बीड — महाराष्ट्र त्यातल्या त्यात बीड “दीन” किती झालेला आहे हे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्र्यांना दाखवलेच पाहिजे.बीडचा नावलौकिक स्वतःला कर्तव्यदक्ष म्हणवून घेणाऱ्या एस पीं च्या यंत्रणेने वाढवायचा नाही तर मग उपयोग काय? एस पी साहेब..!अडीच महिन्यापासून चौसाळा शेजारील गावातील 14 वर्षाची मुलगी फूस लावून पळवली गुन्हा नोंद झाला. तुमच्या शिलेदारांनी आरोपी पाठीशी घातला हतबल झालेल्या मुलीच्या पालकाला मुलगी मिळावी न्याय मिळावा यासाठी पालकमंत्र्यांच्या गाडीवर नासके टमाटे फेकण्याचा इशारा द्यावा लागला. बीडची कायदा सुव्यवस्था किती दीन अन् लाचार झाली आहे खरंच ही अभिमानाची गोष्ट ठरणार आहे?

महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री तथा बीडची पालकमंत्री महिलाच आहे. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण देखील होणार आहे. महाराष्ट्र स्थापनेला 67 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचा हा कौतुकाचा सोहळा आहे. अशा स्थितीत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र किती “दीन” दुबळा करून ठेवला आहे. याच प्रात्यक्षिकही एक मे रोजी दाखवण्याचा मानस पोलीस यंत्रणेने ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.
चौसाळा शहराजवळील एका गावातील 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी सुरज पंजाब झोडगे याने पळवून नेली. याप्रकरणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी एफ आय आर क्र. 0054/26 नुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात दोन अडीच महिन्याचा कालावधी उलटला असला तरी संबंधित मुलगी पोलिसांना सापडली नाही. शेवटी हतबल झालेल्या मुलीच्या पालकांनी एक मे रोजी आंदोलनाचा इशारा दिला. इशारा देऊनही काहीच फरक पडला नाही. फरक कसा पडेल ? या प्रकरणात नेकनूर पोलीस ठाण्याचे फौजदार चंद्रकांत गोसावी आणि जमादार सचिन मुरूमकर यांनी आरोपी सुरज झोडगे च्या नातेवाईकांकडून पैसे खाऊन पाठीशी घातल्याचा आरोप पीडित कुटुंबाने निवेदनात केला आहे. कमीत कमी महिला पालकमंत्री असताना महाराष्ट्र दिनासारखा आनंदोत्सवाचा सोहळा असताना न्याय मिळेल अशी भाबडी आशा पालकांना आहे. पण सध्याची नेकनुर पोलिसांची भूमिका “खलरक्षणाय सद् निग्रहणाय”असताना कारवाई होणार कशी शेवटी “मेहुणी बायको मिंधा संसार” ही म्हण उगाच प्रचलित झाली नाही. पालकांनी पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात चंद्रकांत गोसावी मुरूमकर यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे. मात्र पोलीस अधीक्षकांच्या लाडक्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार कशी असा प्रश्न देखील जनतेतून विचारला जात आहे.
काहीही असो निवेदन देऊनही पोलीस यंत्रणेला घाम फुटला नाही. पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही. महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर तेही नवनियुक्त झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या तथा बीडच्या पालकमंत्र्यांच्या गाडीवर नासके टमाटे फेकूच द्यायचे बीडचा नावलौकिक करायचाच असा चंग नेकनूरच्या पोलीस यंत्रणेने बांधल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.




