वाळू चोरीच्या तपासासाठी अति.पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात एस.आय.टी. स्थापन करा – आ. विजयसिंह पंडित

चकलांबा पोलीस ठाण्यातील वाळूचोरीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

गेवराई — श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथील गोदावरी नदीपात्रात झालेल्या अवैध वाळू उत्खनन शासकीय खनिज संपत्तीची अवाढव्य चोरी, डिजिटल डाटा चोरी यांसह तहसिलदार सारख्या लोकसेवकांनी पदाचा गैरवापर करून शासनाची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र.१९९/२०२६ च्या तपासासाठी अति.पोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वात एस.आय.टी. स्थापन करून त्यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी प्रभारी पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करत असून नियमित पोलीस अधिक्षक रुजू झाल्यानंतर एस.आय.टी. बाबत कार्यवाही होईल असे आश्वासन प्रभारी पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके यांनी दिले.

घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणातील तरतुदीचा गैरफायदा घेऊन गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे व इतरांनी संगणमताने विनापरवाना अवैध वाळूघाट सुरु करून १०० कोटी रुपयांचे सिंडीकेट चालविल्याचा गंभीर आरोप गेवराईचे आ. विजयसिंह पंडित यांनी केला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथील नदीपात्रात अवैध मार्गाने २५,६४२ ब्रास वाळूचे अवैध उत्खनन, चोरी करून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी चकलांबा, ता.गेवराई पोलीस ठाणे येथे गु.र.नं.०१९९/२०२६ नुसार दि.१६.०६.२०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६१ (२) (अ), ३०५ (इ), ३१६ (५), ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (क), ६६ (ड), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम १५, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ मधील कलम ३ (१) नुसार १९ व्यक्तिंच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी शुक्रवार, दि.१९ जून रोजी आ. विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि प्रभारी पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके यांची भेट घेतली. गुन्ह्याची व्याप्ती, आरोपीतांच्या यादीत चकलांबा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश यांसह तहसिलदार सारख्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तिचा भविष्यात आरोपी म्हणून समावेश होण्याची शक्यता आणि गुन्ह्यात सामील असलेले माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलमे, पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलमे आदी गंभीर स्वरुपांच्या कलमांचा समावेश असल्यामुळे याचा तपास पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे देण्याची आवश्यकता असल्याची बाब आ. पंडित यांनी पोलीस अधिक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली. गुन्ह्यामध्ये प्रथमदर्शनी जरी १७,६६,२२,०९६ रुपये किमतीच्या मालमत्तेच्या चोरीचा उल्लेख असला तरी भविष्यात तपासामध्ये या सर्व बाबी सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अति.पोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष एस.आय.टी.ची स्थापना करून या गुन्ह्याचा तपास पारदर्शकपणे करावा अशी लेखी मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी केली.

या प्रकरणातील दोषी तहसिलदार यांच्या विरुध्द चौकशी समितीने शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केलेली असतानाही या बाबत कार्यवाही करण्यासाठी विलंब होत असल्याची बाब आ. पंडित यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकारी, बीड यांचेकडून आजच संदिप खोमणे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असेही आ. विजयसिंह पंडित यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles