पाथर्डी – कोणी आपल्यावर दोष ठेवला किंवा द्वेष केला तरी आपण मात्र कोणाला दोष देऊ नये आणि कुणाचाही द्वेष करू नये, कारण नियती सर्वांचा हिशोब योग्य प्रकारे करत असते, असे विचार माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

श्रीक्षेत्र भगवानगड यांच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथे आयोजित अखंड नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते.
भगवानगड ही भक्ती, शक्ती आणि विश्वासाची परंपरा जपणारी पवित्र भूमी आहे. लाखो ऊसतोड कामगार आपल्या उत्पन्नातून देणगी देऊन या गडाची परंपरा टिकवून ठेवतात. संत भगवान बाबांनी घालून दिलेली ऐश्वर्यसंपन्नतेची परंपरा आजही कायम राखली जात असून, सध्याचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली ती अधिक बळकट होत असल्याचे मुंडे यांनी नमूद केले.
भगवानगड हे ऊर्जा आणि प्रेरणेचे केंद्र असून, येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सकारात्मक ऊर्जा मिळते, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास महंत कृष्णा महाराज शास्त्री, राधाताई सानप, खासदार निलेश लंके, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार बाळासाहेब आजबे, ॲड. प्रताप ढाकणे, प्रा. लक्ष्मण हाके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी बडेवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी धनंजय मुंडे यांची भव्य मिरवणूक काढून फुलांची उधळण करत उत्स्फूर्त स्वागत केले.
📍 उमापूर येथे नारायणगडालाही भेट
दरम्यान, बडेवाडी येथे जाण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील उमापूर येथे श्रीक्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताह सांगता कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी महंत शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

