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर‌ यांनी सोमवारी (दि.२०) रोजी नगर पालिकेची आढावा बैठक घेतली. स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, वीज आदि मुद्यावरून आ.संदीप क्षीरसागर यांनी अधिकार्‍यांना सुनावले. प्रत्येकवेळी कोणतेही काम सांगितले तर निधी नाही असे कारण सांगणार्‍या अधिकार्‍यांनी नगर पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी काय प्रयत्न केले ? असा सवालही आ.संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला. पाणी पुरवठ्यात हयगय खपवून घेणार नाही. स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य द्या आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करा असे निर्देश यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी दिले.


बीड नगर पालिकेतील मुख्याधिकार्‍यांच्या दालनात झालेल्या बैठकीस आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, मुख्याधिकारी निता अंधारे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी नागरीकांनी देखील आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे शहरातील समस्या मांडल्या. आ.संदीप क्षीरसागर आणि माजी आ.सय्यद सलीम यांनी नगर पालिकेच्या उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सुचना देखील यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी दिल्या. नगरपालिकेतील पाणी पुरवठा व जलनिस्सारण विभाग, बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग, अभिलेख विभाग, कर विभाग, लेखा परीक्षण विभाग, विद्युत विभाग, संगणक विभाग आदींसह नगररचना विभागाचा आढावाही आ.क्षीरसागर यांनी घेतला. यासोबतच गेल्या काही वर्षांपासून शहरातील मालमत्तांचा रिव्हीजन सर्व्हे झालेला नाही. हा सर्व्हे दर चार वर्षांनी केल्यास उत्पन्न वाढवता येईल. बीओटी तत्वावरील काही इमारती धुळखात पडलेल्या आहेत. त्या वापरात आणून त्यातूनही उत्पन्न वाढविता येऊ शकते. अशा उपाययोजना यावेळी सुचविण्यात आल्या. बीड शहरात एकाही ठिकाणी नगर पालिकेची पार्किंग नाही,त्यामुळे काही जागा ज्या पडीक आहेत, किंवा वापरात नाहीत अशा ठिकाणी व्यवसायीक गाळे आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध केल्यास त्यातूनही उत्पन्न वाढवता येईल अशा देखील सुचना यावेळी करण्यात आल्या. नाविण्यपुर्ण योजनेतून नगर पालिकेला निधी मिळावा त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी दिल्या. शहरात ठिकठिकाणी लोखंडी कचरा कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या जाग्यावरच सडून चालल्या आहेत. त्याच्या खरेदीच्या अनुषंगानेही कार्यवाही करावी, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, वीज हे मुलभूत प्रश्न तात्काळ मार्गी लावा त्यात हयगय करू नका लोकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवा अशा सक्त सुचना आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

बीड शहरातील जुन्या भाजी मंडईत नगर पालिकेने मच्छीमार्केटसाठी इमारत बांधलेली आहे. रेडिरेकनर प्रमाणे त्याचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. भाडे जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी कोणताच व्यवसायीक पुढे येत नाही त्यामुळे नाममात्र दरात तेथील गाळे व्यवसायीकांना दिल्यास नगर पालिकेचे उत्पन्न वाढू शकते अशी सुचना यावेळी अधिकार्‍यांना करण्यात आली. त्याचबरोबर जुन्या भाजी मंडईत बीओटी तत्वावरील आणखी कॉम्पलेक्स बांधता येतील का ? या दृष्टीनेही नगर पालिकेने प्रयत्न करावेत. जेणेकरून पालिकेच्या उत्पन्नात भरत पडेल अशीही चर्चा या बैठकीत करण्यात आली.

व्यायाम करणाऱ्या तीन तरुणांना बसने चिरडले; पोलीस व्हायचे स्वप्न भंगले

0

बीड — पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घोडका राजुरी जवळ आज पहाटे घडली. या दुर्दैवी घटनेत तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रस्त्यावर अक्षरशः रक्त मांसाचा सडा पडला होता.

घोडका राजुरी येथील तरुण पोलीस भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी रनिंगची प्रॅक्टिस करत होते. याच वेळी बीडहून परभणी कडे भरधाव वेगाने जाणारी बीड परभणी गाडीने या मुलांना जोराची धडक दिली. या घटनेत तिघा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जणांनी वेळीच रस्त्याच्या बाहेर असलेल्या खड्ड्यांमध्ये उडी मारून आपला जीव वाचवला. तिन्ही मयत मुलांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. यामध्ये सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे वय २० वर्ष , विराट बब्रूवान घोडके व 19 वर्ष तसेच ओम सुग्रीव घोडके वय 20 वर्ष यांचा मृत्यू झालेल्या मध्ये समावेश आहे.

