Friday, February 13, 2026

स्व. अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी कटिबध्द — पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार

जिल्हा नियोजन समितीची भावूक वातावरणात सभा

सन 2026- 2027 चा आराखडा सभागृहात सादर

बीड —  जिल्ह्याचा पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीसारखा विकास करण्याचे स्वप्न उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी उराशी बाळगले होते. त्यांच्या या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी सर्व अधिका-यांनी व यंत्रणेने काम करावे असे भावनिक आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केले. या बैठकीत सन 2026-2027 चा आराखडा सादर करण्यात आला व चालू आर्थिक वर्षाच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षात 575 कोटींचा नियतव्यय प्राप्त असून यातील 565 कोटी 41 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

आज दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे झालेल्या या बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, यांची मुंबईतुन तर खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती. समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मुंबईत याबाबतचे सादरीकरण केले. जिल्ह्याचे पालक सचिव विजय वाघमारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यावेळी उपस्थित होते.

बैठकीत प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा परिचय देणारी चित्रफित दाखवण्यात आली. माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी यावेळी शोकप्रस्ताव मांडला. याप्रसंगी सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
दुरदृश्य प्रणालीव्दारे जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांची उपस्थिती होती. अत्यंत भावूक वातावरणात झालेल्या या सभेस बीड येथील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाणे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना बीड जिल्हयाविषयी विशेष ओढ होती. या जिल्हयाचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. जिल्ह्याचा विकास करण्याचे त्यांचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिका-यांनी एकदिलाने आणि प्रमाणिकपणे काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी या प्रसंगी केले. त्यांची विकासगंगा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे त्या म्हणाल्या.

यावेळी कामकाजाचा आढावा सादर करताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, सन 2025-2026 साठी मंजूर नियतव्यय सर्वसाधारण गटासाठी 575 कोटी रूपये इतका आहे. यातील 565 कोटी 41 लक्ष रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून 199 कोटी 64 लक्ष इतकी रकम खर्च झाली आहे. हे प्रमाण नियतव्ययाच्या 34.72 टक्के इतके आहे.

अनूसुचित जाती योजनेंतर्गत 129 कोटी नियतव्यय असून प्रशासकीय मान्यता 81 कोटी 57 लक्ष आहे. हे प्रमाण 52.20 टक्के इतके आहे.
जिल्हा वार्षिक योजना ओटीएसपी अंतर्गत 2 कोटी 39 लक्ष रुपये निधी प्राप्त झालेला असून 2 कोटी 19 लक्ष रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 61 लक्ष रुपये खर्च झालेले आहे. खर्चाची टक्केवारी 25.69 टक्के इतकी आहे.

या बैठकीत सन 2026-2027 चा प्रारुप आराखडा सादर करण्यात आला. यंदा नियोजन विभागातर्फे 481 कोटी 62 लक्ष कमाल आर्थिक नियतव्यय निर्धारित करुन दिला आहे. त्यानुसार आराखडा नियोजन करण्यात आला असून आज तो बैठकीत सादर झाला. यानंतर जिल्हयाच्या वतीने दुपारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तर बैठकीत तो सादर करण्यात आला. यात अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीने केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles