बीड — तालुक्यातील पालवन परिसरातील ‘ सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आज बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे डोंगरावरील हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीवर या आगीमुळे अक्षरशः पाणी फेरलं गेलं आहे. आज सायंकाळच्या सुमारास पालवन डोंगर रांगेत अचानक धुराचे लोट दिसू लागले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच या आगीने संपूर्ण सह्याद्री देवराई प्रकल्पाला वेढले. ही आग इतकी भीषण होती की, दुरूनच आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत होता. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने वन विभागाला याची माहिती दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ताफा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक ग्रामस्थ आणि वन कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, वाळलेले गवत असल्यामुळे आग विझवण्यात मोठे अडथळे येत आहेत.