बीड पोलिस दलात आडनावाने नाही तर नावानेच हाक मारावी लागणार

0

बीड — जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती बदलली असल्याने कायदा सुव्यवस्थेत समाज घटकातील तणाव उफाळून येत आहे. सामाजिक घटकांबरोबरच पोलिस दलातील सलोखा कायम ठेवण्यासाठी आणि मतभेद व मनभेद टाळण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेतला आहे.

पोलिस दलात यापुढे एकमेकांना हाक देताना आडनाव नाही तर नावाने हाक दिली जाईल. तसेच, कर्तव्यावर असताना रील्स काढण्यावरही पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी निर्बंध घातले.

अनेकदा आडनावाच्या उच्चारावरून जाती बोध होतो. हे टाळले जावे यासाठी नावानेच हाक देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक कॉवत यांनी दिल्या आहेत‌ नावाने हाक दिल्याने आपुलकी व जवळीक वाटते, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी यापुढे सगळ्या प्रकारची जबाबदारी ठाणेदारांचीच असेल. ठाण्यातील कोणावरही लाचलुचपतची कारवाई झाली, तर त्यालाही ठाणेप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल.
रील्सचे फॅडही सर्वत्र वाढले आहे. पोलिस खात्यातसुद्धा कर्मचाऱ्यांपासून अधिकारीही रील्स काढण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशांनाही नवनीत कॉवत यांनी तंबी दिली आहे. कर्मचाऱ्यांनी ऑन ड्युटी रील्स काढली तर त्याच्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

धनंजय मुंडेंचा पत्ता कट; पुणे बीड चे पालकमंत्री अजित पवार; पंकजा मुंडेकडे जालन्याची धुरा !

0

मुंबई — राज्य सरकारने आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर केले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडचे नाव आल्यामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. बीड व पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार आहेत. जालन्याचा पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे काम पाहणार आहेत.

गडचिरोली — देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

ठाणे — एकनाथ शिंदे, मा. उप मुख्यमंत्री

मुंबई शहर — एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री

पुणे — अजित पवार उप मुख्यमंत्री

बीड –अजित पवार, मा. उप मुख्यमंत्री

नागपूर — चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती– चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगर– राधाकृष्ण विखे-पाटील

वाशिम — हसन मुश्रीफ

सांगली — चंद्रकांत पाटील

नाशिक –गिरीश महाजन
पालघर — गणेश नाईक
जळगाव — गुलाबराव पाटील
यवतमाळ — संजय राठोड
मुंबई उपनगर —
एड. आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा (सह पालकमंत्री),
रत्नागिरी — उदय सामंत
धुळे — जयकुमार रावल
जालना — पंकजा मुंडे
नांदेड — अतुल सावे
चंद्रपूर — डॉ. अशोक उईके
सातारा — शंभूराज देसाई
रायगड– आदिती तटकरे
लातूर — शिवेंद्रसिंह भोसले
नंदुरबार — ऍड माणिकराव कोकाटे
सोलापूर — जयकुमार गोरे
हिंगोली — नरहरी झिरवाळ
भंडारा — संजय सावकारे
छत्रपती संभाजी नगर –संजय शिरसाट
धाराशिव — प्रताप सरनाईक
बुलढाणा — मकरंद जाधव पाटील
सिंधुदुर्ग — नितेश राणे
अकोला — आकाश फुंडकर
गोंदिया — बाबासाहेब पाटील
कोल्हापूर –प्रकाश आंबिटकर, माधुरी मिसाळ (सह पालकमंत्री)
गडचिरोली — ऍड आशिष जयस्वाल (सह पालकमंत्री)
वर्धा — डॉ. पंकज भोयर
परभणी — मेघना बोर्डीकर

महिला सरपंचाला मागितली एक लाखाची खंडणी; गुन्हा दाखल

0

अंबाजोगाई –तालुक्यातील ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाला गावातीलच उपसरपंच व अन्य दोन ग्रामपंचायत सदस्यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितली या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ममदापूर पाटोदा च्या महिला सरपंच मंगल राम मामडगे यांना तिन जणांनी एक लाख रुपये खंडणी मागितल्याची फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ममदापूर पाटोदा या गावात विकास कामाकरिता निधी आल्यानंतर वेळोवेळी हेच लोक अडथळे आणतात.
त्याचबरोबर शासकीय कार्यालयात जाऊन खोट्या तक्रारी देतात. आपल्यावर मानसिक दहशत टाकतात. असे प्रकार वारंवार होत होते. 16 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा ममदापूर येथील दुरुस्तीची कामे सुरू होती. त्याची पाहणी करण्यासाठी जात असताना वसंत सोपान शिंदे, अनिल लालासाहेब देशमुख व ज्ञानोबा श्रीमंतराव देशमुख हे शाळेजवळ आले. एकमेकांना बोलत असताना गावातील साक्षीदार दोन व्यक्ती समोर त्यांनी सरपंचांना शाळा दुरुस्तीच्या कामासाठी आलेल्या 4 लाख रुपयांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी केली. एक लाख रुपये नाही दिले तर तुम्हाला गावातील कोणतेच काम करू देणार नाही. तसेच तुमच्याविरोधात अर्ज देऊन आधीच्या माजी महिला सरपंचांनी आम्हाला पैसे न दिल्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले तशीच तुमची अवस्था करून टाकू अशी धमकी दिली.याबाबत त्याच वेळी या लोकांविरुद्ध ऑनलाइन तक्रार केली होती. त्यामुळे 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात येऊन आपण तक्रार नोंदवत असल्याचे या महिला सरपंचांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. त्यांना आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आज न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींचा समावेश आहे. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली. सरकारी वकीलांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलीय. याप्रकरणी आरोपी आता जामीनासाठी अर्ज दाखल करू शकतात.

