बीड — शहरातील बार्शी रोड परिसरात कांबळे व टिके परिवाराच्या झालेल्या विवाह सोहळ्यात करण्यात आलेल्या धोकादायक फटाकेबाजीमुळे मोठी दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत फोटोग्राफर गंभीररीत्या भाजले गेले असून त्यांचे लाखो रुपयांचे व्यावसायिक साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. या प्रकरणी संबंधित आयोजक, इव्हेंट व्यवस्थापक आणि फटाके उडवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमेश्वर मंदिर परिसरामागील आशीर्वाद मंगल कार्यालयात २८ एप्रिल २०२६ रोजी विवाह सोहळा पार पडत होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मात्र, ही फटाकेबाजी कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजनांशिवाय आणि नियमांचे पालन न करता करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत फोटोग्राफर अभिषेक गोरख कदम हे गंभीररीत्या भाजले गेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. दुर्घटनेदरम्यान त्यांचे अंदाजे ५ ते ६ लाख रुपये किमतीचे कॅमेरे, लेन्स आणि इतर महागडे उपकरणे जळून नष्ट झाली. तसेच काही अन्य फोटोग्राफर आणि कॅमेरा ऑपरेटर किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रारदारांच्या मते, लोकवस्तीच्या भागात अग्निसुरक्षेची कोणतीही प्रभावी व्यवस्था नव्हती. तसेच आवश्यक परवानग्या, प्रशिक्षित कर्मचारी किंवा सुरक्षेचे निकष पाळले गेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यास उपस्थित महिला, लहान मुले, नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला होता.
विशेष म्हणजे, जखमी फोटोग्राफर अभिषेक कदम यांच्या स्वतःच्या विवाहाला अवघे काही दिवस बाकी असताना ही दुर्घटना घडल्याने त्यांच्या कुटुंबावर मानसिक आणि आर्थिक संकट कोसळले आहे.
दरम्यान, संबंधित मंगल कार्यालयात विनापरवाना मद्यसाठा असल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित पोलीस ठाण्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून आयोजक, फायरवर्क व्यावसायिक आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच जखमींना नुकसानभरपाई मिळावी, नुकसानीचा अधिकृत पंचनामा करण्यात यावा आणि भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी मंगल कार्यालयांमधील धोकादायक फटाकेबाजीवर कठोर नियम लागू करावेत, अशी मागणी अभिषेक कदम चे वडील गोरख कदम यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.




