माळशिरस (सोलापूर) : म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ घडलेल्या भीषण अपघातात १४ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळला. मृतांमध्ये महिला, पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून रांजणी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांचा एक समूह देवदर्शनासाठी गेला होता. त्यांनी सिद्धनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर घरी परतीचा प्रवास सुरू केला होता. मात्र म्हसवड-पंढरपूर मार्गावर माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाच्या हद्दीत हा टेम्पो अचानक अनियंत्रित झाला आणि थेट विहिरीत कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच तांदूळवाडी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले.विहिरीतून आतापर्यंत ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतांमध्ये ४ निष्पाप लहान मुले आणि ४ महिलांचा समावेश विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या दुर्घटनेतील मृत सर्व भाविक रांजणी गावातील असल्याचे सांगितले जात असून, काही मृत एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र मृतांची अधिकृत नावे प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून उर्वरित मृतदेह आणि वाहन बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