वाल्मीक कराडच्या पोलीस कोठडीवर बीडच्या न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना न्यायालय परिसरातच जोरदार घोषणाबाजी झाली होती. दोन गट समोरासमोर आल्याने एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी सौम्य लाठीमार देखील करावा लागला.सुधीर सांगळे व सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हे माजलगाव येथील पोलीस कोठडीत आहेत, तर जयराम साठे, प्रतीक घुले व महेश केदार गेवराई पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत. न्यायालय आवारात सुनावणी वेळी होत असलेली गर्दी पाहता पोलीस प्रशासनाकडून खबरदारी देखील घेतली होती. न्या.सुरेखा पाटील यांच्या निकालानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी अर्ज करावेत– आ.संदीप क्षीरसागर

0

बीड — इंग्लिश स्कूल तसेच खाजगी शाळेत आपल्या मुलांच्या मोफत शिक्षणासाठी बीड मतदारसंघातील पालकांनी शासनाच्या आरटीई योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

शासनाच्या आरटीई योजनेंतर्गत सर्व खाजगी शाळेत एकूण जागांपैकी २५ टक्के जागा सदरील योजनेसाठी राखीव असतात. या योजनेतून प्रवेश झाल्यावर विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत मोफत शिक्षण मिळते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या आरटीई योजनेसाठी १४ जानेवारी पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २७ जानेवारी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी ३ वर्षे ते ७ वर्षांपर्यंतच्या पाल्यांना अर्ज करता येणार आहे. तरी बीड विधानसभा मतदारसंघातील बीड शहर, बीड तालुका व शिरूर कासार तालुक्यातील जास्तीत जास्त पालकांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

फवारणी पंप घोटाळा धनंजय मुंडें पुन्हा नव्या वादात;हायकोर्टाने विचारला राज्य सरकारला जाब

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोकोकाचा आरोपी वाल्मीक कराडची संबंध असल्याच्या कारणा वरूनअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. विरोधकांसह महायुतीमधील मित्रपक्षाचे नेते देखील ही मागणी करत आहेत. मागील महायुती सरकारमध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळी त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात केलेल्या बदलामुळे धनंजय मुंडेंना हाय कोर्टाने फटकारले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून वादाच्या भोवऱ्यात धनंजय मुंडे अडकत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

नागपूर खंडपीठामध्ये राजेंद्र मात्रे यांनी एक जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्यानुसार कृषी विभागाने 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती. पण 2023 मध्ये धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी या धोरणात बदल केला. त्यांनी डीबीटी योजना बंद केली. स्वतः विभागाने कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्य सरकारने 103.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निर्णयामुळे वाढीव खर्चामुळे जास्तीचे नुकसान झाल्याचा आरोप केला जात आहे.
याचिकेत म्हटल्याप्रमाणे हे धोरण बदलताच कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाला. बाजारात स्वस्त असलेले फवारणी पंप चढ्या दराने खरेदी केल्याचे दाखवले. त्यासाठी सरकारी निधीचा वारेमाप खर्च करण्यात आला. 12 मार्च 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार, बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदीसाठी 1500 रुपये प्रतिपंप या दराने 80.99 कोटी रुपयांचा निधी देण्याचे निश्चित केले. परंतु शासनाने तीन लाख तीन हजार 507 पंप हे 104 कोटी रुपयांना खरेदी केले.

याचिकेतील दाव्यानुसार, सरकारला एक पंप हा 3,425 रुपयांना मिळाला. यवतमाळ येथील एका कृषी साहित्य विक्री दुकानात हाच पंप अवघ्य 2,650 रुपयांना मिळतो. सरकार एकदाच इतकी मोठी खरेदी करत असेल तर त्यांना सवलत मिळणे अपेक्षित होते. हा पंप अजून स्वस्तात मिळाला असता, मग चढ्यादराने ही खरेदी का करण्यात आली असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. हायकोर्टाने याबाबत तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना जबाव विचारला आहे. याप्रकरणात न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असून त्यावेळी कृषी मंत्र्यांनी कोणत्या आधारावर कृषी साहित्य खरेदीचे धोरण बदलले असा सवाल कोर्टाने विचारला. तर राज्य सरकारला दोन आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.