मदुराई (तामिळनाडू) — देशभरात खळबळ उडवणाऱ्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात ऐतिहासिक निकाल देत मदुराई प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय यांनी तब्बल 9 पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना भारतात पहिल्यांदाच घडली असून पोलीस अत्याचाराविरोधातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
📌 काय आहे प्रकरण?
2020 मध्ये तूतीकोरिन (थुथुकुडी) जिल्हा येथील साथनकुलम पोलीस ठाण्यात लॉकडाऊनदरम्यान पी. जयराज (51) आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स (31) यांना अटक करण्यात आली होती. दुकान उघडे ठेवल्याचा आरोप करत त्यांना ताब्यात घेतले गेले होते.
मात्र, पोलीस कोठडीत त्यांच्यावर अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप झाला. गंभीर जखमांमुळे काही दिवसांतच दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

🔍 तपास आणि पुरावे
या प्रकरणाचा तपास नंतर केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) कडे सोपवण्यात आला. तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या—
पोलिसांकडून मारहाणीचे पुरावे,स्टेशनमधील रक्ताचे डाग, CCTV फुटेज हटवण्याचा प्रयत्न,
महिला कॉन्स्टेबलची महत्त्वाची साक्ष
⚖️ न्यायालयाचा निर्णय
सहा वर्षांच्या सुनावणीनंतर मार्च 2026 मध्ये सर्व आरोपी दोषी ठरले. अखेर 6 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाने हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट करत नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने हे प्रकरण “पोलीस अत्याचाराचे गंभीर उदाहरण” असल्याचे नमूद केले आणि कठोर शिक्षा देत ठोस संदेश दिला.
🔗अशी आहेत आरोपींची नावे
पोलीस कोठडीत दोघांचा मृत्यू झाल्या प्रकरणात तपास सुरू असताना एका पोलिस उपनिरीक्षकाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला.पो.निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, के. बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन, ए. समिदुराई आणि कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस आणि एस. वेलुमुथू अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
🇮🇳 देशभरात प्रतिक्रिया
या निकालाचे मानवाधिकार संघटनांकडून स्वागत करण्यात आले असून, कोठडीतील मृत्यूंविरोधात मोठी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

